ब्रेकिंग
अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव आणि प्रेरणादायी व्याख्यानातून इतिहासाला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजता महाराणा चौकातील स्मारकस्थळी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. शिबिराला समाजबांधव व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून १०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

व्याख्यानातून इतिहासाचा गौरवशाली वारसा उलगडला

सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह, अमळनेर येथे व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अनिल पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रा. धर्मसिंह पाटील, माजी जि.प. सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, नगरसेवक महेश देशमुख, जितेंद्र ठाकुर, व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे, राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील तसेच सूरज परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हल्दीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना इतिहासाच्या गौरवशाली पानांची सफर घडवली. महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि त्याग यांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला.

यावेळी शेतकी संघ तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सामाजिक उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

मिरवणूक आणि डीजे यांसारख्या पारंपरिक स्वरूपांना फाटा देत रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव आणि व्याख्यान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी राजपूत एकता मंचाचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित समाजबांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधव आणि राजपूत एकता मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *