लोकसहभागातून ११ हजार झाडांचे संवर्धन; साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचा हरित उपक्रम ठरतोय प्रेरणादायी संरक्षणासाठी कंपाउंड ची लोकप्रतिनिधींकडे मागणी
अमळनेर (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि हरित भविष्याच्या दिशेने साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानने हाती घेतलेला महत्त्वाकांक्षी वृक्षसंवर्धन उपक्रम सध्या वेगाने सुरू आहे. लोकसहभागातून उपलब्ध झालेल्या जागेवर तब्बल ११ हजार झाडांचे संवर्धन व संगोपन करण्यात येत असून, हा उपक्रम परिसरासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
लोकसहभागातून उभारलेल्या आणि सुमारे अकरा हजार झाडांचे संवर्धन संगोपन सुरू असलेल्या साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानच्या परिसराला संरक्षण कंपाऊंड उभारण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी केली आहे. कंपाउंड नसल्यामुळे समाजकंटकांकडून दोन वेळा परिसरात आग लावण्यात आली असून त्यात अनेक झाडांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी उभारलेल्या या हरित उपक्रमाचे संरक्षण करणे ही प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सामाजिक जबाबदारी असून तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळात कंपाऊंडच्या कामाला सुरुवात होऊन 25 टक्के काम पूर्ण झाले होते. मात्र त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार अनिल पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित कामाला गती मिळाली नाही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या या प्रकल्पाकडे दुर्लक्ष का केली जात आहे असा सवाल उपस्थित करून यासाठी आता जनमत तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही दर्शना पवार यांनी नमूद केले आहे.


