खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 5 days ago
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
Featured general Latest- Est 0 min
- 0 Views
- 1 week ago
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 week ago
Top 10 News
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन
महापुराच्या संकटात रोटरीचा मदतीचा हात; पूरग्रस्तांना फूड पॅकेट व कपड्यांचे वाटप
नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!
पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकारातून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना गती; भूजल पातळीत वाढ, सिंचनाला बळ, टँकरवरील अवलंबित्व घटले
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सातत्याने होणारी घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत सुमारे ₹१०,२६९.६५ लाख निधीतून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. राज्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव पायलट प्रकल्पामुळे अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, मृद संवर्धन, पूरनियंत्रण आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.

दुष्काळमुक्त अमळनेरचे स्वप्न साकार करण्यासाठी आखला दीर्घकालीन आराखडा
लोकप्रतिनिधी झाल्यापासूनच आमदार अनिल पाटील यांनी अमळनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून जलसंधारणावर आधारित विकासाचा आराखडा तयार केला होता. निम्न तापी पाडळसरे धरणासह नदी-नाल्यांवरील लघु व मध्यम जलसाठे निर्माण करून पावसाचे पाणी गावातच अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला वर्षभरासाठी पाण्याचा स्थिर स्रोत उपलब्ध करून देणे हे त्यांच्या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाल्यानंतर त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दुष्काळ शमन, मृद संवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन यांचा समन्वय साधत आर्च बंधाऱ्यांची अभिनव पायलट योजना मंजूर करून घेतली. या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील विविध नदी-नाल्यांवर आर्च बंधारे, संरक्षण भिंती आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.
आर्च बंधारा – आधुनिक जलसंधारणाची प्रभावी संकल्पना
आर्च बंधारा (Arch Dam/Arch Weir) हा जलसंधारण क्षेत्रातील आधुनिक व अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत प्रभावी प्रकार मानला जातो. कमानीच्या आकारात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यामुळे पाण्याचा दाब थेट संरचनेवर न येता दोन्ही बाजूंच्या खडकाळ काठांवर समान रीतीने वितरित होतो. त्यामुळे कमी काँक्रीटमध्ये अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकालीन टिकाऊ संरचना उभारणे शक्य होते. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी प्रभावीपणे अडविले जाते, भूजल पुनर्भरण वाढते, विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी उंचावते, नदीकाठावरील शेतीला वर्षभर ओलावा मिळतो, सिंचनाखालील क्षेत्र वाढते, मृदा धूप कमी होते आणि पूरस्थितीत पाण्याचा वेग नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
भूजल पुनर्भरणामुळे टँकरमुक्तीकडे अमळनेरची वाटचाल
या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम यंदाच्या वर्षी भूजल पातळीत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहे. आर्च बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाऊन जमिनीत मुरत असल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर स्रोत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. या व्यवस्थेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होत होता. मात्र यंदा भूजल पातळी वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी झाली असून काही गावे टँकरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिणामी शासनाचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ
आर्च बंधाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा थेट लाभ शेती क्षेत्राला होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत असून दुबार व तिबार पीकपद्धतीला चालना मिळत आहे. फळबाग विकास, पशुपालन आणि पूरक व्यवसायांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारत आहे. भूजल पुनर्भरणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढली असून नागरिकांना अधिक स्थिर आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होत आहे.
पूरनियंत्रणासाठी संरक्षण भिंतींचेही महत्त्वपूर्ण योगदान
या योजनेत केवळ आर्च बंधाऱ्यांचा समावेश नसून नदीकाठ संवर्धन, संरक्षण भिंती, तटबंदी आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याची कामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीकाठाची धूप कमी होण्यास, गावांचे संरक्षण होण्यास आणि सार्वजनिक तसेच कृषी मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होत आहे.
अनेक कामे पूर्ण; उर्वरित अंतिम टप्प्यात
मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक आर्च बंधारे पूर्णत्वास आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकून राहू लागले आहे. भविष्यात या प्रकल्पांचा जलसुरक्षा, कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मंजूर करण्यात आलेली प्रमुख कामे
आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजनेत पुढील कामांचा समावेश आहे – मुडी संरक्षण भिंत (₹250.00 लाख), अमळगाव – चिखली नदीवरील आर्च बंधारा (₹295.32 लाख), चोपडाई – लोकल नाल्यावर आर्च बंधारा (₹206.92 लाख), दहिवद – आर्च बंधारा (₹177.15 लाख), ढेकू खुर्द – आर्च बंधारा (₹176.20 लाख), जानवे – आर्च बंधारा (₹160.74 लाख), डांगरी – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹239.75 लाख), लोणे-भोणे फाटा – खैनी नदीवरील आर्च बंधारा (₹236.72 लाख), मारवड – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹234.65 लाख), सडावण – आर्च बंधारा (₹237.75 लाख), सारबेटे – आर्च बंधारा (₹237.75 लाख), अमळनेर – आर्च बंधारा (₹215.24 लाख), नंदगाव – आर्च बंधारा (₹216.04 लाख), वावडे – आर्च बंधारा (₹198.73 लाख), मांडळ – आर्च बंधारा (₹198.73 लाख), पातोंडा – आर्च बंधारा (₹221.92 लाख), गडखांब – आर्च बंधारा (₹175.29 लाख), देवळी – आर्च बंधारा (₹195.97 लाख), नांद्री – आर्च बंधारा (₹186.00 लाख), कन्हेरे – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹807.00 लाख), मुंगसे – तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), तांबापुरा, अमळनेर – महादेव मंदिराजवळ संरक्षण भिंत (₹100.00 लाख), पिंपळे खुर्द – संरक्षण भिंत (₹70.00 लाख), माळण नदीवरील अतिरिक्त आर्च बंधारा (₹237.59 लाख), निमझरी – आर्च बंधारा (₹205.49 लाख), सावखेडा–मुंगसे दरम्यान तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹811.66 लाख), मुडी – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹1,001.23 लाख), भिलाली – आर्च बंधारा (₹237.60 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा व पुलाचे काम (₹2,538.21 लाख), या सर्व कामांसाठी एकूण ₹१०,२६९.६५ लाख (अंदाजित) निधी मंजूर करण्यात आला असून, जलसंधारण, भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, पूरनियंत्रण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अमळनेर मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.
जलसुरक्षित, सिंचनसमृद्ध आणि टँकरमुक्त अमळनेरकडे वाटचाल
जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे, भूजल पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि टँकरमुक्त गावांची निर्मिती करणे ही या प्रकल्पामागील व्यापक संकल्पना आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा अभिनव पायलट प्रकल्प अमळनेर मतदारसंघाला जलसुरक्षित, कृषीसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, भविष्यात राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांसाठीही हा उपक्रम आदर्श मॉडेल ठरू शकतो.
अनिल भाईदास पाटील
मा.मंत्री तथा आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ



अतिवृष्टीग्रस्त अमळनेरला तातडीने आर्थिक मदत द्या; नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दिलासा द्यावा – तालुका काँग्रेसची मागणी
उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; शेतकरी, व्यापारी, कामगारांसह १२०० ते १५०० कुटुंबांना मदतीची मागणी
अमळनेर | प्रतिनिधी
दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व सर्व समाजघटकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात दि. ३ ऑगस्ट रोजी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा. तहसीलदार अमळनेर तसेच मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट रोजी शहरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बोरी नदीकाठावरील उत्तरेकडील रेल्वे पुलापासून दक्षिणेकडील माळी मढीच्या मागील भागापर्यंत, संताजी नगर, मार्केट कमिटीच्या मागील व आतील परिसरासह विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पाहणीदरम्यान बोरी नदीकाठावरील रियाझ मौलाना यांच्या वीटभट्टीचे तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तसेच नदीकाठावरील नागरिकांचे धान्य, डाळी, कपडे, अंथरूण-पांघरूण व दैनंदिन वापराच्या वस्तू पुराच्या पाण्यात पूर्णतः भिजून खराब झाल्या असून अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांसमोर अन्न, निवारा व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर धान्य भिजून खराब झाले असून संपूर्ण परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय प्रसाद नगर, भालेराव नगर, संताजी नगर, गलवाडे रोड, ताडेपुरा, पहिलाड आदी भागांतील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून पुराचे पाणी थेट रस्ते, वस्त्या आणि घरांमध्ये घुसल्याचा आरोपही काँग्रेसने निवेदनातून केला आहे. या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्यातील सुमारे १२०० ते १५०० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून उभी पिके धोक्यात आली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून शेतरस्ते (पाणंद) उद्ध्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहर व ग्रामीण भागात दुर्गंधी पसरू लागली असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ यांसारख्या आजारांचा तसेच डास, माशा व कीटकांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि त्वचारोगांचा धोका वाढल्याबद्दलही निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देताना अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, मगन वामन पाटील, पी. वाय. पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या मांडल्या.
मा. तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देताना डॉ. रवींद्र पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, अधिकार पाटील, लोटन चौधरी, तुषार संधान शिव यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची माहिती देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.
तर मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्यासमोर राजेंद्र भिकन पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, एड. रज्जाक शेख, लोटन पाटील, सुधाकर भैसे, कैलास पाटील यांनी बोरी नदीकाठावरील नागरिकांच्या अडचणी मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावेळी राजू भाट, साईद तेली, तोशिब तेली, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील यांची उपस्थिती होती.



प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला आयएमए अमळनेर शाखेचा तीव्र विरोध प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन;
अमळनेर : राज्य शासनाकडून प्रस्तावित बीएचएमएस व सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अमळनेर शाखेने तीव्र भूमिका घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करत ४ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन यांच्यासह शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेमुळे वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता, उपचारांची शास्त्रीय पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारपद्धती, निदान आणि औषधोपचार हे केवळ त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच केले जाणे आवश्यक असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.
तसेच अशा प्रकारच्या नोंदणी प्रक्रियेमुळे आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संघटनांशी व्यापक चर्चा करावी, रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आयएमए अमळनेर शाखेने केली आहे.
प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी , माजी आमदार डॉ . बी एस पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणी, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्करतसेच शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.




