अखेर अमळनेर न्यायालयाने घेतला मोकळा श्वास न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेने काढले अतिक्रमण
अमळनेर :- येथील न्यायालयाच्या आवाराबाहेरील अतिक्रमण नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणावर वाढले होते त्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्देशानुसार न्यायालयाच्या परिसरातील अतिक्रमण पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटविले असून या कारवाईमुळे रस्ता मोकळा झाला असून वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
न्यायालयाच्या बाहेर आणि परिसरात टपरीधारक, डिजिटल बॅनर, कपडे, बूट चप्पल विक्रेते, पाणीपुरी वाले इत्यादींचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर वाढले होते ज्याला वाटेल तो न्यायालयाच्या बाहेर व्यवसाय थाटत होता त्यामुळे या परिसरात वादही होत असत तसेच तेथे येणाऱ्या ग्राहकांमुळे मोठी वाहतूक कोंडी होत होती.
अखेर जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयाबाहेरील अतिक्रमणे हटविण्याचे आदेश दिले होते. जून महिन्यात दिवाणी न्यायाधीशांनी पालिकेला पत्र देऊनही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे जिल्हा न्यायाधीश एक व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छा. वा. पाटील यांनी नगरपालिकेला पत्र दिले आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी तातडीने अतिक्रमण विभागाला आदेश दिले. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, संजय बिऱ्हाडे, अविनाश बिऱ्हाडे, राम राम राजे, विशाल सपकाळे, दर्शन बिऱ्हाडे या कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण काढले.
*नगरसेवकांचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न अयशस्वी*
अतिक्रमण काढताना काही नगरसेवकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करून अतिक्रमण विभागावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयाचा आदेश पाहून त्यांना तोंडघशी पडावे लागले. शहरातील काही प्रभागांमध्ये नगरसेवकच स्वतः अतिक्रमणधारकांना प्रोत्साहन देत असून मन मानेल त्या ठिकाणी टपऱ्या, हातगाड्या लावल्या जात आहेत त्यामुळे नगरसेवकांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरसेवकांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागावर दबाव न टाकता शहरातील अतिक्रमणे काढण्यासाठी पालिकेला सहकार्य करावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


