महापुरुषांचा अवमान करणाऱ्या ‘जिओ स्मार्ट बाजार’वर गुन्हा दाखल करा! अमळनेरमध्ये राजमुद्रा फाउंडेशन आक्रमक; छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर जाहिरातबाजी केल्याचा आरोप
अमळनेर | १८ जून २०२६
अमळनेर शहरातील ढेकू परिसरातील inराजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्कल येथे महापुरुषांचा अवमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर रिलायन्स जिओ स्मार्ट बाजारने अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी राजमुद्रा फाउंडेशनने केली आहे.
महापुरुषांच्या सन्मानाला धक्का
आरक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ ढेकू परिसरातील सर्कलवर राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून फलक उभारण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर यांनी या फलकावर स्वतःची व्यावसायिक जाहिरात लावल्याचे निदर्शनास आले. या कृत्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करत बहुजन समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
संतप्त भावना; कडक कारवाईची मागणी
या घटनेमुळे अमळनेरसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत संबंधित कंपनीच्या स्थानिक शाखेवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
“महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. व्यावसायिक फायद्यासाठी शाहू महाराजांच्या फलकावर अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या जिओ स्मार्ट बाजारवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा.”
शाम जयवंतराव पाटील अध्यक्ष, राजमुद्रा फाउंडेशन
विविध संघटनांचा एकमुखी पाठिंबा
या मागणीसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमळनेर तालुका मराठा समाजाचे संचालक संजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन, शिवसेना कार्यकर्ते सुरज परदेशी, हर्षल महाजन, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
महापुरुषांच्या सन्मानाशी संबंधित हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात असून, याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण अमळनेर शहरासह सामाजिक संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे. महापुरुषांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.


