ब्रेकिंग
खा शि मं. श्रीमती द्रौ ,रा. कन्या शाळेत आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस साजरा …

 

अमळनेर : नामवंत खा.शि मं संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत आज २३ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय आॕलिम्पिंक दिवस म्हणुन साजरा करण्यात आला.

   या वेळी कार्यक्रम अध्यक्ष स्थानी विदयालयाच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम होत्या.तर या वेळी माधुरी राणे प्राथ.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती भारती आठवले मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर , शिक्षक प्रतिनिधी सौ पी पी जोशी ,जेष्ठ शिक्षक श्री एस एस माळी , जेष्ठ क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे , जेष्ठ शिक्षक श्री के आर बाविस्कर , श्रीमती एस एस देवरे यांनी आॕलिम्पिंक सुवर्ण पदक प्राप्त करुन देशाचा मान वाढवणारे मेजर ध्यांनचंद यांच्या प्रतिमेचे व क्रीडा साहित्यांचे पुजन करुन मशाल पेटवुन आजचा दिवस साजरा करण्यात आला.

    या निमित्ताने शाळेत जंम्प रोप व धावण्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडमांनी आॕलिम्पिंक दिवसा विषयी बोलतांना सांगितले की ,पहिला आलिम्पिंक दिवस २३ जुन 1948ला साजरा करण्यात आला होता. जगातील अतिशय महत्वांची स्पर्धा आॕलिम्पिंक स्पर्धा आहे. ह्या दर चार वर्षांनी होतात. जगात खेळाचे महत्व वाढावे व सर्व जगाने गुणा गोविंदाने वागावे आॕलिम्पिंक दिन प्रामुख्याने हलका , शिका आणि शोधा तीन स्तंभावर आधारीत आहे.निरोगी जीवन शैलीला प्रोत्साहन देणारी व दैनंदिन व्यायामाला महत्त्व देणारी आॕलिम्पिंक स्पर्धा आहे.भारता मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जेचे खेळाडू तयार व्हावेत.त्यांनीआपल्या देशाचे प्रतिनिधीत्व वेग वेगळ्या खेळात करावे या अनुषंगाने शालेय स्तरावर विद्यार्थीची खेळा प्रती आवड व रुची वाढावी व येणाऱ्या काळात- अधीका अधीक पदके भारताने जिंकावीत हा एक उदात्त भावना यामागे दडलेली आहे.खेळामध्ये अधीका अधीक विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवित त्यांनी येणाऱ्या काळात खेळाला सुगीचे दिवस प्राप्त झालेले असेल अशी सामुहीक शपथ घेतली.या कार्यक्रमाचे प्रास्तवीक संयोजन नियोजन संकल्पना पर्यवेक्षक ,श्री एस पी वाघ सरांनी केले.

या स्पर्धेतुन अनेक खेळ खेळुन खेळ भावना , स्नेह आप आपली संस्कृती जोपासली जाते असे विद्यार्थीनींना आपल्या भाषनातुन सांगितले.

    सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य शालेय समिती चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन , व सर्व शिक्षक , शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी यांचे लाभले.

शहापूर येथे वीज पडून युवा शेतकऱ्याचा मृत्यू

 

 

कळमसरे ता.अमळनेर :–प्रतिनिधी- शहापूर ता. अमळनेर येथील राकेश रतिलाल पाटील (वय -32) या तरुणाचा आज ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शेतात वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शेतात आईसह मजूर कामाला असल्याने राकेशही शेती कामाला आलेला होता. ता. 23 रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विजेच्या कडाक्यासह पावसाला सुरुवात झाल्याने राकेश आपली मोटार सायकल (दुचाकी )रस्त्यावर लावण्यासाठी घाईने निघाला असताना त्याच्या अंगावर अचानक वीज पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.बाजूलाच निंबाच्या झाडाखाली मजूरासह राकेश आई व मजुर थांबलेले होते. आईच्या डोळ्यासमोरच ही घटना घडल्याने राकेशच्या आईचा आक्रोश खूपच वेदनादायी होता.

राकेशच्या अंगावर पडलेल्या विजेचा फटका इतका जबरदस्त होता की त्याच्या अंगावरील कपडे तसेच बागायती रुमाल देखील जळल्याच निदर्शनास आले आहे.

दरम्यान राकेशला तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.शहापूर येथे सायंकाळी उशिरा सात वाजेच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.राकेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला असून त्याच्या पच्यात आई -वडील, पत्नी दोन विवाहीत बहिणी असा परिवार आहे.

नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजानेला तिलोत्तमाताई यांच्याकडून स्कूल बसची भेट; तसेच सरपंच सचिन पाटील यांच्याकडून ₹५० हजारांची देणगी

 

अंतुर्ली-रंजाने (ता. अमळनेर) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध व्हावी आणि कोणत्याही विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागू नये, या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली-रंजाने शाळेला संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील यांच्या वतीने स्कूल बस भेट देण्यात आली. तसेच गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी ₹५० हजार रुपयांची रोख देणगी जाहीर करून शिक्षणाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली.

 अंतुरली रंजाने परिसरासह आसपासच्या भागातील अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही विद्यार्थ्यांना लांब अंतर पायी चालत यावे लागत होते, तर काहींना नियमित शाळेत उपस्थित राहणे कठीण होत होते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शाळेला स्कूल बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती वाढण्यास मदत होणार असून शिक्षणाची गोडी निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

स्कूल बस भेटीमुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा मोठा दिलासा ठरणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे. शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणारे गावाचे सरपंच सचिन पाटील यांनी यावेळी शाळेला ₹५० हजारांची रोख मदत देत शाळेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना पाठबळ दिले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे सांगत ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शाळेच्या प्रगतीसाठी ग्रामस्थ, पालक आणि संस्थेचे पदाधिकारी यांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा तिलोत्तमाताई पाटील, सचिव रवींद्र पाटील, सरपंच सचिन पाटील, संदीप धोबी, प्रदीप पाटील मुख्याध्यापक सुभाष पाटील, संजय भगतसिंग पाटील, महेंद्रचव्हाण, संदीप उघडे, जी. बी. पाटील, एम. आर. पाटील, बैसाणे मॅडम, साळुंखे मॅडम, नानाभाऊ, संजय पाटील, भगवान पाटील, वैशाली पाटील, भगवती पाटील, हितेश बडगुजर यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली ही स्कूल बस आणि शाळेला मिळालेली आर्थिक मदत ही निश्चितच शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरणार असून, अंतुर्ली-रंजाने परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

श्री मंगळग्रह मंदिरात आरोग्याबाबत जनजागृती विविध योगप्रकारांचा झाला सराव; आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिर

 

अमळनेर : दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिर परिसरात रविवार, दि. २१ जून रोजी सकाळी ७ ते १० या वेळेत विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, मंगल सेवेकरी तसेच मंदिराच्या सेवेकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात पार पडलेल्या या उपक्रमामुळे आरोग्याबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
शिबिराची सुरूवात योग प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर योग मार्गदर्शक तथा मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम व खजिनदार गिरीश कुलकर्णी यांनी उपस्थितांना विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच श्वसनक्रिया यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सहभागी सर्वांनी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, वज्रासन, अनुलोम-विलोम, कपालभाती आदी योगप्रकारांचा सराव केला.
यावेळी मार्गदर्शक बहिरम यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारी जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती वाढते, मानसिक ताणतणाव कमी होतो आणि व्यक्तीची एकाग्रता सुधारते. आधुनिक धावपळीच्या जीवनात वाढत्या ताणतणावामुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत योग हा आरोग्यपूर्ण जीवनासाठी प्रभावी उपाय ठरतो.
योगाच्या फायद्यांविषयी माहिती देताना कुलकर्णी यांनी सांगितले, की नियमित योग केल्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायू व सांधे मजबूत होतात, लठ्ठपणा नियंत्रणात राहतो तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. याशिवाय ध्यान आणि प्राणायामामुळे मन शांत राहते, सकारात्मक विचारसरणी विकसित होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.
शिबिरात उपस्थित मान्यवरांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करत योगाला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले. तसेच योगाच्या माध्यमातून निरोगी समाज आणि सशक्त राष्ट्र उभारण्यास हातभार लागेल, असे मत व्यक्त केले.

खा,शि.मंडळ संचलित द्रौ.रा.कन्या शाळेत जागतिक योग दिवस योगासने प्रात्यक्षिक व त्यांचे महत्व विषद करुन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न.

 

अमळनेर : खा.शि.मंडळ संचलित श्रीमती द्रौंपदीबाई रांमचंद्र शेठ कन्या शाळेत जागतिक योग दिवस – योगासने व त्यांचे प्रात्यक्षिक आणि त्यांचे मानवी जीवनात असणारे अनन्य साधारण महत्व या सर्व बाबीवर प्रकाश टाकीत उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न संपन्न झाला.

  कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन शुभारंभ शाळेच्या मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम ,पर्यवेक्षक श्री एस पी वाघ सर ,जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री के आर बाविस्कर , जेष्ठ शिक्षिका सौ एस बी उपासनी अश्या मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीदेवीला माल्यार्पण व दिप प्रज्वलन करण्यात आले.

  त्यांच सोबत आज कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रक अतिथी म्हणुन योग तज्ञ , योग आचार्य रामदेवजी बाबा यांचे अनुयायी शिष्य योग तज्ञ श्री गजानन माळी सर हे उपस्थित होते. त्यांनी मानवी जीवनात योग व्यक्तीला व्याधीमुक्त , रोगमुक्त, सशक्त कणखर व दीर्घाष्युशी बनवतो.तसेच विद्यार्थीना तो चिंतन मनन व अध्यापन प्रती ओढ व आस्था निर्माण करतो.आजच्या या योग कार्यक्रम मध्ये चक्रासन ,ताडासन ,व्रजासन , शवासन , सुर्यनमस्कार अश्या नाना विविध स्वरुपाचे योग सादर करुन त्यांचे दुरगामी सकारात्मक परिणाम अश्या विविध बाबीवर उत्तम स्वरुपात प्रकाशज्ञोत टाकला.

   सदर कार्यक्रमासाठी अनमोल सहकार्य शालेय समिती चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन ,मुख्याध्यापिका सौ एस एस सुर्यवंशी मॕडम , पर्यवेक्षक श्री एस पी वाघ , जेष्ठ शिक्षक श्री के आर बाविस्कर ,जेष्ठ शिक्षिका सौ एस बी उपासनी ,सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी वृंद वर्ग यांचे लाभले.

आंतरराष्ट्रीय योग दिन  मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे योग, मोफत मोतीबिंदू शिबिर

 

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे जागतिक योग दिनानिमित्त रविवार, दि. 21 जून 2026 रोजी नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष योग शिबिर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मंगळग्रह मंदिरात सकाळी 7 ते 10 या वेळेत योग शिबिर होईल. या उपक्रमातून आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासोबतच नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

 योग शिबिरात आरोग्यदायी जीवनशैली, तणावमुक्ती, प्राणायाम तसेच ध्यान याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. योगामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते, याबाबतही उपस्थितांना माहिती दिली जाईल. तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी, आवश्यक औषधोपचार आणि मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे गरजू व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या दोन्ही शिबिरांत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोफ्लदवावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्यासह समस्त विश्वस्त मंडळाने केले आहे.

‘शविआ‌’चा सोमवारी निघणारा मोर्चा मुख्याधिकाऱ्यांच्या विनंतीमुळे तूर्त स्थगित पालिकेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ‌‘शविआ‌’ देणार आठ दिवसांचे ‌‘अल्टिमेटम‌’

 

अमळनेर : शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीने सोमवार, दि. 22 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता काढण्यात येणाऱ्या मोर्चासंदर्भात आज शनिवार, दि. 20 जून रोजी पालिका मुख्याधिकाऱ्यांना पूर्वसूचनेचे पत्र दिले. त्याची पालिका प्रशासनाने अतिशय गंभीरतेने दखल घेऊन शहर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. जयश्रीताई पाटील यांना प्रस्तावित मोर्चा स्थगित करण्याची विनंती पालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे दि. 20 जून रोजी सौ. जयश्रीताई पाटील यांनी ‌‘शविआ‌’चे सर्व नगरसेवक व पदाधिकारी यांची मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रावर निर्णय घेण्यासाठी दुपारी चार वाजता तातडीची बैठक घेतली. सदर बैठकीत मोर्चा तूर्त स्थगित करण्याचे ठरले. मात्र, सौ. जयश्रीताई पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना मोबाईलवरून सोमवार, दि. 22 जून रोजी दुपारी चार वाजता ‌‘शविआ‌’सोबत चर्चा करण्यासाठी पालिकेत उपस्थित राहण्यास सांगितले.

 सोमवार, दि. 22 जून रोजी सौ. जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‌‘शविआ‌’चे सर्व नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी पालिकेत मुख्याधिकाऱ्यांसह सर्व विभागप्रमुखांसोबत शहरातील पाणी समस्येसह विविध नागरी सोयी-सुविधांचा जो बोजवारा उडाला आहे त्याबाबत चर्चा करणार आहेत. सदर बैठकीत उपस्थित केल्या जाणाऱ्या समस्याप्रधान प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेला आठ दिवसांचे ‌‘अल्टिमेटम‌’ देण्यात येणार आहे. अन्यथा शहरातील लोकाभिमुख समस्यांच्या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अत्यंत आक्रमक व भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. 

 दरम्यान, शनिवार, दि. 20 जून रोजी दुपारी चार वाजता झालेल्या बैठकीस सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह नगरसेवक डॉ. डिगंबर महाले, विजय कहारू पाटील, सचिन पाटील, शोभाबाई गढरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र संदानशीव, विक्रांत पाटील, मुक्तार खाटीक, विजय राजपूत, नसरोद्दीन हाजी, सयाजीराव पाटील, नरेंद्र चौधरी, ॲड. यज्ञेश्वर पाटील, भूषण भदाणे, निलेश महाजन, संजय भिला पाटील, इम्रान खाटीक, गौरव महाजन, दुर्गेश पाटील, सुनील शिंपी, आशाबाई चावरिया, आरिफ मेवाती, तुषार संदानशीव, वेद पाटील आदी उपस्थित होते.

शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी आम्ही तूर्तास संयमाची भूमिका घेतली आहे. मात्र, पालिकेने अमळनेरकरांसह आमच्या सहनशीलतेचा जास्त अंत पाहू नये. अन्यथा मोठा उद्रेक अटळ आहे.

सौ. जयश्रीताई पाटील, गटनेत्या, ‌‘शविआ‌’.

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात युवक काँग्रेसचा युवक संवाद; NEET घोटाळ्याविरोधात जोरदार आंदोलन  विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

अमळनेर (प्रतिनिधी) : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेस व अमळनेर विधानसभा युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने अमळनेर येथे युवक संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त युवकांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच NEET परीक्षा घोटाळ्याच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव शाम्भवी शुक्ला तसेच महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा व मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आफरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीपराव पवार होते.

कार्यक्रमाची सुरुवात NEET परीक्षा घोटाळ्यामुळे नैराश्यात जाऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला व राहुल गांधी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

 युवकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांनी प्रास्ताविक करत युवक काँग्रेसच्या भूमिका आणि आगामी उपक्रमांची माहिती दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव आशुतोष पवार, किरण पाटील आणि तुषार संदानशिव यांनी युवक काँग्रेसच्या भावी कार्यक्रमांचा आढावा घेतला.

तसेच जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मनोज पाटील, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते संदीप घोरपडे, ज्येष्ठ नेते देवेंद्र पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा सचिव रज्जाक शेख, मौर्य क्रांती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष व सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, मगन भाऊसाहेब पाटील, आदिवासी सेलचे तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार तसेच युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सईद तेली यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

 नव्या पदाधिकाऱ्यांचा गौरव

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या (AICC) संघटन सृजन अभियानांतर्गत निवड झालेल्या विविध फ्रंटल आणि सेलच्या अध्यक्षांचा युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये सेवादल तालुकाध्यक्ष बन्सीलाल भागवत, सेवादल शहराध्यक्ष भिकाजी रामचंद्र पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष राकेश पवार, अनुसूचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष भगवान संदानशिव, आदिवासी सेल तालुकाध्यक्ष रावसाहेब पवार, अल्पसंख्याक सेल तालुकाध्यक्ष राजू भाट, अल्पसंख्याक सेल शहराध्यक्ष जुबेर पठाण, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळी आणि सोशल मीडिया शहराध्यक्ष संदीप बारी यांचा सन्मान करण्यात आला.

 NEET घोटाळ्याविरोधात तहसील कार्यालयावर मोर्चा

बैठकीनंतर युवक काँग्रेसच्या वतीने मराठा मंगल कार्यालय ते तहसील कार्यालय अशी पदयात्रा काढण्यात आली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि तहसीलदार यांना निवेदन सादर करून NEET परीक्षा घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनाद्वारे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच २१ तारखेला होणाऱ्या NEET परीक्षेसाठी बाहेरगावी परीक्षा केंद्र असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या कार्यक्रमासाठी चाळीसगाव विधानसभा अध्यक्ष प्रज्वल राजपूत, पाचोरा विधानसभा अध्यक्ष मनोहर महाले, अमळनेर विधानसभा अध्यक्ष हर्षल जाधव, एरंडोल तालुकाध्यक्ष चेतन पाटील, अमळनेर तालुकाध्यक्ष विकास पाटील, जिल्हा सरचिटणीस गौरव देशमुख, जिल्हा सचिव शुभम शिंदे, चोपडा शहराध्यक्ष माजित तडवी, भडगाव शहराध्यक्ष गोविंद देशमुख, योगेश येवले, धरणगाव युवक काँग्रेस शहराध्यक्ष भूषण भागवत, माजी शहराध्यक्ष गौरवसिंह चव्हाण, काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वनाथ ठाकरे, ज्येष्ठ नेते तुकाराम चौधरी, शरद पाटील, गुलाब पाटील, रऊफ पठाण, जितेंद्र चौधरी, मयूर पाटील, प्रशांत पाटील, संदीप बोरसे, चेतन पाटील, वैभव पाटील, जनार्दन पाटील, कैलास पाटील, पंकज पाटील, सुनील पाटील, अर्जुन शिंदे, सूरज पवार, राकेश जाधव, पवन जाधव, मधुकर बडगुजर, मधुकर पाटील, जीवन पाटील, हिमांशू पाटील, अतुल धनगर, राहुल राजपूत, संकेत पाटील, अजय मालचे, सलमान शेख, तौसिफ बागवान, जयेश कोळी, कुणाल पाटील, कुणाल बडगुजर, तेजस ठाकरे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर महाले यांनी केले तर गौरव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रम  करण्यासाठी माजी शहराध्यक्ष व नगरसेवक मनोज पाटील, तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, शरद पाटील आणि राकेश पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी पाटील तर उपाध्यक्षपदी गणेश भामरे बिनविरोध आमदार अनिल पाटील यांचे शेतकी संघावर निर्विवाद वर्चस्व; राष्ट्रवादीच्या सहकार पॅनलची सत्ता कायम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर तालुका शेतकी संघाच्या अध्यक्षपदी संभाजी लोटन पाटील (लोण) तर उपाध्यक्षपदी गणेश धर्मराज भामरे (बाम्हणे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलने शेतकी संघावरील आपले वर्चस्व कायम राखत या दोन्ही महत्त्वाच्या पदांवर निर्विरोध निवड घडवून आणली.

अमळनेर तालुका शेतकी संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित सहकार पॅनलचे तब्बल १० संचालक विजयी झाले होते. तर काँग्रेस प्रणित शेतकरी पॅनलचे ३ आणि भाजप प्रणित किसान विकास पॅनलचे २ संचालक निवडून आले होते. त्यामुळे शेतकी संघातील सत्तेची सर्व सूत्रे आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाच्या हाती आली होती.

अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया १९ जून रोजी सकाळी ११ वाजता शेतकी संघाच्या कार्यालयात पार पडली. निर्धारित वेळेत अध्यक्षपदासाठी संभाजी पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी गणेश भामरे यांचेच अर्ज दाखल झाल्याने दोघांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी संचालक संजय पुनाजी पाटील, सचिन बाळू पाटील, विक्रांत पाटील, नितीन पाटील, रणजीत पाटील, शंकर बैसाने, सुषमा देसले, मालुबाई पाटील, सुरेश पाटील, प्रा. शाम पवार, जितेंद्र पाटील आणि प्रफुल पवार उपस्थित होते. निवडणूक अधिकारी म्हणून धर्मराज पाटील तर सहाय्यक अधिकारी म्हणून सुनील महाजन यांनी कामकाज पाहिले.

 शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य द्या – आमदार अनिल पाटील

नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील व उपाध्यक्ष गणेश भामरे यांचा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, “तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली ही संस्था जनतेने विश्वासाने आपल्या हाती दिली आहे. त्यामुळे आता जबाबदारी अधिक वाढली आहे. संघाची आर्थिक बळकटी, उत्पन्नवाढ आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय हेच प्राधान्य असले पाहिजे.”

“संघाच्या उत्पन्नवाढीसाठी आवश्यक असेल तर कर्ज घ्यावे लागले तरी चालेल; मात्र नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून संस्था सक्षम करावी लागेल. विरोधकांनी कितीही टीका केली तरी शेतकऱ्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे,” असेही त्यांनी सांगितले.

तसेच, पद न मिळालेल्या कार्यकर्त्यांनाही भविष्यात संधी दिली जाईल, असे संकेत देत पक्षासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांना तज्ज्ञ संचालक पदावर संधी देण्याबाबत संचालक मंडळाला त्यांनी सूचना केल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित उपाध्यक्ष गणेश भामरे यांनी केले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, तिलोत्तमा पाटील , शहराध्यक्ष चेतन राजपूत तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अध्यक्ष संभाजी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

विशेष म्हणजे नवनिर्वाचित अध्यक्ष संभाजी पाटील हे यापूर्वी काँग्रेस पक्षाशी संबंधित होते. मात्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याचे मानले जात असून, शेतकी संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व अधिक भक्कम झाले आहे.

 

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या ‘जिओ स्मार्ट बाजार’वर गुन्हा दाखल करा! अमळनेरमध्ये राजमुद्रा फाउंडेशन आक्रमक; छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर जाहिरातबाजी केल्याचा आरोप

 

अमळनेर | १८ जून २०२६

अमळनेर शहरातील ढेकू परिसरातील inराजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्कल येथे महापुरुषांचा अवमान झाल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे. गेल्या दहा वर्षांपासून राजमुद्रा फाउंडेशनच्या वतीने लावण्यात आलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या फलकावर रिलायन्स जिओ स्मार्ट बाजारने अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणी संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी राजमुद्रा फाउंडेशनने केली आहे.

 महापुरुषांच्या सन्मानाला धक्का

आरक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मरणार्थ ढेकू परिसरातील सर्कलवर राजमुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून फलक उभारण्यात आला होता. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून रिलायन्स जिओ स्मार्ट बाजार, अमळनेर यांनी या फलकावर स्वतःची व्यावसायिक जाहिरात लावल्याचे निदर्शनास आले. या कृत्यामुळे शाहू महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाल्याचा आरोप करत बहुजन समाजातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 संतप्त भावना; कडक कारवाईची मागणी

या घटनेमुळे अमळनेरसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजमुद्रा फाउंडेशनचे अध्यक्ष शाम जयवंतराव पाटील यांनी प्रशासनाला निवेदन देत संबंधित कंपनीच्या स्थानिक शाखेवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

“महापुरुषांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. व्यावसायिक फायद्यासाठी शाहू महाराजांच्या फलकावर अनधिकृत जाहिरातबाजी करणाऱ्या जिओ स्मार्ट बाजारवर तात्काळ गुन्हा दाखल होऊन न्याय मिळावा.”

शाम जयवंतराव पाटील अध्यक्ष, राजमुद्रा फाउंडेशन

विविध संघटनांचा एकमुखी पाठिंबा

या मागणीसाठी देण्यात आलेल्या निवेदनावेळी शहरातील विविध सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अमळनेर तालुका मराठा समाजाचे संचालक संजय पाटील, भारतीय जनता पक्षाचे अमळनेर शहराध्यक्ष योगेश महाजन, शिवसेना कार्यकर्ते सुरज परदेशी, हर्षल महाजन, अनिरुद्ध शिसोदे, शुभम पवार यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

 प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

महापुरुषांच्या सन्मानाशी संबंधित हे प्रकरण अत्यंत संवेदनशील मानले जात असून, याबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधितांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण अमळनेर शहरासह सामाजिक संघटनांचे लक्ष लागून राहिले आहे. महापुरुषांचा सन्मान अबाधित राखण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.