महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
शहापूर येथे वीज पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू
कळमसरे ता.अमळनेर :–प्रतिनिधी- शहापूर ता. अमळनेर येथील राकेश रतिलाल पाटील (वय -32) या तरुणाचा आज ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
शेतात आईसह मजूर कामाला असल्याने राकेशही शेती कामाला आलेला होता. ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाल्याने राकेश आपली मोटार सायकल (दुचाकी )रस्त्यावर लावण्यासाठी घाईने निघाला असताना त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.बाजूलाच निंबाच्या झाडाखाली मजूरासह राकेश आई व मजुर थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने राकेशच्या आईचा आक्रोश खूपच वेदनादायी होता.
राकेशच्या अंगावर पडलेल्या विजेचा फटका इतका जबरदस्त होता की त्याच्या अंगावरील कपडे तसेच बागायती रुमाल देखील जळल्याच निदर्शनास आले आहे.
दरम्यान राकेशला तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.शहापूर येथे सायंकाळी उशिरा सात वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राकेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून त्याच्या पच्यात आई -वडील, पत्नी दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.


नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजानेला तिलोत्तमाताई यांच्याकडून स्कूल बसची भेट; तसेच सरपंच सचिन पाटील यांच्याकडून ₹५० हजारांची देणगी
अंतुर्ली-रंजाने (ता. अमळनेर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाने शाळेला संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्या वतीने स्कूल बस भेट देण्यात आली. तसेच गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी ₹५० हजार रुपयांची रोख देणगी जाहीर करून शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.
अंतुरली रंजाने परिसरासह आसपासच्या भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी चालत यावे लागत होते, तर काहींना नियमित शाळेत उपस्थित राहणे कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळेला स्कूल बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
स्कूल बस भेटीमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी यावेळी शाळेला ₹५० हजारांची रोख मदत देत शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ दिले.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थ, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सचिव रवींद्र पाटील, सरपंच सचिन पाटील, संदीप धोबी, प्रदीप पाटील मुख्याध्यापक सुभाष पाटील, संजय भगतसिंग पाटील, महेंद्रचव्हाण, संदीप उघडे, जी. बी. पाटील, एम. आर. पाटील, बैसाणे मॅडम, साळुंखे मॅडम, नानाभाऊ, संजय पाटील, भगवान पाटील, वैशाली पाटील, भगवती पाटील, हितेश बडगुजर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही स्कूल बस आणि शाळेला मिळालेली आर्थिक मदत ही निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असून, अंतुर्ली-रंजाने परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


श्री मंगळग्रह मंदिरात आरोग्याबाबत जनजागृती विविध योगप्रकारांचा झाला सराव; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर
अमळनेर : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
शिबिराची सुरूवात योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच श्वसनक्रिया यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सहभागी सर्वांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा सराव केला.
यावेळी मार्गदर्शक बहिरम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो आणि व्यक्तीची एकाग्रता सुधारते. आधुनिक धावपळीच्या जीवनात वाढत्या ताणतणावामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रभावी उपाय ठरतो.
योगाच्या फायद्यांविषयी माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले, की नियमित योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे मजबूत होतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत राहते, सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
शिबिरात उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यास हातभार लागेल, असे मत व्यक्त केले.



