ब्रेकिंग
अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी वेगाने; आढावा बैठकीत रणनीतीवर सविस्तर चर्चा जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांची अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट

 

अमळनेर : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष एड. श्री अविनाश भालेराव यांनी पक्ष संघटना अधिक सक्षम व मजबूत करण्यासाठी सर्व विभागांच्या जिल्हाध्यक्षांना संघटनात्मक बांधणीवर विशेष लक्ष देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार दि. २३/८/२६ रोजी सकाळी ११.०० वाजता जळगाव जिल्हा काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष एड. श्री अंकुश कटारे यांनी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीला भेट देत पक्ष संघटना व अनुसूचित जाती विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.

या वेळी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांनी तालुका काँग्रेस कमिटीच्या संघटनात्मक कामाची माहिती दिली. तालुक्यातील एकूण बुथ संख्या, प्रत्येक बुथवर नियुक्त करण्यात आलेले बी. एल. ए., तसेच त्यांच्या वयोमानासंदर्भातील माहिती त्यांनी यावेळी सादर केली. पक्षाची बूथपातळीवरील संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक बाबींवरही यावेळी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश पाटील, ठाकरे सर, एड. प्रशांत संदानशिव यांनी सहभाग घेतला. विशेषतः अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती विभागाची संघटना अधिक प्रभावीपणे उभी करण्याबाबत एड. श्री अंकुश कटारे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली.

अनुसूचित जाती विभागाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यावर भर

अनुसूचित जाती विभागाचे अमळनेर तालुका अध्यक्ष श्री भगवान संधान शिव यांनी अमळनेर तालुका अनुसूचित जाती काँग्रेस कमिटीच्या कामकाजासंदर्भात आवश्यक माहिती दिली. यावेळी श्री सईद तेली, दिनेश पाटील यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक वाटचालीत अनुसूचित जाती विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, या विभागाची तळागाळापर्यंत मजबूत संघटना उभारणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. अनुसूचित जाती समाजातील नागरिकांशी सातत्याने संपर्क वाढवून त्यांच्या प्रश्नांना व अडचणींना संघटनात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली.

या बैठकीला अनुसूचित जाती विभागाचे सरचिटणीस श्री राहुल मोरे, अनिरुद्ध साळवे, राजेंद्र भोसले, अनंत बागुल यांनीदेखील सहभाग नोंदविला. तसेच तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष राजू भाट, तुषार संधान शिव, प्रवीण पाटील, तौसीब तेली यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बूथपातळीपासून संघटना बळकट करण्याचा निर्धार

आगामी काळात अमळनेर तालुक्यात काँग्रेसची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी बूथपातळीपासून नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विशेषतः अनुसूचित जाती विभागाला अधिक सक्रिय करून समाजातील विविध घटकांपर्यंत काँग्रेसची विचारधारा आणि पक्षाचे संघटनात्मक कार्य पोहोचविण्यावर भर देण्यात आला.

जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक स्तरावर संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. या आढावा बैठकीमुळे अमळनेर तालुक्यात काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या आगामी संघटनात्मक कामाला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ज्ञानदीप अभियानातून १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार; आणखी ५० विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेणार

 

डी. एल. सोशल फाउंडेशनचा स्तुत्य सामाजिक उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वप्नांना मिळणार बळ

अमळनेर : आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळा निर्माण होऊ नये, तसेच ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साधने उपलब्ध व्हावीत, या उदात्त उद्देशाने डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘ज्ञानदीप अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानातून आतापर्यंत विविध शाळांमधील तब्बल १,००० गरजू व होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत पोहोचविण्यात आली आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकला साहित्य यासह विविध आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. केवळ साहित्य वाटप करण्यापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि भविष्यात मोठी स्वप्ने पाहण्याची जिद्द निर्माण करणे, हा ‘ज्ञानदीप अभियानाचा’ व्यापक हेतू आहे.

आता ५० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

‘ज्ञानदीप अभियानाला’ अधिक व्यापक आणि दीर्घकालीन स्वरूप देण्याच्या दिशेने डी. एल. सोशल फाउंडेशनने अमळनेर व पारोळा तालुक्यातील गरजू व होतकरू ५० विद्यार्थ्यांना पुढील टप्प्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचा प्रयत्न फाउंडेशनच्या माध्यमातून केला जाणार आहे.

या महत्त्वाकांक्षी सामाजिक उपक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन संचालक डॉ. समाधान मैराळे आणि संचालिका भावना मैराळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महेश संदानशिव, रिझवान मणियार, महेंद्र ढमाळ, मनोज मैराळे आणि कृष्णा निकम यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’

‘एक पाऊल आजचे, उज्ज्वल उद्याचे’ या प्रेरणादायी ब्रीदवाक्याने सुरू असलेल्या ‘ज्ञानदीप अभियानाने’ आतापर्यंत १,००० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला आहे. आता आणखी ५० विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देण्याच्या निर्णयामुळे या अभियानाची व्याप्ती आणखी वाढणार आहे.

गरजू विद्यार्थ्यांच्या हातात शैक्षणिक साहित्य देऊन त्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांना नवी उमेद देणारे ज्ञानदीप अभियान हे शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. या अभियानातून भविष्यात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी मदत मिळेल, असा विश्वास डी. एल. सोशल फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.

 अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी जीव ओवाळून टाकेल : डॉ. दिगंबर (राजू) महाले

 

अमळनेर : “अमळनेर ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. येथील पाणी, उद्योग आणि आरोग्याचे प्रश्न मला चांगलेच ज्ञात आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अमळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसंगी मी जीव ओवाळून टाकेल,” अशी भावपूर्ण ग्वाही डॉ. दिगंबर (राजू) महाले यांनी दिली.

डॉ. दिगंबर महाले यांची व्हाईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अमळनेर येथे विविध सामाजिक, सांस्कृतिक व पुरोगामी संघटनांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासासाठी आपली कटिबद्धता व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत होते. प्रारंभी महात्मा फुले यांचे गीत दिशा संदानशिव, उषा देवरे व डी. ए. पाटील यांनी सादर केले.

यावेळी मराठा सेवा संघाचे अशोक पाटील, बहुजन समाज पार्टीचे गौतम मोरे, अल्लामा फजले हक खैराबादी स्टडी सेंटर अँड पब्लिक लायब्ररीचे रियाज मौलाना, धनदाई महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे, राष्ट्रीय कला मंचचे अजय भामरे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे भीमराव महाजन तसेच युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी डॉ. दिगंबर महाले यांच्या पत्रकारिता व शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या विचारपीठावर महिला पतंजली योग समितीच्या माधुरी पाटील, तसेच पुरोगामी क्रांती दल, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्र सेवा दलाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. महाले यांनी अमळनेरच्या विकासातील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकत, “अमळनेरच्या विकासासाठी केवळ बोलून चालणार नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्नांची गरज आहे. पाणी, उद्योग, आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन शहर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत,” असा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाचे डी. ए. पाटील यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले, तर बापुराव ठाकरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी अर्बन बँकेच्या संचालिका वसुंधरा लांडगे, ॲडव्होकेट तिलोत्तमा पाटील, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष डी. एम. पाटील, शिक्षकांचे नेते योगेश पाटील, सुनील अहिरराव, डॉ. कुणाल पवार, ठेंग मॅडम, वाल्मीक मराठे, दिलीप बहिरम, संजय पाटील, ॲडव्होकेट रज्जाक शेख, उमेश काटे, जयेश काटे, शंकर बैसाणे, देवेंद्र महाजन आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ. दिगंबर महाले यांच्या राष्ट्रीय पातळीवरील निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

साने गुरुजींच्या विचारांचा दीपस्तंभ हरपला; प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांना अमळनेरकरांची भावपूर्ण आदरांजली विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने आदरांजली सभा; मान्यवरांनी व्यक्त केला कृतज्ञ भाव

 

अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे प्राचार्य डॉ. अरविंद सराफ सर यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आदरांजली सभा आयोजित करण्यात आली.

या आदरांजली सभेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सीनियर सिटीजन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्रसेवा दल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप कॉलेज प्राध्यापक संघटना तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

प्राचार्य डॉ. सराफ यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि कर्मभूमीच्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या साधेपणातला मोठेपणा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे त्यांनी अमळनेरच्या जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

यावेळी दर्शना पवार, बजरंग लाल अग्रवाल, ॲड. ललिता पाटील, सोमानी सर, वासुदेव देसले, प्रकाश शेठ पारेख, एएनआयचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, मकसूद बोहरी, प्राचार्य व्ही. ए. पाटील, प्रा. वाय. बी. पाटील, नवसारीकर सर, भगतसिंग परदेशी, चेतन सोनार आदींनी मनोगत व्यक्त करून डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉ. सराफ यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साने गुरुजींच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही उपस्थितांनी व्यक्त केली.

सभेच्या वातावरणात डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. त्यांच्या कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षण व समाजसेवेचा विचार रुजविणाऱ्या एका समर्पित व्यक्तिमत्त्वाला अमळनेरकरांनी अश्रुपूर्ण नयनांनी दिलेली ही आदरांजली ठरली.

अमळनेर नगरपरिषदेत सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर आढावा बैठक संपन्न

 

अमळनेर (प्रतिनिधी):

स्थानिक नगरपरिषद अमळनेर, जिल्हा जळगाव येथे महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान व त्यांचे स्वीय सहाय्यक राजेश सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत आढावा बैठक पार पडली. या बैठकीत अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष नागेश कंडारे आणि नाशिक विभागीय अध्यक्ष अनिल बेंडवाल यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत आयोग व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

या बैठकीदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कामाचे सुरक्षा साहित्य जसे की झाडू, तगारी, पावडी, हँड ग्लोव्हज आणि मास्क वेळेवर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना मोफत घरे मिळावीत, ते राहत असलेली शासकीय निवासस्थाने त्यांच्या मालकी हक्काने नाव करून घरभाडे बंद करावे आणि सर्व कर्मचांची सेवापुस्तके अद्ययावत केली जावीत, अशा विविध विषयांवर भर देण्यात आला.

याव्यतिरिक्त, सन २००५ नंतर सेवेत रुजू होऊन सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना रजारोखीकरणाची रक्कम व इतर थकबाकी तात्काळ देणे, काही कर्मचाऱ्यांच्या ग्रेज्युटीमधून नगरपरिषदेने कपात केलेल्या रकमा परत करणे, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र किंवा सेवेत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नियमानुसार पेन्शन लाभ देणे आणि लाड-पागे वारसा हक्काच्या प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करून पात्र वारसांना नेमणूक आदेश देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत मांडण्यात आलेल्या सर्व विषयांवर आयोग व मुख्याधिकारी यांनी सकारात्मक भूमिका घेत योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले. या बैठकीस नगरपरिषदेचे विविध विभाग प्रमुख, संघटनेचे पदाधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“युवा वर्गाला रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शनाची गरज” -खासदार अॅड. उज्ज्वल निकम

 

अमळनेर, दि. २० ऑगस्ट २०२६ : रोटरी क्लब ऑफ अमळनेरचा पदग्रहण समारंभ नर्मदा रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यास पद्मश्री मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असिस्टंट गव्हर्नर रोटे. ॲड. रुपेश पाटील तसेच रोटे. गनी मेमन, जळगाव यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी परिवारातील सदस्य तसेच साने गुरुजी स्मारकाचे संस्थापक माजी प्राचार्य अरविंद सराफ सर यांच्यासह सर्व दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

मावळते अध्यक्ष रोटे. देवेंद्र कोठारी यांनी गतवर्षातील रोटरीच्या कार्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर त्यांनी नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांना कॉलर, रोटरी चार्टर व हॅमर प्रदान करून पदभार सोपविला. मावळते सचिव रोटे. आशिष चौधरी यांनी नूतन सचिव रोटे. प्रशांत निकम यांच्याकडे सचिवपदाचा पदभार सुपूर्द केला. नूतन अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.

असिस्टंट गव्हर्नर ॲड. रुपेश पाटील यांनी आर.आय. डिस्ट्रिक्ट ३०३० चे गव्हर्नर डॉ. राजेश पाटील यांचा संदेश वाचून दाखविला. प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रोटे. मकसूद बोहरी यांनी संपादित केलेल्या ‘सेवाचक्र’ रोटरी बुलेटीनचे विमोचन करण्यात आले.

आर.आय. डिस्ट्रिक्ट ३०३० मध्ये रोटरी इन्क्लेव्ह म्हणून रोटे. कीर्तीकुमार कोठारी यांची सेक्रेटरी, तर रोटे. प्रीतपाल सिंग बग्गा यांची जॉईंट सेक्रेटरी म्हणून निवड करण्यात आली. या दोघांचाही प्रमुख पाहुणे मान. खासदार ॲड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना खासदार ॲड. उज्ज्वल निकम म्हणाले की, समाजाचे आपण काही देणे लागतो, या सामाजिक बांधिलकीतून रोटरीचे कार्य जगभर सुरू आहे, ही समाधानाची बाब आहे. रोटरीच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मात्र, आजचा युवा वर्ग काही प्रमाणात भरकटलेला दिसत असून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी रोटरीच्या माध्यमातून मार्गदर्शन व समुपदेशनाची गरज आहे. हे महत्त्वाचे काम रोटरीने हाती घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

रोटे. गनी मेमन यांनी समाजातील वृद्धाश्रमांची वाढती संख्या आणि तेथे प्रवेशासाठी ३ ते ५ वर्षांची प्रतीक्षा यादी सुरू झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मुलांनी आई-वडिलांची जबाबदारी घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन आणि रोटरी एनी. आरती रेजा यांनी केले. आभार प्रदर्शन रोटे. प्रशांत निकम यांनी केले, तर पसायदान रोटरी एनी. पूर्वा वशिष्ठ यांनी सादर केले.

या प्रसंगी मान. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, सौ. ज्योती निकम, धरणगाव, पारोळा व चोपडा येथील रोटरी पदाधिकारी, लायन्स क्लब, अमळनेर वकील संघ, अखिल भारतीय ग्राहक पंचायत अमळनेर, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, श्री मंगलग्रह मंदिराचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले, खाशी मंडळाच्या माधुरीताई पाटील, नीरज अग्रवाल, मनोहर निकम, एडवोकेट विलास वाणी, एडवोकेट मनोहर पवार, एडवोकेट तीलोत्तमा पाटील, सौ. भारती सोनवणे यांच्यासह शहरातील मान्यवर, व्यापारी, रोटरी परिवार व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी बातमी रोटे. मकसूद बोहरी यांनी कळविली आहे.

 

अमळनेरमध्ये समाजकार्य पंधरवड्यात संविधान जागर

 

अमळनेर : राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या समाजकार्य पंधरवड्याच्या उपक्रमांतर्गत अमळनेर येथे मासवे, संविधान जागर अभियान आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागर अभियान उत्साहात राबविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्ये, लोकशाही व्यवस्था, मूलभूत अधिकार व कर्तव्यांबाबत जागृती निर्माण करणे, हा या अभियानाचा प्रमुख उद्देश होता.

यावेळी संविधान जागर अभियानाचे समन्वयक निखिल रांजणकर यांनी समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संविधानाच्या विविध पैलूंवर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी संविधानातील मूल्ये आत्मसात करून ती समाजजीवनात रुजविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील होते. त्यांनी संविधान जागृतीची आवश्यकता अधोरेखित करताना युवकांनी संविधानाचा सखोल अभ्यास करून लोकशाही बळकट करण्यासाठी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ. अनिता खेडकर, डॉ. विजयकुमार वाघमारे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सर्वय्या, प्रा. धनराज ढगे, डॉ. भरत खंडागळे, डॉ. सागरराज चव्हाण यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

समाजकार्य पंधरवड्याच्या माध्यमातून संविधानाच्या लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अमळनेर भावसार क्षत्रिय समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 

अमळनेर : भावसार क्षत्रिय समाज, अमळनेर तसेच पारितोषिक दात्यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण व गुणगौरव सोहळा रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी श्री संत सखाराम महाराज भक्त निवास, वाडी चौक येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जव्हार येथील श्री. सुरेश सिताराम शेठ भावसार होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी समाजाचे अध्यक्ष श्री. परेश शांतीलाल भावसार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व उद्देश स्पष्ट केला. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर, ज्येष्ठ समाज बांधव श्री. भावलाल पोपट भावसार, श्री. सुभाष यशवंत भावसार, श्री. प्रकाश फकीरा भावसार, श्री. मनोहर गुरुदास भावसार, तसेच पारितोषिक दाते श्री. राजेश रघुनाथ करंजे व सौ. प्रतिभा कृष्णकांत भावसार यांचे शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले.

शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी देणगी व पारितोषिकांची घोषणा

गुणगौरव सोहळ्याच्या निमित्ताने समाजातील ज्येष्ठ समाज बांधवांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी उदार देणगी जाहीर केली. श्री. अॅड. चंद्रकांत गोकुळदासशेठ भावसार यांनी रु. ११,१११/-, श्री. सुभाष यशवंत सारजे यांनी रु. १,१११/-, तर श्री. प्रकाश फकीरा भावसार यांनी रु. २००/- शिक्षण फंडासाठी देणगी जाहीर केली.

तसेच श्री. मनोहर गुरुदास भावसार यांनी इयत्ता १ ली ते १० वीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी रु. १०१/- पारितोषिक देण्याची घोषणा केली. श्री. सुभाष यशवंत सारजे यांनीदेखील इयत्ता १ ली ते ४ थीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी रु. १०१/- पारितोषिक देण्याचे जाहीर केले. त्यांच्या या शैक्षणिक प्रोत्साहनपर योगदानाबद्दल कार्यकारी मंडळातर्फे आभार व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी पारितोषिक दाते श्रीकृष्णकांत वासुदेव शेठ भावसार तसेच प्रा. मनीष रघुनाथ करंजे सर यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; गुणवंतांचा सन्मान

यावेळी उपस्थित मान्यवरांपैकी प्रा. डॉ. प्रभाकर जोशी सर यांनी विद्यार्थ्यांना यथोचित मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सातत्य, मेहनत, शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुरेश सिताराम शेठ भावसार यांच्या वतीने त्यांच्या सुकन्या सौ. वंदनाताई भावसार, मुख्याध्यापिका, मनमाड यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांना समाजातर्फे तसेच पारितोषिक दात्यांतर्फे देण्यात येणारी विविध बक्षिसे उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.

गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना उपस्थित समाज बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. याप्रसंगी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षण समितीचे चेअरमन प्रा. प्रवीणकुमार रणछोडदास भावसार यांनी केले, तर आभार श्री. सुरेश नारायण भावसार यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष नंदलाल रतिलाल भावसार, सेक्रेटरी कुंदन गोपीनाथ भावसार, सहसेक्रेटरी निलेश गोकुळ भावसार, खजिनदार रविंद्र प्रभाकर भावसार, कार्यकारी सदस्य शांमकांत मिठाराम भावसार, दीपक तुकाराम भावसार, कृष्णकांत जगन्नाथ भावसार, तसेच सागर सुभाष भावसार, निलेश विजय भावसार, लक्ष्मीकांत मणिलाल भावसार, हेमंत भावसार (सेवक) यांनी परिश्रम घेतले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ आणि समाजातील दातृत्वाची परंपरा जपणारा हा सोहळा भावसार क्षत्रिय समाजासाठी प्रेरणादायी ठरला.

अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार

 

अमळनेर (प्रतिनिधी) अनुसूचित जाती संवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील साने गुरुजी विद्यालयात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाज घटकांची सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाविरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा आणि तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.

येत्या पुढील महिन्यात जिल्हास्तरावर उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वप्रथम उपवर्गीकरण विरोधी मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते भानुदास विसावे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यात येणाऱ्या असंवैधानिक संकटाला परतवून लावण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळण्याची गरज आहे.”

या सहविचार सभेला बौद्ध, चांभार, होलार, मातंग व मेहतर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाज बांधवांनी या लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी होण्याची आणि मोर्चा यशस्वी करण्याची शपथ घेतली. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याप्रसंगी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, नरेश कांबळे, विजय बिऱ्हाडे, आरपीआयचे यशवंत बैसाने, ॲड. प्रशांत संदानशिव, सनी गायकवाड,अरुण मोरे,सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, अतुल डोळस, बापूराव संदानशिव, योगराज संदानशिव, अर्जुन संदानशिव, अरुण घोलप, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, सुभाष आगळे, भगवान संदानशिव, अनिकेत ब्रम्हे,अशोक सैंदाने, दगडू सोनवणे,राहुल वाडेकर, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र सैंदाने, गौतम शिरसाठ , उत्तर वानखेडे यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा उपाध्यक्षपदी ‘लोक जागर न्यूज’चे संपादक हृदयनाथ मोरे यांची निवड

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खानदेशी विभागांतर्गत अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ‘लोक जागर न्यूज’चे संपादक तथा पत्रकार हृदयनाथ मोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश संघटक संजयजी भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. खानदेशी विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करत हृदयनाथ मोरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

हृदयनाथ मोरे हे ‘लोक जागर न्यूज’च्या माध्यमातून अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय तसेच जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक उपक्रम, लोकजागृती आणि सकारात्मक घडामोडींना प्रसिद्धी देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी संघटित प्रयत्नांची गरज असताना अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच समाजहिताच्या विषयांना प्राधान्य देणे, यासाठी कार्यकारिणी सक्रियपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हृदयनाथ मोरे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.