ब्रेकिंग
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जयंतीनिमित्त अमळनेरात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद  ‘ आप ‘ च्या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक 

 अमळनेर ( प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अमळनेर तालुका आम आदमी पार्टी च्या वतीने एका भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

               या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिल पाटील, डॉ. अनिल शिंदे, भैरवी वाघ पलांडे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यावेळी उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचे स्मरण केले आणि रक्तदान शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले.

              कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, दीक्षा महेंद्र साळुंखे, यांनी केले होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, वंदना रामकृष्ण पाटील, सल्लागार मोहन मोरे, सुधाकर गजे, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, ललित सातपुते, राजू धनगर, शेजत खाटीक यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अमळनेर शेतकी संघावर राष्ट्रवादीचा दणदणीत विजय   आमदार अनिल पाटलांचे वर्चस्व कायम

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनल दणदणीत विजय मिळवित 15 पैकी दहा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. या विजयामुळे शेतकी संघावर राष्ट्रवादीचे निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. तर काँग्रेसच्या शेतकरी पॅनल ला तीन जागा तर भाजप खासदार स्मिता वाघ यांच्या किसान विकास पॅनल ला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले.

            तालुक्यात भाजपासाठी हा मोठा धक्का असून शेतकऱ्यांची आणि जनतेचे भाजपावर असलेली नाराजी या निवडणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाली आहे.

            व्यक्तिशः मतदारसंघातून प्रा. सुभाष सुकलाल पाटील ( शिरू ड ), संभाजी लोटानराव पाटील ( लोन ), सुरेश पिरण पाटील( निंभोरा ), संजय पुनाजी पाटील ( पिंपळे), प्रा. श्याम साहेबराव पवार ( खेडी ) हे विजयी झाले.

            महिला राखीव मतदारसंघातून सुषमा वासुदेव देसले ( दहिवद ), मालुबाई बापूराव पाटील ( झाडी ) यांनी विजय मिळविला. सोसायटी मतदार संघात मात्र चुरस निर्माण झाली होती. नितीन बापूराव पाटील ( गड खांब ), गणेश धर्मराज भामरे ( ब्राह्मणे ), सचिन बाळू पाटील ( रंजाने ), जितेंद्र पाटील ( फापोरे ) यांनी विजय मिळविला. मात्र पाचव्या जागेसाठी प्रफुल्ल पाटील ( मालपुर ) आणि महेश देशमुख( गांधली ) यांना समान मते पडल्याने ईश्वर चिठ्ठी द्वारे निर्णय घेण्यात आला त्यात प्रफुल्ल पाटील यांना विजय घोषित करण्यात आले. ओबीसी मतदारसंघातून विक्रांत पाटील, अनुसूचित जमाती मतदारसंघातून रणजीत पाटील, तर अनुसूचित जाती मतदारसंघातून एस बी बैसाणे सर यांनी विजय मिळविला.

             सर्व नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन होत असून त्यांनी आता शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आरटीई विद्यार्थ्यांच्या नावाखाली खासगी शाळांची आर्थिक लूट? गणवेश, पुस्तके, दप्तर, मेंटेनन्स फीच्या नावाखाली वसुली;

 

अमळनेर | प्रतिनिधी

शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तर, शैक्षणिक साहित्य तसेच मेंटेनन्स फीच्या नावाखाली हजारो रुपयांची वसुली करणाऱ्या खासगी शाळांविरोधात अमळनेर तालुक्यात पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राज्य शासनाचे स्पष्ट आदेश आणि शिक्षण मंत्र्यांचे निर्देश असतानाही काही शाळांकडून पाच ते सात हजार रुपयांपर्यंतची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला आहे.

दि. २९ मे २०२६ रोजी अमळनेर येथील अनेक पालकांनी पंचायत समिती कार्यालयात जाऊन गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. यावेळी शासनाच्या आदेशाची प्रत सादर करत संबंधित शाळांकडून सुरू असलेल्या कथित आर्थिक वसुलीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. पालकांनी सांगितले की, माननीय शिक्षण मंत्री **दादाजी भुसे** यांनी आरटीई अंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले असून त्यासंदर्भातील अधिकृत पत्र दि. १ जुलै २०२५ रोजी जारी करण्यात आले आहे.

मात्र, शासनाच्या आदेशांना हरताळ फासत काही खासगी शाळांकडून “स्कूल किट”, “बुक सेट”, “युनिफॉर्म पॅकेज”, “अ‍ॅक्टिव्हिटी फी”, “मेंटेनन्स” अशा विविध नावाखाली पालकांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी होत असल्याचा आरोप करण्यात आला. काही शाळांनी थेट पाच हजार रुपये मेंटेनन्स फीची मागणी केली असून, तर काहींनी पुस्तके, वह्या, दप्तर आणि गणवेशासाठी पाच ते सात हजार रुपयांची सक्ती केल्याचे पालकांनी सांगितले.

आरटीई कायद्यानुसार विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून संबंधित शाळांना केली जाते. त्यामुळे पालकांवर कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे हे नियमबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शासनाच्या नव्या निर्देशांमध्ये गणवेश, पुस्तके किंवा इतर शैक्षणिक साहित्याच्या नावाखाली शुल्क घेणे हा गंभीर नियमभंग मानला जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पालकांनी जोरदार भूमिका घेत संबंधित शाळांची तातडीने चौकशी करावी, दोषींना नोटिसा बजावाव्यात तसेच आवश्यक असल्यास शाळांची मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी केली. “गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून आरटीई योजना सुरू करण्यात आली. मात्र काही शाळा पालकांची आर्थिक पिळवणूक करून शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.

यावेळी काही पालकांनी धक्कादायक आरोप करत सांगितले की, “पैसे भरल्याशिवाय प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार नाही”, “पुस्तके शाळेतूनच घ्यावी लागतील”, “गणवेश बाहेरून चालणार नाही” अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे. परिणामी सर्वसामान्य पालक आर्थिक तणावाखाली आले असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

शिक्षण विभागाने आधीच स्पष्ट इशारा दिला आहे की, आरटीई विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर वसुली झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित शाळेची चौकशी करून कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल. आवश्यक असल्यास शाळेची मान्यता रद्द करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अमळनेर तालुक्यातील या गंभीर प्रकरणामुळे आता गटशिक्षणाधिकारी कार्यालय कोणती भूमिका घेणार, संबंधित शाळांवर काय कारवाई होणार आणि पालकांना न्याय मिळणार का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी पालक आता अधिक आक्रमक झाले असून, “आरटीई म्हणजे मोफत शिक्षण की खासगी शाळांची आर्थिक लूट?”असा संतप्त सवाल सर्वसामान्य पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

म.वा.मंडळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजर

अमळनेर-येथिल मराठी वाड्•मय मंडळात राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बन्सीलाल भागवत,डॉ एन डी ओसवाल,डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.डॉ विजय तुंटे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी मा.गोविंद पाटील, हेमंत बाळापुरे,जगदीश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Read More पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

अमळनेरात आम आदमी पार्टीचा ‘झाडू अभियाना’चा धडाका; गाडगे महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन समाजसेवेचा विडा!

 

अमळनेर:

अमळनेर शहरामध्ये सध्या आम आदमी पार्टी (आप) च्या वतीने सुरू असलेल्या ‘झाडू अभियाना’ची चर्चा सर्वत्र होत आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीतून शहर स्वच्छतेचे व्रत पक्षाने स्वीकारले आहे. या अभियानाचे नेतृत्व स्वतः तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके आणि उपाध्यक्ष श्री. रामकृष्ण चिंतामण देवरे करत आहेत.

झाडू अभियान जुडो अभियान हा उद्देश पूर्ण झाला चांगले काम पाहता चांगला मित्र माझी आवड बघून तो आपल्या कामाने भाऊक होऊन दररोज येण्यासाठी तयार झाले आहे श्रीमंत प्रताप शेठजी स्मारक स्वच्छ पाण्याने धुण्यात आले.

गाडगे महाराजांचा वारसा, आमची जिद्द

या मोहिमेबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना तालुका अध्यक्ष श्री. महेंद्र साळुंके म्हणाले की, “संत गाडगे महाराजांनी आपल्या हातात झाडू घेऊन संपूर्ण देशाला स्वच्छतेचा संदेश दिला आणि ते अमर झाले. गाडगे महाराजांच्या पावलांवर पाऊल ठेवूनच आम्ही हे अभियान चालवत आहोत. आम्हाला कोणत्याही निवडणुकीचे वावडे नाही; पुढील चार-पाच वर्षे निवडणुका नसल्या तरीही आम्ही जनसामान्यांच्या सेवेसाठी तत्पर आहोत.”

केवळ स्वच्छताच नाही, तर प्रश्नांची सोडवणूक

आम आदमी पार्टी कोणत्याही राजकीय युतीमध्ये सामील नसून, केवळ स्वबळावर सामान्यांचा आवाज उठवत आहे. सध्या पक्षाचे ध्येय आणि जिद्द एकच आहे – “स्वच्छ आणि सुंदर अमळनेर.” धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्याची जबाबदारी पक्षाचे सर्व पदाधिकारी जसे की, राजेंद्र बाळकृष्ण जाधव, मोहन मनोरे, ललित विसपुते, शेजात खाटीक आणि सुधाकर गजरे हे अतिशय निष्ठेने पार पाडत आहेत.

जनतेच्या मूलभूत गरजांसाठी लढा

आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते दर दोन-तीन दिवसांच्या अंतराने प्रशासनाला निवेदने देऊन विकासकामांचा पाठपुरावा करत आहेत. स्वार्थी राजकारणापेक्षा जनहिताला प्राधान्य देणाऱ्या या कार्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये पक्षाबद्दल विश्वास वाढला आहे.

“झाडू” हा केवळ एक शब्द नसून तो क्रांतीचे प्रतीक आहे, ज्याद्वारे आम्ही शहरातील समस्यांचा कचरा दूर करून सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्याचा संकल्प केला आहे, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रताप महाविद्यालयातील एनसीसी संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिरात अग्निशमन विभागाचे प्रात्यक्षिक; ३५६ छात्र सैनिकांना आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे

 

अमळनेर प्रतिनिधी
खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले एन.सी.सी. संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर (CATC-209) उत्साहपूर्ण वातावरणात सुरू असून छात्र सैनिकांना शिस्त, देशसेवा आणि आपत्कालीन परिस्थितीत कार्य करण्याचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण दिले जात आहे. दि. २० मे ते २९ मे २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या शिबिरात दि. २६ मे रोजी अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागातर्फे विशेष अग्निशमन व आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

या संयुक्त प्रशिक्षण शिबिरात ४८ महाराष्ट्र बटालियन धुळे, ४९ महाराष्ट्र बटालियन अमळनेर आणि ५० महाराष्ट्र बटालियन छत्रपती संभाजीनगर येथील छात्र सैनिकांचा उत्स्फूर्त सहभाग असून तब्बल ३५६ छात्र सैनिक प्रशिक्षण घेत आहेत. प्रताप महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामुळे छात्र सैनिकांना प्रत्यक्ष अनुभवातून आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मिळत आहेत.

अमळनेर नगरपरिषद अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी उपस्थित छात्र सैनिकांना आगीचे विविध प्रकार, आग लागण्याची कारणे, आग विझविण्याच्या पद्धती तसेच अग्निशमन साहित्यांच्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अग्निशमन विभागातील कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारूक शेख आणि आकाश संदानशिव यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवत आग नियंत्रण प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे समजावून सांगितली. छात्र सैनिकांनीही मोठ्या उत्साहाने या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

शिबिराचे आयोजन अत्यंत नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून ४९ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अमित रे तसेच अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल पिनाकी बानकी, एएनओ कॅप्टन डॉ. भारतकुमार सपकाळ, कॅप्टन डॉ. प्रमोद चौधरी, लेफ्टनंट डॉ. राहुल जाधव, सेकंड ऑफिसर रोहन पाटील, सुभेदार गजेसिंग, प्रशिक्षण जेसीओ सुभेदार कुलदीप सिंग तसेच परेड इन्स्ट्रक्टर स्टाफ यांनी विशेष परिश्रम घेतले.

वाढत्या आगीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाला प्राथमिक अग्निशमन आणि आपत्कालीन व्यवस्थापनाचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अग्निशमन अधिकारी श्री. गणेश गोसावी यांनी यावेळी केले. देशसेवेची प्रेरणा देणारे आणि संकटसमयी धैर्याने कार्य करण्याचे बळ देणारे हे प्रशिक्षण छात्र सैनिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या शेवटी ४९ महाराष्ट्र बटालियन, अमळनेर यांच्या वतीने अमळनेर नगरपरिषद अग्निशमन दलाचा सत्कार करण्यात आला.

‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयाच्या करिअर कौन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा यशाची परंपरा कायम राखत मुंबई शहर पोलीस दलात तब्बल सात विद्यार्थ्यांची निवड करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २७ मे रोजी रात्री १०.३० वाजता जाहीर झालेल्या निवड यादीत प्रताप महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटवला.

मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी

१) शितल पाटील

२) चेतन पाटील

३) कार्तिक पाटील

४) रोहित कुंभार

५) समाधान कुंभार

६) उमेश कुंभार

७) अजय कोळी

हे सर्व विद्यार्थी प्रताप महाविद्यालयाच्या सीसीएमसी विभागाचे नियमित विद्यार्थी असून त्यांनी विविध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग, १५ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर तसेच राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचा लाभ घेतला होता.

विशेष म्हणजे अमळगाव येथील वीटभट्टीवर मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही या यशात स्थान मिळविल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, उपाध्यक्ष माधुरीताई पाटील, कमल कोचर, विश्वस्त सौ. वसुंधराताई लांडगे, कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, ज्येष्ठ संचालक हरी भिका वाणी, डॉ. संदेश गुजराथी, योगेश मुंदडे, प्रदीप अग्रवाल, सौ. लीनाताई पाटील, पंकज मुंदडे, चिटणीस प्रा. पराग पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव, प्राध्यापक प्रतिनिधी प्रा. दिनेश भलकार, कुलसचिव राकेश निळे, सीसीएमसी प्रमुख डॉ. विजय तुंटे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Read More ‘प्रताप’च्या सात विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दमदार निवड; अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाची लाट

अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!

 

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात आज ईद-उल-अजहा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. गांधीलीपुरा येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत देशात शांतता आणि प्रगतीसाठी प्रार्थना केली.

शहर ए काझी हाफिजो कारी अझर नुरी साहब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण झाले. यावेळी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. नमाजनंतर हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत अमळनेरच्या सलोख्याची संस्कृती अधोरेखित केली. तसेच कब्रिस्तानात जाऊन पूर्वजांच्या स्मृतीस उजाळा देण्यात आला.

“नाद विसरून भेदाचा, संदेश देऊ प्रेमाचा…” हाच अमळनेरकरांचा सलोख्याचा संदेश आजच्या काळाची गरज आहे!

Read More अमळनेरमध्ये ईद-उल-अजहा उत्साहात; सामाजिक सलोख्याची परंपरा कायम!

जनगणना कर्मचाऱ्यास दमदाटी; माजी नगरसेवक सलीम टोपीविरुद्ध गुन्हा दाखल राष्ट्रीय जनगणना कामात अडथळा; प्रशासनाची कठोर भूमिका

 

अमळनेर | प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाच्या जनगणना प्रक्रियेत अडथळा निर्माण करत शासकीय कर्मचाऱ्यास दमदाटी केल्याप्रकरणी अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरातील माजी नगरसेवक सलीम टोपी यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात एनसीआर दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रीय कर्तव्य बजावत असलेल्या प्रगणकाला थेट हाकलून लावत जनगणना नोंद करण्यास मज्जाव करण्यात आल्याने प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नियुक्त प्रगणक दिनेश पालवे हे जनगणना पूर्वतयारीच्या कामासाठी गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी संबंधित घराची माहिती विचारून नोंद प्रक्रिया सुरू करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना विरोध करण्यात आला.

“तू यहां क्यों आया? यहां पे पच्चीस साल से कोई सरकारी अधिकारी आया नहीं… चल निकल यहां से… यहां आना नहीं…” अशा शब्दांत दमदाटी करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित घराचा क्रमांक टाकू दिला नसून शासकीय कामात थेट अडथळा निर्माण करण्यात आल्याचेही समोर आले आहे.

घटनेनंतर प्रगणक दिनेश पालवे यांनी संपूर्ण प्रकाराची नोंद जनगणना नोंदवहीत केली. त्यानंतर त्यांनी तातडीने अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा जनगणना अधिकारी गणेश शिंदे यांना माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ हालचाल करत अमळनेर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम २२१ व ३५२ नुसार एनसीआर क्रमांक ०५२९/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

“जनगणना ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया” — गणेश शिंदे

> “भारताची जनगणना हे केंद्र शासनाचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय काम असून नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षकांना नागरिकांनी आवश्यक ती माहिती देणे कायद्याने बंधनकारक आहे. अमळनेर नगर परिषदेमार्फत जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीचे काम सुरू आहे. नियुक्त प्रगणक श्री. दिनेश पालवे हे गांधलीपुरा भागात माहिती संकलनासाठी गेले असता त्यांना सहकार्य करण्यात आले नाही, तसेच त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

> शासकीय व राष्ट्रीय कामात अडथळा निर्माण करणे ही गंभीर बाब असून प्रशासनाने संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईसाठी अमळनेर पोलीस ठाण्यात पत्र दिले आहे. नागरिकांनी जनगणना प्रक्रियेस पूर्ण सहकार्य करून प्रगणक व पर्यवेक्षकांशी सौजन्याने वागावे.”

गणेश शिंदे

जनगणना अधिकारी तथा मुख्याधिकारी, अमळनेर नगर परिषद

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकासकामांना वेग; खासदार स्मिताताई वाघ व पश्चिम रेल्वेच्या जनरल मॅनेजरांकडून पाहणी

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकासाला नवसंजीवनी देणाऱ्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आज पश्चिम रेल्वेचे जनरल मॅनेजर श्री रामशरय पांडे यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा करून सविस्तर आढावा घेतला. यावेळी जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांनीही उपस्थित राहून प्रवाशांच्या सोयीसुविधांबाबत महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या.

या पाहणीदरम्यान श्री पंकज सिंग (डीआरएम), श्री आदिश पठानिया (डीसीएम), 

श्री हिमांशू शर्मा यांच्यासह रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. स्थानक परिसरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती अधिकाऱ्यांनी जनरल मॅनेजरांना दिली.

खासदार स्मिताताई वाघ यांनी स्थानकाच्या सुशोभीकरणासोबतच प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी काही आवश्यक दुरुस्त्या करण्याची मागणी केली. तसेच स्थानक परिसरात नागरी सुविधा वाढवून प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित व सुसज्ज वातावरण निर्माण करण्याबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.

 

दरम्यान, सध्या प्रगतीपथावर असलेल्या नरडाणा–धुळे रेल्वे मार्गा बाबतही खासदार वाघ यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. धुळे आणि जळगाव रेल्वेने थेट जोडले जावे, यासाठी नरडाणा येथे स्वतंत्र रेल्वे बायपास उभारण्यात यावा, अशी मागणी त्यांनी जनरल मॅनेजरांकडे केली. यासंदर्भात त्यांनी सविस्तर चर्चा करून पत्रव्यवहारही केला.

हा प्रस्तावित रेल्वे बायपास खानदेशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून भविष्यात मुंबई–पुणे मार्गावरील अनेक रेल्वेगाड्या या मार्गाने चालविणे शक्य होणार असल्याचे स्मिताताई वाघ यांनी सांगितले. त्यामुळे खानदेशातील प्रवाशांना मोठा लाभ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याचबरोबर अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकाधिक एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यात यावा, अशी मागणीही खासदार वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली. तसेच सध्या बंद असलेली पार्सल सेवा तात्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून व्यापारी व नागरिकांची मोठी सोय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपा मंडल अध्यक्ष जिजाबराव पाटील, शहर मंडल अध्यक्ष योगेश महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लालचंद सैनानी, खा.शी. मंडळ संचालक निरज अग्रवाल, राकेश पाटील, दीपक भोई, शिवाजी राजपूत, राहुल चौधरी तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.