*जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान* *अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान*
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 8 hours ago
अमळनेरात गोकुळाष्टमीनिमित्त गोशाळेत गोसेवा; गोविंद अग्रवाल व गार्डन ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 1 day ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
बालविवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवसाची घोषणा संयुक्त राष्ट्र संघाकडून बालविवाह निर्मूलनासाठी ऐतिहासिक जागतिक दिनाची घोषणा; आधार बहुउद्देशीय संस्थेकडून स्वागत २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित
अमळनेर, जि. जळगाव |
५ सप्टेंबर २०२६ :
संयुक्त राष्ट्रसंघाने २७ नोव्हेंबर हा दिवस ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाह निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस’ म्हणून घोषित केल्याच्या ऐतिहासिक निर्णयाचे आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांनी स्वागत केले आहे.
जळगाव जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनासाठी तळागाळात जनजागृती व प्रतिबंधात्मक कार्य करणारी आधार बहुउद्देशीय संस्था ही Just Rights for Children (JRC) या बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या देशातील प्रमुख संस्थांच्या नेटवर्कची भागीदार संस्था आहे. बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दिवस घोषित करण्याच्या JRC च्या दीर्घकालीन अभियानाला या निर्णयामुळे जागतिक स्तरावर ऐतिहासिक मान्यता मिळाल्याचे संस्थेने म्हटले आहे.
आधार बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधी डॉ. भारती पाटील, रेणू प्रसाद आणि प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे यांनी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले. “भारतातून निर्माण झालेला बालविवाह निर्मूलनाचा आवाज आज जागतिक संकल्प बनला आहे. आपल्या देशातील आणि तळागाळातील कार्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “२७ नोव्हेंबर हा दिवस जागतिक स्तरावर बालविवाह निर्मूलनासाठी समर्पित करण्याचा निर्णय भारतासाठी विशेष अभिमानाचा आहे. याच दिवशी २०२४ मध्ये भारत सरकारने JRC आणि त्याच्या भागीदार संस्थांच्या सहकार्याने ‘बाल विवाह मुक्त भारत’ अभियानाची सुरुवात केली होती. मात्र, हा केवळ उत्सव साजरा करून थांबण्याचा क्षण नसून आपली जबाबदारी अधिक दृढ करण्याची वेळ आहे.”
तळागाळातील संघर्ष सुरूच राहणार
जागतिक स्तरावरील या संकल्पाचे रूपांतर गावपातळीवरील प्रत्यक्ष कृतीमध्ये करणे हे आता प्रमुख आव्हान असल्याचे संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले. “जिल्ह्यातील कोणत्याही गावात एखादे मूल बालविवाहाच्या धोक्यात असेपर्यंत आमचा संघर्ष अपूर्ण आहे. केवळ कायदे करून बालविवाह पूर्णपणे थांबविता येणार नाहीत. त्यामुळे शाळा, ग्रामपंचायती आणि गावांमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे,” असे त्यांनी सांगितले.
संस्थेच्या माध्यमातून नागरिकांना बालविवाह विरोधी प्रतिज्ञा घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व बाल विवाहाच्या जोखमीतील कुटुंबांना विविध शासकीय योजनांशी जोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसेच शिक्षणातून बाहेर पडलेल्या मुला-मुलींना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत.
आधार बहुउद्देशीय संस्थेने जळगाव जिल्ह्यात प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा आणि स्थानिक समुदायांच्या सहकार्याने बालविवाह प्रतिबंधासाठी सातत्याने कार्य केले असून, अनेक प्रकरणांमध्ये सामाजिक व कायदेशीर हस्तक्षेप करण्यात आले आहेत.
जागतिक अभियानाची ऐतिहासिक वाटचाल
Just Rights for Children चे संस्थापक भुवन ऋभू यांनी बालविवाह निर्मूलनासाठी स्वतंत्र जागतिक दिवसाची मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने मांडली. मार्च २०२६ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातील आपल्या भाषणात त्यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला. सिएरा लिओनच्या फर्स्ट लेडी डॉ. फातिमा मादा बायो यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला.
त्यानंतर सिएरा लिओनने भारतासह सुमारे ५० देशांच्या पाठिंब्याने संयुक्त राष्ट्रांच्या महासभे समोर २७ नोव्हेंबर हा दिवस बालविवाह निर्मूलनासाठी जागतिक दिवस म्हणून घोषित करण्याचा ठराव सादर केला. ४ सप्टेंबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने हा ऐतिहासिक ठराव मंजूर केला.
भारतातील व्यापक जनआंदोलन
JRC हे जगातील मोठ्या बाल संरक्षण नेटवर्कपैकी एक असून, ‘Child Marriage Free World’ अभियानांतर्गत जागतिक स्तरावर बाल विवाहाविरोधात व्यापक चळवळ उभारण्यासाठी कार्यरत आहे.
भारतात JRC च्या भागीदार संस्था विविध राज्यांमध्ये आणि देशातील ७८२ जिल्ह्यांमध्ये शासन व प्रशासनाच्या सहकार्याने कार्यरत आहेत. समुदाय, शाळा, ग्रामपंचायती, आदिवासी व वंचित समाजघटक, महिला, पोलीस कर्मचारी, धार्मिक नेते आणि लोकप्रतिनिधींना या अभियानात सहभागी करून बाल विवाहाविरोधात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे.
JRC च्या माहितीनुसार, या सामूहिक प्रयत्नांमुळे भारतात ५ लाख ५० हजारांहून अधिक बालविवाह रोखण्यात योगदान मिळाले असून, लाखो नागरिकांनी बाल विवाहाविरोधी प्रतिज्ञा घेतल्या आहेत.
बालविवाह निर्मूलनासाठी करण्यात आलेली ही जागतिक बांधिलकी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट क्रमांक ५ – लैंगिक समानता (SDG-5) मधील लक्ष्य ५.३ शी सुसंगत आहे. या उद्दिष्टानुसार बालविवाह, अल्पवयीन विवाह आणि सक्तीच्या विवाहासह सर्व प्रकारच्या हानिकारक प्रथांचे निर्मूलन करण्याचे जागतिक लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
आधार बहुउद्देशीय संस्थेने सर्व नागरिक, पालक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य, युवक, महिला, सामाजिक संस्था आणि शासकीय यंत्रणांना बाल विवाहमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले आहे.
“प्रत्येक बालकाला शिक्षण, सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बाल विवाहमुक्त भारत आणि बाल विवाहमुक्त जग निर्माण करण्यासाठी आता जागतिक संकल्पाला स्थानिक कृतीची जोड देणे आवश्यक आहे,” असे संस्थेने म्हटले आहे.
या प्रसंगी आधार बहुउद्देशीय संस्थेचे आनंद पगारे, मोहिनी धनगर आणि सुनील हिवाळे उपस्थित होते.
— आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर
जिल्हा जळगाव, महाराष्ट्र
Just Rights for Children (JRC) भागीदार संस्था


आमदारांच्या मुळगावीच बससेवा विस्कळीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ; NSUIचे आगार व्यवस्थापकांना निवेदन
अमळनेर, दि. 5 सप्टेंबर 2026 :
अमळनेर तालुक्याचे आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांचे मुळगाव असलेल्या हिंगोणे येथेच एसटी बससेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाल्याने विद्यार्थी, नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी NSUI जळगाव जिल्हाध्यक्ष ॲड. कौस्तुभ पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आगार व्यवस्थापकांची भेट घेऊन बससेवा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
मागील अनेक महिन्यांपासून हिंगोणे गावातील विद्यार्थ्यांना नियमित व वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी शिष्टमंडळासमोर मांडल्या. नियोजित वेळापत्रकानुसार बस उपलब्ध न होणे, काही वेळा दोन-दोन तास उशिराने बस सुटणे, तसेच अचानक फेऱ्या रद्द होणे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात वेळेवर पोहोचता येत नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे लेक्चर, प्रॅक्टिकल, परीक्षा, स्पर्धा परीक्षा तसेच महत्त्वाचे शैक्षणिक तास बुडत आहेत.
विशेषतः सकाळच्या वेळेत नियमित बस उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दररोजचा अतिरिक्त प्रवासखर्च त्यांच्या पालकांवर आर्थिक भार टाकत आहे. काही विद्यार्थ्यांना बसच्या प्रतीक्षेत तासन्तास बसस्थानकावर थांबावे लागते.
याशिवाय रुग्णांना दवाखान्यात जाण्यासाठी, महिलांना दैनंदिन कामांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना शासकीय कार्यालये व आरोग्यसेवेसाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमळनेर शहराशी संपर्क साधण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर बस न मिळाल्याने अत्यावश्यक वैद्यकीय उपचारांसाठी जाणाऱ्या रुग्णांचीही गैरसोय होत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस ही केवळ प्रवासाची सुविधा नसून त्यांच्या शिक्षणाची जीवनवाहिनी आहे. बससेवा विस्कळीत राहिल्यास त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर आणि भवितव्यावर होतो. त्यामुळे हिंगोणे गावासाठी पुरेशा बसफेऱ्या सुरू करून त्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे, बंद असलेल्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात आणि विद्यार्थ्यांच्या शाळा-महाविद्यालयाच्या वेळेनुसार विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करावे, अशी मागणी NSUIने केली.
यावेळी ॲड. कौस्तुभ पाटील यांनी आगार प्रशासनाला आठ दिवसांचा कालावधी देत, “हिंगोणे येथील बससेवेचा प्रश्न तातडीने मार्गी लावून विद्यार्थ्यांना व नागरिकांना नियमित आणि वेळेवर वाहतूक सुविधा उपलब्ध करून द्यावी. आठ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर विद्यार्थ्यांना सोबत घेऊन NSUIच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही,” असा इशारा दिला.
यावेळी NSUI अमळनेर तालुकाध्यक्ष उमेश संदानशिव जयेश संभाजी पाटील, कुणाल कोळी, तेजस भोई, मयंक चव्हाण, रोहित कोळी, महेश कोळी,यश पाटील, महेश भोई, प्रवीण पाटील व असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.


*जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षक सन्मान* *अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांचा सन्मान*
अमळनेर :–
शिक्षक दिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षक बांधवांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, प्रदेश सरचिटणीस हाजी मुक्ती हारून, प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे, अखिल भारतीय सेवा दलाचे सचिव विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस ॲड. सलीम पटेल, ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विजय महाजन, प्राचार्य एस. एस. राणे, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, काँग्रेस उपाध्यक्ष अशोक खलाणे, पंचायत समितीचे माजी सभापती धनगर अण्णा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष किरण महाजन, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार कोसोदे, जिल्हा खजिनदार राहुल बाहेती, वरिष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय वाणी, एससी सेलचे अध्यक्ष कटारे, किसान काँग्रेसचे अमळनेर तालुकाध्यक्ष प्रा. दिनेश पवार,काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, मगन पाटील,रोहिदास दाजी, रज्जाक शेख,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अमळनेर तालुक्याचे प्रा. हिरालाल पाटील यांचाही यावेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रा. हिरालाल पाटील हे वसंतनगर ता. पारोळा येथे गेल्या सोळा वर्षापासून जुनिअर कॉलेजला कार्यरत आहेत.त्यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल जिल्हा काँग्रेसच्या वतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस पाटील यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. हिरालाल पाटील यांचे अभिनंदन केले.



