ब्रेकिंग
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा उपाध्यक्षपदी ‘लोक जागर न्यूज’चे संपादक हृदयनाथ मोरे यांची निवड

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खानदेशी विभागांतर्गत अमळनेर तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, ‘लोक जागर न्यूज’चे संपादक तथा पत्रकार हृदयनाथ मोरे यांची तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमानी, प्रदेश संघटक संजयजी भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शन व आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आली. खानदेशी विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ. समाधान मैराळे यांनी अमळनेर तालुका कार्यकारिणी जाहीर करत हृदयनाथ मोरे यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती केली.

हृदयनाथ मोरे हे ‘लोक जागर न्यूज’च्या माध्यमातून अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, प्रशासकीय तसेच जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत आहेत. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासोबतच सामाजिक उपक्रम, लोकजागृती आणि सकारात्मक घडामोडींना प्रसिद्धी देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.

पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारिता क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी संघटित प्रयत्नांची गरज असताना अमळनेर तालुका कार्यकारिणीच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच समाजहिताच्या विषयांना प्राधान्य देणे, यासाठी कार्यकारिणी सक्रियपणे काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

हृदयनाथ मोरे यांच्या नियुक्तीबद्दल पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच मित्रपरिवाराकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, नवीन जबाबदारीच्या माध्यमातून पत्रकारिता क्षेत्रात अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

पत्रकार, विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमळनेर तालुका उपअध्यक्षपदी नियुक्ती

 

अमळनेर : पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे पत्रकार विक्की जाधव यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई विभागाच्या अमळनेर तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा पत्रकार संवाद यात्रेचे शिल्पकार वसंतराव मुंडे, कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांच्या सूचनेनुसार आणि तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याची नवी जबाबदारी जाधव यांच्या खांद्यावर सोपविण्यात आल्याने पत्रकार वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

स्थानिक प्रश्नांवर निर्भीड भूमिका, डिजिटल आणि प्रिंट च्या माध्यमातून प्रभावी मांडणी आणि जनहिताच्या विषयांचा सातत्याने पाठपुरावा ही पत्रकार विक्की जाधव यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये मानली जातात.* तालुक्यातील पत्रकारांच्या विविध अडचणी, हक्क आणि प्रश्नांना संघटनात्मक व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच पत्रकारांमध्ये समन्वय वाढविणे, संघटनेचा विस्तार करणे आणि पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे.

या नियुक्तीचे पत्रकारिता, सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. यावेळी नव्या जबाबदारीबाबत पत्रकार विक्की जाधव यांनी संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीमुळे अमळनेर तालुक्यातील पत्रकारांना एकत्रित व्यासपीठ मिळण्यासह पत्रकारांच्या प्रश्नांना अधिक संघटित आणि प्रभावी आवाज मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डॉ. समाधान मैराळे यांची राज्य पत्रकार संघाच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी निवड जळगाव, धुळे व नंदुरबारमधील पत्रकार संघटन बळकट करण्यावर भर

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबईच्या खान्देश विभागीय अध्यक्षपदी डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी ही नियुक्ती जाहीर केली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रदेश संघटक संजय भोकरे, प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि संघटन सरचिटणीस किशोर रायसाकडा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. मैराळे यांच्यावर खान्देश विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

खान्देश विभागात जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. या तिन्ही जिल्ह्यांतील पत्रकारांना संघटित करून त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आगामी काळातील प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे.

पत्कारितेच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पत्रकारितेसोबतच डिजिटल मीडिया, सोशल मीडिया, मोबाईल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), माहितीची पडताळणी, फेक न्यूज आणि पत्रकारितेतील आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर प्रशिक्षण उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. नवोदित पत्रकारांना मार्गदर्शन तसेच कार्यरत पत्रकारांसाठी विविध कार्यशाळा घेण्यावरही भर दिला जाणार आहे.

पत्रकारांच्या स्थानिक पातळीवरील अडचणी, शासकीय यंत्रणांशी समन्वय, पत्रकारांच्या व्यावसायिक कौशल्यविकासाच्या संधी आणि पत्रकारिता क्षेत्रातील बदल यावर विभागीय पातळीवर सातत्याने संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

“खान्देशातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न राहील. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यास प्राधान्य दिले जाईल,” असे डॉ. समाधान मैराळे यांनी सांगितले.

डॉ. मैराळे यांच्या निवडीमुळे खान्देश विभागातील पत्रकार संघटनेच्या कार्याला अधिक व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत असून, आगामी काळात विभागातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये संघटनात्मक उपक्रम, पत्रकार संवाद आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याच्या दृष्टीने नियोजन केले जाणार आहे.

आपत्ती व्यवस्थापनवर समाजकार्य महाविद्यालयात विषयी दोन दिवसाची कार्यशाळा संपन्न अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिसास्टर मॅनेजमेंट मुंबई कडून आयोजन

 

अमळनेर – दिनांक 17 व 18 ऑगस्ट 2026 रोजी श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी अमळनेर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय अमळनेर येथे आपत्ती व्यवस्थापन या विषयास अनुसरून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 समाजकार्याचा प्रशिक्षण 

घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन महत्त्व याविषयी मुंबई येथील अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेकडून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 सदर कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका सौ अनुरुपा अभिजीत भांडारकर यांनी भूषविले. विभाग प्रमुख डॉ. जगदीश सोनवणे, कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती आशिष वाणी, वसंत पाटील हे विचार मंचावर उपस्थित होते. 

कार्यशाळेच्या सुरुवातीला रत्ना खैरनार व तेजस्विनी पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत स्वागत गीताने केले.

 प्रथम सत्राचे मार्गदर्शक आशिष वाणी यांनी नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती, याविषयी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. आपत्ती व्यवस्थापन मूलभूत बचाव तंत्र, आग आणि प्रतिबंध, प्रतिसाद, प्रथमोपचार, यावर सखोल मार्गदर्शन केले. आपत्कालीन व्यवस्थापन चक्र समजून सांगितले की, सज्जता, प्रतिबंध, प्रतिसाद, विमोचन , विकास व पुनरुत्थान, आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची आवश्यकता महत्त्वाची आहे. तसेच आपत्तीचे प्रकार नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीला कसे सामोरे जावं याविषयी देखील त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. 

आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक पण केले गेले.

सदर सत्राच्या सत्र समन्वयक म्हणून प्रा डॉ अस्मिता सरवैया यांनी जबाबदारी सांभाळली. दुपारच्या सत्रात डॉ. धनश्री देवरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. सदर सत्राच्या सत्र समन्वयक प्रा डॉ अनिता खेडकर यांनी जबाबदारी सांभाळली. डॉ धनश्री देवरे यांनी सांगितले की, अचानक कुटुंबातील किंवा परिसरातील एखाद्या व्यक्तींवर हृदयविकाराचा झटका आल्यास, त्याला सीपीसीआर द्वारे कसे जागृत अवस्थेत आणावे, याविषयी डॉ धनश्री देवरे यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले. 

सदर कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी एस पाटील यांच्या मार्गदर्शनातून कार्यक्रमाचे समन्वयक तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या कार्यक्रम अधिकारी डॉ अनिता खेडकर, डॉ विजयकुमार वाघमारे व विद्यार्थी विकास अधिकारी प्रा डॉ अस्मिता सरवैया, प्रा डी आर. ढगे, डॉ. एस आर चव्हाण. डॉ. भरत खंडागळे. ग्रंथपाल प्रा उदय महाजन, शिक्षकेतर कर्मचारी महेश शेलार, कोमल सूर्यवंशी, श्रीमती ज्योती सोनार यांनी सहकार्य केले. कार्यशाळेसाठी महाविद्यालयातील बीएसडब्ल्यू व एम एस डब्ल्यू चे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी पाटील यांनी केले व आभार प्रदर्शन डॉ.अनिता खेडकर यांनी केले.

तालुका विज्ञान मेळावा उत्साहात; मयुरी महाजन प्रथम, मोहक साळुंखे द्वितीय तर सोहम भोसले तृतीय

 

भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ विषयावर विद्यार्थ्यांची चुरशीची स्पर्धा

अमळनेर : समग्र शिक्षा जिल्हा परिषद गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या वतीने अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आयोजित या मेळाव्यात तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र २०४७ : भवितव्य (संधी) व आव्हाने’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर सर उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला आपले विचार मांडण्यासाठी सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी ऊर्जा क्षेत्रातील भविष्यातील संधी, आव्हाने आणि भारताच्या ऊर्जा विकासाची दिशा यावर प्रभावीपणे मते मांडल्याने स्पर्धा अत्यंत चुरशीची झाली.

स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. नंदा पाटील मॅडम व श्री. आकाश पाटील यांनी कामकाज पाहिले. या स्पर्धेत डी. आर. कन्या हायस्कूल, अमळनेरच्या मयुरी संदीप महाजन हिने प्रथम क्रमांक पटकावला. साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय, अमळनेरच्या मोहक मुकेश साळुंखे याने द्वितीय क्रमांक मिळविला, तर पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या सोहम अमोल भोसले याने तृतीय क्रमांक पटकावला. एस. एस. पाटील हायस्कूल, लोंढवेच्या जयेश निंबा पाटील याची उत्तेजनार्थ पारितोषिकासाठी निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव दादासाहेब संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे व डी. ए. धनगर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व परीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.

विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री वानखेडे मॅडम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. यशोदीप बागल यांनी केले.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रमोद पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, मुख्याध्यापिका अनिता बोरसे, गणित मंडळाचे अध्यक्ष डी. ए. धनगर, नंदा पाटील व आकाश पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी विज्ञान शिक्षक श्री. दीपक महाजन सर, सौ. वैशाली पाटील मॅडम, श्री. हर्षल पवार, सौ. भारती पाटील मॅडम, एन. डी. पाटील, सौ. एस. एस. कसबे मॅडम, सौ. डिंपल देसाई मॅडम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि संशोधनवृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टीने हा विज्ञान मेळावा प्रेरणादायी ठरला.

डी. आर. कन्या शाळेच्या मयुरी महाजन हिचा तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांक

 

भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय या विषयावर प्रभावी मांडणी; गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील यांच्या हस्ते बक्षीस देऊन अभिनंदन

अमळनेर : समग्र शिक्षण जिल्हा परिषद जळगाव व गटसाधन केंद्र, पंचायत समिती अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने साने गुरुजी शाळेत आयोजित तालुकास्तरीय विज्ञान मेळावा २०२६ उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेची कुमारी मयुरी संदीप महाजन हिने ‘भारतीय ऊर्जा क्षेत्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर प्रभावी मांडणी करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशाबद्दल पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद पाटील साहेब यांच्या हस्ते मयुरी महाजन हिला बक्षीस देऊन तिचे अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक व वैज्ञानिक उपक्रमांना नवी ओळख मिळाली आहे.

मयुरी महाजन हिने विषयाचा सखोल अभ्यास करून भारतीय ऊर्जा क्षेत्रासमोरील आव्हाने तसेच त्यावरील संभाव्य उपाय यांची प्रभावी मांडणी केली. तिच्या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला परीक्षकांनी दाद देत तिला प्रथम क्रमांक बहाल केला.

या यशाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष व शाळेचे शालेय समिती चेअरमन भाऊसो जितेंद्रजी जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ सर, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी मॅडम, श्रीमती आर. एस. सोनवणे मॅडम, श्री. एस. एस. माळी सर, श्री. के. पी. सनेर, श्री. श्याम पवार सर, श्रीमती एस. एस. कसबे मॅडम तसेच सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक आणि कर्मचारी बंधू-भगिनी यांनी मयुरी महाजन हिचे अभिनंदन केले.

मयुरीच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही विज्ञान विषयात अभ्यास, प्रयोगशीलता आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

मयुरी महाजन हिने मिळविलेल्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने तिचे विशेष अभिनंदन करण्यात आले. तिच्या यशामुळे श्रीमती द्रौ. रा. कन्या शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मयुरी महाजन हिच्या या यशासाठी शाळेतील सर्व विज्ञान व गणित शिक्षिका, सर्व शिक्षक तसेच कर्मचारी बंधू-भगिनींचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.

अमळनेर शहरात मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाहनधारकांची कसरत; बालके, विद्यार्थी व वृद्धांच्या सुरक्षिततेचा प्रश्न — नगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

 

अमळनेर, जि. जळगाव : अमळनेर शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच वर्दळीच्या परिसरात मोकाट जनावरांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून, रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसणाऱ्या जनावरांमुळे वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. अचानक जनावरे रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला असून, शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम होत आहे.

यासोबतच शहरात भटक्या कुत्र्यांचाही सुळसुळाट वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान बालके, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि वृद्ध नागरिकांना कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी कुत्र्यांचे कळप फिरताना दिसत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

शाळा, बाजारपेठ, रुग्णालये तसेच रहिवासी भागात नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी मोकाट जनावरे आणि भटक्या कुत्र्यांचा वावर धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.

मोकाट जनावरांचा बंदोबस्त, भटक्या कुत्र्यांवर निर्बिजीकरणाची प्रभावी मोहीम, तसेच नागरिकांच्या तक्रारींसाठी तत्काळ प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे. प्रशासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असून, अमळनेर नगरपालिका प्रशासन आता तरी जागे होणार का? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सरस्वती शिशुवाटीका येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा

 

अमळनेर : येथील सरस्वती शिशुवाटीका या पूर्व प्राथमिक शाळेत भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपर वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले व त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. 

      कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रधानाचार्य सौ.किरण भदाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्र गान,राष्ट्रगीत व राज्य गीताचे विद्यार्थी व शिक्षकांनी सामूहिक गायन केले व देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या. 

            या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सुभेदार किशोर ठाकरे व रा.स्व.संघाचे तालुका सहकार्यवाह अॅड.विशाल महाजन यांची उपस्थिती होती. सुभेदार किशोर ठाकरे यांनी आपल्या सेवा काळात विविध मोहिमेत घेतलेला सहभाग व त्यात आलेले अनुभव कथन केले. मागील वर्षी झालेल्या “ऑपरेशन सिंदूर” मध्ये घेतलेल्या सहभागाचा त्यांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख केला. सैनिकी सेवेत तरूणांनी सहभागी व्हावे यासाठी लहानपणापासून तयारी करणे आवश्यक आहे असे सुभेदार किशोर ठाकरे यांनी सांगितले.अॅड.विशाल महाजन यांनी शालेय जीवनातील संस्कार व्यक्तीच्या संपूर्ण जीवनात उपयुक्त ठरतात.विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासाचा पाया मजबूत होण्यास शिक्षणाबरोबर संस्कार देणा-या अशा शाळांमुळे मदत होते असे उद्गार काढले. 

*सांस्कृतिक कार्यक्रम*

        वेशभूषा सादरीकरणात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राष्ट्रीय नेत्यांच्या वेशभूषा करून त्यांच्या विचारांचे प्रकटीकरण केले. यात भारत माता, सुभाषचंद्र बोस,भगतसिंग,

पंडित जवाहरलाल नेहरू,

सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई,सैनिक,पोलीस आदी भुमिका विद्यार्थ्यांनी साकारल्या. चिमुकल्या वक्त्यांची देशभक्तीपर भाषणे,सामूहिक व वैयक्तिक नृत्य अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास उपस्थितांनी वेळोवेळी टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

         या कार्यक्रमाला पालक बंधू भगिनी, इतिहास प्रबोधन संस्थेचे विश्वस्त रविंद्र पाटील,

दिनेश नाईक,मनोहर सोनवणे,सर्व विद्यार्थी,शिक्षक वर्ग,परिसरातील नागरीक उपस्थित होते. 

      कार्यक्रमात सौ.आम्रपाली संदानशिव यांनी स्वागत गीत सादर केले.सौ.माहेश्वरी राजपूत व सौ.काजल राठोड यांनी सुत्रसंचालन केले तर सौ.किरण भदाणे यांनी आभार प्रदर्शन केले.

प्रति,

मा.संपादक/प्रतिनिधी

      कृपया वरील वृत्त प्रसिद्ध करावे ही नम्र विनंती.

हॉटेल पायलच्या गोडाऊनला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

 

अमळनेर : अमळनेर येथील नगरसेवक भरत ललवाणी यांच्या मालकीच्या हॉटेल पायलच्या गोडाऊनला सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचे काम हाती घेतले.

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या आदेशाने अग्निशमन विभाग प्रमुख गणेश गोसावी यांच्या नेतृत्वाखाली दिनेश बिराडे, फारुख शेख, मच्छिंद्र चौधरी, वसीम पठाण व भिका संतांची यांनी घटनास्थळी पोहोचून शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.

सकाळच्या वेळेत गोडाऊनला आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अग्निशमन दलाने वेळ न दवडता केलेल्या जलद कारवाईमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

आगीचे नेमके कारण तसेच झालेल्या नुकसानीचा तपशील समजू शकला नसून, संबंधित विभागाकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

भारतीय सैनिकांच्या मनोधैर्यासाठी अमळनेरमध्ये ‘आप’चा अनोखा उपक्रम; १००० हून अधिक विद्यार्थ्यांचे ‘भाऊ-बहीण’ म्हणून दिलेले प्रेम १५ ऑगस्ट व रक्षाबंधनाला थेट जवानांपर्यंत पोहोचणार!

 

अमळनेर:भारतीय स्वातंत्र्यदिन आणि रक्षाबंधन या पवित्र सणांचे औचित्य साधून अमळनेर तालुका आम आदमी पार्टीच्या (आप) वतीने सीमेवर तैनात असलेल्या भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना रुजवण्यासाठी एक अत्यंत अनोखा व स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत तालुक्यातील शाळांमधील तब्बल १००० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारतीय जवानांच्या त्यागावर व धैर्यावर आधारित निबंध आणि पत्रलेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आपले जवान सीमेवर अत्यंत बिकट परिस्थितीत अहोरात्र जागून देशाचे संरक्षण कसे करतात, त्यांच्या या त्यागामुळेच आपण देशात सुरक्षित राहू शकतो, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

विद्यार्थ्यांच्या लेखणीतून पाझरला देशप्रेमाचा सोहळा

या निबंध व पत्रलेखन स्पर्धेत अमळनेर शहरातील कन्या शाळा, साने गुरुजी हायस्कूल, जी. एस. हायस्कूल आणि के. डी. गायकवाड हायस्कूल या शाळांमधील इयत्ता ८ वी, ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांनी आवर्जून भाग घेतला. जवानांच्या संघर्षाची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी आपल्या भावना कागदावर उतरवल्या. “तुमच्यामुळेच आमचा प्रत्येक दिवस सुरक्षित आहे,” अशा शब्दांत विद्यार्थ्यांनी सैनिकांप्रती आदर व कृतज्ञता व्यक्त केली.

रक्षाबंधन व १५ ऑगस्टलाच सैनिकांना मिळणार विद्यार्थ्यांची ही अनोखी भेट!

विद्यार्थ्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने लिहिलेले हे सर्व निबंध आणि भावुक संदेश रक्षाबंधन व १५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिनी) थेट सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. “एक भाऊ-बहीण म्हणून आम्ही पाठवलेली ही छोटीशी भेट” या भावनेतून विद्यार्थ्यांनी हे संदेश लिहिले आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबापासून दूर असलेल्या जवानांना स्वातंत्र्यदिनी आणि रक्षाबंधनालाच आपल्या देशातील तरुण पिढीचे हे प्रेम व पाठिंबा मिळाल्याने त्यांचे मनोबल नक्कीच द्विगुणित होईल.

आम आदमी पार्टी अमळनेर तालुक्याच्या वतीने राबवण्यात आलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी असे उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.