ब्रेकिंग
पाणीप्रश्नी आमदारांवर गंभीर आरोप; “अमळनेरकरांची दिशाभूल करून पाणी अडविण्याचे राजकारण”

 

 

प्रतिनिधी | अमळनेर

अमळनेर शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. शहराच्या पाणीपुरवठ्यात अडथळे निर्माण होण्यास आमदारच अप्रत्यक्षपणे जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पत्रकात म्हटले आहे की, जळोदच्या दिशेने येणारे पाणी अडविण्याचे काम स्वतः आमदारांकडूनच करण्यात आले. तापी नदीवरील वाळू ठेक्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अवैध खड्डे करण्यात आले असून त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा अडविला गेला. तसेच वाळू वाहतुकीसाठी नदीपात्रात टाकण्यात आलेले रस्ते व बांध यामुळे अमळनेर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

 

तहसीलदारांनी नदीपात्रातील अवैध रस्ते हटविण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्यावर दबाव आणण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे. मात्र शिवसेनेचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती व सत्ताधारी नगरसेवक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ते व बांध हटविल्यानंतर डोहातील पाण्याची पातळी वाढली असून आता शहराला नियमित पाणीपुरवठा होईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.

“पाण्याचे राजकारण करू नये,” असा सल्ला देत सभापती कैलास पाटील यांनी आमदारांवर निशाणा साधला. सत्ता गेल्यानंतरच पाणीपट्टीबाबत कळवळा निर्माण झाला असून पाणीपट्टी ९०० रुपयांवरून १८०० रुपये करताना जनतेचा विचार केला होता का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. नगराध्यक्षपदाच्या काळात भर पावसाळ्यात नगरपरिषदेसमोर हंडा मोर्चा निघाल्याची आठवण करून देत त्यांनी आमदारांवर टीका केली.

२४x७ पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव आपणच शासनाकडे पाठविला होता, तसेच त्याकाळात स्वखर्चाने नदीपात्रात १४ बोअरवेल करण्यात आल्या व कलाली डोहातून ८.५० कोटी रुपयांची तातडीची योजना मंजूर करून नागरिकांना एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल होत असल्याचे सांगत भविष्यात सोलर यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यातील गरजा लक्षात घेऊन २४x७ पाणीपुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच अमळनेरकरांना या योजनेचा लाभ मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

“आमचे शब्द हे केवळ आश्वासन नसून वचन आहे,” असे सांगत अमळनेरकर जनतेने दिलेला कौल सार्थ ठरविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे पाणीपुरवठा सभापती श्री. कैलास पाटील यांनी पत्रकाच्या शेवटी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test
casino utan svensk licens