ब्रेकिंग
साने गुरुजींच्या विचारांचा दीपस्तंभ हरपला; प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांना अमळनेरकरांची भावपूर्ण आदरांजली विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने आदरांजली सभा; मान्यवरांनी व्यक्त केला कृतज्ञ भाव

 

अमळनेर : साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानचे अध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सामाजिक कार्याची बांधिलकी जपणारे प्राचार्य डॉ. अरविंद सराफ सर यांच्या निधनाने अमळनेरच्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत अमळनेर येथील साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठानसह विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी संस्थांच्या वतीने रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता आदरांजली सभा आयोजित करण्यात आली.

या आदरांजली सभेत साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान, गुजराती वैष्णव समाज, सीनियर सिटीजन क्लब, सोनार व सराफ असोसिएशन, राष्ट्रसेवा दल, श्री छत्रपती शिवाजी महाराज गार्डन ग्रुप, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, खानदेश शिक्षण मंडळ, प्रताप कॉलेज प्राध्यापक संघटना तसेच परिसरातील सर्व पत्रकार यांच्या वतीने प्राचार्य डॉ. अरविंद सराफ यांच्या कार्याला आदरांजली वाहण्यात आली.

प्राचार्य डॉ. सराफ यांनी शिक्षण क्षेत्रासोबतच सामाजिक व सांस्कृतिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. साने गुरुजींच्या विचारांचा प्रचार-प्रसार आणि कर्मभूमीच्या कार्याला बळ देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या साधेपणातला मोठेपणा, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि सामाजिक प्रश्नांविषयीची संवेदनशीलता यामुळे त्यांनी अमळनेरच्या जनमानसात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.

यावेळी दर्शना पवार, बजरंग लाल अग्रवाल, ॲड. ललिता पाटील, सोमानी सर, वासुदेव देसले, प्रकाश शेठ पारेख, एएनआयचे राज्याध्यक्ष अविनाश पाटील, मकसूद बोहरी, प्राचार्य व्ही. ए. पाटील, प्रा. वाय. बी. पाटील, नवसारीकर सर, भगतसिंग परदेशी, चेतन सोनार आदींनी मनोगत व्यक्त करून डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींना उजाळा दिला.

मान्यवरांनी आपल्या मनोगतात डॉ. सराफ यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी भरून निघणे कठीण असल्याचे सांगितले. शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि साने गुरुजींच्या विचारांशी असलेली त्यांची निष्ठा हीच त्यांच्या कार्याची खरी ओळख होती, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, अशी भावनाही उपस्थितांनी व्यक्त केली.

सभेच्या वातावरणात डॉ. अरविंद सराफ यांच्या आठवणींनी उपस्थितांचे मन हेलावून गेले. त्यांच्या कार्याला अभिवादन करत उपस्थितांनी त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. विविध क्षेत्रांतील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, मित्रपरिवार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

साने गुरुजींच्या कर्मभूमीत शिक्षण व समाजसेवेचा विचार रुजविणाऱ्या एका समर्पित व्यक्तिमत्त्वाला अमळनेरकरांनी अश्रुपूर्ण नयनांनी दिलेली ही आदरांजली ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *