प्रताप महाविद्यालयातील एनसीसी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक; ३५६ छात्र सैनिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे
अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून छात्र सैनिकांना शिस्त, देशसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात दि. २६ मे रोजी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे विशेष अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात ४८ महाराष्ट्र बटालियन धुळे, ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि ५० महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग असून तब्बल ३५६ छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे छात्र सैनिकांना प्रत्यक्ष अनुभवातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत.
अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी उपस्थित छात्र सैनिकांना आगीचे विविध प्रकार, आग लागण्याची कारणे, आग विझविण्याच्या पद्धती तसेच अग्निशमन साहित्यांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख आणि आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आग नियंत्रण प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे समजावून सांगितली. छात्र सैनिकांनीही मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

शिबिराचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग तसेच परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्राथमिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी यावेळी केले. देशसेवेची प्रेरणा देणारे आणि संकटसमयी धैर्याने कार्य करण्याचे बळ देणारे हे प्रशिक्षण छात्र सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करण्यात आला.


