ब्रेकिंग
अमळनेरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव आणि प्रेरणादायी व्याख्यानातून इतिहासाला उजाळा

अमळनेर (प्रतिनिधी) : वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा ४८६ वा जन्मोत्सव अमळनेर येथे मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. राजपूत एकता मंच अमळनेर शहर व ग्रामीण यांच्या वतीने रक्तदान शिबिर, विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ऐतिहासिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

दि. १७ जून रोजी सकाळी १० वाजता महाराणा चौकातील स्मारकस्थळी महाराणा प्रताप यांच्या तैलचित्राचे पूजन व माल्यार्पण माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिराचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते पार पडले. शिबिराला समाजबांधव व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमातून १०० पेक्षा अधिक रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले.

व्याख्यानातून इतिहासाचा गौरवशाली वारसा उलगडला

सायंकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृह, अमळनेर येथे व्याख्यान, विद्यार्थी गुणगौरव सोहळा आणि बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी आमदार अनिल पाटील उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी खासदार स्मिताताई वाघ होत्या.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, प्रा. धर्मसिंह पाटील, माजी जि.प. सदस्य ॲड. व्ही. आर. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, भाजप तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, नगरसेवक महेश देशमुख, जितेंद्र ठाकुर, व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे, राजपूत एकता मंचचे अध्यक्ष रणजित पाटील तसेच सूरज परदेशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या समाजातील विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर व्याख्याते प्राचार्य संजय गिरासे यांनी “महाराणा प्रताप : हल्दीघाटी युद्धाची साडेचारशे वर्षे व भारत” या विषयावर प्रभावी व्याख्यान देत उपस्थितांना इतिहासाच्या गौरवशाली पानांची सफर घडवली. महाराणा प्रताप यांचे शौर्य, स्वाभिमान, राष्ट्रनिष्ठा आणि त्याग यांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या व्याख्यानातून केला.

यावेळी शेतकी संघ तसेच नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

सामाजिक उपक्रमांचे मान्यवरांकडून कौतुक

मिरवणूक आणि डीजे यांसारख्या पारंपरिक स्वरूपांना फाटा देत रक्तदान, विद्यार्थी गुणगौरव आणि व्याख्यान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल आमदार अनिल पाटील आणि खासदार स्मिताताई वाघ यांनी राजपूत एकता मंचाचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांनी उपस्थित समाजबांधवांना महाराणा प्रताप जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव तसेच महिला भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व समाजबांधव आणि राजपूत एकता मंचच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

लिनेस क्लबचा प्रेरणादायी उपक्रम; प्रताप हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

 

अमळनेर (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने लिनेस क्लबतर्फे येथील प्रताप हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिनेस क्लबच्या अध्यक्षा कविता पारख होत्या. यावेळी जास्मिन भरूचा (इन्चार्ज ऑफिसर), जया जैन (कॅबिनेट ऑफिसर), डॉ. मंजुश्री जैन तसेच शारदा अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व मान्यवरांचे स्वागत प्रताप हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. पी. बाविस्कर यांनी केले.

यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कविता पारखयांनी शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शिक्षण हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास, शिस्त आणि परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश दिला. तसेच शाळेला भविष्यात शैक्षणिक साहित्याची आवश्यकता भासल्यास लिनेस क्लबतर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

यानंतर विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, शैक्षणिक किट तसेच इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा व अभ्यासक्रमाशी संबंधित उपयुक्त पुस्तके वितरित करण्यात आली. आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव उमटले होते.

शिक्षणाबाबत सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून स्वागत केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी. एन. पालवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन एस. ए. खांजोडकर यांनी मानले.

“गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती आणि माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी प्रताप हायस्कूलला मदतीचा हात द्यावा. विद्यार्थ्यांचे शिक्षण सशक्त झाले तरच समाजाचा विकास अधिक वेगाने होऊ शकतो.”

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व्यवस्थापन समिती अमळनेरच्या वेदांशू पाटील यांची सदस्यपदी नियुक्ती डॉ. डिगंबर महाले यांचीही गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड

 

अमळनेर : महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार, कृषी व उद्योजक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शतकोत्तर परंपरा लाभलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (एमएसीसीआयए) च्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी उद्योजक वेदांशू पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी आपल्या विशेष अधिकारातून ही नियुक्ती केली असून, चेंबरच्या शतक महोत्सवी वर्षात झालेल्या या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, अमळनेर येथील मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांची देखील गव्हर्निंग कौन्सील सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे, हे विशेष! गेल्या वर्षी डॉ. महाले यांचे एकूण कार्य व दीर्घ अनुभव लक्षात घेऊन संस्थेने त्यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली होती. सदर पदी नियुक्त होणारे ते तालुक्याच्या इतिहासातील पहिलेच सदस्य होते.  

महाराष्ट्र चेंबरची व्यवस्थापन समिती ही संस्थेतील सर्वोच्च धोरणात्मक निर्णय घेणारी समिती आहे. या समितीत अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, विविध विभागांचे उपाध्यक्ष, माजी अध्यक्ष, ट्रस्ट बोर्ड चेअरमन, सेक्रेटरी जनरल यांचा समावेश असतो. महाराष्ट्र चेंबरच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, संस्थेच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभाग घेणे आणि भावी दिशा निश्चित करणे ही या समितीची प्रमुख जबाबदारी असते.

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून अध्यक्षांच्या विशेष अधिकारातून केवळ एका सदस्याची या समितीवर नियुक्ती केली जाते. यंदा ही जबाबदारी वेदांशू पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. वेदांशू पाटील हे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग, शिक्षण, मनोरंजन तसेच ई-कॉमर्स अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेले युवा उद्योजक म्हणून ओळखले जातात. विविध व्यवसाय क्षेत्रांतील त्यांचा अनुभव, संघटन कौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्र चेंबरच्या जवळपास शंभर वर्षांच्या इतिहासात व्यवस्थापन समितीवर नियुक्त झालेल्या सदस्यांपैकी सर्वांत तरुण सदस्य म्हणून वेदांशू पाटील यांची नोंद होणार असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या नियुक्तीकडे उद्योग व व्यापारी क्षेत्रात विशेष उत्सुकतेने पाहिले जात आहे. अलीकडेच पार पडलेल्या 2026-28 च्या निवडणुकीत अध्यक्ष रवींद्र माणगावे यांची बिनविरोध निवड झाली असून, राज्यातील सर्व उपाध्यक्ष आणि सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य यांची बिनविरोध तर काहींची निवडणुकीद्वारे विजय प्राप्त करून एकहाती सत्ता प्रस्थापित झालेली आहे. या पार्श्वभूमीवर नव्या नेतृत्वासोबत युवा उद्योजकांना संधी देण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. 

नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना वेदांशू पाटील यांनी अध्यक्ष रवींद्र माणगावे, ट्रस्ट बोर्ड चेअरमन आशिष पेडणेकर, माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष करुणाकर शेट्टी तसेच महाराष्ट्र चेंबरच्या सर्व नेतृत्वाचे आभार मानले. महाराष्ट्र चेंबरच्या विकासासाठी, सभासदांच्या हितासाठी आणि संस्थेच्या शतक महोत्सवी वर्षात नवे उपक्रम राबविण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र चेंबरच्या शतक महोत्सवी वाटचालीत युवा नेतृत्वाचा सहभाग वाढविण्याच्या दिशेने ही नियुक्ती एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून, उद्योग-व्यापार क्षेत्रात नव्या पिढीच्या प्रतिनिधित्वालाही यामुळे बळ मिळणार आहे.

अमळनेर : महाराष्ट्र चेंबरच्या व्यवस्थापन समितीवर वेदांशू पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करताना अध्यक्ष रवींद्र माणगावे. शेजारी ट्रस्ट बोर्ड चेअरमन पेडणेकर, माजी अध्यक्ष मंडलेचा, वरिष्ठ उपाध्यक्ष शेट्टी.

“सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूलच्या इशिकाला नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड”

 

अमळनेर, दि. १६ जून : अमळनेर येथील सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल मधील इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी इशिका शरद खैरनार हिने राष्ट्रीय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड पटकावून शाळेचे व शहराचे नाव उज्ज्वल केले आहे.

दिनांक १३ व १४ जून २०२६ रोजी विदर्भ केसरी खासदार रामदासजी तडस इंडोर स्टेडियम, देवळी (जि. वर्धा) येथे स्पोर्ट्स शोतो कराटे डो असोसिएशन ऑफ इंडिया संलग्नित स्पोर्ट्स कराटे असोसिएशन, वर्धा यांच्या वतीने राष्ट्रीय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत इशिकाने काता व कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून विशेष यश संपादन केले. तिच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत तिला “नॅशनल बेस्ट प्लेयर अवॉर्ड” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

इशिकाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे चेअरमन श्री. सुरेंद्रजी बोहरा, मुख्याध्यापक श्री. जितेंद्र सिंह, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी चेअरमन बोहरा सरांनी इशिकाच्या पुढील शैक्षणिक व क्रीडा वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात आणखी मोठे यश संपादन करण्याचा विश्वास व्यक्त केला. व सर्वांनी तिचे कौतुक केले

इशिकाच्या या यशामागे मास्टर करंदीकर व सायरदेवी बोहरा सेंट्रल स्कूल अमळनेर यांचे फार मोठे योगदान आहे

अमळनेरच्या पोदार लर्न स्कूलचा दणदणीत शुभारंभ!  ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत; पहिल्याच दिवशी १५० हून अधिक प्रवेश

 

अमळनेर (प्रतिनिधी) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अमळनेर येथील ‘पोदार लर्न स्कूल’मध्ये उत्साह, आनंद आणि जल्लोषाचे अनोखे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेने केलेल्या भव्य आयोजनामुळे पहिल्याच दिवशी परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले.

ढोल-ताशांच्या दणदणाटात आणि मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प देण्यात आले. शाळेच्या संचालिका तथा मुख्याध्यापिका डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी स्वतः उपस्थित राहून प्रत्येक विद्यार्थ्याचे औक्षण केले व नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. या आत्मीय स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता, तर पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

अल्पावधीतच पालकांचा मोठा विश्वास

गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन यामुळे पोदार लर्न स्कूल ने अत्यंत कमी कालावधीत अमळनेर परिसरातील पालकांचा विश्वास संपादन केला आहे. याच विश्वासाचे प्रतीक म्हणून शाळेच्या पहिल्याच वर्षात तब्बल १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

याबाबत माहिती देताना संस्थेचे सचिव प्रशांत सूर्यवंशी म्हणाले, “पालकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमच्यासाठी मोठी जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.”

 बौद्धिक खेळांतून शिक्षणाला नवी दिशा

केवळ पाठांतरावर भर न देता विद्यार्थ्यांच्या विचारशक्ती, सर्जनशीलता आणि बौद्धिक विकासाला चालना देण्यासाठी शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. बौद्धिक खेळ, कृतीप्रधान शिक्षण आणि आधुनिक अध्यापन तंत्रांच्या माध्यमातून शिक्षण अधिक रंजक व प्रभावी बनविण्याचा शाळेचा मानस आहे.

यासाठी शाळेत उच्चशिक्षित, अनुभवी आणि विद्यार्थीहित जपणाऱ्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाचा लाभ मिळणार आहे.

 अत्याधुनिक सुविधा आणि भव्य क्रीडांगण

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देत शाळेत प्रशस्त व सुसज्ज इमारत, आधुनिक वर्गखोल्या तसेच सुरक्षित आणि भव्य क्रीडांगणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासावरही विशेष भर दिला जाणार आहे.

शहरभरातून कौतुकाचा वर्षाव

विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत, आधुनिक शैक्षणिक दृष्टीकोन आणि सर्वांगीण विकासासाठी केलेली तयारी यामुळे ‘पोदार लर्न School’च्या या उपक्रमशील सुरुवातीचे अमळनेर शहरासह परिसरातील पालकांकडून भरभरून स्वागत आणि कौतुक होत आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची ही दमदार सुरुवात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून शाळेच्या उज्ज्वल वाटचालीची नांदी मानली जात आहे.

खासदारांच्या गावालाच टँकरने पाणी; डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजूनही कायम

 

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार स्मिताताई उदय वाघ यांचे मूळ गाव म्हणून ओळखले जाते. मात्र, गावाच्या विकासाचा आणि सत्तेच्या प्रभावाचा दावा केला जात असताना या गावातील नागरिकांना गेल्या सुमारे २५ ते ३० वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून तीव्र प्रश्न उपस्थित केले आहेत.

               प्रा. पवार यांनी म्हटले आहे की, स्मिताताई वाघ यांनी जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषद अध्यक्षा, विधान परिषद आमदार आणि खासदार अशी विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. त्या पक्षाच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय जबाबदाऱ्यांवर कार्यरत राहिल्या असून अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले आहे. उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे. एवढा मोठा राजकीय अनुभव, प्रशासकीय संपर्क आणि सत्तेची ताकद लाभूनही त्यांच्या स्वतःच्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला, ही बाब जनतेच्या दृष्टीने गंभीर आहे.

                त्यांच्या मते, टँकरने पाणीपुरवठा करणे हा कायमस्वरूपी उपाय नसून तो शासनाच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा उपाय आहे. टँकरद्वारे होणारा पुरवठा अनेकदा अपुरा ठरतो. शिवाय पाण्याच्या गुणवत्तेची व शुद्धतेची खात्री देता येत नसल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावरही त्याचे विपरीत परिणाम होतात. दूषित पाण्यामुळे होणारे आजार, उपचारासाठी करावा लागणारा खर्च आणि ग्रामीण भागातील अपुरी आरोग्य व्यवस्था यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अधिक कठीण बनते.

               प्रा. पवार यांनी पत्रकात प्रश्न उपस्थित केला आहे की, “जेव्हा एखाद्या लोकप्रतिनिधीकडे सत्तेची विविध पदे, प्रशासकीय अनुभव आणि निर्णयक्षमतेची संधी असते, तेव्हा सर्वप्रथम आपल्या मतदारसंघातील आणि गावातील मूलभूत प्रश्न सुटणे अपेक्षित असते. मात्र डांगर उर्फ उदयनगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही कायम असल्याने सत्ता नेमकी कोणासाठी आणि कशासाठी वापरली जात आहे, असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.”

               ते पुढे म्हणतात की, “स्मिताताई वाघ यांच्याबाबत कोणताही व्यक्तिगत आकस, द्वेष किंवा राजकीय वैरभाव नाही. त्या गंभीर आजाराशी झुंज देत असूनही सार्वजनिक जीवनात कार्यरत आहेत, याबद्दल आदर आहे. मात्र सार्वजनिक जीवनातील कार्याचे मूल्यमापन हे जनतेच्या प्रश्नांच्या निराकरणावरूनच होत असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेली चार दशके सक्रिय राहून, विविध महत्त्वाची पदे भूषवून आणि केंद्र व राज्यात दीर्घकाळ सत्ता असतानाही गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही, हा प्रश्न अनुत्तरित आहे.”

              प्रा. पवार यांनी असेही नमूद केले की, गेल्या बारा वर्षांपासून राज्य आणि केंद्र या दोन्ही स्तरांवर भाजपची सत्ता विविध स्वरूपात राहिली आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या गावासाठी एखादी दीर्घकालीन पाणीपुरवठा योजना, जलस्रोत विकास, जलजीवन मिशन अथवा अन्य कोणत्याही योजनेचा प्रभावी वापर करून प्रश्न मार्गी लावता आला असता. मात्र तसे झालेले दिसत नाही.

              “डांगरचे नाव बदलून उदयनगर झाले, पण गावकऱ्यांच्या जीवनात पाण्याचा खरा उदय झाला नाही. आजही महिलांना, ज्येष्ठांना आणि सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. पिण्याचे पाणी ही चैनीची नव्हे तर मूलभूत मानवी गरज आहे. ती पूर्ण करण्यात यंत्रणा आणि लोकप्रतिनिधी अपयशी ठरत असतील तर त्याबाबत प्रश्न विचारलेच गेले पाहिजेत,” असेही त्यांनी म्हटले आहे.

             शेवटी प्रा. अशोक पवार यांनी सत्ता ही ग्रामीण, गरीब, वंचित, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनमान उन्नतीसाठी वापरली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली असून डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

प्रा. अशोक पवारउपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), जळगाव जिल्हा.

डांगर उर्फ उदयनगरला टँकरने पाणी 

 

अमळनेर तालुक्यातील डांगर उर्फ उदयनगर हे विद्यमान खासदार सौ स्मिताताई उदय वाघ यांचे गाव. या गावाला सुमारे 25 वर्षापासून पिण्याचे पाणी टँकरने पुरवावे लागत आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सौ स्मिताताई या जळगाव जिल्ह्यातील राजकारणात सक्रिय आहेत. त्यांचा राजकीय प्रवास, जळगाव जिल्हा परिषद सदस्य, जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष, विधान परिषद आमदार आणि आता खासदार पक्षाच्या जिल्हा व राज्य पातळीवर पदाधिकारी शिवाय अनेक समित्यांवर कार्यरत, उत्कृष्ट संसद पटू म्हणून पुरस्कार इत्यादी सौ स्मिता ताईंना अनेक सत्ते ची पदे मिळाली,मानसन्मान मिळाला परंतु डांगर उर्फ उदयनगरच्या ग्रामस्थांना कोणत्याही योजनेतून कायमस्वरूपी पिण्याचे पाणी मिळाले नाही. आजही डांगर उर्फ उदयनगरला टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. ही बाब योग्य नाही.सामान्य माणसाला प्रश्न पडतो की सत्ता कोणासाठी वापरली जात आहे? व कोणते प्रश्न सुटत आहेत.?

. पाण्यासाठी टँकर सुरू केल्याने शासनाचा प्रचंड खर्च वाढतो. ग्रामस्थांना पुरेसे पाणी मिळत नाही.पाण्याच्या शुद्धतेबाबत कोणतीही गॅरंटी देता येत नाही ग्रामस्थांना दूषित पाण्यामुळे आजार होतात.सरकारी दवाखाने ही व्हेंटिलेटरवर असल्याने खाजगी डॉक्टरांचा खर्च ग्रामस्थांना परवडत नाही, परंतु खर्च करावाच लागतो,प्रसंगी काहींना दैनंदिन खर्चासाठी कर्जही काढावे लागते, याचा अर्थ टँकरचे पाणी एका अर्थाने विकतच मिळते. लोकप्रतिनिधींचे जनतेच्या वेदनाशी कोणते नाते आहे.?असे म्हणता येईल?

. सौ स्मिताताई बद्दल व्यक्तिगत आकस व द्वेष नाही. यात राजकारण नाही. त्या मोठ्या आजाराशी झुंज देत आहे. तरीही काम करीत आहे. परंतु काम कोणासाठी करीत आहेत? त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भाजप अशा संघटनांमध्ये गेल्या 40 वर्षापासून क्रियाशील असताना, प्रचंड अभ्यास, अनुभव आणि सत्तेची पदे असतानाही डांगर उर्फ उदयनगरच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सुटला नाही? डांगरच उदयनगर झालं पण ग्रामस्थांना पाणी मिळालं नाही. 12 वर्षापासून राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असताना सौ स्मिता ताईंना!स्वतःच्या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडवता आला नाही? इथे स्वतःच्या गावाच्या ग्रामस्थांना पाणी देता येत नाही, तिथे शेतीला पा7णी, उद्योग,नोकरी या गोष्टी तर खूपच लांब राहिल्या. सत्ता ग्रामीण, गरीब, वंचित आणि शेतकऱ्यांसाठी वापरावी ही अपेक्षा. अशा आशयाचे पत्रक प्रा अशोक पवार, उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस( शरद पवार गट )जळगाव जिल्हा यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

दहावी पुरवणी परीक्षेसाठी प्रताप हायस्कूल केंद्राची आसनव्यवस्था जाहीर; विद्यार्थ्यांनी वेळेपूर्वी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

अमळनेर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या जून/जुलै २०२६ दहावी पुरवणी परीक्षेची प्रताप हायस्कूल, अमळनेर (केंद्र क्रमांक ३७१०) येथील आसनव्यवस्था जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा १६ जून २०२६ पासून सुरू होत असून परीक्षेच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या केंद्रावर विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पार पडणार असून परीक्षेचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या कॉपीमुक्त अभियानांतर्गत सर्व परीक्षा काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर येताना मूळ हॉलतिकीट व ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक असून कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान ३० ते ४५ मिनिटे अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

केंद्राध्यक्ष सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शांत, आत्मविश्वासपूर्ण वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन करताना सर्व आवश्यक सूचना वेळेत पाळण्याचे सांगितले आहे. तसेच परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र प्रशासन, पर्यवेक्षक व कर्मचारी वर्ग सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दहावीच्या पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी असून, विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जावे आणि उज्ज्वल यश संपादन करावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

 

द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ढोल-ताशे, पुष्पवृष्टी आणि औक्षणाने विद्यार्थिनींचे भव्य स्वागत

 

अमळनेर (प्रतिनिधी) : खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळा, अमळनेर येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींच्या स्वागतासाठी आकर्षक सजावट, ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि औक्षणाचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शाळेच्या प्रवेशद्वारावर प्रत्येक विद्यार्थिनीचे औक्षण करून, गुलाबपुष्प देत आणि फुलांचा वर्षाव करत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. विद्यार्थिनींसह पालकांचेदेखील बुके देऊन स्वागत करण्यात आले. यामुळे शाळेचा पहिलाच दिवस अविस्मरणीय ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री विनोदजी अग्रवाल, शालेय समितीचे चेअरमन श्री जितेंद्र भाऊ जैन, खा. शि. मं. चे ज्येष्ठ संचालक श्री हरि भिका वाणी, माधुरी शशिकांत राणे प्राथमिक शाळेचे चेअरमन श्री प्रदीप भाऊ अग्रवाल, दामिनी पथक प्रमुख श्रीमती नम्रता जरे मॅडम, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री आठवले, पर्यवेक्षक श्री एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, ज्येष्ठ लिपिक व प्रतिनिधी श्री शामभाऊ पवार, ज्येष्ठ शिक्षक श्री एस. एस. माळी, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती आर. एस. सोनवणे तसेच क्रीडा शिक्षक श्री के. आर. बाविस्कर उपस्थित होते.

स्वागत समारंभानंतर शाळेची प्रार्थना, राष्ट्रगीत, राज्यगीत आणि संविधान प्रतिज्ञा घेण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन, मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना शालेय पाठ्यपुस्तके आणि गुलाबपुष्प भेट देण्यात आले. तसेच गोडधोड वाटप करून नवीन शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात करण्यात आली. पुष्पवृष्टी आणि उत्साहपूर्ण स्वागतामुळे शाळेचा परिसर आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेने भरून गेला होता.

यावेळी मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी श्री प्रमोद पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत अभ्यास, संस्कार आणि सर्वांगीण विकासाच्या दिशेने वाटचाल करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती आर. एस. सोनवणे व सौ. पी. पी. जोशी यांनी केले. प्रवेशोत्सव यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शाळा प्रशासनाची आकर्षक नियोजनबद्धता यामुळे द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेचा प्रवेशोत्सव यंदा विशेष लक्षवेधी ठरला.

Read More द्रौपदीबाई रामचंद्रशेठ कन्या शाळेत प्रवेशोत्सवाचा जल्लोष; ढोल-ताशे, पुष्पवृष्टी आणि औक्षणाने विद्यार्थिनींचे भव्य स्वागत

सरकारने जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाची मागणी  

 

 

 अमळनेर :- राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील जाचक अटी व शर्ती रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) पक्षाने निवेदनाद्वारे केली आहे.

               तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या तीन वर्षातील नैसर्गिक आपत्ती, सततची नापिकी, शेतमालाचे घसरलेले भाव व खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी योजनेतील जाचक अटींमुळे लाखो शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असून ही योजना कर्जमाफी पेक्षा कर्ज वसुलीचे वाटत असल्याचे टीका यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने योजनेतील सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

               यावेळी पक्षाचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील, शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, दिव्यांग सेल जिल्हाध्यक्ष शांताराम कोळी, शहर सरचिटणीस चिंधू वानखेडे, तालुका उपाध्यक्ष वसुदेव मामा, दीपक जगन्नाथ पाटील, पंजाबराव पाटील यांसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.