ब्रेकिंग
खुर्चीच्या राजकारणात अमळनेरचा विकास अडकला; जनतेच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची ‘आप’ची मागणी

 

अमळनेर (प्रतिनिधी):

अमळनेर नगरपालिकेतील अलीकडील राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आम आदमी पार्टीने जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधण्याची गरज व्यक्त केली आहे. केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांपेक्षा शहरातील पाणी, रस्ते, स्वच्छता आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर सर्व पक्षांनी एकत्रितपणे काम करावे, असे आवाहन आम आदमी पार्टीचे अमळनेर तालुकाध्यक्ष महेंद्र नाना साळुंखे आणि तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.

महेंद्र साळुंखे यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये निवेदन देणे, आंदोलन करणे किंवा प्रशासनाकडे मागण्या मांडणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र, प्रशासकीय पदांचा सन्मान राखणे आणि लोकशाही मूल्यांचे भान ठेवणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रसिद्धीसाठी करण्यात येणाऱ्या प्रतीकात्मक कृतींमुळे शहरातील गंभीर प्रश्नांकडून जनतेचे लक्ष विचलित होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी अमळनेर शहरातील खड्डेमय रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, स्वच्छतेचे प्रश्न आणि आरोग्य व्यवस्थेतील अडचणी यावर तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

तालुका उपाध्यक्ष रामकृष्ण चिंतामण पाटील यांनीही प्रशासकीय संस्थांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. विरोध हा विधायक पद्धतीने, सभागृहात आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वैयक्तिक टीका किंवा प्रसिद्धीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

प्रसिद्धीपत्रकात आम आदमी पार्टीने अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन, दर्जेदार शिक्षण, सक्षम आरोग्य सुविधा, स्वच्छ शहर आणि मूलभूत नागरी सुविधांवर भर देण्याची भूमिका पुन्हा स्पष्ट केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत विकासाभिमुख राजकारण करण्याचा पक्षाचा निर्धार असल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *