ब्रेकिंग
विश्व हिंदू परिषद जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजय शाह; सहसंयोजकपदी मितेश कामदार

 

अमळनेर : विश्व हिंदू परिषदेच्या जळगाव जिल्ह्यातील संघटनात्मक जबाबदाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला असून, अमळनेर येथील डॉ. संजय शाह यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी, तर मितेश कामदार यांची जिल्हा सहसंयोजकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांवर संघटनेने नव्या जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या कार्याचा अनुभव, संघटनात्मक क्षमता आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीचे अमळनेर शहर व परिसरातील विश्व हिंदू परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

नवीन जबाबदारीच्या माध्यमातून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना एकत्रित करून सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

डॉ. संजय शाह व मितेश कामदार यांच्या नियुक्तीमुळे अमळनेरच्या सामाजिक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अमळनेरच्या सुपुत्राचा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून विशेष सन्मान

 

मुडी, ता. अमळनेर येथील सुपुत्र तथा मुंबई एटीएसच्या विशेष पथकातील कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी श्री. जितेंद्र धर्मराज सूर्यवंशी यांना भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे ‘विशिष्ट सेवा पदक’ देऊन गौरविण्यात आले.

आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, उल्लेखनीय कामगिरी आणि पोलीस सेवेत बजावलेल्या उत्कृष्ट भूमिकेची दखल घेत त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. या सन्मानामुळे मुडी गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्याचा आणि मुंबई एटीएसचा गौरव वाढला आहे.

श्री. जितेंद्र सूर्यवंशी यांनी आपल्या कर्तृत्वातून अमळनेरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला असून, त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मित्रपरिवार, नातेवाईक, ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद

 

पनवेलच्या शंकरा आय हॉस्पिटलमध्ये होणार शस्त्रक्रिया; अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलच्या रुग्णांचा समावेश

अमळनेर : सामाजिक बांधिलकी जपत मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मंगळग्रह मंदिरात भव्य मोतीबिंदू तपासणी शिबीर घेण्यात आले. शिबिरात १८७ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ८६ रुग्ण मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले.

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या शिबिरात अमळनेरसह धुळे, चोपडा, जळगाव, पारोळा, एरंडोल तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 

शंकरा आय हॉस्पिटलचे डॉ. विजय बामणे, डॉ. सुधीर फडतरे, डॉ. मोहसीन शेख, तसेच चोपडा येथील डॉ. राहुल चौधरी व भूपेंद्र वाघ यांनी रुग्णांची तपासणी केली. मंगळग्रह सेवा संस्थेचे सचिव सुरेश बाविस्कर यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. मंदिराचे सेवेकरी मनोहर तायडे, कैलास महाजन, प्रमोद पाटील, भाऊसाहेब पाटील, किरण पाटील यांच्यासह सेवेकऱ्यांनी शिबिर यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सहसचिव दिलीप बहिरम यांनी आभार मानले.

दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी शिबीर

गरजू रुग्णांना नेत्रतपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हे शिबिर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळग्रह मंदिर येथे नियमितपणे आयोजित करण्यात येते. परिसरातील गरजू नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

ध्वजवंदनासह राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेने विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर

अमळनेर : पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण, राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा, देशभक्तीपर रांगोळ्या तसेच विद्यार्थ्यांच्या आकर्षक वेशभूषेमुळे संपूर्ण शालेय परिसर राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून गेला होता.

स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच देशभक्तीपर संदेश देणाऱ्या सुंदर रांगोळ्या तसेच आकर्षक फुलांच्या पाकळ्यांनी विविध कलाकृती साकारण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर घोषणा, गीतांचे सूर आणि विविध वेशभूषांमुळे वातावरणात उत्साह संचारला होता.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. ध्वजाला मानवंदना दिल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीताचा सन्मान केला. यावेळी अध्यक्षीय भाषणातून जे. एस. देवरे यांनी युवा पिढीला देशाच्या विकासात योगदान देण्याचे आवाहन केले. भारताला महासत्ता बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपले देशकर्तव्य, दायित्व आणि निस्सीम देशभक्ती कृतीतून व्यक्त करावी, असे त्यांनी सांगितले.

यावेळी विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन व मृदासंवर्धनाची शपथ घेतली. कार्यक्रमाला रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष श्री. महेश पाटील तसेच समस्त कार्यकारी संचालक मंडळ विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळेच्या वतीने दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला.

राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेने रंगत

ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर हाऊसनिहाय राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी जुनी व नवी देशभक्तीपर, प्रेरणादायी तसेच राष्ट्रप्रेमाची भावना जागविणारी गीते सामूहिक स्वरूपात सादर केली. स्पर्धेसाठी लहान व मोठ्या विद्यार्थ्यांचे असे दोन गट करण्यात आले होते.

लहान गट :

🥇 विजेता – ब्ल्यू हाऊस

🥈 उपविजेता – रेड हाऊस

मोठा गट :

🥇 विजेता – येल्लो हाऊस

🥈 उपविजेता – रेड हाऊस

या स्पर्धेसाठी ज्येष्ठ संगीतकार, गायक व संगीतविशारद श्री. शरद सोनवणे यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना उपहारस्वरूप टॉफी व चॉकलेटचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आफरीन शेख मॅडम यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, व्ही.पी. बडवे, प्रशांत वंजारी, राजश्री पाटील, रूपाली पाटील, योगिनी ओवे, व्ही. जी. बोरोले, भावना चौधरी, व्ही.एस. अमृतकर, श्वेता कलंत्री, अनंत बागल, विनायक सूर्यवंशी, योगिषा महाजन, सविता पारधी, कविता चौधरी तसेच समस्त शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाचा सोहळा देशभक्ती, उत्साह आणि आनंदाच्या वातावरणात दिमाखात संपन्न झाला.

ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन

 

जळगाव, दि. १५ ऑगस्ट : वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. गुलाबराव बाविस्कर साहेब होते. तसेच कार्यक्रमास बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँक अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बँकिंग व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले.

कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढण्यास मोलाची मदत झाली.

पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अंमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा…

 

अमळनेर : दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. 

झेंडावंदन कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम् गीताने झाली. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेरचे संचालक डॉ महेश पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. 

वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू होवो आणि भारत माता की जय या घोषवाक्य आणि संपूर्ण परिसर प्रफुल्लित झाला. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

. सदर कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष अभिजीतभाऊ भांडारकर, संचालिका अनुरूपा अभिजीत भांडारकर, संस्थेचे मार्गदर्शक सभासद अनिल वाणी, पालक तुकाराम माळी यांचेसह समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विनोद वैद्य, प्राध्यापक रुंद शिक्षकेतर प्रतिनिधी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यार्थी भूषण शिंगाणे याने देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. यामिनी तुकाराम माळी, गायत्री तुकाराम बोरसे, छाया आगळे, कामिनी स्वप्नील पाटील, रत्ना जगन खैरनार यांनी देशभक्तीपर गीत गायन केले.

 तंबाखूमुक्त अभियान व नशा मुक्त अभियाना विषयी कार्यक्रम घेण्यात आला.

दुर्बल घटक विद्यार्थी चेक वितरण

 विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयातील योजनेचे लाभार्थी साधना बच्छाव .गायत्री बोरसे. मोहिनी ज्ञानेश्वर पाटील यांना आर्थिक मदत म्हणून मान्यवरांच्या हस्ते चेक देण्यात आला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया यांनी केले.

 सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात आले.

जवखेडे येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात; बालविवाह प्रतिबंधाची शपथ घेऊन जनजागृती

 

अमळनेर : तालुक्यातील जवखेडा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर वंदेमातरम्, राष्ट्रगीत, राज्यगीत व ध्वजगीताचे गायन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान माती वाचवा, पाणी जपा, तंबाखूमुक्ती तसेच बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. बालविवाह ही बालकांच्या शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि भविष्यासाठी गंभीर समस्या असून, बालविवाह रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. विद्यार्थ्यांनी संगितमय कवायत सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.

हा बालविवाह प्रतिबंध जनजागृती उपक्रम Just Rights for Children यांच्या अंतर्गत आधार बहुउद्देशीय संस्था, अमळनेर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून बालहक्कांचे संरक्षण, बालविवाह प्रतिबंध आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती केली जात आहे. यावेळी आधार बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा भारती पाटील व संचालक रेणू प्रसाद जिल्हा समन्वयकआनंद पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाहमुक्त समाजासाठी जनजागृती करण्यात आली. संस्थेच्या क्षेत्र समन्वयक मोहिनी धनगर यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमास सरपंच सौ. जयश्री कैलास माळी, उपसरपंच श्री. दिनकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक श्री. न्याहळदे आप्पा, ग्रामपंचायत कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. समाधान पाटील, बाला उपक्रम समितीचे अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, युनियन बँकेचे मॅनेजर श्री. मयुर पाटील, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापक श्री. छगन पंढरीनाथ पाटील यांनी सर्व दानशूर व्यक्तींचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती रत्नप्रभा साळुंखे, श्रीमती रेखा पाटील, सौ. सुनिता पाटील, श्रीमती अर्चना बागुल व श्री. माधवराव ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. मुकेश पाटील सर यांनी केले.

“बालविवाह थांबवूया, बालकांचे भविष्य घडवूया” असा संदेश देत स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातून बालविवाह प्रतिबंधासाठी जनजागृती करण्यात आली.

नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करा

 

एनएसयूआयचे अमळनेर येथे जोरदार आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी तीव्र आंदोलनाचा इशारा

अमळनेर, दि. १४ ऑगस्ट : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पेपरफुटी तसेच परीक्षा व्यवस्थेतील अनियमिततेच्या निषेधार्थ एनएसयूआय विद्यार्थी संघटनेच्या वतीने अमळनेर येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकारांची निष्पक्ष, सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

नीटसारख्या देशातील महत्त्वाच्या प्रवेश परीक्षेबाबत कथित गैरप्रकार समोर आल्याने लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्षभर मेहनत करून परीक्षा देणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, तसेच परीक्षा प्रक्रियेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास अबाधित राहावा, यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलनादरम्यान नीट परीक्षा घोटाळा व पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, दोषींना कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा द्यावी, परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य सुरक्षित करावे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या.

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित असलेल्या या गंभीर प्रश्नाकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात आली नाही, तर एनएसयूआयच्या वतीने संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता, विद्यार्थ्यांचे हक्क आणि गुणवत्ताधारित शिक्षणव्यवस्थेसाठी एनएसयूआय आक्रमक भूमिका घेणार असल्याचे या आंदोलनातून स्पष्ट झाले.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनाला एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष ऍड. कौस्तुभ पाटील, तालुकाध्यक्ष उमेश संधान शिव, शहराध्यक्ष जयेश पाटील, प्रभारी प्रवीण पाटील, तसेच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे यांच्यासह संदीप घोरपडे, मनोज पाटील, तुषार संधान शिव, महेश पाटील, अशोक पवार, प्रताप पाटील, रोहिदास पाटील, गोकुळ बोरसे, कृष्णा चौधरी, कुणाल कोळी, विनायक सोनवणे, विलास भिल, पप्पू भिल, करण भिल, निंबाजी भिल यांच्यासह एनएसयूआय व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांविरोधात संघटित लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

 

खान्देश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत आज 15 ऑगस्ट हा 80 स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहाच्या , व देशभक्तीपर जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.,

   या प्रसंगी आजच्या कार्यक्रमाचा ध्वजारोहनाचा मान शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन , मुख्याध्यापिका एस एस सूर्यवंशी मॅडम ,श्री प्रविण पुरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.

    या वेळी मंचवर सौ जया ज़ैन , उपमुख्याध्यापक एस आर शिंगांणे, श्रीमती भारती आठवले , पर्यवेक्षक एस पी वाघ , कु. समिक्षा जैन ,श्री शाम पवार ,शिक्षक प्रतिनिधी पी पी जोशी होत्या.

  कार्यक्रमाची सुरुवात शालेय प्रार्थना , प्रतिज्ञा , संविधान ,वंदे मातरम् घेऊन झाली.मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून सलामी देऊन राष्ट्र गीत , राज्य गीत म्हणून करण्यात आली.

 शाळेमध्ये विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीत गायले. यावेळी गुणवंत विद्यार्थी व नुकत्याच आईस स्केटिंग हॉकी राष्ट्रीय स्तरावर डेहराडून उत्तराखंड येथे खेळलेल्या कुमारी नूतन किशोर भोई हिचा बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

आजच्या दिवसाचे वातावरण हे देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर व ज्यांनी देशासाठी आपले बलिदान दिले त्यांची आठवण करून देशाला पुन्हा नवीन एका दिशेने नेण्यासाठी देशाचा सुजाण नागरिक व देशाच्या प्रगतीसाठी , व कॉपीमुक्त अभियानासाठी सर्व विद्यार्थिनींनी, शिक्षक, शिक्षिका, सर्वांनी आज प्रतिज्ञा घेतली. 

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना क्रीडा शिक्षिका श्रीमती आर एस सोनवणे मॅडम यांनी केले. मुख्याध्यापिका सौ एस एस सूर्यवंशी मॅडम यांनी आजच्या दिवशीच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी सहकार्य केले.

राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने मध्यरात्री झेंडावंदन उत्साहात संपन्न

 

अमळनेर (दि. १५ ऑगस्ट) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत राष्ट्र सेवा दल, अमळनेरच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही १४ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.०१ वाजता सुभाष चौक येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पहिल्या क्षणीच राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याची ही आगळीवेगळी आणि प्रेरणादायी परंपरा अमळनेर शहरात गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून राष्ट्र सेवा दलाच्या वतीने जपली जात आहे.

यंदाच्या कार्यक्रमात राष्ट्र सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिका कल्पना मोरे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. मध्यरात्रीचा शांत परिसर राष्ट्रगीताच्या स्वरांनी भारावून गेला. उपस्थित नागरिकांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली.

स्वातंत्र्याच्या पहिल्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी शहरातील अनेक राष्ट्रप्रेमी नागरिक मध्यरात्री सुभाष चौकात मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्र सेवा दलाचे सैनिक, पुरोगामी विचारांच्या विविध संघटनांचे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच अमळनेरकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यामुळे संपूर्ण परिसरात देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्र सेवा दलाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील योगदान आणि मध्यरात्री झेंडावंदनाच्या परंपरेचे महत्त्व याबाबत गौतम मोरे यांनी प्रास्ताविकात केले. स्वातंत्र्य केवळ राजकीय सत्तांतर नसून सामान्य माणसाला स्वाभिमान, समान संधी, न्याय आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळवून देणारी व्यापक संकल्पना आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

यानंतर प्रा. अशोक पवार यांनी आजच्या काळातील स्वातंत्र्य आणि देशातील सद्यस्थिती यावर सविस्तर भाष्य केले. संविधानाने दिलेली स्वातंत्र्याची मूल्ये, लोकशाहीची जबाबदारी, सामाजिक समता आणि नागरिकांची भूमिका यांचा संदर्भ देत त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. स्वातंत्र्यदिन हा केवळ उत्सवाचा दिवस न राहता आपल्या संविधानिक मूल्यांचे आणि सामाजिक जबाबदारीचे आत्मपरीक्षण करण्याचा दिवस व्हावा, असे त्यांनी सांगितले.स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर शेतीमाला ला भाव,शिक्षण,रोजगार,आरोग्य, सामान संधी यासाठी सुद्धा राज्य आणि केंद्र सरकारे अजून काही करू शकली असती, मात्र अजून खूप पुढे जावे लागेल. प्रत्येकाला स्वातंत्र्याचं महत्व समजून सांगावे लागेल. आपल्या शहरातून देशासाठी सात देशभक्तांनी जीवाचे बलिदान दिले. त्यांना आज स्मरून त्यांना अभिवादन करून, स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा देतो.

कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हुतात्मा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पू साने गुरुजी यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यलढा, सामाजिक परिवर्तन आणि मानवतावादी विचारांची प्रेरणा देणाऱ्या या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

त्यानंतर पूज्य साने गुरुजी यांच्या पुतळ्याजवळ ‘खरा तो एकाची धर्म’ हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. “खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या मानवतावादी विचाराने उपस्थित वातावरण अधिक भावपूर्ण झाले. जात, धर्म, पंथ आणि भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन माणुसकी, प्रेम आणि बंधुभाव जपण्याचा संदेश या गीतातून देण्यात आला.

राष्ट्र सेवा दलाच्या या मध्यरात्रीच्या झेंडावंदनाची परंपरा केवळ ध्वजारोहणापुरती मर्यादित नसून स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण, संविधानिक मूल्यांची जपणूक आणि लोकशाही-सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीशी असलेली बांधिलकी व्यक्त करणारी परंपरा म्हणून अमळनेरच्या सार्वजनिक जीवनात महत्त्वाची ठरली आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उदय खैरनार यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारती गाला, दिलीप सोनवने,डॉ. मिलिंद वैद्य,सुधाकर देशमुख,अमोल येवले, दीपक चव्हाण,शिवाजी महाजन,तुषार संदानशिव,भीमराव संदानशिव, भालचंद्र सनेर,संजय पाटील,अशोक पाटील,धर्मेश निकुंभ, प्रशांत बडगुजर,

आरीफ भाया, विजयेंद्र शिरसाळे, हरिश देशमुख.प्रशान्त चव्हाण आणि मित्र परिवार

आदींनी विशेष सहकार्य केले.

मध्यरात्रीच्या या झेंडावंदनामुळे अमळनेर शहरात स्वातंत्र्यदिनाची सुरुवातच देशभक्ती, सामाजिक समता, संविधानिक मूल्ये आणि मानवतेच्या विचारांनी झाली. गेल्या ४५ वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आगामी पिढ्यांपर्यंत अधिक व्यापक स्वरूपात पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.