सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न २६ वर्षांपासून प्रलंबित; पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची डॉ. दीपक पाटील यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
कळमसरे ता.अमळनेर : सात्री गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न तब्बल २६ वर्षांपासून प्रलंबित असून, शासनाने तातडीने या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी पंचायत समिती सभापती तथा शिवसेना अमळनेरचे माजी संघटक व शेतकरी सेना अध्यक्ष श्री. डॉ. दीपक पंढरीनाथ पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दि. ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात सात्री गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सात्री गावाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जागा घेतली असली तरी तब्बल २६ वर्षांनंतरही अनेक कुटुंबांना घरांसह मूलभूत सुविधा मिळालेल्या नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
गावाच्या पुनर्वसनासाठी यापूर्वी जमीन संपादित करण्यात आली होती. मात्र, पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अनेक ग्रामस्थांना अद्यापही अनिश्चिततेचा सामना करावा लागत आहे.
दि. २७ मे २०२२ रोजीच्या पत्रानुसार वाटप प्रक्रिया स्थगित करून पुन्हा सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, २६ वर्षांनंतरही सर्वेक्षण पूर्ण झाले नसल्याने आता पुन्हा नवीन सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल डॉ. पाटील यांनी उपस्थित केला आहे.
पांझरा नदीवर बंधारे उभारण्याची मागणी
सात्री गावाच्या पुनर्वसना सोबतच पांझरा नदीवर मंडळ, मुडी आणि शहापूर येथे केटीवेअर बंधारे उभारून नदीतील पाणी अडवावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर होण्यास तसेच शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल. याबाबत जलसंपदा विभाग, जळगाव यांच्याकडून सर्वेक्षण करून प्रस्तावित कामांना गती देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
सात्री गावाचा पुनर्वसन प्रश्न आणि पांझरा नदीवरील बंधाऱ्यांचा प्रश्न शासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी डॉ. दीपक पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.



