खरीप हंगाम तोंडावर; एटीएममध्ये ‘कॅश’चा दुष्काळ, शेतकरी हवालदिल किसान काँग्रेसचे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अग्रणी बँकेला तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश
जळगाव : खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असताना आणि शेतातील कामांना वेग आला असताना जिल्ह्यातील बहुतांश एटीएममध्ये पैशांचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पीक कर्ज मंजूर होऊनही प्रत्यक्ष हातात रोकड मिळत नसल्याने खते, बियाणे खरेदीसह शेतीची अनेक कामे रखडली असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला आहे. या गंभीर प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी जळगाव जिल्हा किसान काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे मार्चअखेर कर्जफेड करून नव्या हंगामाच्या आशेने शेतकरी पीक कर्जाची प्रतीक्षा करत होता. २० एप्रिलनंतर कृषी एटीएम कार्डद्वारे पीक कर्जाचे वाटप सुरू झाले असले, तरी गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांना एटीएमसमोर हेलपाटे मारावे लागत आहेत. अनेक एटीएममध्ये रोख रक्कम उपलब्ध नसते, तर काही ठिकाणी कृषी कार्डच कार्यरत नसल्याच्या तक्रारी आहेत. परिणामी, शेतीसाठी अत्यावश्यक असलेली खते, बियाणे खरेदी आणि उसनवारी फेडणेही कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील अनेक अशिक्षित शेतकऱ्यांना एटीएम व्यवहार करता येत नसल्याने त्यांना पैसे काढण्यासाठी दुसऱ्यांची मदत घ्यावी लागत आहे. काही ठिकाणी तर भाड्याने माणूस सोबत आणण्याची वेळ येत असून, आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त खर्चाचा बोजा पडत आहे.
या निवेदनाची निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण यांनी गंभीर दखल घेत तात्काळ जिल्ह्याची अग्रणी बँक असलेल्या सेंट्रल बँकेचे व्यवस्थापक सुनील दोहरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. एटीएममधील रोकड टंचाईचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यानंतर किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाने अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांची भेट घेत शेतकऱ्यांच्या अडचणींचे सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी बँक प्रशासनाने, “रिझर्व्ह बँकेकडे पुरेशा कॅशची मागणी करण्यात आली असून लवकरच परिस्थिती सुधारेल,” असे आश्वासन दिले.
दरम्यान, जिल्हा बँकेमार्फत किमान निम्मे पीक कर्ज तरी थेट रोखीने देण्यात यावे, अशी मागणी किसान काँग्रेसकडून यापूर्वीच करण्यात आली आहे. हे निवेदन जळगाव जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष सुकलाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांच्यासह पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.


