ब्रेकिंग
अमळनेरमध्ये २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळला; ओळख पटवण्यासाठी अमळनेर पोलिसांचे आवाहन

 

अमळनेर | प्रतिनिधी :

शहरातील दाजीबा नगर परिसरात एका २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाचा बेवारस मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृताची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता दाजीबा नगर येथील कच्च्या रस्त्यालगत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.

 मृताचे वर्णन

वय: अंदाजे २५ ते ३० वर्षे

रंग:  सावळा

उंची: अंदाजे ५ फूट ३ इंच

चेहरा: लांबट

नाक:  सरळ

केस: काळे

अंगावरील कपडे: निळसर रंगाचा टी-शर्ट व राखाडी (ग्रे) रंगाची पॅन्ट

ओळखण्याची खूण: उजव्या हातात स्टीलचे कडे व लाल रंगाचा दोरा बांधलेला आहे.

या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू रजि. क्र. ५६/२०२६ अन्वये बी.एन.एस.एस. २०२३ च्या कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

 पोलिसांचे नागरिकांना आवाहन

वरील वर्णनातील तरुणाची ओळख किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणालाही कोणतीही माहिती असल्यास त्यांनी तात्काळ तपास अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई यांच्याशी ७३०४१६६१४८ या मोबाईल क्रमांकावर किंवा अमळनेर पोलीस स्टेशन च्या ०२५८७-२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!

 

 

अमळनेर | प्रतिनिधी

खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. केंद्राच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, यापूर्वी निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांसह आता एकूण ११ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे प्रताप महाविद्यालयासह संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला यामुळे मोठी दाद मिळाली आहे.

मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी

मयुर भगवान पाटील

अविनाश विकास पाटील

मंगलेश सुनील पाटील

विकास इंदल बेहरे

या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, चिटणीस प्रा. पराग पाटील, सहचिटणीस डॉ. व्ही. बी. मांटे, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, करिअर काउन्सेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. निलेश पवार, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. कैलास निळे, डॉ. माधव भुसनर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विजय साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विवेक बडगुजर, तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील आणि अतुल धनगर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाभावी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सेलिंग सेंटरने अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून, या यशामुळे भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

५८ वर्षांची सेवापरंपरा कायम ठेवण्याचा निर्धार; लायन्स क्लबच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा उत्साहात

 

अमळनेर : समाजसेवा, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि विविध लोकहिताच्या उपक्रमांद्वारे गेली ५८ वर्षे शहरात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या लायन्स क्लब, अमळनेरच्या सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीचा ५८ वा पदग्रहण सोहळा शनिवारी सायंकाळी बन्सीलाल पॅलेस येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. ज्येष्ठ लायन नेते तथा पास्ट मल्टिपल कौन्सिल चेअरपर्सन (पुणे) एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना पदाची शपथ देण्यात आली.

यावेळी जितेंद्र पारख यांनी अध्यक्ष, प्रा. जयेश गुजराथी यांनी सचिव, तर कुमारपाल कोठारी यांनी खजिनदार म्हणून पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीने सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत समाजातील गरजू, वंचित व दुर्बल घटकांसाठी अधिक प्रभावी उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्येची देवता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

शपथविधीनंतर मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे एमजेएफ लायन द्वारकाप्रसाद जालन म्हणाले, “लायन्स क्लब ही केवळ संस्था नसून समाजसेवेची अखंड चळवळ आहे. अमळनेर लायन्स क्लबने गेल्या ५८ वर्षांत सेवाभावी कार्याची समृद्ध परंपरा निर्माण केली असून नव्या नेतृत्वाखाली ही परंपरा अधिक व्यापक स्वरूपात पुढे जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मावळते अध्यक्ष डॉ. संदीप जोशी यांनी वर्षभरातील सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक व जनहिताच्या उपक्रमांचा आढावा सादर केला. तसेच नितीन विंचूरकर यांनी विविध सेवा प्रकल्पांचा सविस्तर अहवाल मांडला.

झोन चेअरपर्सन लायन जितेंद्र जैन यांनीही मार्गदर्शन करताना लायन्स क्लबच्या सातत्यपूर्ण सेवाभावी कार्याचे कौतुक केले. नव्या कार्यकारिणीने समाजहिताला प्राधान्य देत अधिकाधिक लोकांपर्यंत सेवा पोहोचवावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कार्यक्रमात प्रदीप जैन व डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना बॅज परिधान करून पदभार सुपूर्द केला. आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, “आम्ही कायम आपल्या पाठीशी आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात जितेंद्र पारख म्हणाले, “सेवा, संस्कार आणि सामाजिक बांधिलकी जपत लायन्स क्लबचे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यास प्राधान्य दिले जाईल.”

या सोहळ्यास लायन्स क्लबचे सदस्य, लायन परिवार, रोटरी क्लबचे सदस्य तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन करत आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नयना नवसारीकर, रुपाली सिंघवी आणि जया जैन यांनी केले, तर प्रा. जयेश गुजराथी यांनी आभार मानले.

नव्या नेतृत्वाखाली लायन्स क्लबच्या सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, पर्यावरण आणि मानवतावादी सेवा उपक्रमांना अधिक गती मिळेल आणि संस्थेची गौरवशाली सेवापरंपरा अधिक जोमाने पुढे नेली जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

अमळनेर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण

 

 

अमळनेर, दि. २८ जून २०२६ : अमळनेर शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरभर उभारण्यात आलेल्या पोलिओ बुथ, रेल्वे स्थानक व बस स्थानकावरील विशेष पथके तसेच मोबाईल पथकांच्या माध्यमातून दिवसभर मोठ्या प्रमाणात बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात आले.

शहरातील पोलिओ लाभार्थींची एकूण संख्या १२ हजार ९६२ असून दिवसभरात १० हजार ८८९ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला. त्यामुळे पहिल्याच दिवशी ८७.०७ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आरोग्य विभागाला यश आले.

या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रोटरी क्लब, लायन्स क्लब तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. याशिवाय लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षीत बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, सर्व सभापती, नगरसेवक व नगरसेविका यांनीही विशेष सहकार्य केले.

मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी आरोग्य सभापती श्री. रामकृष्ण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरिष गोसावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर तसेच सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

दि. २९ जून ते ३ जुलै २०२६ या कालावधीत ३० पथके शहरातील प्रत्येक घरात जाऊन पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचा डोस पाजणार आहेत. या घरभेट मोहिमेद्वारे आज डोस घेण्यापासून वंचित राहिलेल्या प्रत्येक पात्र बालकापर्यंत पोहोचून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा आरोग्य विभागाचा संकल्प आहे.

आरोग्य विभागाने सर्व पालकांना आवाहन केले आहे की, घरभेटीदरम्यान येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करून आपल्या पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत.

माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ संकल्पनेला बळ; मारवड प्राथमिक आरोग्य केंद्राची पल्स पोलिओ व हिवताप प्रतिरोध जनजागृती मोहीम

 

 

मारवड (प्रतिनिधी):

“माझे गाव आरोग्यसंपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने पल्स पोलिओ अभियान व हिवताप प्रतिरोध महिना अंतर्गत व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी तसेच तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे** यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.

यावेळी दि. २८ जून २०२६ (रविवार) रोजी ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजावेत, असे आवाहन करण्यात आले. आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी सार्वजनिक भिंतीवर “लस पाजा बाळा, पोलिओ टाळा” हा संदेश लिहून नागरिकांमध्ये जनजागृती केली.

पल्स पोलिओ हा भारत सरकारचा राष्ट्रीय प्रतिरक्षण कार्यक्रम असून, या अभियानांतर्गत ० ते ५ वर्षांतील सर्व बालकांना ओरल पोलिओ व्हॅक्सीन (OPV) चे दोन थेंब दिले जातात. यामुळे पोलिओसारख्या गंभीर व कायमस्वरूपी अपंगत्व निर्माण करणाऱ्या आजारापासून बालकांचे संरक्षण होते. पोलिओ हा विषाणूजन्य संसर्गजन्य रोग असून तो प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, घसा दुखणे, डोकेदुखी, उलट्या, हात-पाय दुखणे, स्नायू कमकुवत होणे आणि पक्षाघात ही त्याची प्रमुख लक्षणे आहेत.

भारतामध्ये १९९५ पासून पल्स पोलिओ अभियान सुरू करण्यात आले असून २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारताला पोलिओमुक्त देश म्हणून प्रमाणित केले आहे. पोलिओ प्रतिबंधासाठी OPV (Oral Polio Vaccine) तसेच नियमित लसीकरणात IPV (Inactivated Polio Vaccine) चा वापर केला जातो.

यावेळी “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब द्या” आणि “पोलिओमुक्त भारत, आपली सर्वांची जबाबदारी” हा संदेश देत पोलिओमुक्त मारवड घडविण्याचा संकल्प करण्यात आला. आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे व संजय जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

दरम्यान, जून महिना हिवताप प्रतिरोध महिना म्हणून साजरा करण्यात येत असून हिवताप निर्मूलन धोरण २०३० च्या अनुषंगाने विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. किटकशास्त्रीय सर्वेक्षण, डास उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याबाबत मार्गदर्शन, गप्पी माशांचे महत्त्व, परिसर स्वच्छता, मच्छरदाणीचा वापर, तसेच जलजन्य व किटकजन्य आजारांपासून बचावासाठी नागरिकांना माहिती देण्यात आली.

ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी साहील चौधरी, विदया देवरे, आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे, संजय जाधव, प्रयोगशाळा वैज्ञानिक के. आर. साबळे, आरोग्य सहाय्यिका सुनिता गावित, आरोग्य सेवक योगेश कापडणे तसेच आशा सेविका राजेश्री पाटील, संगीता चौधरी, मंदाताई शिंदे, मनिषा पाटील, कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले.

आरोग्यदायी, रोगमुक्त आणि सुरक्षित गाव घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकाला पोलिओ लसीचे दोन थेंब पाजून अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र, मारवड यांच्या वतीने करण्यात आले.

श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी

 

अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित ख्यातकीर्त श्री मंगळग्रह मंदिर परिसरात नव्याने विकसित करण्यात आलेल्या संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेस शुक्रवार, दि. 26 जून रोजी सायंकाळी संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानाचे गादिपती प. पू. प्रसाद महाराज यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी रोपवाटिकेची पाहणी केली. तसेच रोपवाटिकेत तयार करण्यात आलेले स्वतंत्र विविध विभाग, परिसरातील सुशोभीकरण, पर्यावरण संवर्धनासाठी करण्यात आलेले प्रयत्न आणि भाविकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या सोयी-सुविधांबद्दल कौतुक करत मंगळग्रह सेवा संस्थेच्या या उपक्रमास भरभरून शुभेच्छा देत कृपाशीर्वादही दिला.

 मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ग्रीनरी कन्स्लंटट श्री. सुबोध पाटील यांच्या सहकार्याने गेल्या 20 वर्षांपासून या रोपवाटिकेचे संगोपन केले जात होतेच. मात्र, रोपवाटिकेत विविध विभाग तयार करून ती अधिकाधिक भव्य-दिव्य स्वरूपात विकसित करावी, या उद्देशातून नुकतेच या रोपवाटिकेचे व्यापक नूतनीकरण करण्यात आले आहे. रोपवाटिकेमध्ये विविध प्रकारच्या औषधी वनस्पती, फुलझाडे, शोभिवंत वृक्ष, फळझाडे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणारे विविध विभाग विकसित करण्यात आले असून, भाविकांना निसर्गाच्या सान्निध्यात अध्यात्माचा अनुभव घेता यावा, या उद्देशाने परिसराचे आकर्षक नियोजन करण्यात आले आहे.

 संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी रोपवाटिकेतील विविध विभागांची पाहणी करून त्यामागील संकल्पना जाणून घेतली. मंदिर परिसरातील हरित उपक्रम, स्वच्छता आणि पर्यावरणपूरक विकासाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये पर्यावरण संरक्षणाचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 तत्पूर्वी, संतश्री प. पू. प्रसाद महाराज यांनी श्री मंगळग्रह मंदिरात जाऊन श्री मंगळग्रह देवांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात येऊन यथोचित स्वागत करण्यात आले. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, हेमंत गोसावी, पवन शर्मा यांनी पौरोहित्य केले. यावेळी संत श्री सखाराम महाराज वाडी संस्थानातील सुदाम पाटील महाराज, हर्षल जोशी महाराज, सारंग पाठक, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, ए. डी. भदाणे यांच्यासह मंदिराचे सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रोपवाटिकेतील विविध विभाग

संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेच्या नूतनीकरणात विविध विभाग नव्याने तयार केले आहेत. त्यामध्ये गांडूळ खत प्रकल्प, गोवरी, प्लास्टिक क्रशिंग, गुलाब बाग, वृक्षारोपण, जैविक खतप्रणाली आदी विभागांसह रोपवाटिकेशेजारीच भाविकांना निसर्ग सान्निध्याचा मनमुराद आनंद घेता यावा, या उद्देशातून निसर्ग बैठक स्थळही तयार करण्यात आले असून, हे स्थळ विविध वृक्षराजीने सज्ज झालेले आहे.

 

Read More श्री मंगळग्रह मंदिर परिसरात संतश्री सखाराम महाराज रोपवाटिका झाली नव्याने विकसित विकसित केलेल्या विविध विभागांसह निसर्ग बैठक स्थळाची संतश्री प. पू. प्रसाद महाराजांकडून पाहणी

अमळनेरकरांसाठी आनंदाची बातमी: भाविक आणि प्रवाशांच्या सुविधेसाठी ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ एसटी विनंती थांब्याचे अनावरण!

 

अमळनेर (प्रतिनिधी) : ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची, विशेषतः सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांची आणि स्थानिक नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. एसटी महामंडळाची बस या ठिकाणी थांबून प्रवाशांना योग्य सुखसुविधा मिळावी या उद्देशाने आज या भागात ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ (एसटी विनंती थांबा) चे अधिकृत बोर्ड लावून लोकार्पण करण्यात आले.

हे जनहिताचे काम युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख मा. श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी यांच्या प्रमुख पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. नागरिकांना आणि भाविकांना येण्या-जाण्यासाठी हक्काचा थांबा मिळावा यासाठी मनिषभाऊंनी विशेष लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावला.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती

याप्रसंगी गावातील आणि परिसरातील प्रमुख नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कामात मोलाचे सहकार्य आणि उपस्थिती लाभलेले मान्यवर खालीलप्रमाणे:

१) श्री. मनिष हरिश्चंद्र चौधरी (युवासेना शिवसेना अमळनेर शहर तीर्थक्षेत्र प्रमुख)

२) श्री. मोहन मनोरे (आम आदमी पार्टी)

३) श्री. महेंद्र साळुंखे (भाग्यलक्ष्मी लॅब, आम आदमी पार्टी)

४) श्री. रामकृष्ण चिंतामण पाटील – देवरे साहेब (आम आदमी पार्टी)

५) श्री. राजेंद्र बाळकृष्ण जाधव

६) श्री. नागोराज राजाराम धनगर

७) श्री. अमोल नागोराज धनगर

८) श्री. हितेश चौधरी

९) श्री. इंजि. निखिल चौधरी

प्रवाशांना मिळणार मोठा दिलासा

या नवीन ‘मंगळग्रह मंदिर स्टॉप’ मुळे आता परिसरातील प्रवाशांना, महिलांना, वृद्ध नागरिकांना आणि दूरवरून येणाऱ्या भाविकांना बससाठी ताटकळत उभे राहावे लागणार नाही. प्रवाशांच्या सुखसुविधेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे आणि मनिषभाऊ चौधरी यांचे समस्त अमळनेरकर नागरिकांकडून मनःपूर्वक आभार व्यक्त केले जात आहेत.

“लोकांचे हित, हेच आमचे कर्तव्य!” या भावनेतून हे कार्य पूर्ण झाल्याचे याप्रसंगी कार्यकर्त्यांनी सांगितले.

अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर   आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा 

 

अमळनेर :- तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गडखांब – पातोंडा – धरणगाव या मार्गांच्या काँक्रिटीकरण आला अखेर राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी 172 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली आहे. अनेक दिवसांपासून या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाची मागणी केली जात होती.

        हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठी च नाही तर उत्तर महाराष्ट्रातील विविध शहरांना जोडणारा महत्त्वाचा दुवा मानला जातो. या प्रकल्पामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. या मार्गावरून दररोज हजारो लहान-मोठी वाहने, शेतमालाची वाहने तसेच प्रवासी वाहतूक होत असते. हा रस्ता खराब असल्याने वाहनधारकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे धरणगाव ते चोपडा या मार्गाचे काम आधीच प्रगतीपथावर असून आता धरणगाव फाटा ते अमळनेर या महत्त्वाच्या टप्प्यालाही मंजुरी मिळाल्याने धुळे – अमळनेर- चोपडा तसेच धरणगाव कडे जाणारा मार्ग अधिक सक्षम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  शेतकरी व उद्योजकांना होणार फायदा 

    अमळनेर आणि परिसरातील केळी, कापूस, मका, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण होणार आहे. शेतमाल बाजारपेठेत जलद गतीने पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांना वेळ व वाहतूक खर्च वाचणार आहे. तसेच दर्जेदार रस्त्यांमुळे या भागात औद्योगिक मालवाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना गती मिळून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण तयार होईल असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे. सदर प्रकल्पाकडे उत्तर महाराष्ट्रातील रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

Read More अमळनेर ते धरणगाव रस्त्याच्या कामासाठी 172 कोटी मंजूर   आ. अनिल पाटील यांचे प्रयत्न, नागरिकांना मोठा दिलासा 

अमळनेर ग्रामिण रुग्णालयात 20 अतिरिक्त पदाना मंजुरी-आ.अनिल पाटील उपजिल्हारुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने वाढणार 4 डॉक्टर व स्टाफ,आरोग्य सेवा होणार वृद्धिंगत

 

अमळनेर:-येथील ग्रामिण रुग्णालयाचे उपजिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाले असल्याने 20 अतिरिक्त पदाना महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली असून यामुळे 4 तज्ञ डॉक्टर व इतर स्टाफ वाढून येथील आरोग्य सेवा अधिक वृद्धिंगत होणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

      याबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन आदेश दिनांक 24 जून 2026 रोजी प्रसिद्ध झाला असून यात राज्यातील काही रुग्णालयांचा समावेश आहे.राज्यातील 50 टक्के पेक्षा जास्त बांधकाम झालेल्या नवनिर्मित अथवा श्रेणी वर्धीत आरोग्य संस्था करिता पदनिर्मिती करण्यात आली असून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालय म्हणून श्रेणीवर्धन झाल्यानंतर याचे बांधकाम देखील 90 टक्के पूर्ण झाले असल्याने या पद वाढीस मंजुरी मिळाली आहे.विशेष म्हणजे आमदार अनिल पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर ही पद वाढ झाली आहे.

 

चार अतिरिक्त डॉक्टरांमुळे रुग्णांना मिळणार लाभ

 

   अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आधी एकूण 29 पदे होती त्यात एक वर्ग 1 चे वैद्यकीय अधीक्षक 1,वर्ग 2 चे 3 वैद्यकीय अधिकारी आणि इतर स्टाफ चा समावेश होता.आता 20 पदे वाढली असून त्यात 4 डॉक्टर असतील यात 1 सर्जन, 1 फिजिशियन आणि 2 एमबीबीएस डॉक्टर्सचा समावेश असेल याशिवाय इतर नर्सिंग व अन्य कर्मचारी असतील.सदर रुग्णालयात एनएचएम अंतर्गत कंत्राटी 20 आहेत आधीची आहेत.म्हणजेच आरोग्य सेवेची मोठी टीम अमळनेर रुग्णालयात कार्यरत असणार आहेत.

      दरम्यान अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हारुग्णालयात रूपांतर करण्यासाठी आमदार अनिल पाटील यांनी पाठपुरावा केल्याने त्यास यश आले त्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम देखील सुरू होऊन तेही पूर्णत्वास येण्याच्या मार्गावर आहे.व आता आमदारांच्याच प्रयत्नांनी पदे देखील वाढल्याने अमळनेर परिसरातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे.याकामी पाठपुरावा करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रकाश ताळे व इतर स्टाफ चे सहकार्य लाभल्याचे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले. सदर मंजुरी बद्दल आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार,आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर,ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आरोप प्रत्यारोप पुरे झाले, आता कृती हवी! अमळनेरच्या पाण्याच्या टाक्यांची तातडीने स्वच्छता करा: आम आदमी पार्टीची मागणी

 

अमळनेर ( प्रतिनिधी) अमळनेर शहरातील पाण्याचा प्रश्न गंभीर असून त्याबाबत सत्ताधारी आणि विरोधकांनी केवळ एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्यापेक्षा तात्काळ सोडवून शहरातील सर्व पाणीपुरवठा करणाऱ्या टाक्यांची त्वरित स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष महेंद्र साळुंखे यांनी केली आहे.

शहरातील पाण्याच्या टाक्यांच्या तळाशी साचलेला एक फुटाचा गाळ हा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा जिवंत पुरावा आहे. “आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा पिण्याच्या पाण्याची शुद्धता अधिक महत्त्वाची आहे,” असे स्पष्ट करत, आपच्या कार्यकर्त्यांनी आता स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. टाक्या पूर्ण भरल्यावर त्यात मिसळणारा गाळ, क्षार आणि जंतू यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

प्रशासनासमोर ठोस उपाययोजनांची मागणी:

१. तात्काळ स्वच्छता: सर्व पाणी साठवणूक टाक्यांचे तांत्रिक ऑडिट करून त्यांची तात्काळ स्वच्छता करण्यात यावी.

२. नियमित वेळापत्रक: वर्षातून एकदाच नव्हे, तर दर तीन महिन्यांनी नियमितपणे टाक्या स्वच्छ करण्याचे वेळापत्रक जाहीर करावे.

३. पारदर्शकता: ही स्वच्छता शास्त्रोक्त पद्धतीने होत असल्याची खात्री स्थानिक नागरिकांच्या समितीमार्फत करून घ्यावी.

आमचा निर्धार:

आम्हाला कोणावरही आरोप करण्यात रस नाही, तर जनतेला स्वच्छ पाणी मिळण्यात रस आहे. जर प्रशासनाने युद्धपातळीवर स्वच्छतेचे काम पूर्ण केले, तर ते अमळनेरकरांच्या आरोग्यासाठी हिताचे ठरेल. मात्र, यापुढेही केवळ कागदी घोडे नाचवून दुर्लक्ष केले, तर या प्रश्नासाठी कोणत्याही टोकाची भूमिका घ्यायला आम आदमी पार्टी मागे हटणार नाही.