ब्रेकिंग
स्मार्ट मीटर सक्ती विरोधात वीज ग्राहकांनी जागरूक रहावे.  सुस्थितीत असलेल्या वीज मीटर बदलण्याची सक्ती थांबवा     ग्राहकांना निवडीचा अधिकार: अखिल भारतीय ग्राहक पंचायत 

 

अमळनेर:- महावितरण कडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत एसएमएस व इतर माध्यमातून सूचना दिल्या जात असून ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुस्थितीत असलेले अचूक रीडिंग देणारे विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केली आहे.

                वीज ग्राहक हा सेवाग्राही असून त्याला योग्य माहिती, पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. वीज कायदा 2003, ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि संविधानिक अधिकारांचा विचार करूनच कोणतेही प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असे औटी यांनी सांगितले.

     वीज ग्राहकांनी काय करावे ?

 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, आपले सध्याचे मीटर व्यवस्थित चालू असेल व योग्य रीडिंग घेत असेल तर त्याची नोंद ठेवावी. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी महावितरण कडून लेखी माहिती व स्पष्टीकरण मागावे. कोणतेही सक्ति किंवा दबाव निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करावा ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे व कोणतीही कारवाई कायदेशीर मार्गाने करावी.

 ” महावितरणच्या भूमिकेबाबत ग्राहक पंचायतीची भूमिका “

 स्मार्ट मीटर तंत्रज्ञानाबाबत ग्राहकांना योग्य माहिती, सुरक्षा व्यवस्था, तपासणी सुविधा, डेटा संरक्षण आणि भविष्यातील आर्थिक परिणाम याबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करता सक्तीची प्रक्रिया राबविणे योग्य नाही. विशेषतः स्मार्ट मीटर नातवृत्त झाल्यास त्याची निष्पक्ष तपासणी करण्यासाठी मान्यता प्राप्त प्रयोगशाळा पारदर्शक व्यवस्था आणि ग्राहक संरक्षणाची हमी आवश्यक आहे.

    ” विजय ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे ही ग्राहक पंचायतीची भूमिका आहे. तंत्रज्ञानाला विरोध नाही, मात्र ग्राहकांच्या संमतीशिवाय व पुरेशी माहिती न देता कोणतीही सक्ती मान्य केली जाणार नाही. ग्राहकांच्या हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्यात येईल “

            अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व वीज ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी घाबरून न जाता जागरूक राहावे आपल्या हक्कांची माहिती घ्यावी आणि कोणती अडचण आल्यास ग्राहक संघटनेची संपर्क साधावा.

 

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले उत्तरकार्य; दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, उपस्थितांना ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट

 

धरणगाव प्रतिनिधी : 

धरणगाव : वैयक्तिक दुःखालाही समाजजागृतीची दिशा देत धरणगावातील वाघ परिवाराने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व आबासाहेब राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत विवेक, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची धरणगावसह परिसरात मोठी चर्चा होत असून, विविध स्तरांतून वाघ परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. 

     कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणत साधेपणा, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीती, कर्मकांडशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर सकारात्मक ठसा उमटविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ” महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडापेक्षा मानवसेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन हाच खरा धर्म आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”

 यावेळी आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्या श्रद्धाच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.

पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सत्यशोधक विचारांची परंपरा जपली असून, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” ह्या उक्तीनुसार वाघ परिवाराचे निरंतर कार्य असून, श्रद्धाच्या स्मृतीतून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे सांगत ॲड. महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

     कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे उपस्थित सर्वांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक १०० ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. वाचनसंस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 

     याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड. व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी. एम. पाटील, नगरसेवक विनय भावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, भूषण धनगर, महेंद्र तायडे, भरत शिरसाठ, गुलाब महाजन, हरी महाजन, महेंद्र महाजन, राहुल रोकडे, रामकृष्ण चौधरी, गोरख देशमुख, हेमंत माळी, कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, मयुर भामरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, विवेकवाद, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता समाजाला नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास   न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण 

 

अमळनेर :- येथील न्यायालयाच्या आवाराबाहेरील अतिक्रमण नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले होते त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयाच्या परिसरातील अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले असून या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

               न्यायालयाच्या बाहेर आणि परिसरात टपरीधारक, डिजिटल बॅनर, कपडे, बूट चप्पल विक्रेते, पाणीपुरी वाले इत्यादींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले होते ज्याला वाटेल तो न्यायालयाच्या बाहेर व्यवसाय थाटत होता त्यामुळे या परिसरात वादही होत असत तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती.

                अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाबाहेरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. जून महिन्यात दिवाणी न्यायाधीशांनी पालिकेला पत्र देऊनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छा. वा. पाटील यांनी नगरपालिकेला पत्र दिले आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अतिक्रमण विभागाला आदेश दिले. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, संजय बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, राम राम राजे, विशाल सपकाळे, दर्शन बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढले.

 *नगरसेवकांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न अयशस्वी*

         अतिक्रमण काढताना काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून अतिक्रमण विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाचा आदेश पाहून त्यांना तोंडघशी पडावे लागले. शहरातील काही प्रभागांमध्ये नगरसेवकच स्वतः अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देत असून मन मानेल त्या ठिकाणी टपऱ्या, हातगाड्या लावल्या जात आहेत त्यामुळे नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागावर दबाव न टाकता शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 

अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देणारे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’ उभारण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने रु. १ कोटी ५० लाख ३६ हजार ७८८ इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली असून, ८ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी शासनाकडून रु. ७५ लाख १८ हजारांचे (५० टक्के) अनुदान उपलब्ध होणार असून, उर्वरित निधी बाजार समितीकडून उभारला जाणार आहे.

राज्यात ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकरी भवन उपलब्ध नाही किंवा विद्यमान इमारती जीर्ण अवस्थेत आहेत, अशा ठिकाणी “राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन” उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना शासनाने हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचा प्रस्ताव मंजूर झाल्याने तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शासन निर्णयानुसार मंजूर झालेल्या एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदानाची रक्कम दोन समान हप्त्यांत वितरित करण्यात येणार आहे. निविदा प्रक्रियेनंतर मंजूर होणारी रक्कम प्रशासकीय मंजुरीपेक्षा कमी असल्यास, त्या मंजूर निविदा रकमेच्या ५० टक्के इतकेच शासन अनुदान देण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी भवनाच्या बांधकामापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता (स्थापत्य) यांच्याकडून तांत्रिक मान्यता घेणे बंधनकारक राहणार आहे. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार निविदा प्रक्रिया राबवून कार्यारंभ आदेश दिले जातील. बांधकामाचा प्रगती अहवाल वेळोवेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांच्याकडे सादर करण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

प्रशासकीय मान्यता मिळाल्यापासून एका वर्षाच्या आत हे बांधकाम पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. तसेच शेतकरी भवनाचा देखभाल-दुरुस्ती खर्च, वीज, पाणी, मनुष्यबळ व इतर सर्व खर्च संबंधित बाजार समितीनेच उचलायचा असून, त्यासाठी शासनाकडून कोणताही अतिरिक्त निधी मिळणार नाही.

या शेतकरी भवनासोबत ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भोजन योजना’ देखील राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रति भोजन ४० रुपयांचे अनुदान मिळणार असून, बाजार समितीच्या सहभागातून शेतकऱ्यांना केवळ नाममात्र ५ रुपयांत भोजन उपलब्ध होणार आहे. याशिवाय शेतमाल विक्रीसाठी येणाऱ्या शेतकरी पुरुष, महिला तसेच हमाल-मापाडी यांच्यासाठी मुक्काम, विश्रांती आणि आवश्यक मूलभूत सुविधांचीही व्यवस्था या भवनात करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील मोजक्याच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना या योजनेचा लाभ मिळाला असून, त्यामध्ये अमळनेरचा समावेश झाला आहे. पणन मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या विशेष सहकार्यामुळे तसेच खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजूर झाल्याचे सांगण्यात आले.

याबाबत समाधान व्यक्त करताना अशोक आधार पाटील, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, अमळनेर यांनी सांगितले की, *”सातत्यपूर्ण तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या दीड कोटींच्या शेतकरी भवनामुळे बाजार समितीत येणाऱ्या गोरगरीब, कष्टकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुक्काम, विश्रांती, भोजन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचा आनंद आहे. या कामासाठी पणन मंत्री ना. जयकुमार रावल, खा. स्मिताताई वाघ आणि आ. अनिलदादा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.”

या प्रकल्पाबद्दल सभापती अशोक पाटील, उपसभापती सुरेश पाटील तसेच संचालक मंडळाने महाराष्ट्र शासनाचे आभार मानले असून, लवकरच या महत्त्वाकांक्षी शेतकरी भवनाच्या उभारणीला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Read More अमळनेर बाजार समितीत तब्बल दीड कोटींचे ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन’; शासनाची प्रशासकीय मान्यता, ७५.१८ लाखांचे अनुदान मंजूर

“एक पेड माँ के नाम” उपक्रमातून हरित अमळनेरचा संकल्प; रोटरी क्लबच्या वृक्षारोपण अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमळनेर | प्रतिनिधी

वन महोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देत रोटरी क्लब अमळनेर यांच्या पुढाकाराने “एक पेड माँ के नाम” वृक्षारोपण अभियान २०२६ मोठ्या उत्साहात पार पडले. वृक्षसंवर्धन, हरित अमळनेर आणि पर्यावरण संरक्षणाचा संकल्प करत विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रोटरी क्लब अमळनेर, अमळनेर नगर परिषद, महिला हाऊसिंग ट्रस्ट अमळनेर, पर्यावरण सखी आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रो. अजयभाऊ केले यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल श्रीमती सुनीता धनगर, वनरक्षक श्रीमती अलका पाटील आणि वनरक्षक जगदीश ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत हरित भविष्यासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी रो. अजय केले यांच्या धर्मपत्नी सौ. विनिता अजय केले यांच्या वाढदिवसानिमित्त केकऐवजी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण म्हणजे डॉक्टर शिबी वशिष्ठ यांनी आपल्या सुप्रसिद्ध “भाग्यश्री” या शेळ्यांच्या लेंड्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत वृक्षांच्या संगोपनासाठी भेट दिले. हे सेंद्रिय खत वृक्षांची वाढ अधिक जोमदार व निरोगी होण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी बोलताना रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. महेश पाटील आणि सचिव रो. प्रशांत निकम यांनी “एक पेड माँ के नाम” हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली. प्रोजेक्ट चेअरमन रो. अजय केले आणि रो. आशिष चौधरी यांनी प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.

या अभियानात विवेक देशमुख, अजय रोडगे, कीर्तिकुमार कोठारी, दिनेश रेझा, प्रतीक जैन यांच्यासह रोटरी क्लबचे सदस्य, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

“एक झाड लावूया… पर्यावरण वाचवूया!” हा प्रेरणादायी संदेश देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. समारोपानंतर सर्व उपस्थितांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.

पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

 

अमळनेर :- शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसर तसेच संपूर्ण अमळनेर शहरावर शोक कडा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

                मृत पावलेल्या मुलांची नावे अनुक्रमे मानव बंटी रत्नांनी, कार्तिक विकी उधवानी, आणि दिनेश विजय पंजवानी अशी आहेत. आज दुपारच्या सुमारास हे तिघेही मित्र खदानित एकत्र पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज आहे.

               घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये दैदिप्यमान कामगिरी; विद्यार्थ्यांनी उंचावला अमळनेरचा मान

 

अमळनेर | प्रतिनिधी

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा या दोन्ही प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेसह संपूर्ण अमळनेर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी यश मिळवत उत्तीर्णतेची नोंद केली. विशेष म्हणजे पाटील आरव विठ्ठल (इयत्ता ५ वी) व भामरे श्रावणी हेमंत (इयत्ता ५ वी) हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

याचबरोबर इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत देखील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी भामरे श्रावणी हेमंत हिने राज्यात १६ वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व ₹१००० ची रोख पारितोषिक रक्कम शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच यश चौधरी (इयत्ता ५ वी) यालाही ऑलिम्पियाड परीक्षेतील यशाबद्दल स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी, पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही. एस. अमृतकर, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, एस. एस. पारधी तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन, परिश्रम आणि सहकार्य लाभले.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत शाळेचा आणि अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) चे शहर सरचिटणीस आप्पासाहेब चिंधु वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

 

अमळनेर :- येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे ओंकार वानखेडे , यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. बी एस पाटील यांच्या हस्ते वानखेडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आबासाहेबांनी वानखेडे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच सामाजिक व राजकीय कार्यात यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.

             या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी एस पाटील, उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर, शहर कार्याध्यक्ष जाकिर शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष मकसूद पठाण , लोकजागर न्यूजचे संपादक हृदयनाथ मोरे, पत्रकार संदीप सोनवणे, अजय भामरे, तसेच सिद्धार्थ सोनवणे, मारुती दादा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेरचे आध्यात्मिक वैभव आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आता शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने आणि राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने मंदिराचे भव्य-दिव्य नवनिर्माण करण्यात येईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मंदिर परिसराच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.

मंदिराला भेट दिल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी थेट भडगाव येथे वारीमध्ये सहभागी होत परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेतली. यावेळी मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मंदिराचे विश्वस्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रद्धास्थानाचे वैभव पूर्ववत करण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर पाठपुरावा

मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिर हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र स्थळाचे नवनिर्माण अत्याधुनिक सुविधा आणि पारंपरिक वास्तुशैली जपत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विश्वस्त मंडळासोबतही पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. दुर्घटनेच्या वेळी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आमदारांनी अग्निशमन विभागाचे विशेष कौतुक केले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत प्रसाद महाराजांशी थेट संवाद; पुनर्बांधणीसाठी शासनाची ठाम भूमिका

दुर्घटनेमुळे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना या घटनेमुळे दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधताना दिली.

भडगाव येथे आमदार अनिल पाटील हे महाराजांच्या भेटीस गेले असताना त्यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराजांशी थेट संवाद साधत शासनाची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांकडे ₹१५ कोटींच्या विशेष निधीची मागणी

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधिमंडळातही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपत्कालीन निधीची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन या विषयावर सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर परमपूज्य संत प्रसाद महाराज म्हणाले, “साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो वारकरी भक्तांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नाही. मंदिराचे वैभव पूर्ववत उभे राहील, असा पूर्ण विश्वास आहे.”

महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील दिंडीकडे मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा

अमळनेरकरांना शुद्ध पाण्याची मोठी भेट! वर्षानुवर्षे प्रलंबित जलकुंभ स्वच्छतेचा धडाका; नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेच्या कामाला अखेर वेग आला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून जलकुंभ स्वच्छतेची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभाची यशस्वी साफसफाई पूर्ण करण्यात आली असून, आता तांबेपुरा येथील जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. यानंतर शहरातील उर्वरित सर्व जलकुंभ टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ

शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या मोहिमेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांची ‘आरोग्य प्रथम’ भूमिका

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलकुंभ स्वच्छता मोहिमेस तातडीने मंजुरी दिली. “शहरवासीयांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही,” या भूमिकेतून त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत कामाला गती दिली.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे नियोजन

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवत जलकुंभ स्वच्छतेचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

दिलेला शब्द पाळला; कैलास नामदेवराव पाटील यांच्यावर नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव

नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व जलकुंभांची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी प्रथम कोर्टमागील जलकुंभाची साफसफाई पूर्ण केली आणि आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून दिलेला शब्द खऱ्या अर्थाने पाळला आहे.

तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे स्वागत करत जाहीरपणे आभार व्यक्त केले. “काम असावे तर असे!” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

जलस्रोतांच्या नियमित स्वच्छतेमुळे शहरवासीयांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नगरपरिषदेची ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.