नैसर्गिक आपत्तीत अमळनेरात दिसले माणुसकीचे दर्शन, कुठे दिसला मायेचा झरा, तर कुठे दिसला मदतीचा आधार…!

अमळनेर( हृदयनाथ मोरे ) 30 जुलै च्या रात्री पडलेल्या मुसळधार पावसाने अमळनेर तालुक्यात हाहाकार माजवला. काही तासांतच नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. अनेक वर्षानंतर बोरी नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महावितरण चे अनेक ट्रांसफार्मर पाण्याखाली गेल्यामुळे वीजपुरवठाही खंडित झाला. पावसाचा सर्वाधिक फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसला. पिंपळे नाल्याच्या पुराच्या पाण्यामुळे बाजार समितीच्या मागील संरक्षक भिंतीला भगदाड पडून पाणी थेट आत घुसले त्यामुळे व्यापाऱ्यांच्या धान्याच्या गोण्या वाहून गेल्या काही गोण्या पाण्यात भिजल्या यात व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. धुळे रोडवरील शिवांश हब येथे पाणी घुसून दुकानातील मालाचे नुकसान झाले. गलवाडे रोड परिसर पूर्णपणे जलमय झाला होता. तसेच नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे अतोनात हाल झाले तसेच प्रचंड नुकसान झाले.
एकंदरीतच अमळनेर शहरावर आलेल्या या नैसर्गिक संकटाच्या वेळी अंमळनेरकर नागरिक मदतीला धावले नसते तरच नवल…! अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची तातडीने व्यवस्था करण्यात आली. तसेच गरजूंसाठी औषधे, प्रथमोपचार याची व्यवस्था करण्यात आली होती.
अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या कठीण परिस्थितीत तसेच पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था, जय निल फाउंडेशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, जैन सोशल ग्रुप, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी, ज्ञात, अज्ञात अनेक नागरिकांनी ज्याला जशी जमेल तशी मदत करून या कठीण प्रसंगी अमळनेरवर कोणतेही संकट आले तर आम्ही ते परतावून लावू या भावनेने काम केले.
आता जनजीवन पूर्व पदावर येत असून शासन प्रशासनाने नुकसानग्रस्तांचे त्वरित पंचनामे करून त्यांना तात्काळ शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी एवढीच अमळनेर वासीयांकडून माफक अपेक्षा.



