लोकवर्गणी व पाणीपट्टीवरील २% व्याजाविरोधात ग्राहक पंचायत पुन्हा आक्रमक; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम स्कूल चा 49 वा स्थापना दिवस उत्साहाच्या आनंदाच्या वातावरणात साजरा करीत संपन्न
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 2 days ago
भंते नागसेन यांच्या नेतृत्वात जळगाव ते धुळे लांडोर बंगला ‘ भीमस्मृती धम्म पदयात्रा ‘
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची महाराष्ट्र राज्य पीटीए क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड साई इंग्लिश अकॅडमीच्या संचालकांवर राज्यस्तरीय जबाबदारी; शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल, अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा
अमळनेर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अमळनेरने पुन्हा एकदा राज्यस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य ही राज्यातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून हजारो कोचिंग क्लासेस संचालक या संघटनेचे सभासद आहेत. कोचिंग क्लासेस क्षेत्रातील विविध प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, संस्थाचालकांचे हित आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.
संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भैय्यासाहेब मगर यांच्यावर कार्याध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही निवड उत्तर महाराष्ट्रासह अमळनेरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, प्रशासकीय अनुभवाचा आणि शैक्षणिक योगदानाचा लाभ आता राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालकांना मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.
या मानाच्या निवडीनंतर भैय्यासाहेब मगर यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.



तणावमुक्त जीवनशैलीच निरोगी आरोग्याचा पाया; सकारात्मक विचार व सात्त्विक आहाराची गरज : हेमंतकुमार भदाणे श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसची जिल्हास्तरीय कार्यशाळा; जळगाव जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती
अमळनेर : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच बदलती आहारशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि मानसिक तणाव यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, सात्त्विक आहार, नियमित दिनचर्या आणि मानसिक संतुलन यांचा अंगीकार केल्यासच निरोगी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले.
येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. १८ जुलै रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत उपस्थितांना दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.
यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच मंदिरामार्फत समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील पूजाविधी, धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्रीताई पाटील, श्रीमती प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सौ. वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती प्रीतीताई देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



लायन्स क्लब अमळनेरचा सामाजिक पुढाकार ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप; ग्रामीण भागातील मातांना बसभाड्याचीही मदत
अमळनेर | प्रतिनिधी
तालुक्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येची दखल घेत लायन्स क्लब, अमळनेर यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. जून २०२६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अमळनेर तालुक्यात ३७ बालके तीव्र कुपोषित (SAM) आणि २१४ बालके मध्यम कुपोषित (MAM) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लबने पुढाकार घेत ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले.
शुक्रवारी (दि. १७) सकाळी जी. एस. हायस्कूल येथील लायन्स हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात प्रत्येक बालकाला २०० ग्रॅम प्रोटीन पावडर आणि राजगिरा लाडू देण्यात आले. विशेष म्हणजे, दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व मातांना लायन सुनील चौधरी यांच्या वतीने बसभाडे देऊन आर्थिक मदतीचाही हात पुढे करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद, जळगावचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, पंचायत समिती, अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संदीप जोशी, महेंद्र पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेमंतराव भदाणे यांनी कुपोषण ही केवळ उपचारांची नव्हे, तर सामाजिक आणि आरोग्यविषयक जाणीवेची समस्या असल्याचे सांगितले. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत माता व बालकाच्या पोषणाची विशेष काळजी घेणे, बालकांना पचनशक्ती वाढविणारा सकस आहार देणे आणि कुटुंब नियोजनाबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा सेवाभावी कार्यासाठी लायन्स क्लब, अमळनेरचे विशेष कौतुक करत समाजसेवेचा हा वसा अखंड सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले यांनी, “समाजातील वंचित, गरजू आणि गरजवंत घटकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. समाजसेवा हीच आमची खरी ओळख आणि परंपरा आहे,” असे सांगितले.
अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी लायन्स क्लब सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही देत गरजूंसाठी मदतीचे दरवाजे कायम खुले असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता पाटील यांनी मानले.
यावेळी सुनील चौधरी, दिनेश मणियार, चंद्रकांत महाजन, विजय पारख, प्रितेश पारख, जितेंद्र जैन, महावीर पहाडे, प्रदीप जैन, प्रकाश जैन, राज जैन, रोनक दोधिवाला यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.




