ब्रेकिंग
पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू 

 

अमळनेर :- शहरातील चोपडा रस्त्यावर असलेल्या खदानीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सिंधी कॉलनीतील तीन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी घडली असून या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसर तसेच संपूर्ण अमळनेर शहरावर शोक कडा पसरली असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

                मृत पावलेल्या मुलांची नावे अनुक्रमे मानव बंटी रत्नांनी, कार्तिक विकी उधवानी, आणि दिनेश विजय पंजवानी अशी आहेत. आज दुपारच्या सुमारास हे तिघेही मित्र खदानित एकत्र पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचा अंदाज आहे.

               घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तसेच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित यंत्रणा आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली. या दुर्दैवी घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची राज्य शिष्यवृत्ती व इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाडमध्ये दैदिप्यमान कामगिरी; विद्यार्थ्यांनी उंचावला अमळनेरचा मान

 

अमळनेर | प्रतिनिधी

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यंदाच्या महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षा या दोन्ही प्रतिष्ठित परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे शाळेसह संपूर्ण अमळनेर शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्य शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलचे एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांनी यश मिळवत उत्तीर्णतेची नोंद केली. विशेष म्हणजे पाटील आरव विठ्ठल (इयत्ता ५ वी) व भामरे श्रावणी हेमंत (इयत्ता ५ वी) हे दोन्ही विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून त्यांना लवकरच शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.

याचबरोबर इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षेत देखील पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी भामरे श्रावणी हेमंत हिने राज्यात १६ वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिला स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र व ₹१००० ची रोख पारितोषिक रक्कम शाळेचे मुख्याध्यापक जे. एस. देवरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. तसेच यश चौधरी (इयत्ता ५ वी) यालाही ऑलिम्पियाड परीक्षेतील यशाबद्दल स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, स्वाती माळी, पी. व्ही. महाजन, वाय. पी. ओवे, व्ही. एस. अमृतकर, डिंपल देसाई, प्रशांत वंजारी, एस. एस. पारधी तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन, परिश्रम आणि सहकार्य लाभले.

पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत शाळेचा आणि अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ( शरद पवार गट ) चे शहर सरचिटणीस आप्पासाहेब चिंधु वानखेडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा 

 

अमळनेर :- येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस आप्पासाहेब शिंदे ओंकार वानखेडे , यांचा वाढदिवस पक्षाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी माजी आमदार व पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. बी एस पाटील यांच्या हस्ते वानखेडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच आबासाहेबांनी वानखेडे यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य तसेच सामाजिक व राजकीय कार्यात यश मिळो अशा शुभेच्छा दिल्या.

             या कार्यक्रमास माजी आमदार डॉ. बी एस पाटील, उपनगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष प्रशांत निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर, शहर कार्याध्यक्ष जाकिर शेख, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष मकसूद पठाण , लोकजागर न्यूजचे संपादक हृदयनाथ मोरे, पत्रकार संदीप सोनवणे, अजय भामरे, तसेच सिद्धार्थ सोनवणे, मारुती दादा यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेरचे आध्यात्मिक वैभव आणि वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी आता शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने आणि राज्य शासनाच्या भक्कम सहकार्याने मंदिराचे भव्य-दिव्य नवनिर्माण करण्यात येईल, असा विश्वास माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी मंदिर परिसराच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.

मंदिराला भेट दिल्यानंतर आमदार अनिल पाटील यांनी थेट भडगाव येथे वारीमध्ये सहभागी होत परमपूज्य संत प्रसाद महाराज यांची भेट घेतली. यावेळी मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. या भेटीवेळी मंदिराचे विश्वस्त, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

श्रद्धास्थानाचे वैभव पूर्ववत करण्यासाठी शासनाच्या सर्व स्तरांवर पाठपुरावा

मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आमदार अनिल पाटील म्हणाले की, श्री संत सखाराम महाराज वाडी मंदिर हे केवळ अमळनेरचे नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या पवित्र स्थळाचे नवनिर्माण अत्याधुनिक सुविधा आणि पारंपरिक वास्तुशैली जपत लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

सध्या संस्थान पर्यटन विभागाच्या ‘ब’ वर्गात असून, त्याला ‘अ’ वर्गाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यामुळे अधिक निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होईल. यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना आमदारांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

विश्वस्त मंडळासोबतही पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. दुर्घटनेच्या वेळी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आमदारांनी अग्निशमन विभागाचे विशेष कौतुक केले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, संस्थानचे राजेंद्र भामरे, महेश कोठावदे, उदय देशपांडे, अतुल कुलकर्णी, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा संत प्रसाद महाराजांशी थेट संवाद; पुनर्बांधणीसाठी शासनाची ठाम भूमिका

दुर्घटनेमुळे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारशाचे मोठे नुकसान झाले असून, लाखो वारकरी आणि भाविकांच्या भावना या घटनेमुळे दुखावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी परमपूज्य संत प्रसाद महाराज यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधताना दिली.

भडगाव येथे आमदार अनिल पाटील हे महाराजांच्या भेटीस गेले असताना त्यांच्या मोबाईलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महाराजांशी थेट संवाद साधत शासनाची भूमिका स्पष्ट केली.

मुख्यमंत्र्यांकडे ₹१५ कोटींच्या विशेष निधीची मागणी

यावेळी आमदार अनिल पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून ₹१५ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच विधिमंडळातही पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपत्कालीन निधीची मागणी करण्यात आली असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य शासन या विषयावर सकारात्मक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावर परमपूज्य संत प्रसाद महाराज म्हणाले, “साक्षात विठ्ठल माऊली आणि लाखो वारकरी भक्तांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असल्याने कोणतीही चिंता नाही. मंदिराचे वैभव पूर्ववत उभे राहील, असा पूर्ण विश्वास आहे.”

महाराजांचे आशीर्वाद घेतल्यानंतर आमदार अनिल पाटील दिंडीकडे मार्गस्थ झाले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read More विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपाआशीर्वादाने संत सखाराम महाराज वाडी मंदिराचे होणार भव्य नवनिर्माण; आमदार अनिल पाटील यांचा शब्द, शासनाकडून मोठ्या निधीसाठी जोरदार पाठपुरावा

अमळनेरकरांना शुद्ध पाण्याची मोठी भेट! वर्षानुवर्षे प्रलंबित जलकुंभ स्वच्छतेचा धडाका; नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी दिलेला शब्द केला पूर्ण

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जलकुंभ (पाण्याच्या टाक्या) स्वच्छतेच्या कामाला अखेर वेग आला आहे. शहरवासीयांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेकडून जलकुंभ स्वच्छतेची विशेष मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे.

मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभाची यशस्वी साफसफाई पूर्ण करण्यात आली असून, आता तांबेपुरा येथील जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू झाले आहे. यानंतर शहरातील उर्वरित सर्व जलकुंभ टप्प्याटप्प्याने स्वच्छ करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे मार्गदर्शन आणि भक्कम पाठबळ

शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व पाठपुरावा महत्त्वाचा ठरला आहे. नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या मोहिमेला गती मिळाल्याचे बोलले जात आहे.

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांची ‘आरोग्य प्रथम’ भूमिका

लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. परिक्षित बाविस्कर यांनी नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत जलकुंभ स्वच्छता मोहिमेस तातडीने मंजुरी दिली. “शहरवासीयांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होणार नाही,” या भूमिकेतून त्यांनी प्रशासनाला आवश्यक निर्देश देत कामाला गती दिली.

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांचे नियोजन

मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवत जलकुंभ स्वच्छतेचे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी काटेकोर नियोजन केले आहे. प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

दिलेला शब्द पाळला; कैलास नामदेवराव पाटील यांच्यावर नागरिकांचा कौतुकाचा वर्षाव

नगरसेवक तथा पाणीपुरवठा सभापती कैलास नामदेवराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील सर्व जलकुंभांची साफसफाई करून नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करत त्यांनी प्रथम कोर्टमागील जलकुंभाची साफसफाई पूर्ण केली आणि आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम सुरू करून दिलेला शब्द खऱ्या अर्थाने पाळला आहे.

तांबेपुरा परिसरातील नागरिकांनी त्यांच्या या कार्याचे स्वागत करत जाहीरपणे आभार व्यक्त केले. “काम असावे तर असे!” अशा शब्दांत नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले.

जलस्रोतांच्या नियमित स्वच्छतेमुळे शहरवासीयांना अधिक स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार असून, नगरपरिषदेची ही मोहीम नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे.

महात्मा फुले जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त अमळनेरमध्ये वर्षभर ‘विशेष वक्ता’ उपक्रम महात्मा फुले यांच्या विचारांचा जागर; प्रत्येक सहभागीला प्रमाणपत्र, बक्षीस व सन्मान

 

अमळनेर, प्रतिनिधी : “गुलामगिरीतून मुक्त व्हा” असा क्रांतिकारी संदेश देणारे समाजक्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्म द्विशताब्दी वर्षानिमित्त (2026–2027) युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने वर्षभर ‘विशेष वक्ता’ हा अभिनव आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम 5 जुलै 2026 पासून सुरु होणार आहे.

 एप्रिल 2027 पर्यंत प्रत्येक रविवारी महात्मा फुले यांच्या जीवनकार्य, सामाजिक क्रांती आणि विचारांचा अभ्यास करून त्यावर आधारित 10 मिनिटांचे प्रभावी मनोगत सादर करणाऱ्या प्रत्येक सहभागीचा विशेष प्रमाणपत्र, आकर्षक बक्षीस आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पाच मिनिटांचा कालावधी ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा नसून पहिलीतील विद्यार्थ्यांपासून ते 90 वर्षांपर्यंतचे ज्येष्ठ नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची अमळनेर तालुक्यात ‘विशेष वक्ता’ म्हणून नोंद करण्यात येणार असून, भविष्यात विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रबोधनपर कार्यक्रमांमध्ये वक्ता म्हणून संधी उपलब्ध करून देण्याचा प्रतिष्ठानचा मानस आहे.

उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी दर रविवारी सकाळी 9.30 वाजेपर्यंत ‘अभ्यासिका’, प्रा. अशोक पवार, 28, विठ्ठल नगर, पिंपळे रोड, अमळनेर येथे उपस्थित राहावे. या उपक्रमासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नसून समाजातील सर्व घटकांनी या ऐतिहासिक उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क : 9422278256

 

रोटरी क्लब अमळनेरतर्फे डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त अभिष्टचिंतन

 

अमळनेर, दि. १ जुलै २०२६ – रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने १ जुलै रोजी डॉक्टर्स डे व सीए डे निमित्त शहरातील मान्यवर डॉक्टर व चार्टर्ड अकाउंटंट यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. राहुल मुठ्ठे डॉ. कौस्तुभ वानखेडे, डॉ. प्रसन्ना जोशी, डॉ. शरद बाविस्कर, डॉ. जी.एम. पाटील, डॉ. विशाल जोशी, डॉ. प्रीतम जैन, डॉ. किरण बडगुजर, डॉ. अनिल वाणी, डॉ. सौरभ जैन, डॉ. निलेश जैन या डॉक्टरांसह सीए आकाश वर्मा, कीर्ती कोठारी, यांचा गौरव करण्यात आला.

कोरोना काळापासून आजपर्यंत अहोरात्र सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याला सलाम करण्यासाठी आणि आर्थिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या सीएंना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी नूतन अध्यक्ष महेश पाटील व नूतन सचिव , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, चेलारामसैनानी, सनी कोठारी ,कीर्ती कुमार कोठारी, अविनाश अमृतकर,प्रतीक शाह विनोद थोरात आदि रोटरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .अशी बातमी मकसूद बोहरी कळवितात.

 

खान्देशातील वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीनिमित्त उधना–मिरज विशेष रेल्वे; खासदार स्मिता वाघ

 

जळगांव,प्रतिनिधी : आषाढी एकादशी यात्रेनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या खान्देशातील वारकऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–मिरज–उधना विशेष रेल्वे (क्र. 09071/09072) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील वारकरी, भाविक व प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, यासाठी खासदार स्मिताताई वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याने आषाढी वारीसाठी ही विशेष रेल्वे उपलब्ध झाली आहे.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, क्र. (09071)उधना–मिरज विशेष ही गाडी 23 व 24 जुलै 2026 रोजी उधना येथून सकाळी 6.45 वाजता सुटणार आहे. तर क्र. (09072) मिरज–उधना विशेष ही गाडी 24 व 25 जुलै 2026 रोजी मिरज येथून सकाळी 8.40 वाजता उधनाकडे प्रस्थान करणार आहे. या विशेष रेल्वेच्या स्लीपर वर्गाचे आरक्षण 4 जुलै 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार असून, वारकरी व प्रवाशांनी वेळेत आरक्षण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही विशेष रेल्वे उधना, बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, सिंदखेडा, नरडाणा, अमळनेर, धरणगाव, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर मार्गे मिरज अशी धावणार असून, या गाडीला एकूण 24 डबे असतील.

आषाढी वारीसाठी जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील हजारो वारकऱ्यांना या विशेष रेल्वेचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे भाविकांनी वेळेत आरक्षण करून आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. खासदार स्मिताताई वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही विशेष रेल्वे सुरू झाल्याने खान्देशातील वारकरी, भाविक व नागरिकांनी समाधान व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

 

संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आमदार अनिल पाटील यांची विधानभवनात भेट

 

अमळनेरचे आमदार तथा माजी मंत्री मा. अनिल भाईदास पाटील यांनी आज मुंबईतील विधानभवनात मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन, अमळनेर येथील परमपूज्य श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान येथे लागलेल्या भीषण आगीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली. तसेच मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी विशेष बाब म्हणून तातडीने १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी ठाम मागणी केली.

आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की, १ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे २५० वर्षांचा ऐतिहासिक व कलात्मक लाकडी गाभारा पूर्णतः जळून खाक झाला. प्राथमिक अंदाजानुसार जवळपास १५ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना केवळ अमळनेरसाठी नव्हे, तर संपूर्ण खान्देशातील लाखो वारकरी व भाविकांसाठी अत्यंत वेदनादायी आहे. या भीषण दुर्घटनेत मंदिरातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आणि मुख्य मंदिर सुरक्षित राहिले, ही दिलासादायक बाब असली तरी गाभाऱ्याचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभव कायमचे नष्ट झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण होईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.

 लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेचा विषय- खान्देशचे ‘प्रति पंढरपूर’ म्हणून ओळखले जाणारे श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येत्या २५ जुलै रोजी आषाढी एकादशी असल्याने दरवर्षी हजारो वारकरी येथे विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी येतात. अशा परिस्थितीत मंदिराच्या गाभाऱ्याचे झालेले नुकसान वारकरी संप्रदायाच्या भावना खोलवर दुखावणारे आहे. या पार्श्वभूमीवर मंदिराचे त्वरित स्ट्रक्चरल ऑडिट करून, पर्यटन किंवा तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत विशेष प्रस्ताव मंजूर करून १५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच या ऐतिहासिक व आध्यात्मिक वारशाचे जतन करत मंदिराचे पूर्ववैभव पुनर्स्थापित करावे, अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी केली.

 मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद- यावेळी मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत शासन या विषयावर सकारात्मक भूमिका घेईल तसेच आवश्यक त्या कार्यवाहीसाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली. संत सखाराम महाराजांच्या पावन भूमीचे वैभव पुन्हा उभे राहावे, लाखो वारकऱ्यांच्या श्रद्धेला नवे बळ मिळावे आणि हे ऐतिहासिक मंदिर पूर्वीच्या तेजाने पुन्हा उजळून निघावे, हीच सर्व भाविकांची सामूहिक अपेक्षा आहे.

 

Read More संत सखाराम महाराज वाडी संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी १५ कोटींच्या विशेष निधीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; आमदार अनिल पाटील यांची विधानभवनात भेट

“वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”

 

अमळनेर : येथील संपूर्ण महाराष्ट्रात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या संत सखाराम महाराज वाडी संस्थानात १ जुलै रोजी रात्री ८ वाजता शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले. मात्र या संकटाच्या क्षणी धर्म, जात आणि राजकीय भेद विसरून हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी दर्शन घडल्याची भावना प.पू. प्रसाद महाराज यांनी व्यक्त केली आहे.

सध्या आषाढी वारीत असलेल्या प्रसाद महाराजांनी भावनिक संदेशातून अमळनेरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन, प्रशासकीय अधिकारी,अग्निशमन दल, पोलीस अधिकारी, होमगार्ड, नगरपालिकांचे अधिकारी, नगरसेवक,लोकप्रतिनिधी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते,वाडी संस्थांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ,भक्तगण, संस्थांचे सर्व सेवेकरी, तसेच हजारो नागरिकांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले. अमळनेरसह पारोळा, चोपडा, शिरपूर येथील अग्निशमन दल आणि खाजगी वाहनधारकांनीही शर्थीचे प्रयत्न केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांचेही महाराजांनी कौतुक केले. या प्रसंगी दाखविलेला एकोपा भविष्यातही कायम ठेवावा आणि कोणत्याही संकटाला सर्वांनी मिळून सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, भीषण आगीत सभामंडपाचे मोठे नुकसान झाले असले तरी गाभाऱ्यातील देवमूर्ती सुरक्षित राहिल्याने भाविकांनी याला ईश्वरी कृपा मानली आहे. “बरेच काही जळाले, पण देव शाबूत राहिले; यापेक्षा मोठी कृपा कोणती?” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.

आगीत मंदिराचे नुकसान झाले तरी प्रसाद महाराजांनी आषाढी वारी अर्धवट सोडली नाही. “आधी पांडुरंग” ही भूमिका कायम ठेवत त्यांनी दिंडीचा प्रवास सुरूच ठेवला. यापूर्वी स्वतःच्या मातोश्रींच्या निधनाच्या प्रसंगीही वारी सोडून ते परतले नव्हते. पांडुरंगाच्या भक्तीपुढे दुःख, मोह-माया आणि वैयक्तिक वेदना लहान ठरतात, अशी संतपरंपरेची शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून पुन्हा अधोरेखित केली.

“वाडी संस्थानला आग लागल्याचे कळताच अमळनेरकरांनी दाखविलेला एकोपा माझ्यासाठी मोठा आधार आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांनी हातात हात घालून जीवाची पर्वा न करता मंदिर वाचविण्यासाठी प्रयत्न केले. प्रशासन, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी, वाडी संस्थांचे सर्व पदाधिकारी, विश्वस्त मंडळ,भक्तगण, संस्थांचे सर्व सेवेकरी आणि मदतीला धावून आलेल्या प्रत्येक नागरिकाला माझा आशीर्वाद आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत आहात, त्यामुळे मला कसलीही चिंता नाही. ‘आधी पांडुरंग’ या भावनेने माझी वारी सुरूच राहील. मंदिराची पुनर्बांधणीही आपल्या सर्वांच्या एकोप्याने नक्की उभी राहील.”

– प.पू. प्रसाद महाराज, गादीपुरुष, संत सखाराम महाराज वाडी संस्थान, अमळनेर.

 

Read More “वाडी संस्थानच्या आगीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन; ‘तुमच्या एकोप्यामुळे माझी वारी निर्धास्तपणे सुरू’ – प.पू. प्रसाद महाराज”