जळगाव जिल्हा “आरोग्य संपन्न” बनविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे — पालकमंत्री गुलाबराव पाटील “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घ्यावी विशेष काळजी
जळगाव, दि. 27 एप्रिल (जिमाका) — “माझं गाव–आरोग्य संपन्न गाव” हे अभियान केवळ पुरस्कारापुरते मर्यादित नसून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. जळगाव जिल्ह्याने या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करणे, तसेच संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना “आरोग्य संपन्न ग्राम” पुरस्कार देऊन सकारात्मक स्पर्धेला चालना दिली जाणार आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे निर्देश देताना सांगितले की, आरोग्य सेवा प्रत्येक नागरिकाच्या दारापर्यंत पोहोचली पाहिजे. ग्रामपंचायत, महिला बचत गट, युवक मंडळे आणि स्थानिक संस्थांच्या सक्रिय सहभागातून हे अभियान जनआंदोलनात रूपांतरित करणे आवश्यक आहे. माता-बाल आरोग्य, लसीकरण, पोषण आणि स्वच्छता यांसारख्या घटकांवर कोणतीही तडजोड न करता विशेष भर देण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच शुद्ध पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनावर ठोस काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
🔥 उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात तापमान 44 अंशांपर्यंत पोहोचल्याने उष्माघात (हीट स्ट्रोक) व डिहायड्रेशन टाळण्यासाठी आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. गावोगावी दवंडी देऊन जनजागृती करण्याचे निर्देश देताना त्यांनी नागरिकांना दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि डोक्याचे संरक्षण करावे, असे आवाहन केले. शेतकरी बांधवांनी शेतीची कामे सकाळी व सायंकाळीच करावीत, अशी सूचनाही त्यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, या अभियानाच्या यशासाठी लोकप्रतिनिधी आणि लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. आरोग्य सेवा अधिक गतिमान करून ती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सरपंच प्रतिनिधी म्हणून सुरेश पाटील यांनीही मनोगत व्यक्त करत ग्रामस्तरावर अभियान राबविण्याच्या अनुभवांची माहिती दिली.
या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) भाऊसाहेब अकलादे, महिला व बालकल्याण अधिकारी हेमंतराव भदाणे यांच्यासह सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन भूषण क्षत्रिय यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रमेश धापते यांनी केले.
जिल्ह्याच्या सर्वांगीण आरोग्य उन्नतीसाठी राबविण्यात येणारे हे अभियान प्रभावीपणे राबल्यास जळगाव “आरोग्य संपन्न” जिल्हा म्हणून राज्यात आदर्श ठरणार, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
