ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन
जळगाव, दि. १५ ऑगस्ट : वाढत्या सायबर फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि क्विक हील फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळ, जळगाव येथे सायबर जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात स्नेहल पाटील आणि वैष्णवी पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, ओटीपी फ्रॉड, क्यूआर कोड फ्रॉड, एआय व्हॉइस कॉल फ्रॉड, ऑनलाइन बँकिंग फसवणूक, बनावट कस्टमर केअर कॉल, फिशिंग लिंक तसेच सोशल मीडियावरील फसवणुकीचे प्रकार याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनादरम्यान कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, बँक खात्याची माहिती, एटीएम कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही किंवा पिन देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच मोबाईलमध्ये कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याची खातरजमा करावी, असे आवाहन करण्यात आले. मजबूत पासवर्डचा वापर, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (2FA) सुरू ठेवणे आणि डिजिटल व्यवहार करताना सतर्क राहण्याचे महत्त्वही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमानंद नगर ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष श्री. गुलाबराव बाविस्कर साहेब होते. तसेच कार्यक्रमास बँकेचे अधिकारी उपस्थित होते. बँक अधिकाऱ्यांनी ऑनलाइन बँकिंग व डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष घडलेल्या सायबर फसवणुकीच्या उदाहरणांमुळे उपस्थितांना संभाव्य धोके ओळखणे आणि त्यापासून बचाव करण्याचे प्रभावी मार्ग समजले.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये सायबर सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढण्यास मोलाची मदत झाली.



