ब्रेकिंग
अमळनेरात केंद्र व राज्य सरकारविरोधात पेटवली क्रांतीची मशाल महाविकास आघाडी व पुरोगामी संघटनांचा भव्य मशाल मोर्चा; शेतकरी, बेरोजगारी, महागाईसह विविध प्रश्नांवर सरकारला घेरले

 

अमळनेर (प्रतिनिधी) : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात अमळनेर शहरात महाविकास आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांच्या वतीने मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. तिरंगा चौकातून सुरू झालेल्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते

तिरंगा चौकातून सुरू झालेला मशाल मोर्चा सुभाष चौक, पाच कंदील चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर येथे जाहीर सभा घेण्यात आली.

या सभेत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, प्रा. अशोक पवार, शिवराम पाटील, सुलोचना वाघ, बन्सीलाल भागवत, ऍड. शकील काझी, रियाज मौलाना, चंद्रशेखर भावसार आदी वक्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वक्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध धोरणांवर जोरदार टीका करत शेतकरी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महागाई, भ्रष्टाचार तसेच स्थानिक प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे आवाहन केले. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या प्रश्नांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

विविध पक्ष-संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

या मशाल मोर्चात उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, ऍड. तीलोत्तमा पाटील, गोकुळ बोरसे, सुरेश पाटील, योजना पाटील, आरती पाटील, गजेंद्र साळुंखे, प्रताप पाटील, जाकीर शेख, नरेंद्र पाटील, लोटन चौधरी, अरुण देशमुख, पंढरीनाथ बागुल, मकसूद पठाण, एड. कौस्तुभ पाटील, प्राचार्य लीलाधर पाटील, बसपाचे गौतम मोरे, अतुल डोळस, चिंधु, वानखेडे योगेश पाटील, बाळासाहेब पाटील, नितीन निळे, रज्जाक शेख, विजय पाटील, वासू पाटील, गिरीश पाटील यांच्यासह विविध पक्ष व पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे डी. एम. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्याम पाटील यांनी केले.

क्रांती दिनाच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सरकारच्या धोरणांविरोधातील घोषणांनी आणि मशालींनी अमळनेर शहरातील वातावरण दुमदुमून गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *