समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
स्वर अर्पण’मधून अमळनेरकरांना हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी १३ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रंगणार संगीताची अविस्मरणीय मैफल
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मेजवानी घेऊन स्वर ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत ‘स्वर अर्पण’ हा विशेष संगीत कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे रंगणार आहे. लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचा बहारदार नजराणा सादर करणाऱ्या या कार्यक्रमाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून अमळनेरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध भावछटांनी नटलेली गाणी, दमदार ऑर्केस्ट्राचे सादरीकरण, सुरेल गायन आणि नृत्याचा मनमोहक आविष्कार यामुळे ‘स्वर अर्पण’ कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.
या संगीत सोहळ्याचे आयोजन सुनील वाघ यांनी केले असून, कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी करुणा सोनार सांभाळणार आहेत. ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी साऊंड मॅनेजर विजय शुक्ला यांच्याकडे असून, नृत्यांगना पूजा आपल्या आकर्षक नृत्याविष्कारातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
या सुरेल मैफलीत शिवानी वाघ, ऋचा बिरारी, चंद्रकांत बी. आणि सिंगर मनोज वानखेडे आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणासोबतच ऑर्केस्ट्राची साथ आणि नृत्याची रंगत यामुळे रसिकांना संगीताचा बहुरंगी अनुभव मिळणार आहे.
‘स्वर अर्पण’ हा केवळ संगीत कार्यक्रम नसून, जुन्या-नव्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि संगीतप्रेमींच्या मनाला आनंद देणारा सुरेल अनुभव ठरणार आहे. अमळनेरकर रसिकांना आपल्या आवडत्या गीतांचा आनंद प्रत्यक्ष संगीत मैफलीत घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.
संगीताची आवड असलेल्या सर्व रसिकांनी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सुनील वाघ यांनी केले आहे.



विद्यापीठात वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी) — जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी या स्वयंसेवकांचा सहभाग होता.
वनराई बंधारा उभारणीची संकल्पना, त्याचे नियोजन, आवश्यक साहित्य, प्रत्यक्ष बांधकामाची पद्धत, पाण्याचा अडवणूक व साठवणुकीसाठी त्याचा उपयोग तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचे महत्त्व याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
या प्रसंगी प्रकूलगुरु डॉ एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजुदादा नन्नवरे, डॉ शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ प्रविण महाले, डॉ मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत दादा अमलकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे आणि आदित्य सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. वनराई बंधाऱ्यांसारख्या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती तसेच भूजलपातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ विजयकुमार वाघमारे आणि डॉ अनिता खेडकर यांनी सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत भविष्यात जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.



अमळनेरात केंद्र व राज्य सरकारविरोधात पेटवली क्रांतीची मशाल महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचा भव्य मशाल मोर्चा; शेतकरी, बेरोजगारी, महागाईसह विविध प्रश्नांवर सरकारला घेरले
अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात अमळनेर शहरात महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते
तिरंगा चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा सुभाष चौक, पाच कंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, ऍड. शकील काझी, रियाज मौलाना, चंद्रशेखर भावसार आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार तसेच स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग
या मशाल मोर्चात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. तीलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, योजना पाटील, आरती पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, मकसूद पठाण, एड. कौस्तुभ पाटील, प्राचार्य लीलाधर पाटील, बसपाचे गौतम मोरे, अतुल डोळस, चिंधु, वानखेडे योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, रज्जाक शेख, विजय पाटील, वासू पाटील, गिरीश पाटील यांच्यासह विविध पक्ष व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.
क्रांती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी आणि मशालींनी अमळनेर शहरातील वातावरण दुमदुमून गेले.




