ब्रेकिंग
जवखेडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन जनजागृती

 

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर वंदेमातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान माती वाचवा, पाणी जपा, तंबाखूमुक्ती तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. बालविवाह ही बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्यासाठी गंभीर समस्या असून, बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगितमय कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

हा बालविवाह प्रतिबंध जनजागृती उपक्रम Just Rights for Children यांच्या अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व संचालक रेणू प्रसाद जिल्हा समन्वयकआनंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त समाजासाठी जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमास सरपंच सौ. जयश्री कैलास माळी, उपसरपंच श्री. दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. न्याहळदे आप्पा, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. समाधान पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, युनियन बँकेचे मॅनेजर श्री. मयुर पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापक श्री. छगन पंढरीनाथ पाटील यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती रत्नप्रभा साळुंखे, श्रीमती रेखा पाटील, सौ. सुनिता पाटील, श्रीमती अर्चना बागुल व श्री. माधवराव ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. मुकेश पाटील सर यांनी केले.

“बालविवाह थांबवूया, बालकांचे भविष्य घडवूया” असा संदेश देत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली.

नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा

 

एनएसयूआयचे अमळनेर येथे जोरदार आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा

अमळनेर, दि. १४ ऑगस्ट : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी तसेच परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने अमळनेर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांची निष्पक्ष, सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नीटसारख्या देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेबाबत कथित गैरप्रकार समोर आल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत करून परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनादरम्यान नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा द्यावी, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर एनएसयूआयच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हक्क आणि गुणवत्ताधारित शिक्षणव्यवस्थेसाठी एनएसयूआय आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनाला एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष ऍड. कौस्तुभ पाटील, तालुकाध्यक्ष उमेश संधान शिव, शहराध्यक्ष जयेश पाटील, प्रभारी प्रवीण पाटील, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांच्यासह संदीप घोरपडे, मनोज पाटील, तुषार संधान शिव, महेश पाटील, अशोक पवार, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ बोरसे, कृष्णा चौधरी, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, विलास भिल, पप्पू भिल, करण भिल, निंबाजी भिल यांच्यासह एनएसयूआय व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.,

   या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण पुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

    या वेळी मंचवर सौ जया ज़ैन , उपमुख्याध्यापक एस आर शिंगांणे, श्रीमती भारती आठवले , पर्यवेक्षक एस पी वाघ , कु. समिक्षा जैन ,श्री शाम पवार ,शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी होत्या.

  कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना , प्रतिज्ञा , संविधान ,वंदे मातरम् घेऊन झाली.मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्र गीत , राज्य गीत म्हणून करण्यात आली.

 शाळेमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व नुकत्याच आईस स्केटिंग हॉकी राष्ट्रीय स्तरावर डेहराडून उत्तराखंड येथे खेळलेल्या कुमारी नूतन किशोर भोई हिचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आजच्या दिवसाचे वातावरण हे देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर व ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांची आठवण करून देशाला पुन्हा नवीन एका दिशेने नेण्यासाठी देशाचा सुजाण नागरिक व देशाच्या प्रगतीसाठी , व कॉपीमुक्त अभियानासाठी सर्व विद्यार्थिनींनी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांनी आज प्रतिज्ञा घेतली. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन उत्साहात संपन्न

 

अमळनेर (दि. १५ ऑगस्ट) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०१ वाजता सुभाष चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या क्षणीच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची ही आगळीवेगळी आणि प्रेरणादायी परंपरा अमळनेर शहरात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जपली जात आहे.

यंदाच्या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिका कल्पना मोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. मध्यरात्रीचा शांत परिसर राष्ट्रगीताच्या स्वरांनी भारावून गेला. उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी शहरातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक मध्यरात्री सुभाष चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अमळनेरकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्र सेवा दलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि मध्यरात्री झेंडावंदनाच्या परंपरेचे महत्त्व याबाबत गौतम मोरे यांनी प्रास्ताविकात केले. स्वातंत्र्य केवळ राजकीय सत्तांतर नसून सामान्य माणसाला स्वाभिमान, समान संधी, न्याय आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळवून देणारी व्यापक संकल्पना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर प्रा. अशोक पवार यांनी आजच्या काळातील स्वातंत्र्य आणि देशातील सद्यस्थिती यावर सविस्तर भाष्य केले. संविधानाने दिलेली स्वातंत्र्याची मूल्ये, लोकशाहीची जबाबदारी, सामाजिक समता आणि नागरिकांची भूमिका यांचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता आपल्या संविधानिक मूल्यांचे आणि सामाजिक जबाबदारीचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस व्हावा, असे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर शेतीमाला ला भाव,शिक्षण,रोजगार,आरोग्य, सामान संधी यासाठी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारे अजून काही करू शकली असती, मात्र अजून खूप पुढे जावे लागेल. प्रत्येकाला स्वातंत्र्याचं महत्व समजून सांगावे लागेल. आपल्या शहरातून देशासाठी सात देशभक्तांनी जीवाचे बलिदान दिले. त्यांना आज स्मरून त्यांना अभिवादन करून, स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो.

कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पू साने गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि मानवतावादी विचारांची प्रेरणा देणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

त्यानंतर पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याजवळ ‘खरा तो एकाची धर्म’ हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या मानवतावादी विचाराने उपस्थित वातावरण अधिक भावपूर्ण झाले. जात, धर्म, पंथ आणि भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, प्रेम आणि बंधुभाव जपण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला.

राष्ट्र सेवा दलाच्या या मध्यरात्रीच्या झेंडावंदनाची परंपरा केवळ ध्वजारोहणापुरती मर्यादित नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाही-सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी असलेली बांधिलकी व्यक्त करणारी परंपरा म्हणून अमळनेरच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची ठरली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उदय खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती गाला, दिलीप सोनवने,डॉ. मिलिंद वैद्य,सुधाकर देशमुख,अमोल येवले, दीपक चव्हाण,शिवाजी महाजन,तुषार संदानशिव,भीमराव संदानशिव, भालचंद्र सनेर,संजय पाटील,अशोक पाटील,धर्मेश निकुंभ, प्रशांत बडगुजर,

आरीफ भाया, विजयेंद्र शिरसाळे, हरिश देशमुख.प्रशान्त चव्हाण आणि मित्र परिवार

आदींनी विशेष सहकार्य केले.

मध्यरात्रीच्या या झेंडावंदनामुळे अमळनेर शहरात स्वातंत्र्यदिनाची सुरुवातच देशभक्ती, सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि मानवतेच्या विचारांनी झाली. गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आगामी पिढ्यांपर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाणीटंचाईच्या संकटात नगरसेवक दीपक चौगुले यांची धावपळ; प्रभाग ६ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

 

अमळनेर | प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे अमळनेर शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली असून, अनेक भागांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. या बिकट परिस्थितीत प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक दीपक भाऊ चौगुले यांनी नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून प्रभाग क्रमांक ६ मधील विविध कॉलनी तसेच परिसरात गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागू नये आणि त्यांच्या दैनंदिन गरजा सुरळीतपणे पूर्ण व्हाव्यात, यासाठी दीपक भाऊ चौगुले हे आपल्या भाऊ मित्र मंडळाच्या सहकाऱ्यांसह सातत्याने प्रयत्नशील आहेत.

दिवस असो वा रात्र, नागरिकांकडून पाण्याची मागणी होताच परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टँकर उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या या पाणीटंचाईच्या संकटात नागरिकांच्या मदतीला प्रत्यक्ष धावून जात मदतकार्य सुरू ठेवल्याने दीपक भाऊ चौगुले यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

प्रभागातील नागरिकांना तातडीने पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची व्यवस्था सातत्याने सुरू ठेवण्यात आली असून, शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत नागरिकांना शक्य ती सर्व मदत करण्याचा प्रयत्न सुरूच राहील, असे नगरसेवक दीपक भाऊ चौगुले यांनी सांगितले.

अतिवृष्टीच्या काळात निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या संकटात प्रशासनाच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला पूरक ठरत नागरिकांच्या दारापर्यंत पाणी पोहोचविण्याचा उपक्रम सुरू असल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.

अमळनेरात अतिवृष्टी बाधितांना आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते किराणा किटचे वाटप

 

बाधित कुटुंबांना पुढील आठवड्यात मिळणार दहा हजारांची मदत-आमदारांची माहिती

अमळनेर:- तालुक्यात ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे नुकसान झालेल्या नगरपरिषद हद्दीतील बाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा किटचे वाटप काल शुक्रवार, दिनांक १४ ऑगस्ट रोजी माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते प्राथमिक स्वरूपात वाटप करून वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

      यावेळी आमदारांनी बांधीत भागातील प्रत्येक केंद्रावर जाऊन किटचे वाटप केल्यानंतर बाधित नागरिकांशी संवाद साधत पुढील आठवड्यात प्रत्येक बाधित कुटुंबास शासनाकडून दहा हजारांची मदत दिलेल्या बँक खात्यावर जमा होईल असे संकेत दिले.दरम्यान बाधित कुटुंबाचे पंचनामे झाल्यानंतर तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी, अमळनेर यांच्या कार्यालयाकडून किराणा किट वाटपाचे आदेश पारित करण्यात आले होते.सदर किट वाटप करताना आमदार पाटील यांच्या सोबत प्रांताधिकारी मयूर भंगाळे,न प चे मुख्याधिकारी गणेश शिंदे यासह प्रशासनातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

       बाधित नागरिकांना मदत मिळण्यास सोयीचे व्हावे, यासाठी शहरातील ८ विविध ठिकाणी केंद्र करण्यात आले होते.

भोई समाज मंगल कार्यालय, पैलाड,शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र,ताडेपुरा,डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, गांधलीपुरा,संत सखाराम महाराज वाडी,शिवाजी विद्या मंदिर, तांबेपुरा,क्षत्रिय कांचमाळी पंचमढी, बहादरपूर नाका रोड,शिवम कुटी बोर्डाजवळ, झामी चौक,विद्या विहार कॉलनी गेटजवळ आदी केंद्रांवर हे वाटप करण्यात आले.सुमारे 1700 पेक्षा अधिक कुटुंबाना ही मदत मिळाली असून या वाटप प्रक्रियेत प्रति बाधित कुटुंबास एक किराणा किट देण्यात आले आणि मदत देताना लाभार्थ्यांचा फोटो आणि वाटप केल्याबाबतची स्वाक्षरी घेण्यात आली.

      यावेळी नगरसेवक भरतकुमार ललवाणी,शोभाबाई गढरे,नरेंद संदानशिव,विजय कहारु पाटील,सचिन पाटील,देवेंद्र कांबळे,मुक्तार खाटीक,संजय कौतीक पाटील,विजय पाटील,दुर्गेश पाटील,विनोद लांबोळे,देविदास महाजन,दिनेश शेलकर,शांताराम महाजन,प्रविण महाजन,गंगाराम महाजन,भुषण भदाणे,वेद पाटील तसेच राष्ट्रवादी शहराध्यक्ष चेतन राजपूत,जितेंद्र ठाकुर यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वंचित कुटुंबांनाही मिळणार मदत

     सदर प्रक्रियेत बाधित झालेल्या काही बाधित कुटुंबांची नावे मदतीच्या यादीत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदारांनी प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांचेशी मोबाईलवरून संवाद साधत लवकरच या कुटुंबाना देखील किराणा किट उपलब्ध करून घ्यावेत अश्या सूचना केल्या.

स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या अंधजन कल्याण मंडळाचा भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचा कार्यक्रम

 

अंध बंधवांच्या मदतीसाठी अंध कलाकार देणार अमळनेरकराना संगीत मेजवानी…” 

अमळनेर:- स्वातंत्र्य दिनानिमित्त दृष्टिदिव्यांग कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अंधजन कल्याण मंडळाच्या वतीने भव्य चॅरिटी संगीत मैफिलीचे आयोजन आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे.

         या मौफिलीचे वैशिट्य म्हणजे सर्व कलाकार दृष्टिहीन व शासकीय सेवेतील असून केवळ आपल्या अंध बांधवांच्या मदतीसाठी त्यांनी हे पाऊल टाकले आहे.हा कार्यक्रम शनिवार, दि. 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजता छत्रपती शिवाजी नाट्यगृह, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे. सप्तस्वरांजली म्युझिकल ग्रुप यांच्या वतीने देशभक्तीपर, मराठी, हिंदी तसेच अहिराणी सदाबहार गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे.

        दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कला, कौशल्य आणि स्वयोरोजगार करणाऱ्या अंध व्यक्तींच्या स्वावलंबनाला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमातून प्राप्त होणारा निधी दृष्टिदिव्यांग बांधवांच्या शिक्षण, आरोग्य, स्वयोरोजगार, कौशल्य विकास तसेच विविध सामाजिक कल्याणकारी उपक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.तरी या सामाजिक उपक्रमात सर्व नागरिक, उद्योजक, व्यापारी, संस्था आणि दानशूर व्यक्तींनी सहभाग नोंदवावा. चॅरिटी शोचे तिकीट शुल्क फक्त ₹100/- ठेवण्यात आले आहे.तरी नागरिकांनी कुटुंबासह उपस्थित राहून दृष्टिदिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अमळनेर शहरात डास प्रतिबंधक फवारणी व मलेरिया ऑइल टाकण्याची प्रभावी मोहीम

 

अमळनेर : अमळनेर नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागामार्फत माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि डासांमुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध व्हावा, यासाठी विशेष स्वच्छता व डास प्रतिबंधक मोहीम राबविण्यात येत आहे.

शहरातील प्रभाग क्रमांक १ ते १८ मधील विविध भागांमध्ये डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत असून, ज्या ठिकाणी पाणी साचलेले आहे अशा ठिकाणी मलेरिया ऑइलचा वापर करण्यात येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डासांची उत्पत्ती होऊ नये, तसेच मलेरिया, डेंग्यू यांसारख्या डासांपासून होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने ही प्रतिबंधात्मक कार्यवाही सातत्याने करण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी भरत आगळे, प्रविण बिऱ्हाडे, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, विजय पाटील व मनोज गरुड यांच्या कर्मचारी पथकासह प्रभाग क्रमांक १ ते १८ मधील सर्व मुकादम व स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित पथकांकडून विविध भागांची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी फवारणी तसेच साचलेल्या पाण्यावर मलेरिया ऑइल टाकण्याची कार्यवाही केली जात आहे.

“स्वच्छ व निरोगी अमळनेर – डासमुक्त अमळनेर” या उद्देशाने नगरपरिषद प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. घराभोवतीची भांडी, टायर, डबे, कुंड्या, गटारी किंवा इतर ठिकाणी पाणी साचले असल्यास ते तात्काळ काढून टाकावे आणि नगरपरिषद स्वच्छता विभागास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, स्वच्छता ही केवळ नगरपरिषदेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याने अमळनेर शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता विभाग सदैव तत्पर राहील.

जिजामाता माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना सायबर क्राईमविषयी मार्गदर्शन

 

एरंडोल, जि. जळगाव : डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि ऑनलाइन व्यवहारांच्या वाढत्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत सजग राहणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर क्राईम आणि सायबर सुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थिनी कुमारी स्नेहल पाटील व कुमारी वैष्णवी पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे विविध प्रकार, त्यापासून बचावाच्या उपाययोजना तसेच डिजिटल माध्यमांचा सुरक्षित वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

मोबाईल, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी व पासवर्ड कोणालाही सांगू नये, सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवावे, तसेच क्यूआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले. ऑनलाइन फसवणुकीची घटना घडल्यास घाबरून न जाता तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचेही सांगण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मार्गदर्शक बुकलेटचे वाटप करण्यात आले. या बुकलेटमधील माहिती विद्यार्थ्यांना दैनंदिन डिजिटल व्यवहार करताना अधिक सजग आणि सुरक्षित राहण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी बुकलेटमधील मार्गदर्शक सूचनांचा नियमित वापर करावा, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रविण शंभू केदार सर तसेच ज्युनिअर क्लर्क श्री. आर. आर. वाघ सर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा, ऑनलाइन फसवणूक आणि सोशल मीडिया वापराबाबत विविध प्रश्न विचारले. उपस्थित मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसन केले.

डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम; शहरात शैक्षणिक चळवळीची संकल्पना

 

अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, एकाग्रता आणि वाचनाची आवड वाढावी, तसेच मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून काही काळ दूर राहून अभ्यास व ज्ञानार्जनासाठी वेळ देता यावा, या उद्देशाने अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अनुशासन, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सकारात्मक सवय निर्माण करण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासंदर्भात PTA पदाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम तसेच शिक्षण सभापती श्री.नविद शेख यांची भेट घेऊन संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. या अभिनव उपक्रमाचे दोन्ही मान्यवरांनी स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला. अमळनेर नगर परिषद आणि PTA यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हा उपक्रम कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून केवळ अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनासाठी वेळ द्यावा, अशी संकल्पना आहे. सायंकाळी ७ वाजता विशेष सायरन वाजवून संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाची वेळ सुरू झाली’ असा संदेश देण्याची कल्पनाही मांडण्यात आली आहे.

हा उपक्रम केवळ PTA किंवा नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण अमळनेर शहराने स्वीकारलेली शैक्षणिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ‘दोन तासांचा छोटासा संकल्प; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी चळवळ!’ या विचारातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अमळनेर शहराने एक आदर्श निर्माण करावा, असा मानस PTA पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात वेळेचे नियोजन, स्व-अनुशासन, एकाग्रता आणि वाचनाची गोडी निर्माण होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या भेटीप्रसंगी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, सौ. सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सौ. वैशाली निकम, मयूर भावसार, स्वर्णदीप राजपूत आदी PTA पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण शहराने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा संकल्प प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.