अर्वाचीन भारताची ओळख म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्ध –प्रा.डॉ. राहुल निकम
वाघोदा ता. अमळनेर : तथागत भगवान गौतम बुद्ध प्राचीन भारताची ओळख असून अर्वाचीन भारताची ओळख डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या जगाला मिळालेले वरदान आहे. तथागतांनी दिलेला धम्म आणि धम्माची शिकवण सर्वांकरिता कल्याणदायी आहे. तथागतांच्या धम्माच्या अनुसरणाने मानवी जीवनाचे उत्थान होऊन त्याला सर्व सुख प्राप्त होतात. प्रज्ञा, शील, करुणा हे धम्माचे प्रमुख आधारस्तंभ असून अनंत मैत्री, अनंत मुदिता, अनंत उपेक्षा आणि अनंत करुणा या धम्माच्या चार भिंती आहेत. पंचशिलाचे तथा अष्टांग मार्गाचे पालन केल्याने मानवाचे कल्याण होते तो स्वतः सुखी होतो आणि इतरांना देखील सुखी करतो असे प्रतिपादन समाजकार्य महाविद्यालय, चोपडा येथील प्रा.डॉ. राहुल निकम यांनी केले. ते अमळनेर तालुक्यातील वाघोदा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती स्थापन सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातून भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुर्त्यांची पुष्प वर्षाव करून रॅली काढण्यात आली. त्यानंतर भंते नागसेन यांनी बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात केली. या कार्यक्रमाचे आयोजन विनोद सैंदाणे, श्याम घोलप तसेच गावकऱ्यांच्या सहकार्याने केले होते.
या प्रसंगी धम्म भंते नागसेन, भंते आनंद, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी अशोक बिराडे, सामाजिक कार्यकर्ते गौतम मोरे, प्रा. भगवान भालेराव, हृदयनाथ मोरे, एम एस बैसाणे, अतुल डोळस, प्रवीण बैसाणे, कृष्णकांत शिरसाठ, भालचंद्र सनर आदी मान्यवर उपस्थित होते.

