ब्रेकिंग
अमळनेर तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर; जनजीवन विस्कळीत, बोरी नदीला महापूर, शहरात सर्वत्र पाणीच पाणी

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याला अक्षरशः जलमय स्वरूप प्राप्त झाले आहे. संततधार पावसामुळे बोरी नदीला महापूर आला असून नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. 

शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि बाजारपेठांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. अनेक घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्य, अन्नधान्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंचेही नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

बोरी नदीने धोक्याची पातळी गाठली

सततच्या पावसामुळे बोरी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. नदी दुथडी भरून वाहत असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांना नदीपात्रात किंवा पुलांवर जाण्याचे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाहतूक आणि दैनंदिन व्यवहारांवर परिणाम

अनेक अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला. काही ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहने पाण्यात बंद पडल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शाळा, महाविद्यालये, व्यापारी आस्थापने आणि दैनंदिन व्यवहारांवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे.

प्रशासन सतर्क

महसूल, नगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आवश्यक असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, तसेच पुराच्या पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मुसळधार पावसामुळे अमळनेर तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली असून सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे.

अमळनेरात ‘समाधान शिबिर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निराकरण

 

अमळनेर | प्रतिनिधी

तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी कार्यालय, अमळनेर यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र सन्मान अभियान” अंतर्गत शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी १० वाजता सुरू झालेल्या या शिबिराचे उद्घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्रीपाटील तसेच जिल्हाधिकारी जळगाव रोहन घुगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे तत्काळ निराकरण करण्यावर भर दिला.

शिबिरात उपविभागीय अधिकारी, मयूर भंगाळे,उपविभागीय पोलीस अधिकारी, विनायक, कोते तहसीलदार, रुपेश कुमार सुराणा, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, नगर परिषद, पंचायत समिती तसेच महसूल, ग्रामविकास, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, समाजकल्याण, शिक्षण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘रोल मॉडेल’ ठरलेल्या या समाधान शिबिरात महसूल, जात व रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, शासकीय योजनांचा लाभ, रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध तक्रारी व अर्जांची जागेवरच सुनावणी करून अनेक प्रकरणांमध्ये तत्काळ निर्णय घेण्यात आले. तसेच पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले, तर सेवानिवृत्त शिक्षिका वसुंधरा लांडगे यांनी आभार मानले. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत प्रशासन आणि जनतेतील दुवा अधिक मजबूत करणारे हे समाधान शिबिर यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

विठूनामाच्या अखंड गजरात अमळनेर महिला पतंजली योग समितीची भव्य आषाढी वारी!

 

टाळ-चिपळ्यांच्या निनादात विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेने भाविक मंत्रमुग्ध; २० योगवर्गांचा उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त अमळनेर महिला पतंजली योग समितीच्या वतीने विठूरायाच्या दर्शनासाठी भव्य व शिस्तबद्ध वारीचे आयोजन करण्यात आले. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात, टाळ-चिपळ्यांच्या निनादात आणि वारकरी परंपरेचा भक्तिमय आविष्कार सादर करणाऱ्या या वारीने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले.

या वारीचे आयोजन जिल्हा प्रभारी तथा कोषाध्यक्ष रत्ना भदाणे मॅडम आणि अमळनेर तहसील प्रभारी कामिनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. शनिवार, दि. २६ जुलै, रोजी पहाटे ५.३० वाजता क्रांतिपर्व योगवर्ग, ढेकूरोड, अमळनेर येथून वारीला प्रारंभ झाला.

वारी जिजाऊ गेट, बसस्टॅण्ड, तिरंगा चौक, सराफ बाजार मार्गे भक्तिमय वातावरणात मार्गक्रमण करत संत सखाराम महाराज वाडी येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर विठ्ठलनामाचा गजर, टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि भक्तीचा उत्साह अनुभवायला मिळाला.

या वारीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध पद्धतीने निघालेली दिंडी, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज, पालखी, विठ्ठलाची मूर्ती तसेच प्रत्यक्ष विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेतील सहभागी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी पारंपरिक रिंगण सोहळे सादर करण्यात आले. भाविकांनी सामूहिकरित्या विठूरायाचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात वारी पोहोचली. तेथे विविध योगवर्गांच्या वतीने आकर्षक आणि भक्तिमय रिंगण सोहळ्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.

वारीची सांगता रत्ना भदाणे ताई यांच्या हस्ते भाविकांना राजगिऱ्याच्या लाडूंचे गोड प्रसाद वितरण करून करण्यात आली. या वारीच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व योगशिक्षक तसेच योग संघटन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

वारीमध्ये योगशिक्षक, साधक आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. उत्कृष्ट नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि भक्तिमय वातावरणामुळे ही वारी विशेष लक्षवेधी ठरली. विशेष म्हणजे एकूण २० योगवर्गांनी या भव्य वारीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर अमळनेर भक्तिरसात न्हाऊन निघाले!

 

ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात श्री मंगळग्रह मंदिरातून संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत भव्य दिंडी; जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक केले पूजन

अमळनेर (प्रतिनिधी):

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त संपूर्ण अमळनेर नगरी शनिवारी (दि. २५ जुलै) विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली. मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिराच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतच्या भव्य दिंडी सोहळ्याने शहरातील वातावरण भक्तिमय झाले. ‘ज्ञानोबा-तुकाराम’, ‘राम कृष्ण हरी’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या अखंड नामघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविकांनी विठुरायाच्या चरणी भक्तीभाव अर्पण केला.

दिंडीच्या शुभारंभप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक उपस्थित राहून राजदंडाचे पूजन केले. मंत्रोच्चारात भगव्या पताकेला वंदन करून त्यांनी दिंडीला खांदा दिला. यानंतर हातात टाळ घेऊन काही काळ दिंडीत सहभागी होत त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भक्तिमय वातावरणाचा आनंद लुटला. त्यांच्या उपस्थितीमुळे या धार्मिक सोहळ्याला विशेष प्रतिष्ठा लाभली.

यावेळी नायब तहसीलदार प्रशांत धमके, महसूल प्रशासनातील पुरुषोत्तम पाटील, टी. सी. धनराळे, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे, ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण, मंगल सेवेकरी विनोद कदम, बाळा पवार, मंदिराचे सेवेकरी आणि असंख्य भाविक उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिरात पूजा-अर्चा करून संकल्प सोडला. त्यानंतर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या हस्ते त्यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.

पहाटेपासूनच विठ्ठलनामाचा अखंड गजर

पहाटे श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच श्री मंगळग्रह देवतेची विधिवत पूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. त्यानंतर वैष्णव परंपरेचे प्रतीक असलेली पताका, तुळशी वृंदावन, भगवे ध्वज आणि विठ्ठलाच्या प्रतिमेसह दिंडीला प्रारंभ झाला. टाळ, मृदुंग आणि अभंगांच्या सुरेल संगतीने वातावरण भक्तिरसाने भारावून गेले. मंदिराचे सेवेकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि बालवारकरी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विठ्ठलनामाचा अखंड गजर केला.

दिंडीदरम्यान संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत एकनाथ महाराज यांच्या अभंगांचे सामूहिक गायन करण्यात आले. ‘राम कृष्ण हरी’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल’ या नामघोषांनी संपूर्ण मार्ग भक्तिमय झाला. समता, सेवा, प्रेम, संयम आणि ईश्वरनिष्ठेचा वारकरी संदेश या दिंडीतून समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला.

पुष्पवृष्टीने दिंडीचे जल्लोषात स्वागत

दिंडी मार्गावरील पैलाड परिसर आणि चोपडा नाका येथे नागरिकांनी दिंडीवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. दगडी दरवाजा ते सराफ बाजार आणि पुढे संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंत सेवेकऱ्यांनी हरिपाठ म्हणत, फुगडी खेळत भक्तीचा अनोखा संगम घडवून आणला.

संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानात पोहोचल्यानंतर संस्थानाचे विश्वस्त तथा पुरोहित जय देव आणि सेवेकऱ्यांनी दिंडीचे स्वागत केले. तेथे देवांच्या मूर्तींना राजदंडाचा स्पर्श करून हरिपाठ, महाआरती आणि विठ्ठल-रुक्मिणी पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दिंडी पुन्हा श्री मंगळग्रह मंदिरात परतली.

भक्ती, सेवा आणि समर्पणाचा अविस्मरणीय सोहळा

आषाढी एकादशीच्या या मंगल सोहळ्याने भक्ती, श्रद्धा, सेवा आणि समर्पणाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. श्री मंगळग्रह मंदिरातून निघालेली ही दिंडी केवळ संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानापर्यंतचा प्रवास नव्हता, तर प्रत्येक भाविकाच्या अंतःकरणात विठ्ठलभक्ती जागवणारी, संतपरंपरेचा गौरव करणारी आणि समाजात अध्यात्माचा सुगंध दरवळवणारी एक अविस्मरणीय आध्यात्मिक यात्रा ठरली.

“एआय हेच भविष्य; तंत्रज्ञान आत्मसात केले नाही तर मागे पडू” – आमदार अनिल पाटील प्रताप महाविद्यालयात ‘स्व. अजितदादा पवार’ जयंतीनिमित्त एआय तंत्रज्ञान पुरस्कार सोहळा; आदर्श शेतकरी व विद्यार्थ्यांचा गौरव

 

अमळनेर (प्रतिनिधी):

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे आजच्या युगातील सर्वात प्रभावी आणि अद्ययावत माहितीचे माध्यम असून भविष्यात प्रत्येक क्षेत्रात एआयचे महत्त्व वाढणार आहे. विद्यार्थ्यांनी न्यूनगंड न बाळगता एआयचे प्रशिक्षण घेऊन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा भविष्यात स्पर्धेत मागे पडण्याची वेळ येईल, असे प्रतिपादन लोकप्रिय आमदार अनिल पाटील यांनी केले.

AISECT-HAL कौशल्य रथ आणि प्रताप महाविद्यालय (स्वायत्त), अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित AI तंत्रज्ञान विद्यार्थी बक्षीस समारंभ तथा स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार सोहळा शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.शी.मंडळाचे कार्याध्यक्ष सी.ए. नीरज अग्रवाल होते. प्रारंभी दानशूर प्रताप शेठजी, सरस्वती देवी, पूज्य साने गुरुजी तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमांचे पूजन आमदार अनिल पाटील, आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा, सी.ए. नीरज अग्रवाल, धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे प्रवक्ते श्यामकांत सनेर, खा.शी.मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष कमल कोचर, ज्येष्ठ संचालक हरी वाणी, प्रदीप अग्रवाल आणि विश्वस्त सौ. वसुंधरा लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक HAL कौशल्य रथचे समन्वयक महेंद्र शिरसाठ यांनी केले. त्यांनी एआय प्रशिक्षण उपक्रमाचा विस्तृत आढावा मांडत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध संधींची माहिती दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सी.ए. नीरज अग्रवाल आणि विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

आईसेक्ट विद्यापीठाचे समन्वयक बिनेश वर्मा यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना बँकिंग किंवा ई-मेलचे पासवर्ड कुठेही शेअर करू नयेत, असा सल्ला दिला. एआयच्या माध्यमातून इंटर्नशिप, प्रकल्प आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक विद्यार्थ्याने एआयचा वापर शिकणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, महेंद्र शिरसाठ, सामाजिक न्याय विभाग जळगावच्या प्रमुख कल्पना अहिरे, प्राचार्य हर्षवर्धन जाधव, खा.शी.मंडळाचे चिटणीस प्रा. पराग पंडित पाटील, सहचिटणीस प्रा. व्ही. बी. मांटे, माहिती व तंत्रज्ञान इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. वर्षा पाठक, संजीवनी गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

“चॅट जीपीटीसह एआयचा वापर अपरिहार्य”

मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, आज प्रशासन, शिक्षण, शेती आणि उद्योग क्षेत्रात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे. चॅट जीपीटीसारख्या आधुनिक माध्यमातून अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होत असून एआयचा वापर करता आला नाही तर आपण शेवटच्या क्रमांकावर राहू. विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेऊन या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवावे. सीएसआर निधीतून विद्यार्थ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न होत असून शेतकऱ्यांच्या मुलांनाही एआयचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती अधिक उत्पादनक्षम आणि सक्षम कशी करता येईल, याचा विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

‘आदर्श कृषी सन्मान पुरस्कार’ प्रदान

कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वर्गीय अजितदादा पवार कृषी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

पुरस्कार प्राप्त शेतकरी :

प्रकाश बडगुजर (गलवाडे)

श्रीमती लिलाबाई ठाकूर (साळवे)

किशोर पाटील (गांधली)

बापूसाहेब देवरे (वलवाडी उपनगर, धुळे)

शरद सोनवणे (धरणगाव)

एआय प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचाही गौरव

AI प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सन्मानित विद्यार्थी :

जयश्री वासुदेव पाटील

पूनम राहुल चौधरी

हर्षल महेंद्र नेरकर

कल्याणी कैलास बडगुजर

फाल्गुनी आनंदा महाजन

रिंकू अनिल साळी

भूमिका रितेश जैन

मयुरी किशोर पवार

वैष्णवी विलास पाटील

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी HAL कौशल्य रथच्या प्रशिक्षिका परिणिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले, तर दीपक चौधरी यांनी तांत्रिक सहकार्य केले.

यावेळी प्राचार्य डॉ. एस. जे. शेख (अमळनेर), प्रा. विजय तुंटे, डॉ. अमित पाटील, प्रा. शशिकांत सोनवणे, प्रा. आर. सी. सरवदे, डॉ. माधव भुसनर, प्रा. नलिनी पाटील, प्रा. वृषाली वाकडे, प्रा. जितेंद्र पाटील, डॉ. रवी बाळसकर, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. नितेश कोचे, डॉ. अनिल झळके, डॉ. बालाजी कांबळे यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वाल्मिक जाधव यांनी केले, तर प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

रेल्वे स्थानकावर मानवतेचा महायज्ञ! ‘जैन सोशल ग्रुप’सह शहरातील सामाजिक संस्थांकडून अन्नछत्र; अडकलेल्या १२०० प्रवाशांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काहींचे मार्ग बदलण्यात आले, तर अनेक गाड्या अमळनेर रेल्वे स्थानकावरच तासन्‌तास खोळंबून राहिल्या. त्यामुळे हजारो प्रवासी अमळनेरमध्ये अडकून पडले. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी प्रवाशांसमोर अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

अशा संकटाच्या वेळी ‘जैन सोशल ग्रुप’ (JSG) आणि अमळनेर शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी एकत्र येत मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला. रेल्वे स्थानकावरच भव्य अन्नछत्राचे आयोजन करून अडकलेल्या प्रवाशांसाठी गरमागरम भोजन, नाश्ता, चहा, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपसोबत लायन्स क्लब, लायनेस क्लब, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, परिवर्तन ग्रुप आणि शहरातील इतर अनेक सामाजिक संस्थांनी खांद्याला खांदा लावून निस्वार्थ भावनेने काम केले. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी दिवसभर रेल्वे स्थानकावर थांबून प्रवाशांची सेवा केली.

याशिवाय अमळनेरमधील अनेक नागरिकांनीही आपापल्या परीने मोठे योगदान दिले. कोणी अन्नधान्य उपलब्ध करून दिले, कोणी वाहनांची व्यवस्था केली, तर अनेकांनी श्रमदान करून सेवा कार्यात सहभाग नोंदवला. संकटाच्या क्षणी संपूर्ण शहरच मदतीसाठी एकवटल्याचे प्रेरणादायी चित्र रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.

या अन्नछत्राचा लाभ सुमारे १,००० ते १,२०० प्रवाशांनी घेतला. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांची काळजी घेत त्यांच्यासाठी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे अनेक प्रवासी भावूक झाले. “अमळनेरकरांनी आम्हाला परक्या शहरातही घरच्यांसारखी माया दिली,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख, सचिव महावीर सिंघवी तसेच जैन सोशल ग्रुपचे सर्व सभासद सक्रियपणे सहभागी झाले होते. या मानवतावादी उपक्रमाची माहिती जैन सोशल ग्रुपचे पीआरओ कीर्तीकुमार कोठारी यांनी दिली.

संकटाच्या काळात जात, धर्म, पंथ आणि संघटनांच्या सीमा बाजूला ठेवत अमळनेरकरांनी दाखवलेली एकजूट, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, “माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म” हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव

 

केक कापून, फुगे आकाशात झेपावत आणि ‘वर्धापन दिन चिरायू होवो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेचा ८२ वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या आणि अभिनव पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थीनी, शिक्षक, माजी विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने शाळेच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद जगदीश अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रोहिणी सुनील देशपांडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. शुभांगी निलेश राजपूत उपस्थित होत्या.

यावेळी ताईसाहेब माधुरी पाटील, कमलजी कोचर, ताईसाहेब वसुंधरा लाडगे, सी.ए. नीरजजी अग्रवाल, भाऊसाहेब जितेंद्र जैन, श्री. हरी आण्णा वाणी, श्री. प्रदीप अग्रवाल, श्री. विवेक भांडारकर, प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, श्री. विनोद भांडारकर, प्रा. व्ही. बी. मांटे, श्री. निलेश भांडारकर, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, श्री. व्ही. एम. पाटील, श्रीमती एस. पी. बाविस्कर, श्री. दत्तात्रय पवार, श्री. एस. पी. वाघ, श्री. कैलास पाटील, श्री. आर. जे. पाटील, श्री. एस. एम. पवार तसेच सौ. पी. पी. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, श्रीमंत प्रताप शेठजी, परमपूज्य सानेगुरुजी आणि श्रीमती द्रौपदीबाई भांडारकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून झाली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.

यावेळी शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्यात आली. हा अनोखा क्षण पाहताच विद्यार्थीनींनी “वर्धापन दिन चिरायू होवो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. के. पी. सनेर आणि श्रीमती पी. डी. शेवाळे यांनी करून दिला.

प्रमुख अतिथींनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना शिक्षण, संस्कार, कर्तृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. याच प्रसंगी शाळेच्या “फुलवात” या स्वलिखित वार्षिक अंकाच्या ८१ व्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

समारंभात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींसह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या क्रीडापटू विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना चिवडा व पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले, तर श्री. एस. पी. वाघ यांनी आभार मानले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, बक्षीस समिती प्रमुख श्रीमती पी. व्ही. साबे, सौ. व्ही. जे. पाटील, श्री. किरण पाठक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शाळेच्या ८२ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा हा वर्धापन दिन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी

‘लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण’ या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनाला यश

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील सहायक प्राध्यापक प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समाजकार्य विषयात यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन केली आहे.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी डॉ. एस. जी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या संशोधनाचा ऑनलाइन व्हायवा यशस्वीरीत्या पार पडला.

या परीक्षेसाठी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन (बिलासपूर) यांनी चेअरमन म्हणून तर प्रा. डॉ. प्रतिभा मिश्रा (बिलासपूर) यांनी बाह्य मूल्यमापक म्हणून सहभाग नोंदविला. संशोधन मार्गदर्शक डॉ. सुदाम राठोड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी “लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण” या समाजातील अत्यंत संवेदनशील, दुर्लक्षित आणि महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणारे हे संशोधन समाजकार्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेरचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, राज्यभरातील सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि स्नेहींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, समाजकार्य क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुराच्या संकटात मानवतेचा हात! रोटरी क्लब अमळनेरकडून हजारो प्रवाशांना अन्नसेवा वापी विभागातील पुरामुळे मार्ग बदललेल्या पटना–बांद्रा एक्स्प्रेसमधील १२०० प्रवाशांना रेल्वे स्थानकावर दिला दिलासा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : वापी विभागात आलेल्या भीषण पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्र. २९७२ पटना–बांद्रा एक्स्प्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत ट्रेनमधील सुमारे १००० ते १२०० प्रवाशांच्या जेवणाची तातडीने व्यवस्था करून रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी परिचय दिला.

पुराच्या संकटामुळे अडकलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. त्यामध्ये रोटरी क्लब अमळनेरने अत्यंत तत्परतेने पुढाकार घेत प्रवाशांना अन्नसेवा उपलब्ध करून दिली.

क्लब अध्यक्ष रोटे. महेश पाटील तसेच सेक्रेटरी व उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे स्थानक अधीक्षक श्री. अनिल शिंदे व सी. एम. आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने, तसेच पश्चिम रेल्वेचे माजी ZRUCC सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेने व विशेष प्रयत्नातून अन्नवाटपाची प्रभावी व्यवस्था उभी करण्यात आली.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब अमळनेर आणि इतर सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे हा उपक्रम यशस्वी केला. संकटाच्या काळात सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वयंसेवकांनी प्रवाशांची मनापासून सेवा केली.

या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. प्रीतपालसिंग बग्गा होते. त्यांच्यासह रोटे. अभिजीत भांडारकर, रोटे. कीर्ती कुमार कोठारी, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. प्रतीक खंडेरिया, रोटे. धीरज अग्रवाल, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. ईश्वर सेनानी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. सनी कोठारी तसेच रोटरी क्लबच्या सर्व रोटेरियन सदस्यांनी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.

या सेवाकार्यासाठी अमळनेरमधील नागरिक आणि विविध संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकटाच्या प्रसंगी समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब अमळनेरने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला.

चैतन्य संदानशिव हल्लाप्रकरण तापले; आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी समाजबांधवांचा एल्गार! मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा; प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा, घोषणांनी अमळनेर दणाणले

 

अमळनेर | प्रतिनिधी

देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी गुरुवारी संताप व्यक्त करत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने महाराणा प्रताप चौक ते प्रांत कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा”, “मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी तसेच अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या चैतन्य राजेंद्र संदानशिव यांना जातीवाचक शिवीगाळ करत तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रकरणाचा निष्पक्ष, जलद व सखोल तपास करण्याची मागणी केली. भारतीय न्याय संहितेतील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच पीडित आणि साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजबांधवांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव व विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.