ब्रेकिंग
सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील यांची शिवसेना शहर ओबीसी आघाडीच्या पदावर दमदार नियुक्ती

 

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्य करणारे युवा सामाजिक कार्यकर्ते श्री. दिपक श्रीराम पाटील यांची शिवसेना शहर ओबीसी आघाडी (कार्यक्षेत्र – अमळनेर विधानसभा क्षेत्र) पदावर पुढील एक वर्षांच्या कालावधीसाठी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ही नियुक्ती वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून प्रेरित होत, शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगाव लोकसभा संपर्कप्रमुख आ. दिलीप लांडे यांच्या सूचनेनुसार आणि मा. आ. शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील व ओबीसी आघाडी जिल्हाप्रमुख रुपेश माळी यांच्या नेतृत्वात ही निवड जाहीर करण्यात आली.

नियुक्तीपत्रामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीचा तळागाळापर्यंत प्रचार आणि प्रसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षवाढीसाठी सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्षाचे विचार घराघरात पोहोचविण्यासाठी कार्य करावे, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे.

श्री. दिपक पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात सातत्याने जनसंपर्क ठेवत विविध उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर शहर व विधानसभा क्षेत्रात शिवसेना ओबीसी आघाडी अधिक बळकट होईल, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे.

या निवडीबद्दल सामाजिक, राजकीय तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

RTE प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेश-पुस्तकांसाठी पैसे घेतल्यास शाळांवर थेट कारवाई  राज्य सरकारचा कडक इशारा; अमळनेरातील काही शाळांविरोधात पालकांमध्ये संताप

 

अमळनेर : शिक्षण हक्क कायदा (आरटीई) अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने खासगी शाळांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. आरटीई कोट्यातून प्रवेशित विद्यार्थ्यांकडून गणवेश, पुस्तके, वह्या किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली एक रुपयाही आकारता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश शिक्षण विभागाने जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचेही शासनाने बजावले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, आरटीई अंतर्गत प्रवेशित बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. मात्र राज्यातील अनेक खासगी शाळांकडून पुस्तके, गणवेश व विविध साहित्याच्या नावाखाली पालकांकडून अतिरिक्त शुल्क उकळले जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या गंभीर प्रकाराची दखल घेत शिक्षण संचलनालयाने सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी तसेच संबंधित प्रशासनाला अशा शाळांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

नियमानुसार, आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार टाकणे बेकायदेशीर असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जर एखादी शाळा गणवेश, पुस्तके किंवा इतर साहित्यांसाठी पैशांची मागणी करत असेल, तर पालकांनी तात्काळ स्थानिक शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहरातही काही संस्थाचालक शाळांकडून आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांकडे तब्बल सात हजार रुपयांपर्यंतची मागणी केली जात असल्याची चर्चा सध्या पालकांमध्ये रंगली आहे. आयडी नंबर प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून गणवेश व पुस्तकांच्या नावाखाली रक्कम मागितली जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

पालकांनी गट शिक्षणाधिकारी, अमळनेर तसेच शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित शाळांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोषी आढळणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्याचा इशाराही शिक्षण विभागाने दिला आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, शिक्षणाच्या नावाखाली होणारी पालकांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी शासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.

अमळनेरचे सुपुत्र डॉ. संदीप पाटील यांना आंतरराष्ट्रीय बहुमान 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) अमेरिकेतील प्रतिष्ठित ‘ अमेरिकन असोसिएशन ऑफ हीप अँड नी सर्जन्स ‘ या संघटनेने अमळनेरचे सुपुत्र तथा प्रसिद्ध सांधेरोपण व स्पोर्ट्स सर्जन डॉ. संदीप सुरेश पाटील यांना संघटनेचे सदस्यत्व बहाल केले आहे. हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठा बहुमान मानला जातो.

 

यासाठी डॉ. पाटील यांना त्यांचे मार्गदर्शक डॉ. आर्थर मलकानी, चीफ ऑफ अॅडल्ट रिकन्स्ट्रक्शन व फेलोशिप डायरेक्टर फॉर जॉइंट रिप्लेसमेंट, युनिव्हर्सिटी ऑफ लुईव्हिल, केंटकी (यूएसए) तसेच डॉ. सव्यसाची ठक्कर, डिपार्टमेंट ऑफ आर्थोप्लास्टी, हिप अँड नी सर्जरी, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, बाल्टिमोर (यूएसए) यांनी शिफारस केली. डॉ. पाटील यांनी सन २००८-०९ मध्ये डॉ. आर्थर मलकानी यांच्या मार्गदर्शनाखाली फेलोशिप पूर्ण केली होती. याशिवाय डॉ. संदीप पाटील यांची ‘इंडियन सोसायटी ऑफ हिप अँड नी सर्जन्स’ या राष्ट्रीय संघटनेचे सदस्य म्हणूनही निवड झाली आहे. दि. १६ एप्रिल २०२६ रोजी त्यांना सदस्यत्व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्यांचा सदस्यत्व क्रमांक पी-०१-१३२ असा आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एच. पी. सी. खिंचा व सचिव डॉ. लिओ जोसेफ यांच्या स्वाक्षरीने हे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. संदीप पाटील हे डी.एन.बी. ऑर्थो व डिप्लोमा ऑर्थो पदवीधारक असून सांधेरोपण व स्पोर्ट्स इंज्युरी शस्त्रक्रियेत तज्ज्ञ आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील सदस्यत्वामुळे अमळनेरच्या वैद्यकीय क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. डॉ. पाटील यांनी या यशाचे श्रेय आपले गुरू डॉ. मलकानी व डॉ. ठक्कर यांना देत कृतज्ञता व्यक्त केली आहे. डॉ. संदीप पाटील हे सध्या मुंबई (बोरीवली) येथे सेवारत असून अमळनेर तालुका मराठा समाजाचे माजी सचिव कै. सुरेश रामकृष्ण सोनवणे (अमळगाव) यांचे ते सुपूत्र आहेत.

 

 

 

अमळनेरमध्ये संत शिरोमणी भिमा भोई जयंती उत्साहात साजरी महाभंडाऱ्यासह भक्तिमय वातावरणात हजारो समाजबांधवांची उपस्थिती

 

अमळनेर शहरात संत शिरोमणी भिमा भोई यांची जयंती अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. भोई समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सामूहिक आरती करून संत शिरोमणी भिमा भोई यांना अभिवादन करण्यात आले.

भोईवाडा, बहादरपूर नाका, रुबीजीनगर तसेच पैलाड परिसरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. सर्वांनी एकत्र येत भक्तीभावाने जयंती उत्सव साजरा करत सामाजिक ऐक्य आणि एकोप्याचे दर्शन घडवले.

यावेळी समाजासाठी विशेष योगदान देणाऱ्या मान्यवरांचा भोई समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यात सुरेश शिंगाणे, अनिल महाजन, भीमराव शिंगाणे, रोहन वडिले, हिरालाल भोई, साहेबराव शिंगाणे, संतोष शिंगाणे, पांडुरंग शिंगाणे, सुदाम शिंगाणे, देविदास भोई, पंकज मोरे, प्रकाश शिंगाणे आणि भाऊसाहेब महाजन यांचा समावेश होता. समाजकार्य आणि कार्यक्रमासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पांडुरंग शिंगाणे (नगरसेवक), दीपक शिंगाणे, मोहन भोई, हिरालाल भोई, राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे, श्रीराम भोई, भीका भोई, संतोष शिंगाणे, पंकज भोई (नगरसेवक), दिनकर भोई, शशिकांत शिंगाणे, मनोज शिंगाणे, सुदाम शिंगाणे, गणेश शिंगाणे, देवा भोई, विजय शिंगाणे, सागर भोई, दीपक ढोले, संदीप शिंगाणे, विकी शिंगाणे आणि प्रवीण शिंगाणे यांनी विशेष परिश्रम घेत मोलाचे सहकार्य केले.

संपूर्ण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण माहोलात पार पडला. समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून सामाजिक ऐक्याचे सुंदर दर्शन या जयंती उत्सवातून घडले.

पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आमदार अनिल पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर नगरसेवकांसह उपस्थित

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहराचे अनेक वर्षांपासूनचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेली तब्बल *१९४.५४ कोटी रुपयांची पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजना* आता वेगाने प्रगतिपथावर असून या महत्त्वाकांक्षी योजनेची रविवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

रविवार, दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह पाडळसरे धरण परिसराला भेट देत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी ७:३० वाजताच आमदार अनिल पाटील यांचा ताफा पाडळसरे धरण परिसरात दाखल झाला.

विशेष म्हणजे, शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहर विकासाच्या मुद्द्यावर आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

पाडळसरे धरणाजवळ तापी नदीच्या काठी सुरू असलेल्या जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. शहरवासीयांना भविष्यात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमळनेर शहरासाठी ही योजना ‘गेमचेंजर’ ठरणार असून, २४ तास अखंडित पाणीपुरवठ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येत केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात दिसू लागल्याचे चित्र या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.

जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर सलग दुसऱ्यांदा मानाचा बहुमान; जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

प्रतिनिधी | जळगाव

देशातील संसदेतील उल्लेखनीय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी कामगिरीसाठी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावत त्यांनी जळगाव जिल्ह्याचा गौरव देशपातळीवर उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियंदर्शिनी राहुल यांनी पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत खासदारांच्या संसदीय कामगिरीचा सखोल अभ्यास करून ज्युरी समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, विविध चर्चांमधील प्रभावी मांडणी, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा, विकासाभिमुख भूमिका आणि संसदेतील शिस्तबद्ध उपस्थिती या महत्त्वपूर्ण निकषांवर खासदार स्मिताताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा हा पुरस्कार देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो.

यंदाच्या *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* मध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळाले आहे. राज्यातील पाच खासदारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, हेमंत सावरा, स्मिता वाघ तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्यनिष्ठा, जनतेशी असलेली बांधिलकी आणि विकासकामांबाबतच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विविध स्तरांतून विशेष कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमळनेरात लायन्स क्लबतर्फे मोफत हाडे व सांधे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर : शहरातील लायन्स क्लब ऑफ,अमळनेर यांच्या वतीने रविवारी दि. २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत हाडे व सांधे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. न्यू प्लॉट परिसरातील प्राजक्ता क्लिनिक येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले.


शिबिरात हाडे व सांधे विकारांवरील तज्ज्ञ म्हणून डॉ.संदीप सुरेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबईतील व्ही. एन. देसाई व एमसीजीएम रुग्णालयाचे माजी विभागप्रमुख म्हणूनही कार्य केले आहे.
शिबिरात सांधे प्रत्यारोपण, गुडघे व खांदा प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच कंबरदुखी आदी आजारांबाबत सखोल माहिती देण्यात आली. आधुनिक व रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन करून रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा अमळनेर तालुक्यासह पारोळा, चोपडा, नरडाणा व शिंदखेडा तालुक्यातील तब्बल १०५ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ. संदीप जोशी, सचिव ला. महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष ला. नितीन बिंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन ला. शेखर धनगर, ला. डॉ. धीरज कोकाटे, ला. राजेश कुंदनानी, डॉ. मिलिंद नवसारीकर, रवींद्र कॉलरा, प्रशांत सिंघवी, रवींद्र जैन, निरज अग्रवाल, प्रदीप जैन, प्रदीप अग्रवाल, सुनील चौधरी, एस. डी. भरुचा, डॉ. किशोर शहा, योगेश मुंदडा, डॉ. रवींद्र कुलकर्णी, शाम गोकलानी, राजेश वरलानी तसेच प्रा. नयना नवसारीकर आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अमळनेरात आज रंगणार हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन  मराठी वाङ् मय मंडळाचा उपक्रम 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मराठी वाङ् मय मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन शनिवार दिनांक 23 रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.

           या कवी संमेलनात देशभरातील प्रसिद्ध कवी व शायर सहभागी होणार असून त्यामध्ये घनश्याम अग्रवाल ( हास्य – व्यंग अकोला), सरिता सरोज ( गीत गजल नागपूर ), कवीपुष्पक देशमुख ( वीर रस, मुलताई ), कपिल जैन ( यवतमाळ) आणि शायर दीपक मोहिते ( वर्धा) यांचा समावेश आहे.

                 रसिकांच्या मनाला खळखळून हसवणारा, विचारांना हलकेच चिमटे काढणारा आणि साहित्यिक आनंदाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम अमळनेर करांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

             कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष विवेकानंद भांडारकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, कार्यवाह भैय्यासाहेब मगर, प्रा. श्याम पवार, प्रदीप साळवी, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. उदय देशपांडे, तसेच कार्यकारिणी सदस्य बन्सीलाल भागवत, सोमनाथ ब्रम्हे, स्नेहा एकता रे, संदीप घोरपडे, ऍड. के. व्ही. कुलकर्णी, वसुंधरा लांडगे, डॉ. महेश पाटील, कांचन शहा, प्रा. डॉ. विजयकुमार तुंटे, अजय केले, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, अनिल सोनार आयोजनात सक्रिय आहेत.

             कार्यक्रमासाठी तिकीट विक्री मराठी वाङ्मय मंडळ च्या कार्यालयात सुरु असून तिकीट दर रुपये 1500, रुपये 1000, रुपये सातशे, आणि रुपये 400 असे ठेवण्यात आले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने रसिकांनी आपली जागा त्वरित निश्चित करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेतकी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात.  बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अयशस्वी

 

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत एकूण 155 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. दिनांक 20 मे रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी 111 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता अंतिम चित्र स्पष्ट होऊन 30 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत 44 उमेदवार रिंगणात आहेत.

            दरम्यान शेतकी संघ ही सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या फारसे भक्कम नसल्याने निवडणुकीचा भुर्दंड संस्थेवर नको असे काही नेत्यांचे म्हणणे होते. त्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र बिनविरोध चा प्रयत्न यशस्वी झाल्याने आता निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे.

          आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून यात संपूर्ण 15 उमेदवारांचा समावेश आहे. तर खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास पॅनल गठीत झाले असून या चौदा उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाने शेतकरी पॅनल जाहीर केले असून त्यांनी सोसायटी मतदार संघात एकही उमेदवार दिला नसून अन्य जागांवर दहा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

            या निवडणुकीत खासदार आणि आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.