ब्रेकिंग
अमळनेरात भूमी सुपोषण अभियानाची भक्तीमय सांगता; शेतकऱ्यांना माती संवर्धनाचा संदेश

 

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी, दि. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीया निमित्त भूमी सुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळीच्या मासिक जनजागर सोहळ्याची अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली. अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अभियानाला शेतकरी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या अभियानाचा शुभारंभ वर्षप्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, दि. 19 मार्च 2026 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. महिनाभर चाललेल्या या जनजागर उपक्रमाची सांगता समारंभपूर्वक पार पडली.

सांगता सोहळ्यास प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, कृषिभूषण सौ. राजश्री पाटील, पोलीस पाटील विश्वास महाजन, माजी उपसरपंच पुंजू पाटील, कृषी विभागाचे अधिकारी योगेश वंजारी, दिनेश पाटील, दीपक चौधरी यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विविध गावांतील शेतकऱ्यांनी आणलेल्या मातीचे एकत्रीकरण करून करण्यात आली. या मातीपासून मंडल तयार करून मंत्रोच्चाराच्या माध्यमातून भूमी शुद्धीकरण व अभिमंत्रण विधी पार पडला. गणपती पूजन, संकल्प आणि विधिवत पूजा करून भूमी अभिमंत्रित करण्यात आली.

यानंतर ही अभिमंत्रित माती पाकिटांमध्ये भरून उपस्थित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात वापरण्यासाठी देण्यात आली. यावेळी शेतजमिनीचा पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी माती संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. तसेच हा संदेश गावागावांत पोहोचवून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या चळवळीत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल पाटील व पदमसिंग पाटील यांनी सहकार्य केले.या अभियानामुळे शेतकऱ्यांमध्ये मातीच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होऊन शाश्वत शेतीच्या दिशेने सकारात्मक पाऊल पडत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

test