डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 12 hours ago
समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 2 days ago
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 3 days ago
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 4 days ago
Top 10 News
डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न
रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती
आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न २६ वर्षांपासून प्रलंबित; पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची डॉ. दीपक पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
कळमसरे ता.अमळनेर : सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल २६ वर्षांपासून प्रलंबित असून, शासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक व शेतकरी सेना अध्यक्ष श्री. डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात सात्री गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सात्री गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जागा घेतली असली तरी तब्बल २६ वर्षांनंतरही अनेक कुटुंबांना घरांसह मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक ग्रामस्थांना अद्यापही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
दि. २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करून पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, २६ वर्षांनंतरही सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने आता पुन्हा नवीन सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी
सात्री गावाच्या पुनर्वसना सोबतच पांझरा नदीवर मंडळ, मुडी आणि शहापूर येथे केटीवेअर बंधारे उभारून नदीतील पाणी अडवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. याबाबत जलसंपदा विभाग, जळगाव यांच्याकडून सर्वेक्षण करून प्रस्तावित कामांना गती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सात्री गावाचा पुनर्वसन प्रश्न आणि पांझरा नदीवरील बंधाऱ्यांचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. दीपक पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.



डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन
नवलनगर, ता. व जि. धुळे : ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त क्रांतिवीर नवलभाऊ कला महाविद्यालय, नवलनगर येथे विविध ग्रंथांचे आकर्षक प्रदर्शन आयोजित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉ. व्ही एच उभाळेसर यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, तसेच ग्रंथालयातील उपलब्ध साहित्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, हा प्रदर्शनामागील प्रमुख उद्देश होता.
या ग्रंथ प्रदर्शनाचे अध्यक्षीय स्थान प्राचार्य डॉ. विजय उबाळेसर होते. प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुजाता निकम होत्या. कार्यक्रमास डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, डॉ. ए. बी. सोनवणे, डॉ. यु.वाय. गांगुर्डे, डॉ. के. डी. बागुल, डॉ. संभाजी कदम, प्रा. एस. डी. सूर्यवंशी, प्रा. विजय शिंदे, प्रा. छाया पाटील, श्री. रवींद्र धनगर, श्री. संभाजी पाटील, श्री. संतोष पाटील, श्री. संजय पवार, श्री. योगेंद्र राजपूत, श्री. रोहिदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात विविध विषयांवरील संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा पुस्तके, साहित्यिक पुस्तके तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करणारे विविध ग्रंथ मांडण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध पुस्तकांची माहिती घेतली.
यावेळी डॉ. सुजाता निकम यांनी वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी ग्रंथालयाचे महत्त्व आणि डॉ. रंगनाथन यांचे ग्रंथालय क्षेत्रातील योगदान याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची प्रेरणा निर्माण होऊन ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करण्याची भावना वाढीस लागली.
ग्रंथ प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



स्वर अर्पण’मधून अमळनेरकरांना हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी १३ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रंगणार संगीताची अविस्मरणीय मैफल
अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मेजवानी घेऊन स्वर ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत ‘स्वर अर्पण’ हा विशेष संगीत कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे रंगणार आहे. लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचा बहारदार नजराणा सादर करणाऱ्या या कार्यक्रमाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून अमळनेरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध भावछटांनी नटलेली गाणी, दमदार ऑर्केस्ट्राचे सादरीकरण, सुरेल गायन आणि नृत्याचा मनमोहक आविष्कार यामुळे ‘स्वर अर्पण’ कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.
या संगीत सोहळ्याचे आयोजन सुनील वाघ यांनी केले असून, कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी करुणा सोनार सांभाळणार आहेत. ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी साऊंड मॅनेजर विजय शुक्ला यांच्याकडे असून, नृत्यांगना पूजा आपल्या आकर्षक नृत्याविष्कारातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.
या सुरेल मैफलीत शिवानी वाघ, ऋचा बिरारी, चंद्रकांत बी. आणि सिंगर मनोज वानखेडे आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणासोबतच ऑर्केस्ट्राची साथ आणि नृत्याची रंगत यामुळे रसिकांना संगीताचा बहुरंगी अनुभव मिळणार आहे.
‘स्वर अर्पण’ हा केवळ संगीत कार्यक्रम नसून, जुन्या-नव्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि संगीतप्रेमींच्या मनाला आनंद देणारा सुरेल अनुभव ठरणार आहे. अमळनेरकर रसिकांना आपल्या आवडत्या गीतांचा आनंद प्रत्यक्ष संगीत मैफलीत घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.
संगीताची आवड असलेल्या सर्व रसिकांनी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सुनील वाघ यांनी केले आहे.




