ब्रेकिंग
स्वर अर्पण’मधून अमळनेरकरांना हिंदी-मराठी गीतांची सुरेल मेजवानी १३ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रंगणार संगीताची अविस्मरणीय मैफल

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मेजवानी घेऊन स्वर ओमकार म्युझिकल ऑर्केस्ट्रा, मुंबई प्रस्तुत ‘स्वर अर्पण’ हा विशेष संगीत कार्यक्रम गुरुवार, १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे रंगणार आहे. लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचा बहारदार नजराणा सादर करणाऱ्या या कार्यक्रमाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय तसेच सदाबहार गीतांची सुरेल मैफल या कार्यक्रमातून अमळनेरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. विविध भावछटांनी नटलेली गाणी, दमदार ऑर्केस्ट्राचे सादरीकरण, सुरेल गायन आणि नृत्याचा मनमोहक आविष्कार यामुळे ‘स्वर अर्पण’ कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढणार आहे.

या संगीत सोहळ्याचे आयोजन सुनील वाघ यांनी केले असून, कार्यक्रमाच्या निवेदनाची जबाबदारी करुणा सोनार सांभाळणार आहेत. ध्वनी व्यवस्थापनाची जबाबदारी साऊंड मॅनेजर विजय शुक्ला यांच्याकडे असून, नृत्यांगना पूजा आपल्या आकर्षक नृत्याविष्कारातून रसिकांचे मनोरंजन करणार आहेत.

या सुरेल मैफलीत शिवानी वाघ, ऋचा बिरारी, चंद्रकांत बी. आणि सिंगर मनोज वानखेडे आपल्या सुमधुर आवाजातून हिंदी व मराठी गीतांचे सादरीकरण करणार आहेत. लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणासोबतच ऑर्केस्ट्राची साथ आणि नृत्याची रंगत यामुळे रसिकांना संगीताचा बहुरंगी अनुभव मिळणार आहे.

‘स्वर अर्पण’ हा केवळ संगीत कार्यक्रम नसून, जुन्या-नव्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या आठवणींना उजाळा देणारा आणि संगीतप्रेमींच्या मनाला आनंद देणारा सुरेल अनुभव ठरणार आहे. अमळनेरकर रसिकांना आपल्या आवडत्या गीतांचा आनंद प्रत्यक्ष संगीत मैफलीत घेण्याची ही विशेष संधी उपलब्ध झाली आहे.

संगीताची आवड असलेल्या सर्व रसिकांनी १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर, अमळनेर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल मैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक सुनील वाघ यांनी केले आहे.

विद्यापीठात वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न समाजकार्य महाविद्यालय अमळनेरच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग

 

अमळनेर (प्रतिनिधी) — जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामीण भागातील पाण्याच्या समस्येवर प्रभावी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि केशव स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय वनराई बंधारा प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रशिक्षण कार्यक्रमात समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये प्रेरणा पिंपळे, कोमल जगताप, शिवदास पावरा, पिंटी पावरा, गीता जगताप, सुवार्ता गावित, सचिन साळवे आणि शामराव पारधी या स्वयंसेवकांचा सहभाग होता.

वनराई बंधारा उभारणीची संकल्पना, त्याचे नियोजन, आवश्यक साहित्य, प्रत्यक्ष बांधकामाची पद्धत, पाण्याचा अडवणूक व साठवणुकीसाठी त्याचा उपयोग तसेच जलसंधारणाच्या दृष्टीने वनराई बंधाऱ्याचे महत्त्व याबाबत स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाच्या प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यावर भर देण्यात आला.

या प्रसंगी प्रकूलगुरु डॉ एस टी इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य राजुदादा नन्नवरे, डॉ शिवाजीराव भोईटे, जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग संचालक डॉ प्रविण महाले, डॉ मनोज इंगोले, कृषी विभाग अधिकारी कुर्बान तडवी, केशव स्मृती प्रतिष्ठानचे भरत दादा अमलकर, निळकंठ गायकवाड, अनिल भाकरे आणि आदित्य सावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

मान्यवरांनी जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करताना युवकांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. वनराई बंधाऱ्यांसारख्या उपक्रमांमुळे पावसाचे पाणी अडवून त्याचा उपयोग शेती तसेच भूजलपातळी वाढविण्यासाठी होऊ शकतो, त्यामुळे अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

समाजकार्य महाविद्यालय, अमळनेरचे प्राचार्य डॉ पी एस पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ विजयकुमार वाघमारे आणि डॉ अनिता खेडकर यांनी सहभागी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी प्रशिक्षणाचा लाभ घेत भविष्यात जलसंधारण व पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये जलसंधारण, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास मदत झाली. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अमळनेरात केंद्र व राज्य सरकारविरोधात पेटवली क्रांतीची मशाल महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचा भव्य मशाल मोर्चा; शेतकरी, बेरोजगारी, महागाईसह विविध प्रश्नांवर सरकारला घेरले

 

अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात अमळनेर शहरात महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते

तिरंगा चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा सुभाष चौक, पाच कंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, ऍड. शकील काझी, रियाज मौलाना, चंद्रशेखर भावसार आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार तसेच स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

या मशाल मोर्चात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. तीलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, योजना पाटील, आरती पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, मकसूद पठाण, एड. कौस्तुभ पाटील, प्राचार्य लीलाधर पाटील, बसपाचे गौतम मोरे, अतुल डोळस, चिंधु, वानखेडे योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, रज्जाक शेख, विजय पाटील, वासू पाटील, गिरीश पाटील यांच्यासह विविध पक्ष व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.

क्रांती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी आणि मशालींनी अमळनेर शहरातील वातावरण दुमदुमून गेले.

समाजकार्य महाविद्यालयात आदिवासी गौरव दिन, क्रांती दिन व डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात संपन्न

 

अमळनेर : श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथे विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन तसेच डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिता खेडकर यांनी केले.

जागतिक आदिवासी दिनानिमित्त सचिन ज्ञानेश्वर साळवे, यामिनी तुकाराम माळी आणि निलेश साईराम भोये या विद्यार्थ्यांनी आपापल्या मनोगतातून आदिवासी समाजाची जीवनशैली, समृद्ध संस्कृती, भाषा तसेच जल, जंगल आणि जमीन यांच्याशी असलेले आदिवासी समाजाचे अतूट नाते यावर प्रकाश टाकला. आदिवासी समाजाच्या परंपरा, संघर्ष आणि सांस्कृतिक वैविध्याची माहिती विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे मांडली.

यावेळी प्रा. डॉ. जगदीश सोनवणे आणि प्रा. डॉ. अस्मिता सरवैया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एस. पाटील यांनी आदिवासी समाजाच्या विविध वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकत त्यांच्या संस्कृतीचे आणि परंपरांचे जतन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच क्रांती दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगत स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांच्या योगदानाची माहिती दिली.

याचवेळी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची आणि ग्रंथालय क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यात आली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

या कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. जे. एस. सोनवणे, संशोधन विभागाचे संचालक प्रा. डॉ. भरत खंडागळे, सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डी. आर. ढगे, डॉ. एस. आर. चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनिता खेडकर, प्रा. डॉ. विजयकुमार वाघमारे, ग्रंथपाल प्रा. उदय महाजन यांच्यासह महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. अस्मिता सरवैया यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन यामिनी तुकाराम माळी या विद्यार्थिनीने केले.

आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, क्रांती दिनाचा प्रेरणादायी इतिहास आणि डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या ज्ञानक्षेत्रातील योगदानाची विद्यार्थ्यांना माहिती देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

रवींद्र मोरे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती

 

अमळनेर : पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या प्रिंट मीडिया विभागाच्या अमळनेर तालुका अध्यक्षपदी तथा जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी रवींद्र सखाराम मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूषण रमेश महाजन यांनी रवींद्र मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. 

पत्रकारांच्या हितासाठी तसेच संघटनेचा विस्तार करण्याच्या दृष्टीने मोरे यांनी संघटनेची उद्दिष्टे, नियम व धोरणांचे पालन करून प्रभावीपणे काम करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. 

अमळनेर तालुक्यात पत्रकारिता, डिजिटल मीडिया आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने सक्रिय असलेल्या रवींद्र मोरे यांच्या नियुक्तीचे पत्रकारिता क्षेत्रातून स्वागत होत आहे. त्यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे, रवींद्र मोरे यांच्या निवडी बद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

स्वातंत्र्य दिनी अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन जैन सोशल ग्रुप व रोटरेक्ट क्लबचा संयुक्त उपक्रम; रक्तदात्यांना आकर्षक ट्रॅव्हल बॅगचे प्रोत्साहनपर बक्षीस

 

अमळनेर : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत जैन सोशल ग्रुप व रोटरेक्ट क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, १५ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील १३ पंथ भवन, अमळनेर येथे सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर होणार आहे.

स्वातंत्र्य दिन हा देशभक्ती आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा दिवस असून, या विशेष दिनाचे औचित्य साधत नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर आकर्षक ट्रॅव्हल बॅग बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. त्यामुळे अमळनेर शहरातील नागरिक, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदानाचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन यशस्वी करण्यासाठी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख, सचिव महावीर सिंघवी, रोटरेक्ट क्लबचे वेंकी शर्मा, मोनीश मकिजा, प्रोजेक्ट चेअरमन प्रतीक जैन आणि देवेंद्र कोठारी परिश्रम घेत आहेत.

स्वातंत्र्य दिनी देशसेवेबरोबरच मानवसेवेची अनोखी संधी!
अमळनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रक्तदान शिबिर यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून अमळनेरमध्ये जलक्रांती..!

 

माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या पुढाकारातून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना गती; भूजल पातळीत वाढ, सिंचनाला बळ, टँकरवरील अवलंबित्व घटले

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सातत्याने होणारी घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तत्कालीन मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत सुमारे ₹१०,२६९.६५ लाख निधीतून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. राज्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव पायलट प्रकल्पामुळे अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, मृद संवर्धन, पूरनियंत्रण आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.

दुष्काळमुक्त अमळनेरचे स्वप्न साकार करण्यासाठी आखला दीर्घकालीन आराखडा

लोकप्रतिनिधी झाल्यापासूनच आमदार अनिल पाटील यांनी अमळनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून जलसंधारणावर आधारित विकासाचा आराखडा तयार केला होता. निम्न तापी पाडळसरे धरणासह नदी-नाल्यांवरील लघु व मध्यम जलसाठे निर्माण करून पावसाचे पाणी गावातच अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला वर्षभरासाठी पाण्याचा स्थिर स्रोत उपलब्ध करून देणे हे त्यांच्या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाल्यानंतर त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दुष्काळ शमन, मृद संवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन यांचा समन्वय साधत आर्च बंधाऱ्यांची अभिनव पायलट योजना मंजूर करून घेतली. या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील विविध नदी-नाल्यांवर आर्च बंधारे, संरक्षण भिंती आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.

आर्च बंधारा – आधुनिक जलसंधारणाची प्रभावी संकल्पना

आर्च बंधारा (Arch Dam/Arch Weir) हा जलसंधारण क्षेत्रातील आधुनिक व अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत प्रभावी प्रकार मानला जातो. कमानीच्या आकारात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यामुळे पाण्याचा दाब थेट संरचनेवर न येता दोन्ही बाजूंच्या खडकाळ काठांवर समान रीतीने वितरित होतो. त्यामुळे कमी काँक्रीटमध्ये अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकालीन टिकाऊ संरचना उभारणे शक्य होते. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी प्रभावीपणे अडविले जाते, भूजल पुनर्भरण वाढते, विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी उंचावते, नदीकाठावरील शेतीला वर्षभर ओलावा मिळतो, सिंचनाखालील क्षेत्र वाढते, मृदा धूप कमी होते आणि पूरस्थितीत पाण्याचा वेग नियंत्रित राहण्यास मदत मिळते.

भूजल पुनर्भरणामुळे टँकरमुक्तीकडे अमळनेरची वाटचाल

या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम यंदाच्या वर्षी भूजल पातळीत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहे. आर्च बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाऊन जमिनीत मुरत असल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर स्रोत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. या व्यवस्थेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होत होता. मात्र यंदा भूजल पातळी वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी झाली असून काही गावे टँकरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिणामी शासनाचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.

शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ

आर्च बंधाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा थेट लाभ शेती क्षेत्राला होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत असून दुबार व तिबार पीकपद्धतीला चालना मिळत आहे. फळबाग विकास, पशुपालन आणि पूरक व्यवसायांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारत आहे. भूजल पुनर्भरणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढली असून नागरिकांना अधिक स्थिर आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होत आहे.

पूरनियंत्रणासाठी संरक्षण भिंतींचेही महत्त्वपूर्ण योगदान

या योजनेत केवळ आर्च बंधाऱ्यांचा समावेश नसून नदीकाठ संवर्धन, संरक्षण भिंती, तटबंदी आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याची कामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीकाठाची धूप कमी होण्यास, गावांचे संरक्षण होण्यास आणि सार्वजनिक तसेच कृषी मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होत आहे.

अनेक कामे पूर्ण; उर्वरित अंतिम टप्प्यात

मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक आर्च बंधारे पूर्णत्वास आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकून राहू लागले आहे. भविष्यात या प्रकल्पांचा जलसुरक्षा, कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

मंजूर करण्यात आलेली प्रमुख कामे

आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजनेत पुढील कामांचा समावेश आहे – मुडी संरक्षण भिंत (₹250.00 लाख), अमळगाव – चिखली नदीवरील आर्च बंधारा (₹295.32 लाख), चोपडाई – लोकल नाल्यावर आर्च बंधारा (₹206.92 लाख), दहिवद – आर्च बंधारा (₹177.15 लाख), ढेकू खुर्द – आर्च बंधारा (₹176.20 लाख), जानवे – आर्च बंधारा (₹160.74 लाख), डांगरी – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹239.75 लाख), लोणे-भोणे फाटा – खैनी नदीवरील आर्च बंधारा (₹236.72 लाख), मारवड – माळण नदीवरील आर्च बंधारा (₹234.65 लाख), सडावण – आर्च बंधारा (₹237.75 लाख), सारबेटे – आर्च बंधारा (₹237.75 लाख), अमळनेर – आर्च बंधारा (₹215.24 लाख), नंदगाव – आर्च बंधारा (₹216.04 लाख), वावडे – आर्च बंधारा (₹198.73 लाख), मांडळ – आर्च बंधारा (₹198.73 लाख), पातोंडा – आर्च बंधारा (₹221.92 लाख), गडखांब – आर्च बंधारा (₹175.29 लाख), देवळी – आर्च बंधारा (₹195.97 लाख), नांद्री – आर्च बंधारा (₹186.00 लाख), कन्हेरे – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹807.00 लाख), मुंगसे – तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), तांबापुरा, अमळनेर – महादेव मंदिराजवळ संरक्षण भिंत (₹100.00 लाख), पिंपळे खुर्द – संरक्षण भिंत (₹70.00 लाख), माळण नदीवरील अतिरिक्त आर्च बंधारा (₹237.59 लाख), निमझरी – आर्च बंधारा (₹205.49 लाख), सावखेडा–मुंगसे दरम्यान तापी नदीलगत संरक्षण भिंत (₹100.00 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹811.66 लाख), मुडी – बोरी नदीवरील आर्च बंधारा (₹1,001.23 लाख), भिलाली – आर्च बंधारा (₹237.60 लाख), अमळनेर – बोरी नदीवरील आर्च बंधारा व पुलाचे काम (₹2,538.21 लाख), या सर्व कामांसाठी एकूण ₹१०,२६९.६५ लाख (अंदाजित) निधी मंजूर करण्यात आला असून, जलसंधारण, भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, पूरनियंत्रण आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने हा उपक्रम अमळनेर मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे.

 जलसुरक्षित, सिंचनसमृद्ध आणि टँकरमुक्त अमळनेरकडे वाटचाल

जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे, भूजल पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि टँकरमुक्त गावांची निर्मिती करणे ही या प्रकल्पामागील व्यापक संकल्पना आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा अभिनव पायलट प्रकल्प अमळनेर मतदारसंघाला जलसुरक्षित, कृषीसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, भविष्यात राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांसाठीही हा उपक्रम आदर्श मॉडेल ठरू शकतो.

अनिल भाईदास पाटील

मा.मंत्री तथा आमदार अमळनेर विधानसभा मतदारसंघ

अतिवृष्टीग्रस्त अमळनेरला तातडीने आर्थिक मदत द्या; नुकसानीचे पंचनामे करून शासनाने दिलासा द्यावा – तालुका काँग्रेसची मागणी

 

उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; शेतकरी, व्यापारी, कामगारांसह १२०० ते १५०० कुटुंबांना मदतीची मागणी

अमळनेर | प्रतिनिधी

दि. ३० व ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे अमळनेर शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून बाधित नागरिक, शेतकरी, व्यापारी, शेतमजूर व सर्व समाजघटकांना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी जोरदार मागणी अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे. यासंदर्भात दि. ३ ऑगस्ट रोजी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर, मा. तहसीलदार अमळनेर तसेच मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर यांना सविस्तर निवेदन देण्यात आले.

तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट रोजी शहरातील पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. बोरी नदीकाठावरील उत्तरेकडील रेल्वे पुलापासून दक्षिणेकडील माळी मढीच्या मागील भागापर्यंत, संताजी नगर, मार्केट कमिटीच्या मागील व आतील परिसरासह विविध भागांना भेट देऊन नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान बोरी नदीकाठावरील रियाझ मौलाना यांच्या वीटभट्टीचे तब्बल ७ ते ८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तसेच नदीकाठावरील नागरिकांचे धान्य, डाळी, कपडे, अंथरूण-पांघरूण व दैनंदिन वापराच्या वस्तू पुराच्या पाण्यात पूर्णतः भिजून खराब झाल्या असून अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांसमोर अन्न, निवारा व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर धान्य भिजून खराब झाले असून संपूर्ण परिसरात उग्र दुर्गंधी पसरली आहे. याशिवाय प्रसाद नगर, भालेराव नगर, संताजी नगर, गलवाडे रोड, ताडेपुरा, पहिलाड आदी भागांतील शेकडो घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.

नाल्यांच्या काठावरील अतिक्रमण आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडला असून पुराचे पाणी थेट रस्ते, वस्त्या आणि घरांमध्ये घुसल्याचा आरोपही काँग्रेसने निवेदनातून केला आहे. या अतिवृष्टीमुळे शहर व तालुक्यातील सुमारे १२०० ते १५०० कुटुंबांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीतील सुपीक माती वाहून गेली असून उभी पिके धोक्यात आली आहेत. अनेक घरांची पडझड झाली असून शेतरस्ते (पाणंद) उद्ध्वस्त झाले आहेत. काही ठिकाणी रस्ते खचले असून पशुधनाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पूराचे पाणी ओसरल्यानंतर शहर व ग्रामीण भागात दुर्गंधी पसरू लागली असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, अतिसार, कावीळ यांसारख्या आजारांचा तसेच डास, माशा व कीटकांमुळे डेंग्यू, मलेरिया आणि त्वचारोगांचा धोका वाढल्याबद्दलही निवेदनातून चिंता व्यक्त करण्यात आली. पूरग्रस्त कुटुंबांच्या मदतीसाठी सेवाभावी संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

यावेळी मा. उपविभागीय अधिकारी अमळनेर यांना निवेदन देताना अमळनेर तालुका काँग्रेस अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत, प्रा. शाम पवार, मगन वामन पाटील, पी. वाय. पाटील यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या मांडल्या.

मा. तहसीलदार अमळनेर यांना निवेदन देताना डॉ. रवींद्र पाटील, रोहिदास कापडे, कन्हैयालाल कापडे, अधिकार पाटील, लोटन चौधरी, तुषार संधान शिव यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाची माहिती देत तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली.

तर मुख्याधिकारी, अमळनेर नगरपरिषद यांच्यासमोर राजेंद्र भिकन पाटील, डॉ. प्रकाश सोनवणे, एड. रज्जाक शेख, लोटन पाटील, सुधाकर भैसे, कैलास पाटील यांनी बोरी नदीकाठावरील नागरिकांच्या अडचणी मांडत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.

यावेळी राजू भाट, साईद तेली, तोशिब तेली, शालिग्राम पाटील, पितांबर पाटील यांची उपस्थिती होती.

प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेला आयएमए अमळनेर शाखेचा तीव्र विरोध प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन; 

 

अमळनेर : राज्य शासनाकडून प्रस्तावित बीएचएमएस व सीसीएमपी नोंदणी प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) अमळनेर शाखेने तीव्र भूमिका घेतली असून, या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करत ४ ऑगस्ट रोजी प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन यांच्यासह शाखेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित बीएचएमएस, सीसीएमपी नोंदणी प्रक्रियेमुळे वैद्यकीय व्यवसायाची गुणवत्ता, उपचारांची शास्त्रीय पद्धत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांची सुरक्षितता धोक्यात येण्याची भीती आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारपद्धती, निदान आणि औषधोपचार हे केवळ त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच केले जाणे आवश्यक असल्याचे आयएमएने स्पष्ट केले.

तसेच अशा प्रकारच्या नोंदणी प्रक्रियेमुळे आरोग्य व्यवस्थेत गोंधळ निर्माण होऊ शकतो, रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शासनाने कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनसह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ संघटनांशी व्यापक चर्चा करावी, रुग्णहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे आणि प्रस्तावित नोंदणी प्रक्रिया तातडीने स्थगित करावी, अशी मागणी आयएमए अमळनेर शाखेने केली आहे.

प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी आयएमए अमळनेर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव डॉ. नरेंद्र महाजन, खजिनदार डॉ. मयुरी जोशी , माजी आमदार डॉ . बी एस पाटील, डॉ. अविनाश जोशी, डॉ. निखिल बहुगुणी, डॉ. संदीप जोशी, डॉ. भूषण पाटील, डॉ. रवींद्र कुलकर्णी, डॉ. राहुल मुठे, डॉ. प्रसन्न जोशी, डॉ. अक्षय कुलकर्णी, डॉ. शरद बाविस्करतसेच शाखेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

खानदेश शिक्षण मंडळाकडून नवीन सभासद नोंदणीबाबत स्पष्टीकरणात्मक जाहीर आवाहन

 

अमळनेर : |, दि. ५ ऑगस्ट : खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर यांच्या वतीने नवीन सभासद नोंदणीसंदर्भात सोशल मीडियावर सुरू असलेल्या विविध संदेशांच्या पार्श्वभूमीवर अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.

संस्थेचे चिटणीस प्रा. पराग पी. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर येथे नवीन सभासद बनविण्याबाबत अथवा त्यासाठी अर्ज भरण्याबाबत अद्याप संस्थेने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अशा कोणत्याही संदेशांवर अथवा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच त्यास बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

संस्थेने स्पष्ट केले आहे की, सभासद नोंदणीसंदर्भातील कोणताही निर्णय झाल्यास त्याची माहिती संस्थेमार्फत अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात येईल. तोपर्यंत नागरिकांनी व इच्छुकांनी केवळ संस्थेच्या अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.