ब्रेकिंग
सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांचे परखड मत लालपरीचे विद्रुपीकरण थांबवा; सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान करायला शिका!

 

अमळनेर : सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देते; मात्र काही विद्यार्थ्यांकडून याच सुविधेचा गैरफायदा घेत एसटी बसच्या आसनांची तोडफोड, काचांवर व सीटच्या मागील बाजूस अश्लील मजकूर व चित्रे काढणे, तसेच बसचे विद्रुपीकरण करण्याचे प्रकार सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकारावर सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांनी परखड मत व्यक्त करत प्रशासन, शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना जागे होण्याचे आवाहन केले आहे.

“सरकारने शिक्षणासाठी मोफत पास दिला, पण काही विद्यार्थ्यांनी त्याचा अर्थच बदलून टाकला. काय चाललंय आमच्या लालपरीत?” असा थेट सवाल राजू बापू चौधरी यांनी उपस्थित केला आहे.

एसटी बसमधील सीटचे कव्हर ब्लेडने फाडून त्यातील कुशन (स्पॉन्ज) बाहेर काढून रस्त्यावर फेकणे, मार्कर पेन व करकटकने सीटच्या मागील बाजूस तसेच काचेवर स्वतःची नावे, घाणेरडे शब्द आणि अश्लील चित्रे लिहिणे, असे प्रकार काही बसमध्ये सर्रास होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कोट्यवधी रुपये खर्च करून नव्या कोऱ्या बस प्रवाशांच्या सेवेत दाखल केल्या जातात; मात्र काही महिन्यांतच त्यांची अवस्था अत्यंत विद्रुप होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

मूक प्रेक्षकही जबाबदार!

या प्रकारातील सर्वात गंभीर बाब म्हणजे काही विद्यार्थी आपल्या डोळ्यादेखत बसची तोडफोड होताना पाहतात; मात्र चुकीचे कृत्य करणाऱ्या मित्राला थांबविण्याचे किंवा वाहकाला माहिती देण्याचे धाडस करत नाहीत. या मूक संमतीमुळेच सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीला प्रोत्साहन मिळत आहे, असे राजू बापू चौधरी यांनी म्हटले आहे.

“आज मागच्या सीटचे एकही कुशन शाबूत राहत नाही. एसटीचे विद्रुपीकरण सुरू आहे. हा केवळ बसच्या नुकसानीचा विषय नाही, तर विद्यार्थ्यांच्या संस्कारांचा आणि सामाजिक जबाबदारीचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“खरंच मुलांना योग्य शिक्षण मिळतंय का?”

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सार्वजनिक मालमत्तेचा सन्मान, सामाजिक जबाबदारी आणि शिस्त यांचे संस्कार देणे गरजेचे आहे. एसटी ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता नसून सर्वसामान्यांच्या पैशातून उभी राहिलेली सार्वजनिक सेवा आहे. तिचे नुकसान करणे म्हणजे अप्रत्यक्षपणे सर्वसामान्यांचेच नुकसान करणे होय.

“ज्यांना सार्वजनिक मालमत्ता जपायची असते, तिचा सन्मान करायचा असतो, हेच शिकवले जात नसेल तर भविष्यात देशाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची भावना कशी निर्माण होणार?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“जो आज एसटीची सीट फाडतोय, तो उद्या त्याच एसटीवर दगड फेकणार नाही, याची मला १ टक्काही खात्री वाटत नाही.”

आजच्या पिढीने सार्वजनिक सुविधा सहज उपलब्ध होतात म्हणून त्यांची किंमत कमी समजू नये. एका बसची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्ती यामागे शासनाचा मोठा खर्च तसेच अनेक कर्मचाऱ्यांचे श्रम असतात. त्यामुळे एसटीचे नुकसान करणे म्हणजे समाजाच्या पैशांचा अपव्यय करण्यास हातभार लावणे आहे.

🔴 आता बस्स झालं! प्रशासनाने जागे व्हा! 🔴

एसटी प्रशासनाला विनंती : प्रत्येक बसमध्ये “बस फाडताना कोणी दिसल्यास वाहकाला कळवा, तुमचे नाव गुप्त ठेवले जाईल” अशा आशयाचे स्टिकर लावण्यात यावेत. तसेच उपलब्ध असल्यास सीसीटीव्ही फुटेज तपासून तोडफोड करणाऱ्या विद्यार्थ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.

शाळा प्रशासनानेही पुढाकार घ्यावा : महिन्यातून किमान एकदा एसटी कर्मचाऱ्यांना शाळेत बोलावून “एसटी ही आपलीच आहे” या विषयावर विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात यावे. सार्वजनिक मालमत्तेचे महत्त्व, शिस्त आणि जबाबदारी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे.

पालक आणि सुजाण विद्यार्थ्यांनीही जबाबदारी स्वीकारावी : आपल्या मित्राकडून बसची तोडफोड होत असल्याचे दिसल्यास त्याला थांबवावे आणि संबंधित प्रकाराची माहिती वाहक किंवा एसटी प्रशासनाला द्यावी. चुकीच्या कृत्याकडे दुर्लक्ष न करता त्याला वेळीच आळा घालणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे.

लालपरी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी!

“एसटी ही फक्त बस नाही, ती महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. तिची तोडफोड करून तुम्ही दुसऱ्याचे नव्हे, तर तुमच्या स्वतःच्या सार्वजनिक सुविधांचे नुकसान करत आहात. लालपरीचे संरक्षण करणे ही प्रशासनाइतकीच समाजाची आणि विद्यार्थ्यांचीही जबाबदारी आहे,” असे सामाजिक कार्यकर्ते राजू बापू चौधरी यांनी स्पष्ट केले.

एसटीच्या बसचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सार्वजनिक मालमत्तेबद्दल जाणीव आणि जबाबदारी निर्माण करण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *