विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण
अमळनेर | प्रतिनिधी
तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सन्मान अभियान” अंतर्गत शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीपाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला.
शिबिरात उपविभागीय अधिकारी, मयूर भंगाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक, कोते तहसीलदार, रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती तसेच महसूल, ग्रामविकास, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, समाजकल्याण, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या समाधान शिबिरात महसूल, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांची जागेवरच सुनावणी करून अनेक प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या शिबिराचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर सेवानिवृत्त शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करणारे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!
टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने भाविक मंत्रमुग्ध; २० योगवर्गांचा उत्स्फूर्त सहभाग
अमळनेर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने विठूरायाच्या दर्शनासाठी भव्य व शिस्तबद्ध वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार सादर करणाऱ्या या वारीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या वारीचे आयोजन जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे मॅडम आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शनिवार, दि. २६ जुलै, रोजी पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकूरोड, अमळनेर येथून वारीला प्रारंभ झाला.
वारी जिजाऊ गेट, बसस्टॅण्ड, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत संत सखाराम महाराज वाडी येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.
या वारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली दिंडी, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, पालखी, विठ्ठलाची मूर्ती तसेच प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील सहभागी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात वारी पोहोचली. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने आकर्षक आणि भक्तिमय रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.
वारीची सांगता रत्ना भदाणे ताई यांच्या हस्ते भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूंचे गोड प्रसाद वितरण करून करण्यात आली. या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक तसेच योग संघटन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.
वारीमध्ये योगशिक्षक, साधक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही वारी विशेष लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे एकूण २० योगवर्गांनी या भव्य वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.



आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले पूजन
अमळनेर (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण अमळनेर नगरी शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतच्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तीभाव अर्पण केला.
दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले. मंत्रोच्चारात भगव्या पताकेला वंदन करून त्यांनी दिंडीला खांदा दिला. यानंतर हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.
यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिरात पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
पहाटेपासूनच विठ्ठलनामाचा अखंड गजर
पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.
दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा वारकरी संदेश या दिंडीतून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.
पुष्पवृष्टीने दिंडीचे जल्लोषात स्वागत
दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे नागरिकांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार आणि पुढे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हणत, फुगडी खेळत भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.
संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.
भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा
आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हता, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात विठ्ठलभक्ती जागवणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळवणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा ठरली.




