आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 14 hours ago
द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने भाविक मंत्रमुग्ध; २० योगवर्गांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने विठूरायाच्या दर्शनासाठी भव्य व शिस्तबद्ध वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार सादर करणाऱ्या या वारीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या वारीचे आयोजन जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे मॅडम आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शनिवार, दि. २६ जुलै, रोजी पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकूरोड, अमळनेर येथून वारीला प्रारंभ झाला.
वारी जिजाऊ गेट, बसस्टॅण्ड, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत संत सखाराम महाराज वाडी येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.
या वारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली दिंडी, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, पालखी, विठ्ठलाची मूर्ती तसेच प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील सहभागी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात वारी पोहोचली. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने आकर्षक आणि भक्तिमय रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.
वारीची सांगता रत्ना भदाणे ताई यांच्या हस्ते भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूंचे गोड प्रसाद वितरण करून करण्यात आली. या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक तसेच योग संघटन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
वारीमध्ये योगशिक्षक, साधक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही वारी विशेष लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे एकूण २० योगवर्गांनी या भव्य वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.



आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले पूजन
अमळनेर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण अमळनेर नगरी शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतच्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तीभाव अर्पण केला.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले. मंत्रोच्चारात भगव्या पताकेला वंदन करून त्यांनी दिंडीला खांदा दिला. यानंतर हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिरात पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पहाटेपासूनच विठ्ठलनामाचा अखंड गजर
पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा वारकरी संदेश या दिंडीतून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
पुष्पवृष्टीने दिंडीचे जल्लोषात स्वागत
दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे नागरिकांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार आणि पुढे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हणत, फुगडी खेळत भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.
संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा
आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हता, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात विठ्ठलभक्ती जागवणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळवणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा ठरली.



“एआय हेच भविष्य; तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर मागे पडू” – आमदार अनिल पाटील प्रताप महाविद्यालयात ‘स्व. अजितदादा पवार’ जयंतीनिमित्त एआय तंत्रज्ञान पुरस्कार सोहळा; आदर्श शेतकरी व विद्यार्थ्यांचा गौरव
अमळनेर (प्रतिनिधी):
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी आणि अद्ययावत माहितीचे माध्यम असून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचे महत्त्व वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता एआयचे प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा भविष्यात स्पर्धेत मागे पडण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांनी केले.
AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते. प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिल पाटील, आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी.मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी एआय प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तृत आढावा मांडत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सी.ए. नीरज अग्रवाल आणि विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.
आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना बँकिंग किंवा ई-मेलचे पासवर्ड कुठेही शेअर करू नयेत, असा सल्ला दिला. एआयच्या माध्यमातून इंटर्नशिप, प्रकल्प आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक विद्यार्थ्याने एआयचा वापर शिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जळगावच्या प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पंडित पाटील, सहचिटणीस प्रा. व्ही. बी. मांटे, माहिती व तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.
“चॅट जीपीटीसह एआयचा वापर अपरिहार्य”
मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, आज प्रशासन, शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. चॅट जीपीटीसारख्या आधुनिक माध्यमातून अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असून एआयचा वापर करता आला नाही तर आपण शेवटच्या क्रमांकावर राहू. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे. सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही एआयचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम आणि सक्षम कशी करता येईल, याचा विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
‘आदर्श कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार प्राप्त शेतकरी :
प्रकाश बडगुजर (गलवाडे)
श्रीमती लिलाबाई ठाकूर (साळवे)
किशोर पाटील (गांधली)
बापूसाहेब देवरे (वलवाडी उपनगर, धुळे)
शरद सोनवणे (धरणगाव)
एआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही गौरव
AI प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सन्मानित विद्यार्थी :
जयश्री वासुदेव पाटील
पूनम राहुल चौधरी
हर्षल महेंद्र नेरकर
कल्याणी कैलास बडगुजर
फाल्गुनी आनंदा महाजन
रिंकू अनिल साळी
भूमिका रितेश जैन
मयुरी किशोर पवार
वैष्णवी विलास पाटील
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी HAL कौशल्य रथच्या प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.
यावेळी प्राचार्य डॉ. एस. जे. शेख (अमळनेर), प्रा. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, प्रा. नलिनी पाटील, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. जितेंद्र पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.




