महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
नगराध्यक्षांच्या कन्येने पंतप्रधानांना पाठवली राखी नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राद्वारे अरुश्री चे कौतुक
अमळनेर : रक्षा बंधन म्हणजे रक्षण करण्यासाठी बांधलेला वचनाचा ,हमीचा प्रेमाचा धागा. अमळनेर येथील नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांची कन्या कु अरुश्री हिने देशाच्या नागरिकांचे आणि बालकांचे रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली आणि नरेंद्र मोदी यांनी देखील चिमुकलीच्या राखीला पत्राने उत्तर देत सुरक्षित ,सुखी जीवनाची हमी देत तिचे कौतुक केले आहे.
शुद्ध बीजा पोटी फळ रसाळ गोमटी,सामाजिक बांधिलकी जोपासत निरपेक्ष भावनेने अव्याहतपणे *वैद्यकीय क्षेत्रात सेवारत असलेले लोकनियुक्त नगराध्यक्ष प्रतिथयश हृदय रोग* तज्ञ डॉ.परिक्षीत श्रीराम बाविस्कर व डॉ.सौ.स्वाती परीक्षित बाविस्कर यांची कन्या *रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल* मधील *इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी कु.अरुश्री परिक्षीत बाविस्कर* या
विद्यार्थिनीने राष्ट्रनेते, लाडके प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांना जनसेवा,राष्ट्र कल्याणार्थ उदंड, निरामय आयुष्य चांगले आरोग्य मिळो या करिता पवित्र सण रक्षा बंधनाच्या पावन पर्वावर रक्षा सूत्र (राखी, शुभपत्र)पाठवले होते , कु. अरुश्री हिचे पत्र व राखी नवी दिल्ली येथील प्रधानमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने नुकतेच राष्ट्रनेते लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष पत्र पाठवून कौतुक करत आभार मानले तसेच
आपल्या देशाच्या मुली,विद्यार्थिनी विकसित भारताच्या योगदानात सहभाग देत असून क्रीडा, कौशल्य,शिक्षण तसेच विज्ञान,तंत्रज्ञान मध्ये चमक दाखवत असून मुली महिला राष्ट्रकल्याणात योगदान स्वयंस्फूर्त करत आपल्या शक्तीचा परिचय देत असल्याचे सांगून कौतुक केले आहे. विकसित भारत निर्माणकरिता “शक्तीच्या सप्तधारा” माध्यमातून उत्पादन , कृषी , तंत्रज्ञान ,नवे विचार , गतिशक्ती , रक्षण , ग्रीन ब्ल्यू उत्पादन सांस्कृतिक शक्तीच्या नव्या उर्जेशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. मला विश्वास आहे की आपण आपल्या प्रयत्नाने आणि योगदानाने बदलत्या भारताच्या प्रवासात योगदान देईल आपल्या उत्तम स्वास्थ्य आणि भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा असेही पत्रात म्हटले आहे.
अमळनेर पत्रकार संघ व तेरापंथ युवक परिषदेतर्फे आज भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्याला प्रोत्साहनपर मिळणार ट्रॉली बॅग भेट
अमळनेर :-अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ आयोजित व अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद प्रस्तुत व आचार्य श्री महाश्रमण जी यांच्या प्रेरणेने अमळनेरात आज भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…”आणि “थेंब तुमचा जीवन त्यांचे – रक्तदान ही सर्वोत्तम सेवा… मानवतेचा खरा उत्सव” या संदेशासह हे शिबिर होणार आहे.सदर शिबीर दिनांक आज १७ सप्टेंबर २०२६ (गुरुवार) रोजी
१) तेरापंथ भवन,न्यू प्लॉट,अमळनेर व २) प्रताप कॉलेज,व इच्छादेवी चौक अमळनेर येथे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.
विशेष म्हणजे या शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग भेट देण्यात येणार आहे.”रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती मोठा फरक!” हा यामागचा उद्देश असून सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज, उज्ज्वल भविष्य आणि नवीन जीवन हा संदेश देण्यात आला आहे.
तरी जास्तीतजास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ,तेरापंथ युवक परिषद, अमळनेर व शिबिराचे सहयोगी असलेले रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर,न्यू प्लॉट परिसर विकास मंच आणि जैन सोशल ग्रुप,जय बजरंग व्यायाम शाळा अमळनेर आदींनी केले आहे.
नवीन मालमत्ता कर आकारणीवरून अमळनेरकरांच्या हक्काचा सवाल! ‘कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करा’; नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा — सोमचंद संदानशिव
अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या कर आकारणीसंदर्भात सध्या टी.पी. विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरकर नागरिकांनी केवळ सुनावणीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कर आकारणी प्रक्रियेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेऊन आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेमार्फत निविदेच्या माध्यमातून अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पद्धत, मोजणीचे निकष, कर निर्धारणाची गणना तसेच नागरिकांवर आकारण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासण्याची गरज असल्याचे सोमचंद संदानशिव यांनी स्पष्ट केले आहे.
सुनावणी सुरू; मात्र नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार का?
सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये नागरिकांना नेमकी किती सवलत मिळणार, कर आकारणीत कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आणि पूर्वी आकारण्यात आलेल्या कराचे पुनर्मूल्यांकन होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ सुनावणी घेऊन विषय संपविण्याऐवजी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची निविदा, कार्यपद्धती, मोजणीचे निकष आणि कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे तपासण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
मूलभूत सुविधा अपुऱ्या, मग कराचा वाढता बोजा कशासाठी?
विशेषतः शहरातील विविध कॉलनी परिसरांमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे. एका बाजूला आवश्यक नागरी सुविधा अपुऱ्या असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा बोजा पडत असल्यास, या कर आकारणीचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते!’
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते,’ असा इशारा देत सोमचंद संदानशिव यांनी अमळनेरकरांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे. कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची तसेच संबंधित निविदेची सखोल चौकशी करण्यात यावी. आवश्यक असल्यास सदर कामाचा फेरविचार करून नगरपरिषदेच्या सक्षम कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करावी आणि त्यानंतर पारदर्शक, वस्तुनिष्ठ व नियमानुसार कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिक समिती स्थापन करून लोकशाही मार्गाने आंदोलनाची गरज
या प्रश्नावर नागरिकांची समिती स्थापन करून सर्व करदात्यांना विश्वासात घेत लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. बाह्य संस्थेला देण्यात आलेल्या कामाचा खर्च अखेरीस नागरिकांच्या पैशातूनच होणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत अमळनेरकरांनी जागरूक राहून प्रशासनाला प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा प्रश्न कोण्या एका व्यक्तीचा नसून शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वस्तुनिष्ठ माहिती जाणून घ्यावी आणि अन्यायकारक वाटणाऱ्या कर आकारणीविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवावा,” असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.

