ब्रेकिंग
“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता “लावलेले प्रत्येक झाड जगलेच पाहिजे” हा दृढ संकल्प करत जयनिल फाउंडेशनने अमळनेर शहरात भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाची सुरुवात केली आहे. “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” हा संदेश देत फाउंडेशनने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा दाखवली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अमळनेर शहर अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावे, तसेच भावी पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण लाभावे या उद्देशाने शेकडो वृक्ष लागवडीचा संकल्प जयनिल फाउंडेशनने केला आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणानंतर झाडांची जबाबदारी स्वीकारणे. अनेक ठिकाणी झाडे लावली जातात; मात्र त्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन जयनिल फाउंडेशनने प्रत्येक वृक्षासाठी ट्री गार्ड, वेळोवेळी खत, आवश्यकतेनुसार पाणी आणि नियमित निगा राखण्याचा निर्णय घेतला असून झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे खरे रक्षण करायचे असेल तर केवळ वृक्षारोपण करून उपयोग नाही, तर प्रत्येक झाड जगवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आमचा भर केवळ लागवडीवर नसून वृक्षसंवर्धनावर आहे. या पावसाळ्यात अमळनेर अधिक हिरवेगार करण्यासाठी आम्ही व्यापक वृक्षलागवड आणि संगोपन मोहीम राबवणार आहोत.”

यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले. “आज जिवंत ठेवलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या वृक्षारोपण अभियानात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलिस काँस्टेबल सुनिल पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील, पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शहरभरातून या उपक्रमाचे कौतुक होत असून “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा प्रभावी संदेश देणारा जयनिल फाउंडेशनचा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील आणि दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या या अभियानामुळे अमळनेरच्या हरित भविष्यास नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *