ब्रेकिंग
चिमुकल्यांच्या ओजस्वी भाषणातून महापुरुषांना अभिवादन; सरस्वती शिशुवाटीकेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात विद्यार्थ्यांनी उलगडला महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी वारसा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : थोर समाजसेवक, स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रप्रेमाची प्रेरणा देणारे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त तसेच लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त येथील सरस्वती शिशुवाटीका येथे प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणांमधून दोन्ही महापुरुषांच्या कार्याचा, विचारांचा व समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेत उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण राष्ट्रभक्तीने भारावून टाकले. लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे श्री दिनेश नाईक यांच्या हस्ते पूजन व माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी शाळेतील प्रियंका बनसोडे, राधिका मोरे, नीरज बाविस्कर, तन्मयी पाटील, हर्षाली संदानशिव आणि दिशान सोनवणे या विद्यार्थ्यांनी ओजस्वी भाषणातून महापुरुषांच्या जीवनकार्याचा प्रेरणादायी परिचय करून दिला. त्यांच्या प्रभावी वक्तृत्वाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले.

यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रेरणादायी व बोधपर प्रसंग सांगून त्यांच्या विचारांचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि संस्कारांची जपणूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमास सौ. किरण भदाणे, सौ. माहेश्वरी राजपूत, सौ. काजल राठोड आणि सौ. आम्रपाली संदानशिव यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेवटी सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची भावपूर्ण सांगता करण्यात आली.

अतिवृष्टीग्रस्तांसाठी जयनिल फाऊंडेशनचा मदतीचा हात; अन्न व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वितरण रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि पत्रकार संघाच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य

 

अमळनेर :- अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांनी सामाजिक बांधिलकी जपत तातडीने मदतकार्य हाती घेतले आहे. फाऊंडेशनच्या वतीने पूरग्रस्त बांधवांसाठी अन्नपदार्थ तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यात आली.

         यासाठी जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम पाटील व उपाध्यक्ष वरून पाटील यांनी पुढाकार घेतला.या मदतकार्याचे प्रभावी नियोजन करण्यासाठी आणि मदत योग्य लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावी यासाठी रोटरी क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर,जैन सोशल ग्रुप तसेच अमळनेर तालुका व शहर पत्रकार संघ यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्व संस्थांच्या स्वयंसेवकांनी दिवसभरात वितरण व्यवस्थापनात सक्रिय सहभाग घेत पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत अन्न व पिण्याचे पाणी पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.

नैसर्गिक आपत्तीच्या काळात विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन गरजूंना मदतीचा हात देत असल्याचे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. जयनिल फाऊंडेशनसह सहकार्य करणाऱ्या सर्व संस्थांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, संकटाच्या काळात अशा सामाजिक एकोप्यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळत आहे.

      दरम्यान गौतम पाटील यांच्या नेतृत्वाखाली जयनिल फाऊंडेशनच्या टीमने दिवसभर पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना धीर दिला.एवढेच नव्हे तर काही ठिकाणी मदत कार्यासाठी जेसीबी सह इतर मशिनरी उपलब्ध करून दिली.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी : वक्त्या सुनिता मोरे यांचे प्रतिपादन 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेचा विचार आजच्या पिढीसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, त्यांनी कधीही समरस तेला महत्व दिले नसून समता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या तथा वक्त्या सुनिता मोरे यांनी केले.

             येथील युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या वतीने आज शहरातील साने गुरुजी शाळेत प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आप्पासो. गुणवंतराव गुलाबराव पाटील होते. 

               आपल्या व्याख्यानात सुनीता मोरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवन प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या साहित्याने समाजातील वंचित, शोषित आणि दुर्बल घटकांना न्याय व स्वाभिमानाची प्रेरणा दिल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक समता आणि मानवतेची मूल्ये जोपासून प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या जीवनात यश संपादन करावे असे आवाहन त्यांनी केले. 

          कार्यक्रमाला संचालक ॲड. अशोक बाविस्कर, पत्रकार किरण पाटील, मुख्याध्यापक संजीव पाटील, उप मुख्याध्यापक मोरे सर, शिक्षक प्रतिनिधी जगताप सर उपस्थित होते. सूत्रसंचालन स्नेहल पाटील मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अनिल पाटील सर यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘प्रताप’ मध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,लोकमान्य टिळकांना अभिवादन

 

अमळनेर- समाज सुधारक,लेखक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या अग्रस्थानी असणारे साहित्यिक डॉ.अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली तसेच केसरी व मराठा या साप्ताहिक व नियतकालिकातून ब्रिटिश राजवट विरोधी बुलंद आवाज उठविणारे, चतु:सूत्री च्या माध्यमातून राष्ट्रीय आंदोलन सक्रिय करणारे बॅरिस्टर लोकमान्य टिळकांची १०६ वे स्मृती दिन निमित्ताने खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा.पराग पाटील,सह सचिव प्रा.व्ही बी मांटे,प्रताप कॉलेजचे प्राचार्य डॉ.हर्षवर्धन जाधव, कुलसचिव राकेश निळे यांनी अण्णाभाऊ व टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

या प्रसंगी उपप्रचार्य डॉ.अशोक पाटील,डॉ.कल्पना पाटील,राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.विजय तुंटे,हिंदी विभाग प्रमुख डॉ.शशिकांत सोनवणे, डॉ.बालाजी कांबळे,डॉ.अनिल झळके, ग्रंथपाल दिपक पाटील, कमलाकर पाटील,धनराज मोरे, महेंद्र चौधरी, विश्वास पाटील,सीसीएमसी विभागाचे पराग रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.

अमळनेरमध्ये पुराच्या विळख्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची थरारक सुटका; आरोग्य विभाग व अग्निशमन दलाचे दोन तास जीवावर उदार बचावकार्य

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरात मुसळधार पावसाने थैमान घातले असताना भालेराव नगर परिसरातील गुरुकृपा कॉलनीत घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण शहराची धडकी भरली. नाल्याला आलेल्या प्रचंड पुरामुळे एका घरात अवघ्या एक महिन्याच्या बाळासह संपूर्ण कुटुंब अडकून पडले होते. घरात वेगाने पाणी शिरत असल्याने कुटुंबीयांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला होता. मात्र, अमळनेर नगरपालिकेच्या आरोग्य विभाग आणि अग्निशमन दलाच्या धाडसी व शर्थीच्या बचाव मोहिमेमुळे सर्व कुटुंबीयांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

मुसळधार पावसामुळे गुरुकृपा कॉलनीलगतच्या नाल्याला अचानक पूर आला. काही क्षणांतच परिसरात छातीएवढे पाणी साचले आणि एका घरात पाणी घुसल्याने कुटुंबीय पूर्णपणे अडकून पडले. घरामध्ये एक महिन्याचे चिमुकले बाळ, त्याची आई, तीन महिला, तीन लहान मुले आणि इतर कुटुंबीय असे अनेक जण जीव मुठीत धरून उंच जागेवर उभे राहून मदतीची वाट पाहत होते.

घटनेची माहिती मिळताच मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या तातडीच्या निर्देशानुसार आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे तसेच अग्निशमन दलाचे फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांचे पथक घटनास्थळी धावून पोहोचले.

पुराच्या पाण्याचा वेग अत्यंत प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोर, लाइफ जॅकेट आणि मानवी साखळी तयार करून बचाव पथकाने तब्बल दोन तास जीवाची बाजी लावत पुराच्या पाण्यातून मार्ग काढत अडकलेल्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले.

या बचाव मोहिमेतील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे अवघ्या एक महिन्याच्या चिमुकल्याला प्लास्टिकच्या टबमध्ये सुरक्षित ठेवून पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर बाळासह सर्व कुटुंबीयांना सुरक्षितपणे जवळील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हलविण्यात आले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या धाडसी आणि वेळेवर पार पडलेल्या बचाव मोहिमेमुळे एक संपूर्ण कुटुंब नवजीवन मिळाल्याची भावना व्यक्त होत असून मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आरोग्य विभाग व अग्निशमन दलातील किरण कंडारे, गोल्डी बिऱ्हाडे, फारुख शेख, दिनेश बिऱ्हाडे, भिका सदानंदशीव आणि पवन बिऱ्हाडे यांच्या धैर्य, तत्परता आणि सेवाभावाचे शहरभरातून कौतुक होत आहे.

पुराच्या संकटात जीवाची पर्वा न करता केलेल्या या धाडसी बचावकार्यामुळे अमळनेरच्या आपत्कालीन यंत्रणेने पुन्हा एकदा आपल्या कर्तव्यदक्षतेची प्रचिती दिली आहे.

अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याला अक्षरशः जलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधार पावसामुळे बोरी नदीला महापूर आला असून नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 

शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्य, अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचेही नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

बोरी नदीने धोक्याची पातळी गाठली

सततच्या पावसामुळे बोरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदीपात्रात किंवा पुलांवर जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शाळा, महाविद्यालये, व्यापारी आस्थापने आणि दैनंदिन व्यवहारांवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे.

प्रशासन सतर्क

महसूल, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण

 

अमळनेर | प्रतिनिधी

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सन्मान अभियान” अंतर्गत शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीपाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला.

शिबिरात उपविभागीय अधिकारी, मयूर भंगाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक, कोते तहसीलदार, रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती तसेच महसूल, ग्रामविकास, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, समाजकल्याण, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या समाधान शिबिरात महसूल, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांची जागेवरच सुनावणी करून अनेक प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर सेवानिवृत्त शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करणारे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!

 

टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने भाविक मंत्रमुग्ध; २० योगवर्गांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने विठूरायाच्या दर्शनासाठी भव्य व शिस्तबद्ध वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार सादर करणाऱ्या या वारीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या वारीचे आयोजन जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे मॅडम आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शनिवार, दि. २६ जुलै, रोजी पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकूरोड, अमळनेर येथून वारीला प्रारंभ झाला.

वारी जिजाऊ गेट, बसस्टॅण्ड, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत संत सखाराम महाराज वाडी येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.

या वारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली दिंडी, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, पालखी, विठ्ठलाची मूर्ती तसेच प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील सहभागी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात वारी पोहोचली. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने आकर्षक आणि भक्तिमय रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

वारीची सांगता रत्ना भदाणे ताई यांच्या हस्ते भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूंचे गोड प्रसाद वितरण करून करण्यात आली. या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक तसेच योग संघटन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

वारीमध्ये योगशिक्षक, साधक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही वारी विशेष लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे एकूण २० योगवर्गांनी या भव्य वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!

 

ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले पूजन

अमळनेर (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण अमळनेर नगरी शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतच्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तीभाव अर्पण केला.

दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले. मंत्रोच्चारात भगव्या पताकेला वंदन करून त्यांनी दिंडीला खांदा दिला. यानंतर हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.

यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिरात पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

पहाटेपासूनच विठ्ठलनामाचा अखंड गजर

पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.

दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा वारकरी संदेश या दिंडीतून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

पुष्पवृष्टीने दिंडीचे जल्लोषात स्वागत

दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे नागरिकांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार आणि पुढे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हणत, फुगडी खेळत भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.

भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा

आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हता, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात विठ्ठलभक्ती जागवणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळवणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा ठरली.

“एआय हेच भविष्य; तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर मागे पडू” – आमदार अनिल पाटील प्रताप महाविद्यालयात ‘स्व. अजितदादा पवार’ जयंतीनिमित्त एआय तंत्रज्ञान पुरस्कार सोहळा; आदर्श शेतकरी व विद्यार्थ्यांचा गौरव

 

अमळनेर (प्रतिनिधी):

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी आणि अद्ययावत माहितीचे माध्यम असून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचे महत्त्व वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता एआयचे प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा भविष्यात स्पर्धेत मागे पडण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांनी केले.

AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते. प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिल पाटील, आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी.मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी एआय प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तृत आढावा मांडत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सी.ए. नीरज अग्रवाल आणि विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना बँकिंग किंवा ई-मेलचे पासवर्ड कुठेही शेअर करू नयेत, असा सल्ला दिला. एआयच्या माध्यमातून इंटर्नशिप, प्रकल्प आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक विद्यार्थ्याने एआयचा वापर शिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जळगावच्या प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पंडित पाटील, सहचिटणीस प्रा. व्ही. बी. मांटे, माहिती व तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

“चॅट जीपीटीसह एआयचा वापर अपरिहार्य”

मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, आज प्रशासन, शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. चॅट जीपीटीसारख्या आधुनिक माध्यमातून अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असून एआयचा वापर करता आला नाही तर आपण शेवटच्या क्रमांकावर राहू. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे. सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही एआयचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम आणि सक्षम कशी करता येईल, याचा विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘आदर्श कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त शेतकरी :

प्रकाश बडगुजर (गलवाडे)

श्रीमती लिलाबाई ठाकूर (साळवे)

किशोर पाटील (गांधली)

बापूसाहेब देवरे (वलवाडी उपनगर, धुळे)

शरद सोनवणे (धरणगाव)

एआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही गौरव

AI प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मानित विद्यार्थी :

जयश्री वासुदेव पाटील

पूनम राहुल चौधरी

हर्षल महेंद्र नेरकर

कल्याणी कैलास बडगुजर

फाल्गुनी आनंदा महाजन

रिंकू अनिल साळी

भूमिका रितेश जैन

मयुरी किशोर पवार

वैष्णवी विलास पाटील

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी HAL कौशल्य रथच्या प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. जे. शेख (अमळनेर), प्रा. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, प्रा. नलिनी पाटील, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. जितेंद्र पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.