पूरग्रस्त मातंगवाडीत शिक्षिकेच्या मायेचा ओलावा; मंदाकिनी भोई यांनी दिला धीर, अन्न व वस्त्रांची मदत
अमळनेर (प्रतिनिधी):
पैलाड भागातील मातंगवाडीजवळील केडी गायकवाड हायस्कूल येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांनी पूरग्रस्त कुटुंबांना दिलेल्या मदतीमुळे मानवतेचा हृदयस्पर्शी आदर्श निर्माण केला आहे. मुसळधार पावसामुळे ३१ जुलै रोजी आलेल्या पुरात मातंगवाडीतील अनेक गोरगरीब कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झाला. ही विदारक परिस्थिती पाहून शिक्षिका मंदाकिनी भोई यांना अश्रू अनावर झाले.

शाळेत कार्यरत असताना त्या रोजच या वस्तीतील कुटुंबांचे हालअपेष्टा व गरिबी जवळून पाहत होत्या. मात्र पुरामुळे महिलांचे संसारोपयोगी साहित्य, कपडे व अन्य वस्तू वाहून गेल्याचे दृश्य पाहून त्यांनी तत्काळ मदतीचा निर्णय घेतला.
घरी परतल्यानंतर आपल्या वयोवृद्ध सासू-सासरे, तसेच सुपुत्र गौरव व भूषण यांच्या सहकार्याने त्यांनी पूरग्रस्तांसाठी भाजी-भाकरी, खिचडी आदी अन्नपदार्थ तयार करून मातंगवाडीत जाऊन गरजू कुटुंबांना वाटप केले. अन्नासोबतच त्यांनी प्रेमाचे दोन शब्द देत महिलांचे सांत्वन केले आणि संकटाच्या काळात धीर दिला.
पूराच्या पाण्यात अनेक महिलांचे कपडे वाहून गेल्याने सौ. मंदाकिनी सुनील भोई यांनी स्वतःच्या चांगल्या प्रतीच्या साड्याही मातंग समाजातील भगिनींना वाटप केल्या. त्यांच्या या संवेदनशील व मानवतावादी कृतीचे सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या वस्तीत त्या शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य करतात, त्याच वस्तीतील गरजू कुटुंबांच्या मदतीसाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत मानवतेचे दर्शन घडविले.
सौ. मंदाकिनी सुनील भोई या समाजसेवक व पक्षीमित्र तसेच अर्बन बँकेतील कॅशियर श्री. सुनील भोई यांच्या सुविद्य पत्नी असून, समाजकार्यात त्या आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवाभावी कार्यामुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अनेकांनी त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून गौरविले आहे.
या समाजकार्याबद्दल प्रताप छबुलाल साळी, नगरसेवक यांनी सौ. ताईसाहेब मंदाकिनी सुनील भोई यांना मानाचा मुजरा करत त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. त्यांच्या या माणुसकीच्या कार्याने समाजात सेवाभाव, संवेदनशीलता आणि मानवतेचा संदेश दिला आहे.



