ब्रेकिंग
पाडळसरे धरणावरील अमळनेरची १९४.५४ कोटींची २४x७ पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आमदार अनिल पाटील यांची प्रत्यक्ष पाहणी; नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर नगरसेवकांसह उपस्थित

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहराचे अनेक वर्षांपासूनचे जलसंकट कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने उभारण्यात येत असलेली तब्बल *१९४.५४ कोटी रुपयांची पाडळसरे धरणावरील २४x७ पाणीपुरवठा योजना* आता वेगाने प्रगतिपथावर असून या महत्त्वाकांक्षी योजनेची रविवारी प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

रविवार, दि. २४ मे रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांसह पाडळसरे धरण परिसराला भेट देत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. सकाळी ७:३० वाजताच आमदार अनिल पाटील यांचा ताफा पाडळसरे धरण परिसरात दाखल झाला.

विशेष म्हणजे, शहराच्या विकासासाठी शिवसेना शिंदे गटाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीही नगरसेवकांसह उपस्थिती लावत या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे शहर विकासाच्या मुद्द्यावर आमदार आणि नगराध्यक्ष एकत्र आल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.

पाडळसरे धरणाजवळ तापी नदीच्या काठी सुरू असलेल्या जलवाहिनी आणि पाणीपुरवठा योजनेच्या विविध कामांची पाहणी करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेण्यात आली. शहरवासीयांना भविष्यात शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अमळनेर शहरासाठी ही योजना ‘गेमचेंजर’ ठरणार असून, २४ तास अखंडित पाणीपुरवठ्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी एकत्र येत केलेले प्रयत्न आता प्रत्यक्षात दिसू लागल्याचे चित्र या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले.

जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांना प्रतिष्ठेचा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर सलग दुसऱ्यांदा मानाचा बहुमान; जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

प्रतिनिधी | जळगाव

देशातील संसदेतील उल्लेखनीय, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी कामगिरीसाठी दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे, सलग दुसऱ्यांदा हा मानाचा पुरस्कार पटकावत त्यांनी जळगाव जिल्ह्याचा गौरव देशपातळीवर उंचावला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

संसद रत्न पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियंदर्शिनी राहुल यांनी पुरस्कारांची घोषणा करताना सांगितले की, २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत खासदारांच्या संसदीय कामगिरीचा सखोल अभ्यास करून ज्युरी समितीने पुरस्कार विजेत्यांची निवड केली आहे.

संसदीय कामकाजातील सक्रिय सहभाग, विविध चर्चांमधील प्रभावी मांडणी, लोकहिताच्या प्रश्नांवरील सातत्यपूर्ण पाठपुरावा, विकासाभिमुख भूमिका आणि संसदेतील शिस्तबद्ध उपस्थिती या महत्त्वपूर्ण निकषांवर खासदार स्मिताताई वाघ यांची निवड करण्यात आली आहे. संसदेमध्ये अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भूमिका मांडणाऱ्या लोकप्रतिनिधींना दिला जाणारा हा पुरस्कार देशातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो.

यंदाच्या *‘संसद रत्न पुरस्कार २०२६’* मध्ये महाराष्ट्राचे विशेष वर्चस्व पाहायला मिळाले आहे. राज्यातील पाच खासदारांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यामध्ये श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, हेमंत सावरा, स्मिता वाघ तसेच राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांचा समावेश आहे.

खासदार स्मिताताई वाघ यांच्या कार्यनिष्ठा, जनतेशी असलेली बांधिलकी आणि विकासकामांबाबतच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विविध स्तरांतून विशेष कौतुक होत असून, त्यांच्या या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

अमळनेरात लायन्स क्लबतर्फे मोफत हाडे व सांधे तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

अमळनेर : शहरातील लायन्स क्लब ऑफ,अमळनेर यांच्या वतीने रविवारी दि. २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत हाडे व सांधे आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. न्यू प्लॉट परिसरातील प्राजक्ता क्लिनिक येथे सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत हे शिबिर पार पडले.


शिबिरात हाडे व सांधे विकारांवरील तज्ज्ञ म्हणून डॉ.संदीप सुरेश पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केले. त्यांनी मुंबईतील व्ही. एन. देसाई व एमसीजीएम रुग्णालयाचे माजी विभागप्रमुख म्हणूनही कार्य केले आहे.
शिबिरात सांधे प्रत्यारोपण, गुडघे व खांदा प्रत्यारोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया तसेच कंबरदुखी आदी आजारांबाबत सखोल माहिती देण्यात आली. आधुनिक व रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन करून रुग्णांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा अमळनेर तालुक्यासह पारोळा, चोपडा, नरडाणा व शिंदखेडा तालुक्यातील तब्बल १०५ रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष ला. डॉ. संदीप जोशी, सचिव ला. महेंद्र पाटील, कोषाध्यक्ष ला. नितीन बिंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन ला. शेखर धनगर, ला. डॉ. धीरज कोकाटे, ला. राजेश कुंदनानी, डॉ. मिलिंद नवसारीकर, रवींद्र कॉलरा, प्रशांत सिंघवी, रवींद्र जैन, निरज अग्रवाल, प्रदीप जैन, प्रदीप अग्रवाल, सुनील चौधरी, एस. डी. भरुचा, डॉ. किशोर शहा, योगेश मुंदडा, डॉ. रवींद्र कुलकर्णी, शाम गोकलानी, राजेश वरलानी तसेच प्रा. नयना नवसारीकर आदी उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

अमळनेरात आज रंगणार हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन  मराठी वाङ् मय मंडळाचा उपक्रम 

 

अमळनेर ( प्रतिनिधी ) येथील मराठी वाङ् मय मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त हिंदी हास्य व्यंग कवी संमेलन शनिवार दिनांक 23 रोजी रात्री आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.

           या कवी संमेलनात देशभरातील प्रसिद्ध कवी व शायर सहभागी होणार असून त्यामध्ये घनश्याम अग्रवाल ( हास्य – व्यंग अकोला), सरिता सरोज ( गीत गजल नागपूर ), कवीपुष्पक देशमुख ( वीर रस, मुलताई ), कपिल जैन ( यवतमाळ) आणि शायर दीपक मोहिते ( वर्धा) यांचा समावेश आहे.

                 रसिकांच्या मनाला खळखळून हसवणारा, विचारांना हलकेच चिमटे काढणारा आणि साहित्यिक आनंदाची अनुभूती देणारा हा कार्यक्रम अमळनेर करांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.

             कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, उपाध्यक्ष विवेकानंद भांडारकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, कार्यवाह भैय्यासाहेब मगर, प्रा. श्याम पवार, प्रदीप साळवी, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. उदय देशपांडे, तसेच कार्यकारिणी सदस्य बन्सीलाल भागवत, सोमनाथ ब्रम्हे, स्नेहा एकता रे, संदीप घोरपडे, ऍड. के. व्ही. कुलकर्णी, वसुंधरा लांडगे, डॉ. महेश पाटील, कांचन शहा, प्रा. डॉ. विजयकुमार तुंटे, अजय केले, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, अनिल सोनार आयोजनात सक्रिय आहेत.

             कार्यक्रमासाठी तिकीट विक्री मराठी वाङ्मय मंडळ च्या कार्यालयात सुरु असून तिकीट दर रुपये 1500, रुपये 1000, रुपये सातशे, आणि रुपये 400 असे ठेवण्यात आले आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असल्याने रसिकांनी आपली जागा त्वरित निश्चित करावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शेतकी संघाच्या निवडणुकीत 15 जागांसाठी 44 उमेदवार रिंगणात.  बिनविरोध निवडणुकीचा प्रयत्न अयशस्वी

 

अमळनेर ( प्रतिनिधी) येथील तालुका शेतकरी सहकारी संघाच्या निवडणुकीत एकूण 155 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. दिनांक 20 मे रोजी माघारीच्या अखेरच्या दिवशी 111 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले त्यामुळे आता अंतिम चित्र स्पष्ट होऊन 30 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत 44 उमेदवार रिंगणात आहेत.

            दरम्यान शेतकी संघ ही सहकारी संस्था आर्थिकदृष्ट्या फारसे भक्कम नसल्याने निवडणुकीचा भुर्दंड संस्थेवर नको असे काही नेत्यांचे म्हणणे होते. त्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे होते. मात्र बिनविरोध चा प्रयत्न यशस्वी झाल्याने आता निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ही निवडणूक होत असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची ठरणार आहे.

          आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल असून यात संपूर्ण 15 उमेदवारांचा समावेश आहे. तर खासदार स्मिता वाघ यांच्या नेतृत्वाखाली किसान विकास पॅनल गठीत झाले असून या चौदा उमेदवार रिंगणात आहेत. याशिवाय काँग्रेस पक्षाने शेतकरी पॅनल जाहीर केले असून त्यांनी सोसायटी मतदार संघात एकही उमेदवार दिला नसून अन्य जागांवर दहा उमेदवार रिंगणात उतरविले आहेत.

            या निवडणुकीत खासदार आणि आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार असून संपूर्ण तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होणार का? दोन वर्षांपासून रखडलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार तातडीने वितरित करण्याची मागणी

 

 

प्रतिनिधी | अमळनेर 

ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी सुरू करण्यात आलेला *“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”* गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी तरी रखडलेले सर्व पुरस्कार थाटामाटात वितरित करून ग्रामीण महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 9 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा *31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त* सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

या पुरस्कारांतर्गत महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रति महिला 500 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येत होते. 31 मे 2023 रोजी राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील दोन वर्षांचे पुरस्कार रखडले.

विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरही शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने हजारो ग्रामीण महिलांवर अन्याय झाला असून शासन निर्णयाचाही अनादर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डी. ए. धनगर यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणेही तितकेच आवश्यक आहे.

यावर्षी तरी 2024, 2025 आणि 2026 या तीन वर्षांचे मिळून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींसाठी हा महत्त्वाचा प्रश्न बनला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार

 

अमळनेर : “आज उना आखजिना सन… त्याले दीना आम्ही आहेरना मान!” या पारंपरिक ओळींना साजेसा सामाजिक उपक्रम अमळनेर शहरात पाहायला मिळाला. आखाजीच्या पावन निमित्ताने अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम यांच्या पुढाकारातून होतकरू विद्यार्थ्यांचा घरगुती सत्कार करून एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील पैलाड येथील उदय अरुण सोनार या गुणवंत विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयात नियुक्ती मिळवली असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. याचबरोबर ते यूपीएससी परीक्षेची तयारीही करत आहेत. त्यांच्या या यशाचा गौरव करत आखाजीच्या पारंपरिक ‘आहेर’ पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री. प्रशांत निकम, नगरसेवक श्री. पंकज भोई तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उदय सोनार यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, उदय यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या मातोश्रींचाही समाजसेवक श्री. मनोहर निकम यांच्या हस्ते सन्मान करून ‘मातेचा गौरव’ ही सुंदर परंपरा जपण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मनोहर निकम यांनी केली. त्यानंतर श्री. प्रशांत निकम, श्री. कैलास भोई, वानखेडे सर आणि लांडगे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. सत्कारमूर्ती उदय सोनार यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व आगामी यूपीएससी वाटचालीसाठी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

या उपक्रमाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुक व्यक्त करण्यात आले. होतकरू आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला अमळनेर शहराचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम, श्री. पंकज भोई, समाजसेवक श्री. मनोहर निकम, श्री. हिरामण कणखरे, प्रा. श्री. गणेश पवार, भूषण भदाणे, महेश पाटील, चंदू वानखेडे, विजय वानखेडे, गौतम मोरे सर, जयवंतराव पाटील, नरसिंहराव वाघ, दशरथ लांडगे, कैलास भोई, बाळू बिराडे, विश्वासराव पाटील सर तसेच पतंजली महिला ग्रुपच्या सदस्यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, पारंपरिक आखाजी सणाला सामाजिक भानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न

 

पातोंडा : जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे आयोजित करण्यात आलेले विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम आविष्कार घडवणाऱ्या या प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यामध्ये सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच श्री. स्वप्नील शिंदे व सागर भोई यांचा समावेश होता. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कलाकृती, हस्तकला साहित्य, तसेच कार्यानुभवावर आधारित प्रकल्प सादर केले. रंग, कल्पकता आणि कौशल्य यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळालेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.

एकूणच, या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार

 

 जळगाव : मावळते मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप देण्यात आला असून, त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. तसेच, नवनियुक्त मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अमळनेरात सराफ बाजारातील घराला लागली आग 

 अमळनेर :- येथील सराफ बाजार येथे दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संजय मंगलचंद कोठारी यांच्या कापड दुकानावरील घराला अचानक आग लागली असता नागरिकांनी अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली आणि पुढील अनर्थ टळला. ही आग तिसऱ्या मजल्या वरील घराला लागल्यामुळे तसेच खाली कापड दुकान असल्यामुळे मोठा अनर्थ झाला असता मात्र नगरसेवक गोपी कासार, सुरज परदेशी यांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क केला.

                    आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आकाश संधनशिव, लखन कंखरे, भिका संदनशिव, तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

                   आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.