ब्रेकिंग
अल्पवयीन मुलीच्या मृत्यूने संतप्त धोबी समाज आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईसाठी तहसीलदारांना निवेदन..

 

अमळनेर :धुळे येथील गोळीबार टेकडी परिसरातील १५ वर्षीय जानवी जितेंद्र ठाकरे या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्या प्रकरणाने परीट-धोबी समाजात संतापाची लाट उसळली असून, अमळनेर युवा परीट धोबी समाज व परदेशी धोबी समाजाच्या वतीने सोमवारी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना निवेदन देत दोषींवर तातडीने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. मानसिक छळामुळे एका निष्पाप मुलीला जीवन संपवावे लागल्याचा आरोप करत समाजबांधवांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आणि संबंधितांवर कायद्यानुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

निवेदनात दोषींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील लागू कलमांनुसार तात्काळ गुन्हे दाखल करून प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करण्यात यावी तसेच दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. यावेळी रविंद्र जाधव, विजय वाघ, उमेश वाल्हे, भरत जावदेकर, दीपक वाल्हे, गंगाराम वाल्हे, गणेश वाल्हे, अनिल मांडोळे, अनिल पवार, परशुराम महाले, सुरेशचंद्र येशी, विकी जाधव, अशोक येशी, अरुण जाधव, लक्ष्मण परदेशी, जयसिंग परदेशी, केशव परदेशी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही,” असा इशारा देत समाजाने या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. आवश्यकता भासल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. एका अल्पवयीन मुलीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा मिळाली पाहिजे, अशी एकमुखी मागणी करत समाजाने न्यायासाठी एकजुटीने आवाज बुलंद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *