नवीन मालमत्ता कर आकारणीवरून अमळनेरकरांच्या हक्काचा सवाल! ‘कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करा’; नागरिकांनी एकजुटीने आवाज उठवावा — सोमचंद संदानशिव
अमळनेर : अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांवर सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कर आकारणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, या कर आकारणीसंदर्भात सध्या टी.पी. विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेरकर नागरिकांनी केवळ सुनावणीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण कर आकारणी प्रक्रियेची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेऊन आपल्या हक्कासाठी एकजुटीने आवाज उठवावा, असे आवाहन अमळनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
सुमारे दोन-अडीच वर्षांपूर्वी कोअर प्रोजेक्ट, अमरावती या संस्थेमार्फत निविदेच्या माध्यमातून अमळनेर शहरातील नवीन मालमत्तांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या संपूर्ण प्रक्रियेची पद्धत, मोजणीचे निकष, कर निर्धारणाची गणना तसेच नागरिकांवर आकारण्यात आलेल्या कराची योग्यताही तपासण्याची गरज असल्याचे सोमचंद संदानशिव यांनी स्पष्ट केले आहे.
सुनावणी सुरू; मात्र नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळणार का?
सध्या सुरू असलेल्या सुनावणीमध्ये नागरिकांना नेमकी किती सवलत मिळणार, कर आकारणीत कोणत्या स्वरूपाचा बदल होणार आणि पूर्वी आकारण्यात आलेल्या कराचे पुनर्मूल्यांकन होणार का, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे केवळ सुनावणी घेऊन विषय संपविण्याऐवजी कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची निविदा, कार्यपद्धती, मोजणीचे निकष आणि कर आकारणीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे तपासण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
मूलभूत सुविधा अपुऱ्या, मग कराचा वाढता बोजा कशासाठी?
विशेषतः शहरातील विविध कॉलनी परिसरांमध्ये अनेक ठिकाणी अद्यापही रस्ते, गटारी यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची नागरिकांची तक्रार आहे. एका बाजूला आवश्यक नागरी सुविधा अपुऱ्या असताना दुसऱ्या बाजूला नागरिकांवर मोठ्या प्रमाणात मालमत्ता कराचा बोजा पडत असल्यास, या कर आकारणीचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते!’
‘आज आवाज उठवला नाही, तर उद्या पश्चात्तापाची वेळ येऊ शकते,’ असा इशारा देत सोमचंद संदानशिव यांनी अमळनेरकरांना जागरूक होण्याचे आवाहन केले आहे. कोअर प्रोजेक्ट, अमरावती यांना देण्यात आलेल्या कामाची तसेच संबंधित निविदेची सखोल चौकशी करण्यात यावी. आवश्यक असल्यास सदर कामाचा फेरविचार करून नगरपरिषदेच्या सक्षम कर्मचाऱ्यांमार्फत नव्याने मोजणी करावी आणि त्यानंतर पारदर्शक, वस्तुनिष्ठ व नियमानुसार कर आकारणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागरिक समिती स्थापन करून लोकशाही मार्गाने आंदोलनाची गरज
या प्रश्नावर नागरिकांची समिती स्थापन करून सर्व करदात्यांना विश्वासात घेत लोकशाही मार्गाने आंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही सोमचंद संदानशिव यांनी म्हटले आहे. बाह्य संस्थेला देण्यात आलेल्या कामाचा खर्च अखेरीस नागरिकांच्या पैशातूनच होणार असल्याने या संपूर्ण प्रक्रियेबाबत अमळनेरकरांनी जागरूक राहून प्रशासनाला प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“हा प्रश्न कोण्या एका व्यक्तीचा नसून शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकाच्या हिताचा आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन वस्तुनिष्ठ माहिती जाणून घ्यावी आणि अन्यायकारक वाटणाऱ्या कर आकारणीविरोधात लोकशाही मार्गाने आवाज उठवावा,” असे आवाहन सोमचंद संदानशिव यांनी केले आहे.
