अमळनेरच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा अभिनव उपक्रम; शहरात शैक्षणिक चळवळीची संकल्पना
अमळनेर : विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची सवय, एकाग्रता आणि वाचनाची आवड वाढावी, तसेच मोबाईल व टीव्हीच्या अतिवापरापासून काही काळ दूर राहून अभ्यास व ज्ञानार्जनासाठी वेळ देता यावा, या उद्देशाने अमळनेर PTA क्लासेस संघटनेतर्फे ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम राबविण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्व-अनुशासन, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची सकारात्मक सवय निर्माण करण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमासंदर्भात PTA पदाधिकाऱ्यांनी अमळनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम तसेच शिक्षण सभापती श्री.नविद शेख यांची भेट घेऊन संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. या अभिनव उपक्रमाचे दोन्ही मान्यवरांनी स्वागत करून सकारात्मक प्रतिसाद दिला. अमळनेर नगर परिषद आणि PTA यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच हा उपक्रम कार्यान्वित करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी ७ ते ९ या दोन तासांच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी मोबाईल व टीव्हीपासून दूर राहून केवळ अभ्यास, वाचन आणि ज्ञानार्जनासाठी वेळ द्यावा, अशी संकल्पना आहे. सायंकाळी ७ वाजता विशेष सायरन वाजवून संपूर्ण शहरातील विद्यार्थ्यांना ‘अभ्यासाची वेळ सुरू झाली’ असा संदेश देण्याची कल्पनाही मांडण्यात आली आहे.
हा उपक्रम केवळ PTA किंवा नगर परिषदेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संपूर्ण अमळनेर शहराने स्वीकारलेली शैक्षणिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. ‘दोन तासांचा छोटासा संकल्प; विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मोठी चळवळ!’ या विचारातून हा उपक्रम पुढे नेण्यात येत असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी अमळनेर शहराने एक आदर्श निर्माण करावा, असा मानस PTA पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात वेळेचे नियोजन, स्व-अनुशासन, एकाग्रता आणि वाचनाची गोडी निर्माण होण्यास हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या भेटीप्रसंगी PTA अध्यक्ष भैय्यासाहेब मगर, सौ. सुरश्री वैद्य, सुधीर टाकणे, सौ. वैशाली निकम, मयूर भावसार, स्वर्णदीप राजपूत आदी PTA पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संपूर्ण शहराने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि ‘दोन तास मोबाईलपासून मुक्ती’चा संकल्प प्रत्यक्षात आणावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



