आप ‘ चा अस्वच्छते च्या विरोधात एल्गार, हातात ‘ झाडू ‘ घेऊन केली शहरातील धार्मिक स्थळ व स्मारकांची स्वच्छता

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने शहरात सर्वत्र जोरदार स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. या स्वच्छता उपक्रमाद्वारे शहरातील धार्मिक स्थळे, स्मारके आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता केली आहे. दररोज पहाटे उठून ‘ आप ‘ चे कार्यकर्ते व पदाधिकारी शहरातील एका ठिकाणी जाऊन तेथील परिसर स्वच्छ करत आहेत.
दरम्यान शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग तयार झाले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने नगरपालिका प्रशासनाला निवेदन देऊन तातडीच्या उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.
स्वच्छ भारत अभियान, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक आरोग्य यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र शहरात अनेक ठिकाणी कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या नसल्याने नागरिकांना उघड्यावर कचरा टाकावा लागत आहे. घंटा गाड्या केवळ नावाला असून काही भागात घंटागाळा येत नसल्याची आणि आल्या तरी थांबत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटा गाड्या नियमित आणि वेळेवर द्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे. तसेच नगरपालिका प्रशासनाने ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याचेही नियोजन करावे.

शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नागरिक, सामाजिक संस्था आणि नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे काम करणे आवश्यक असल्याचे मत हे यावेळी व्यक्त करण्यात आले. निवेदनावर आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे, उपाध्यक्ष रामकृष्ण देवरे, राजेंद्र जाधव, मुकेश राजपूत, मोहन मनोरे, सुधाकर गजरे, प्रतिभा गजरे, लियाकत अली, शेजात खाटीक, प्रवीण सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.





