ब्रेकिंग
अमळनेर नगर परिषदेत ‘नमस्ते दिवस’ उत्साहात साजरा; सफाई कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्डचे वाटप

 

अमळनेर (प्रतिनिधी): केंद्र शासनाच्या NAMASTE (National Action for Mechanised Sanitation Ecosystem) अभियानांतर्गत अमळनेर नगरपरिषदेच्या वतीने ‘नमस्ते दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इंदिरा गांधी भवन येथे आयोजित या कार्यक्रमात शहराच्या स्वच्छतेसाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कर्मचाऱ्यांना PPE किट तसेच आयुष्मान भारत कार्ड वाटप करून त्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचा संदेश देण्यात आला.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. श्री. परीक्षित बाविस्कर व मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. कार्यक्रमास आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव व स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधत शहराच्या स्वच्छता व्यवस्थेत घंटागाडी चालक, वाहक तसेच घनकचरा प्रक्रिया केंद्रावर कार्यरत कर्मचारी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व कल्याणासाठी अमळनेर नगरपरिषद सातत्याने कटिबद्ध असून अशा विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमात उपस्थित महिला व पुरुष कर्मचाऱ्यांना ‘नमस्ते’ योजनेची सविस्तर माहिती, आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच सुरक्षिततेबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. त्यानंतर आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, स्वच्छता निरीक्षक श्री. संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक श्री. किरण कंडारे आणि शहर समन्वयक श्री. गणेश गढरी यांच्या हस्ते सर्व कर्मचाऱ्यांना PPE किट व आयुष्मान भारत कार्ड वितरित करण्यात आले.

या उपक्रमामुळे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी अमळनेर नगरपरिषदेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अशा उपक्रमांमुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावून शहरातील स्वच्छता सेवेची गुणवत्ता अधिक प्रभावी होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

यावेळी शहरातील विविध भागांमध्ये कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या नागरिकांनी स्वच्छता विभागाशी संपर्क साधून ‘नमस्ते’ योजनेअंतर्गत नाव नोंदणी करून शासनाच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभागातील योगेश पवार, श्यामराव करंदीकर, महेंद्र बिऱ्हाडे, अनंत संदानशिव, युनस शेख यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

मराठा समाज महिला मंडळाच्या वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; गुणवंत वक्त्यांचा सन्मान

 

अमळनेर : अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत व हौशी महिलांना आपल्या विचारांना प्रभावीपणे मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या अचानक दिलेल्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण, प्रभावी मांडणी आणि ओघवत्या वक्तृत्वामुळे स्पर्धा रंगतदार ठरली.

स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावत विजेतेपद मिळविले. सीमा पाटील यांनी द्वितीय, तर स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पारितोषिक रेखा मराठे व अपेक्षा पाटील यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून आपल्या वक्तृत्वाची छाप पाडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री पाटील होत्या. प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सौ. गायत्री भदाणे व सौ. स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण सौ. भारती (आक्का) पाटील व सौ. भारती पाटील यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील व नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धा पाहण्यासाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. या उपक्रमामुळे महिलांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळाल्याबद्दल उपस्थितांनी मराठा समाज महिला मंडळाचे कौतुक केले.

श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांच्या बदनामीप्रकरणी अनंत निकमविरोधात तक्रारी

 

अमळनेर : श्री मंगळग्रह मंदिर व मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत अनंत रमेश निकम यांच्याविरोधात पोलिस व प्रशासनाकडे अनेक सामूहिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

डॉ. डिगंबर महाले यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, न्यायालयाच्या निकालाची चुकीची व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करून मंदिर व त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला आहे. तसेच मंगळवार, दि. १४ जुलै रोजी धर्मदाय विभागाकडेही पुराव्यांसह तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

सोमवारी सकल हिंदू समाज, विविध हिंदुत्ववादी संघटना, मंगळग्रह सेवा संस्थेचे कर्मचारी व व्यावसायिक तसेच व्हॉईस ऑफ मीडियाच्या अमळनेर शाखेने प्रांताधिकारी, पोलीस उपअधीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्याकडे स्वतंत्र निवेदने सादर करून अनंत निकम यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली.

तक्रारदारांच्या मते, सोशल मीडियावरील पोस्ट व व्हिडिओंद्वारे न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून श्री मंगळग्रह मंदिर व डॉ. डिगंबर महाले यांची बदनामी करण्यात आली आहे. यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संतप्त धोबी समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन..

 

अमळनेर :धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाने परीट-धोबी समाजात संतापाची लाट उसळली असून, अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी धोबी समाजाच्या वतीने सोमवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देत दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मानसिक छळामुळे एका निष्पाप मुलीला जीवन संपवावे लागल्याचा आरोप करत समाजबांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि संबंधितांवर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

निवेदनात दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्यात यावी तसेच दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यावेळी रविंद्र जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दीपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरुण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा इशारा देत समाजाने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. आवश्यकता भासल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी करत समाजाने न्यायासाठी एकजुटीने आवाज बुलंद केला.

अमळनेर अपघात रोखण्यासाठी वाहतूक शाखेची विशेष मोहीम   अपघाताच्या प्रमाणात वाढ, ट्रॅक्टर ट्रॉलींवर बसविले रिफ्लेक्टर 

 

अमळनेर :- जळगाव जिल्ह्यासह तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढल्यामुळे तसेच भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी अमळनेर शहर वाहतूक शाखेने विशेष जनजागृती व प्रतिबंधात्मक मोहीम हाती घेतली. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या आदेशानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान रस्त्यावरून धावणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलींची तपासणी करण्यात आली. ज्या ट्रॅक्टर ट्रॉलींना मागील बाजूस रिफ्लेक्टर नव्हते त्यांना थांबवून तात्काळ रिफ्लेक्टर बसविण्यात आले .

            विशेषतः रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉली सहज दिसाव्यात आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना वेळेत त्यांचा अंदाज यावा यासाठी रिफ्लेक्टर अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

               या मोहिमेत पोलीस हवालदार संजय बोरसे, विनय पाटील, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र बोरसे आणि विलास बागुल यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच त्यांनी वाहन चालकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती ही केली.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे राज्य शिष्यवृत्ती परीक्षा व इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी उत्तुंग यश संपादन

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्यावतीने राज्य शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी व 8 वी गट विभागासाठी घेण्यात आली होती. पाचवी विभाग गटासाठी एकूण 37 विद्यार्थी उपरोक्त परीक्षेसाठी बसले होते एकूण 24 विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आणि दोन विद्यार्थी पाचवी कक्षा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले त्यांची नावे पुढीलप्रमाणे 1) पाटील आरव विठ्ठल 2) भामरे श्रावणी हेमंत
‌ त्याचसोबत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण 22 विद्यार्थी बसले होते एकूण 8 विद्यार्थी पात्र ठरले. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे नाव मराठे कैवल्य दिनेश हे असून सदर विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तुत्वाने शाळेचे नाव उज्वल करून शाळेसाठी ऐतिहासिक कार्य त्यांच्याद्वारे होऊन आकाशाला गवसणी घालण्याचे कार्य करून सर्वांच्या गुणगौरवास पात्र ठरुन त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.
त्याचसोबत इंडियन टॅलेंन्ट ऑलिमपियाड परीक्षेत पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी राज्यातून चतुर्थ क्रमांक प्राप्त केला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी भामरे श्रावणी अजय हिस रोख राशी 1000 रुपये स्मृतीचिन्ह सन्मानपत्र अशा स्वरूपात भेट देऊन मा. मुख्याध्यापक जे.एस. देवरे यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले. अशी दुर्मिळ कामगिरी करणारी एकमेव विद्यार्थीनी ही अमळनेर तालुक्यातील ठरली असून शैक्षणिक क्षेत्रातून या ऐतिहासिक कामगिरीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत असून ही ऐतिहासिक कामगिरी करून शाळेचे नाव संबंध महाराष्ट्रात उंचावून एक आदर्श तिने आपल्या कर्तृत्वातून निर्माण केले आहे. इयत्ता 5 वीचा विद्यार्थी यश चौधरी हा या उपरोक्त परीक्षेसाठी 16 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून त्याला सुद्धा स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरान्वीत करण्यात आले. सदर सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन खा. शि. मंडळाचे समस्त मान्यवर संचालक मंडळ यांनी केले.
सदर परीक्षेसाठी अनमोल मार्गदर्शन सहकार्य परीक्षेसाठी ज्ञानवर्धक पुस्तके उपलब्ध करून देण्यामध्ये शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी ,मुख्याध्यापक जे.एस देवरे, पर्यवेक्षक महेश माळी पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी ,पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही एस अमृतकर , डिंपल देसाई, प्रशांत वंजारी , एस. एस. पारधी समस्त शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वृंदवर्ग यांचे लाभले.

शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; १६० कोटींच्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपी प्रशांत वाडीले धुळ्यातून जेरबंद

 

धुळे| प्रतिनिधी

शिक्षण विभागाला हादरवून सोडणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत मुख्य आरोपींपैकी एक प्रशांत तुळशीराम वाडीले याला धुळे येथून अटक केली आहे. बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या प्रकरणात आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपी प्रशांत वाडीले हा धुळे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने धुळे येथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. अटकेनंतर त्याला येवला प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

या प्रकरणात बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावावर वेतन व थकबाकीची रक्कम काढून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत अनेक संशयितांची नावे समोर आली असून आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, पोलीस निरीक्षक रामदास शेळके, पोलीस निरीक्षक किरण शेवाळे तसेच गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

शालार्थ घोटाळ्याच्या तपासात ही अटक महत्त्वाची मानली जात असून, या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराचे आणखी धागेदोरे उलगडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

लोकसहभागातून ११ हजार झाडांचे संवर्धन; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा हरित उपक्रम ठरतोय प्रेरणादायी संरक्षणासाठी कंपाउंड ची लोकप्रतिनिधींकडे मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी वृक्षसंवर्धन उपक्रम सध्या वेगाने सुरू आहे. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या जागेवर तब्बल ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे अकरा हजार झाडांचे संवर्धन संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षण कंपाऊंड उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाउंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आली असून त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सामाजिक जबाबदारी असून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन 25 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळाली नाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केली जात आहे असा सवाल उपस्थित करून यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही दर्शना पवार यांनी नमूद केले आहे.

 

स्मार्ट मीटर सक्ती विरोधात वीज ग्राहकांनी जागरूक रहावे.  सुस्थितीत असलेल्या वीज मीटर बदलण्याची सक्ती थांबवा     ग्राहकांना निवडीचा अधिकार: अखिल भारतीय ग्राहक पंचायत 

 

अमळनेर:- महावितरण कडून वीज ग्राहकांना स्मार्ट मीटर बसविण्याबाबत एसएमएस व इतर माध्यमातून सूचना दिल्या जात असून ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुस्थितीत असलेले अचूक रीडिंग देणारे विद्यमान मीटर बदलून स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती करू नये, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, मध्य महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष बाळासाहेब औटी यांनी केली आहे.

                वीज ग्राहक हा सेवाग्राही असून त्याला योग्य माहिती, पारदर्शकता आणि निवडीचा अधिकार मिळणे आवश्यक आहे. वीज कायदा 2003, ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि संविधानिक अधिकारांचा विचार करूनच कोणतेही प्रक्रिया राबविणे गरजेचे आहे, असे औटी यांनी सांगितले.

     वीज ग्राहकांनी काय करावे ?

 अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, आपले सध्याचे मीटर व्यवस्थित चालू असेल व योग्य रीडिंग घेत असेल तर त्याची नोंद ठेवावी. स्मार्ट मीटर बसविण्यापूर्वी महावितरण कडून लेखी माहिती व स्पष्टीकरण मागावे. कोणतेही सक्ति किंवा दबाव निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी अर्ज करावा ग्राहकांनी आपल्या हक्कांबाबत जागरूक राहावे व कोणतीही कारवाई कायदेशीर मार्गाने करावी.

 ” महावितरणच्या भूमिकेबाबत ग्राहक पंचायतीची भूमिका “

 स्मार्ट मीटर तंत्रज्ञानाबाबत ग्राहकांना योग्य माहिती, सुरक्षा व्यवस्था, तपासणी सुविधा, डेटा संरक्षण आणि भविष्यातील आर्थिक परिणाम याबाबत स्पष्टता देणे आवश्यक आहे. ग्राहकांच्या शंकांचे समाधान न करता सक्तीची प्रक्रिया राबविणे योग्य नाही. विशेषतः स्मार्ट मीटर नातवृत्त झाल्यास त्याची निष्पक्ष तपासणी करण्यासाठी मान्यता प्राप्त प्रयोगशाळा पारदर्शक व्यवस्था आणि ग्राहक संरक्षणाची हमी आवश्यक आहे.

    ” विजय ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करणे ही ग्राहक पंचायतीची भूमिका आहे. तंत्रज्ञानाला विरोध नाही, मात्र ग्राहकांच्या संमतीशिवाय व पुरेशी माहिती न देता कोणतीही सक्ती मान्य केली जाणार नाही. ग्राहकांच्या हक्कांसाठी लोकशाही व कायदेशीर मार्गाने संघर्ष करण्यात येईल “

            अखिल भारतीय ग्राहक पंचायत सर्व वीज ग्राहकांना आवाहन करते की त्यांनी घाबरून न जाता जागरूक राहावे आपल्या हक्कांची माहिती घ्यावी आणि कोणती अडचण आल्यास ग्राहक संघटनेची संपर्क साधावा.

 

दुःखातून समाजप्रबोधनाचा नवा आदर्श! धरणगावातील वाघ परिवाराने सत्यशोधक पद्धतीने पार पाडले उत्तरकार्य; दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीप्रित्यर्थ १०० गरजू विद्यार्थ्यांना गणवेश, उपस्थितांना ‘शिवाजी कोण होता?’ ग्रंथ भेट

 

धरणगाव प्रतिनिधी : 

धरणगाव : वैयक्तिक दुःखालाही समाजजागृतीची दिशा देत धरणगावातील वाघ परिवाराने एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते रमेश व सतिष जगन्नाथ वाघ यांची पुतणी आणि ललिता व आबासाहेब राजेंद्र वाघ यांची कन्या दिवंगत श्रद्धा (ताऊ) हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ दशपिंड, गंधमुक्ती व उत्तरकार्याचा संपूर्ण विधी सत्यशोधक पद्धतीने पार पाडण्यात आला. अंधश्रद्धा आणि कर्मकांडाला फाटा देत विवेक, समता आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाची धरणगावसह परिसरात मोठी चर्चा होत असून, विविध स्तरांतून वाघ परिवाराच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. 

     कार्यक्रमाच्या प्रारंभी संत, महापुरुष आणि महामाता यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सत्यशोधक समाजाचे विधीकर्ते शिवदास महाजन यांनी सत्यशोधक समाजाची प्रार्थना म्हणत साधेपणा, विवेक आणि मानवतावादी मूल्यांवर आधारित विधी संपन्न केला. कोणत्याही अनिष्ट चालीरीती, कर्मकांडशिवाय पार पडलेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांवर सकारात्मक ठसा उमटविला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माळी समाजाचे सचिव आर डी महाजन यांनी केले. तद्नंतर सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी. डी. पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, ” महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांनी दिलेला समता, शिक्षण आणि विज्ञाननिष्ठ विचारांचा वारसा जपणे ही आजच्या समाजाची गरज आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडापेक्षा मानवसेवा, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन हाच खरा धर्म आहे. शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सत्यशोधक विचार स्वीकारले पाहिजेत.”

 यावेळी आबासाहेब राजेंद्र वाघ यांनी आपल्या दिवंगत कन्या श्रद्धाच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व होतकरू १०० विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्याची घोषणा केली. त्यांच्या या समाजहिताच्या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्फूर्त स्वागत केले. दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करण्याचा हा संदेश अनेकांच्या मनाला स्पर्शून गेला.

पुरोगामी चळवळीचे नेते तुळशीराम बापू आणि भाजप नेते ॲड. संजय महाजन यांनी आपल्या मनोगतात जगन्नाथ खंडू वाघ यांच्या परिवाराने अनेक वर्षांपासून पुरोगामी, परिवर्तनवादी आणि सत्यशोधक विचारांची परंपरा जपली असून, “बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले” ह्या उक्तीनुसार वाघ परिवाराचे निरंतर कार्य असून, श्रद्धाच्या स्मृतीतून समाजासाठी प्रेरणादायी कार्य करण्याचा घेतलेला निर्णय हा संपूर्ण समाजासाठी अनुकरणीय असल्याचे सांगत ॲड. महाजन यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

     कार्यक्रमातील आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे उपस्थित सर्वांना ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता?” या विचारप्रवर्तक १०० ग्रंथाचे मोफत वितरण करण्यात आले. वाचनसंस्कृती, विवेकवादी विचार आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. 

     याप्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, भाजप नेते ॲड. संजय महाजन, ॲड. व्ही.एस.भोलाणे, शिवसेना नेते पी. एम. पाटील, नगरसेवक विनय भावे, गटनेते कैलास माळी, नगरसेवक लक्ष्मणराव पाटील, लक्ष्मण महाजन, हेमंत महाजन, किरण अग्निहोत्री, भूषण धनगर, महेंद्र तायडे, भरत शिरसाठ, गुलाब महाजन, हरी महाजन, महेंद्र महाजन, राहुल रोकडे, रामकृष्ण चौधरी, गोरख देशमुख, हेमंत माळी, कविराज पाटील, प्रल्हाद महाजन, दिनेश महाजन, मयुर भामरे यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, आप्तेष्ट आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत श्रद्धाच्या स्मृतीतून समाजसेवा, विवेकवाद, शिक्षण आणि समतेचा संदेश देणारा हा उपक्रम केवळ एका कुटुंबाचा वैयक्तिक कार्यक्रम न ठरता समाजाला नवी दिशा देणारा आणि परिवर्तनवादी विचारांना बळ देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.