अमळनेरकरांचे पाणी संकट तूर्तास टळले ; नगरपरिषदेचे ५० लाखांचे आवर्तन खर्चातून बचत नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या नियोजनाला यश ; तापी नदीतील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत
अमळनेर प्रतिनिधी : अमळनेर शहराला जळोद–कलाली योजनेद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा जलस्तर खालावल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. मे महिन्याच्या तीव्र उन्हामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊन आवर्तनाची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच तापी नदीत पुन्हा पाणी उपलब्ध झाल्याने अमळनेरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांचा पाणीप्रश्न तूर्तास मार्गी लागला आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांच्या अभ्यासपूर्ण नियोजनामुळे नगरपरिषदेला आवर्तनासाठी खर्च करावे लागणारे तब्बल ४५ ते ५० लाख रुपये वाचल्याचे मत पाणीपुरवठा सभापती कैलासतात्या पाटील यांनी व्यक्त केले. पाणीटंचाईचे संभाव्य संकट ओळखून प्रशासनाने वेळेवर हालचाली केल्याने शहरावर मोठे आर्थिक ओझे येण्यापासून बचाव झाला आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर अनवर्डे परिसरात काहींनी अवैध बंधारा व रस्ता तयार केल्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळित झाला होता. ही गंभीर बाब समोर येताच नगराध्यक्ष डॉ. बाविस्कर यांनी तातडीने उपाध्यक्ष प्रशांत निकम यांना तहसीलदार चोपडा, मंडळ अधिकारी तसेच संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्याच्या सूचना दिल्या.
प्रशासनाने तात्काळ कारवाई करत अवैध रस्ता व बंधारा हटवून पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरळीत केला. त्यामुळे नगरपरिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आज दि. ७ मे २०२६ रोजी भर उन्हात उपाध्यक्ष, सभापती तसेच दोन्ही गटांतील नगरसेवकांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. अनवर्डे नदी पात्रात स्वतः उपस्थित राहून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याने प्रशासनाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
याचबरोबर नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांनी तापी नदीच्या जळोद पात्रात पाण्याची साठवण करण्यासाठी तात्पुरता बंधारा उभारण्याच्या सूचनाही दिल्या असल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे मे महिन्यासारख्या कठीण कालावधीत जळोद येथील दोन्ही पंप पूर्ण क्षमतेने सुरू असून कलाली डोह अद्याप सुरू करण्याची वेळ आलेली नसल्याने नगरपरिषदेच्या नियोजनाचे कौतुक केले जात आहे.
अमळनेर शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषद यंत्रणा समन्वयाने कार्यरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
