ब्रेकिंग
“फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

 

अमळनेर (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धनाच्या नावाखाली केवळ औपचारिक वृक्षारोपण न करता “लावलेले प्रत्येक झाड जगलेच पाहिजे” हा दृढ संकल्प करत जयनिल फाउंडेशनने अमळनेर शहरात भव्य वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन अभियानाची सुरुवात केली आहे. “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणारही!” हा संदेश देत फाउंडेशनने पर्यावरण रक्षणासाठी प्रत्यक्ष कृतीची दिशा दाखवली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात अमळनेर शहर अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक व्हावे, तसेच भावी पिढीला स्वच्छ व निरोगी वातावरण लाभावे या उद्देशाने शेकडो वृक्ष लागवडीचा संकल्प जयनिल फाउंडेशनने केला आहे.

या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वृक्षारोपणानंतर झाडांची जबाबदारी स्वीकारणे. अनेक ठिकाणी झाडे लावली जातात; मात्र त्यानंतर त्यांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होते. ही बाब लक्षात घेऊन जयनिल फाउंडेशनने प्रत्येक वृक्षासाठी ट्री गार्ड, वेळोवेळी खत, आवश्यकतेनुसार पाणी आणि नियमित निगा राखण्याचा निर्णय घेतला असून झाडे मोठी होईपर्यंत त्यांचे संपूर्ण संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

यावेळी जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजेश पाटील यांनी सांगितले की, “पर्यावरणाचे खरे रक्षण करायचे असेल तर केवळ वृक्षारोपण करून उपयोग नाही, तर प्रत्येक झाड जगवणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. आमचा भर केवळ लागवडीवर नसून वृक्षसंवर्धनावर आहे. या पावसाळ्यात अमळनेर अधिक हिरवेगार करण्यासाठी आम्ही व्यापक वृक्षलागवड आणि संगोपन मोहीम राबवणार आहोत.”

यावेळी त्यांनी नागरिकांनाही आवाहन करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे सांगितले. “आज जिवंत ठेवलेले प्रत्येक झाड उद्याच्या पिढीसाठी अमूल्य ठेवा ठरणार आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

या वृक्षारोपण अभियानात पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाट, चेतन राजपूत, जितेंद्र ठाकूर, नरेंद्र चौधरी, पोलिस काँस्टेबल सुनिल पाटील, आरिफ मेवाती, किरण पाटील, दर्शन पाटील, वेद पाटील, टिल्लू पाटील, प्रशांत पाटील, किशोर महाजन, योगेश राजपूत, वरद कासार, अभिषेक भदाणे, मेहुल चौधरी, राहुल पाटील, भूषण पाटील, भूषण लोहार, विशाल पाटील, पियुष पाटील यांच्यासह जयनिल फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शहरभरातून या उपक्रमाचे कौतुक होत असून “वृक्षारोपणापेक्षा वृक्षसंवर्धन अधिक महत्त्वाचे” हा प्रभावी संदेश देणारा जयनिल फाउंडेशनचा हा उपक्रम इतर सामाजिक संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील आणि दीर्घकालीन दृष्टीकोन स्वीकारणाऱ्या या अभियानामुळे अमळनेरच्या हरित भविष्यास नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Read More “फक्त झाडे लावणार नाही… तर ती जगवणार!” – जयनिल फाउंडेशनचा हरित संकल्प; अमळनेरमध्ये वृक्षसंवर्धनाचा आदर्श उपक्रम

अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

 

अमळनेर | प्रतिनिधी

अमळनेर तालुक्यात महावितरणमध्ये कार्यरत असलेले वायरमन शरद गोसावी यांचा कामादरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली. या घटनेमुळे महावितरण कर्मचारीवर्गासह संपूर्ण अमळनेर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, वीजपुरवठ्याशी संबंधित काम सुरू असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने शरद गोसावी गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

कर्तव्य बजावत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत असून, शरद गोसावी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व शासकीय स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेचे नेमके कारण आणि अपघाताची परिस्थिती याबाबत संबंधित यंत्रणेकडून अधिक तपास सुरू असून, आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.

Read More अमळनेर हादरले! महावितरणच्या वायरमन शरद गोसावी यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू

रोटरी क्लब अमळनेरतर्फे भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; ४०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळाले रंगमंच

 

अमळनेर | दि. १९ जुलै २०२६ — रोटरी क्लब अमळनेरच्या वतीने पी. बी. ए. इंग्लिश मिडीयम शाळा परिसरातील रोटरी हॉल येथे आयोजित करण्यात आलेली भव्य आंतरशालेय चित्रकला स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. अमळनेर शहर व परिसरातील विविध शाळांमधील ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होत आपल्या कल्पकतेचा, रंगसंगतीचा आणि कलात्मक कौशल्याचा अप्रतिम आविष्कार सादर केला.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात चित्रकार व शिल्पकार श्री. प्रल्हाद सोनार (शिरपूर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्त्व, सर्जनशील विचारांची गरज आणि कलेतून व्यक्त होणाऱ्या सामाजिक जाणिवांविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना विविध विषय देण्यात आले होते. या विषयांवर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या चित्रांमधून कल्पनाशक्ती, सामाजिक भान, पर्यावरण जागरूकता आणि रंगांच्या सुरेख मिलाफाचे प्रभावी दर्शन घडले. परीक्षकांनी सर्व कलाकृतींचे बारकाईने परीक्षण करून उत्कृष्ट चित्रांची निवड केली.

या स्पर्धेचे प्रकल्प प्रमुख रोटे. देवांग शाह व रोटे. डॉ. शरद बाविस्कर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण आयोजनाची धुरा सांभाळली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. दिनेश पालवे सर यांनी केले.

यावेळी रोटरी क्लब अमळनेरचे अध्यक्ष रोटे. महेश पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळत असल्याचे सांगितले. सचिव रोटे. प्रशांत निकम यांनी सर्व सहभागी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रोटे. किर्ती कोठारी, रोटे. पूनम कोचर, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. सनी कोठारी, रोटे. सचिन कोठावदे, रोटे. ईश्वर सैनानी, रोटे. अजय रोडगे, रोटे. प्रतीक जैन, रोटे. चेलाराम सैनानी यांच्यासह रोटरी क्लबचे सर्व सदस्य सक्रियपणे उपस्थित होते.

तसेच स्पर्धेच्या आयोजनासाठी पाटील सर, मार्ते मॅडम, परदेशी मॅडम आणि पाठक सर यांच्यासह सर्व चित्रकला शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना रोटरी क्लब अमळनेरतर्फे सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा उपक्रम अविस्मरणीय ठरला. रोटरी क्लब अमळनेरचा हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि सर्जनशीलतेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देणारा ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाविकास आघाडीचा जाहीर पाठिंबा; केंद्र सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध

 

अमळनेर | प्रतिनिधी

दिल्लीतील जंतर-मंतर येथे शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, पेपरफुटीच्या घटना, परीक्षांमधील कथित गैरव्यवहार, शिक्षणावरील वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांसारख्या गंभीर मुद्द्यांवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्ते श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र विकास आघाडी, अमळनेर यांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भात मा. उपविभागीय अधिकारी, अमळनेर यांना निवेदन देऊन शासनापर्यंत भावना पोहोचविण्याची मागणी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, देशभरात वारंवार घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटना व परीक्षांमधील कथित गैरव्यवहाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी श्री. सोनम वांगचुक दिल्लीच्या जंतर-मंतर येथे शांततापूर्ण मार्गाने उपोषण करत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने ताब्यात घेऊन सफदरजंग रुग्णालयात दाखल केल्याची घटना लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असून, या कारवाईचा महाविकास आघाडीने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडीच्या निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार, पेपरफुटी, शिक्षणाचा वाढता खर्च आणि विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण या देशाच्या भविष्याशी निगडित अत्यंत गंभीर समस्या आहेत. या प्रश्नांवर सरकारने ठोस उपाययोजना करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या व्यक्तींवर दडपशाहीचे धोरण अवलंबणे ही लोकशाहीसाठी धोकादायक बाब असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या घटक पक्षांच्या वतीने अमळनेर तालुका महाविकास आघाडीने श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

या प्रसंगी डॉ. बी. एस. पाटील, डॉ. रविंद्र पाटील, चिंधू वानखेडे, डी. एम. पाटील, बी. के. सूर्यवंशी, धनगर दला पाटील, सुरेश पिरन पाटील, प्रा. अशोक पाटील, अरुण बाबूराव देशमुख, संदीप बाबूराव घोरपडे, अनंत निकम, संतोष पाटील, बन्सीलाल भागवत, चंद्रशेखर भावसार, नितीन निळे, मनोज पाटील, तुषार संधनशिव आणि शरद पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविकास आघाडीने शासनाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, तसेच श्री. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरील दडपशाही थांबवून लोकशाही मार्गाने संवाद साधावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

 

अमळनेर | प्रतिनिधी

संस्कृत साहित्याची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख असून, महाकवी कालिदास यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेने या परंपरेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. ‘मेघदूत’ हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या उत्कट प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आणि निसर्गप्रेमाचा सर्वोच्च आविष्कार आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.

महाकवी कालिदास दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महाविद्यालय, अमळनेर येथे ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती, अमळनेर शाखेच्या वतीने करण्यात आले.

आपल्या व्याख्यानात दिनेश नाईक यांनी सांगितले की, महाकवी कालिदास यांनी कठोर साधना, अभ्यास आणि प्रतिभेच्या जोरावर संस्कृत साहित्यात अजरामर स्थान प्राप्त केले. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्गाचे रमणीय सौंदर्य, पर्वत, नद्या, ऋतू, प्रेम, शृंगार, मानवी भावना आणि तत्कालीन समाजजीवनाचे अत्यंत जिवंत व प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या साहित्याची सोप्या पण प्रभावी शब्दरचनेमुळे आणि विलक्षण कल्पनाशक्तीमुळे आजही जगभरातील वाचकांना भुरळ पडते.

ते पुढे म्हणाले की, महाकवी कालिदास यांनी दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके अशी सात अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. त्यापैकी ‘मेघदूत’ हे महाकाव्य त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या साहित्याचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून भारतीय साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध विषयांवरील दर्जेदार साहित्याचे नियमित वाचन करून आपले ज्ञान, विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य भारती अमळनेर शाखेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. वाचन, लेखन आणि प्रभावी संवाद कौशल्ये ही आधुनिक युगातील यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर सुनिल वाघ यांनी आभार मानले.

या प्रसंगी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Read More ‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

समाजातील दुर्बलांना ‘नवदृष्टी’ देणारे कार्य प्रेरणादायी; मंगळग्रह सेवा संस्थेचे योगदान गौरवास्पद : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मंगळग्रह सेवा संस्था व आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर; ७२ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी पात्र

 

अमळनेर | प्रतिनिधी

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असून, मंगळग्रह सेवा संस्था, अमळनेर आणि पनवेल (जि. रायगड) येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येत असलेले मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया अभियान हे समाजाला ‘नवदृष्टी’ देणारे अत्यंत प्रेरणादायी व गौरवास्पद कार्य आहे, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले.

रविवार, दि. १९ जुलै रोजी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर आणि ‘सीईओ’ आर. जी. चव्हाण उपस्थित होते.

श्रीकांत धिवरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील अनेक गरजू नागरिकांना डोळ्यांच्या उपचारांसाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी आयोजित होणाऱ्या या मोफत शिबिरातून हजारो रुग्णांना नवजीवन आणि नवदृष्टी मिळत आहे. आतापर्यंत जवळपास १,२०० हून अधिक रुग्णांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा प्रकाशाची अनुभूती देण्याचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे.

शिबिरादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. गुरुप्रीतसिंग राठोड, डॉ. विजय बाम्हणे, डॉ. अनिल मुंडे तसेच सहाय्यक प्राची गायकवाड आणि नेत्रा गोडवे यांनी नागरिकांची नेत्र तपासणी केली. या शिबिरात एकूण १३७ नागरिकांनी सहभाग नोंदविला. सखोल वैद्यकीय तपासणीनंतर ७२ रुग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले. पात्र रुग्णांची आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय नोंदणी पूर्ण करण्यात आली.

यावेळी उपस्थित रुग्णांच्या हस्ते नेत्रतज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. तसेच पात्र ठरलेल्या सर्व रुग्णांना पनवेल येथील आर. जे. शंकरा आय हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे मोफत शस्त्रक्रियेसाठी पाठविण्याची व्यवस्था मंगळग्रह सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आली. हे सर्व रुग्ण सायंकाळी श्री मंगळग्रह मंदिर येथून पनवेलकडे रवाना झाले. शस्त्रक्रियेनंतरचा उपचार, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सुविधा देखील रुग्णालयामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंगळग्रह सेवा संस्थेचे विश्वस्त मंडळ, सेवेकरी आणि वैद्यकीय पथकाने विशेष परिश्रम घेतले. उपस्थित नागरिकांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत भविष्यातही अशाच आरोग्यविषयक शिबिरांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांनी सांगितले की, “समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा मिळावी, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर नियमितपणे आयोजित केले जाते. भविष्यातही विविध आरोग्यविषयक व समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविले जातील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहसचिव दिलीप बहिरम यांनी केले.

संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेची श्रीकांत धिवरे यांनी केली पाहणी

शिबिरानंतर जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सपत्नीक श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील संत श्री सखाराम महाराज रोपवाटिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी गांडूळ खत प्रकल्प, गोवरी निर्मिती विभाग, निसर्गसज्ज बैठक विभाग, गुलाब बाग, सेंद्रिय शेती, गोसेवा विभाग आदी उपक्रमांची सविस्तर पाहणी केली.

मंगळग्रह सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून या विविध प्रकल्पांची माहिती जाणून घेतल्यानंतर श्रीकांत धिवरे यांनी संस्थेच्या पर्यावरणपूरक, समाजोपयोगी आणि अभिनव उपक्रमांचे तोंडभरून कौतुक करत अशा कार्यातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे गौरवोद्गार काढले.

‘सुवर्णक्षणात’ जीवदानासाठी लायन्स क्लबचा पुढाकार; अमळनेर पोलिसांना स्ट्रेचर व फर्स्ट एड किट भेट ‘झिरो फॅटॅलिटी’ मोहिमेला बळ; अपघातग्रस्तांना तातडीची मदत, पोलीस ठाण्यात वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

 

अमळनेर | प्रतिनिधी

रस्ते अपघातातील जखमींना ‘सुवर्णक्षणात’ (Golden Hour) तातडीची मदत मिळून मौल्यवान जीव वाचावेत, या सामाजिक उद्देशाने लायन्स क्लब, अमळनेर यांनी जळगाव जिल्हा पोलिसांच्या ‘झिरो फॅटॅलिटी कॉन्सेप्ट’ उपक्रमाला मोलाचे बळ दिले. क्लबच्या वतीने अमळनेर शहर पोलीस ठाण्यास दोन फोल्डेबल स्ट्रेचर आणि दोन फर्स्ट एड किट बॉक्स भेट देण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उपक्रमात पोलीस ठाण्याच्या दोन्ही शासकीय वाहनांमध्ये स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्य ठेवण्यात आले. त्यामुळे अपघातस्थळी जखमींना सुरक्षितपणे हलविणे आणि तातडीचे प्रथमोपचार देणे अधिक प्रभावी व जलद होणार आहे.

शहर व परिसरातील अपघातांमध्ये मदत करताना स्ट्रेचर व प्रथमोपचार साहित्याची कमतरता जाणवत असल्याची बाब पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत क्लबने या सूचनेची तात्काळ दखल घेत आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.

यावेळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम म्हणाले की, “अपघातग्रस्तांना वेळेवर मदत मिळणे हेच सर्वात मोठे समाजकार्य आहे. लायन्स क्लबने दिलेल्या स्ट्रेचर व फर्स्ट एड किटमुळे ‘सुवर्णक्षणात’ जखमींना मदत करणे अधिक परिणामकारक ठरणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यास याचा निश्चितच हातभार लागेल.”

कार्यक्रमानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या सामाजिक उपक्रमासाठी लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, प्रोजेक्ट चेअरमन सुनील चौधरी, अभिषेक (राज) जैन, रजनीश वरलानी आणि प्रदीप पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला.

कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, डॉ. मिलिंद नवसारीकर, महेंद्र पाटील, एस. डी. भरुचा, जितेंद्र जैन, प्रशांत सिंघवी, शेखर धनगर, डॉ. रवींद्र जैन, रवींद्र कॉलरा, प्रकाश शहा, कुमारपाल कोठारी, प्रकाश जैन, चंद्रकांत महाजन, दिनेश मणियार, दिलीप गांधी, विनोद अग्रवाल, पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, नामदेव बोरकर, शरद काकलीज, पोलीस हवालदार हितेश बेहरे, सिद्धार्थ शिसोदे, भटुसिंग तोमर, प्रमोद पाटील, योगेश बागुल यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.

लायन्स क्लबच्या या सामाजिक योगदानाबद्दल पोलीस प्रशासनाने समाधान व्यक्त करत, सामाजिक संस्था आणि पोलीस प्रशासनाच्या अशा समन्वयातून अपघातग्रस्तांना वेळेत मदत मिळून ‘झिरो फॅटॅलिटी’चे उद्दिष्ट साध्य करण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.

अमळनेरच्या भैय्यासाहेब मगर यांची महाराष्ट्र राज्य पीटीए क्लासेस संघटनेच्या कार्याध्यक्षपदी निवड साई इंग्लिश अकॅडमीच्या संचालकांवर राज्यस्तरीय जबाबदारी; शिक्षण क्षेत्रातील कार्याची दखल, अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा

 

अमळनेर : शिक्षण क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य, प्रभावी नेतृत्व आणि संघटन कौशल्याच्या जोरावर अमळनेरने पुन्हा एकदा राज्यस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. येथील साई इंग्लिश अकॅडमी कोचिंग क्लासेसचे संचालक भैय्यासाहेब मगर यांची प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य या प्रतिष्ठित संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या मानाच्या निवडीमुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढला असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन (पीटीए) महाराष्ट्र राज्य ही राज्यातील कोचिंग क्लासेस संचालकांची सर्वांत जुनी, प्रतिष्ठित आणि शिखर संघटना म्हणून ओळखली जाते. सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये विस्तारले असून हजारो कोचिंग क्लासेस संचालक या संघटनेचे सभासद आहेत. कोचिंग क्लासेस क्षेत्रातील विविध प्रश्न, शैक्षणिक गुणवत्ता, संस्थाचालकांचे हित आणि संघटनात्मक बळकटीसाठी ही संघटना सातत्याने कार्यरत आहे.

संघटनेच्या नव्या कार्यकारिणीत सातारा येथील डॉ. पी. कुलकर्णी यांची अध्यक्षपदी, तर वाई येथील डॉ. नितीन कदम यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत भैय्यासाहेब मगर यांच्यावर कार्याध्यक्ष म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही निवड उत्तर महाराष्ट्रासह अमळनेरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

भैय्यासाहेब मगर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि कोचिंग क्लासेस क्षेत्राच्या उन्नतीसाठी सातत्याने उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा, प्रशासकीय अनुभवाचा आणि शैक्षणिक योगदानाचा लाभ आता राज्यभरातील कोचिंग क्लासेस संचालकांना मिळणार असल्याचा विश्वास शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

या मानाच्या निवडीनंतर भैय्यासाहेब मगर यांच्यावर शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, कोचिंग क्लासेस संचालक, विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

तणावमुक्त जीवनशैलीच निरोगी आरोग्याचा पाया; सकारात्मक विचार व सात्त्विक आहाराची गरज : हेमंतकुमार भदाणे श्री मंगळग्रह मंदिरात आयसीडीएसची जिल्हास्तरीय कार्यशाळा; जळगाव जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती

 

अमळनेर : आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमुळे तणाव प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. त्यातच बदलती आहारशैली, फास्टफूडचे वाढते प्रमाण आणि मानसिक तणाव यामुळे अनेक शारीरिक व मानसिक आजारांना आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे सकारात्मक विचार, सात्त्विक आहार, नियमित दिनचर्या आणि मानसिक संतुलन यांचा अंगीकार केल्यासच निरोगी व आनंदी जीवन जगता येईल, असे प्रतिपादन जळगाव जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंतकुमार भदाणे यांनी केले.

येथील श्री मंगळग्रह मंदिरात शनिवार, दि. १८ जुलै रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यशाळेला जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील बालविकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ), पर्यवेक्षिका तसेच महिला व बालविकास विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना हेमंतकुमार भदाणे यांनी तणाव व्यवस्थापन, मानसिक आरोग्य, सकारात्मक विचारसरणी, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली या विषयांवर प्रभावी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. बदलत्या जीवनशैलीत मानसिक स्वास्थ्य जपण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित करत उपस्थितांना दैनंदिन जीवनात आरोग्यदायी सवयी अंगीकारण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी श्री मंगळग्रह मंदिराचे धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक महत्त्व विशद केले. तसेच मंदिरामार्फत समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे सांगितले.

कार्यक्रमात मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम यांनी मनोगत व्यक्त करत अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या नेतृत्वाखाली संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच श्री मंगळग्रह मंदिरातील पूजाविधी, धार्मिक परंपरा आणि सामाजिक उपक्रमांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

कार्यक्रमात अमळनेरच्या सीडीपीओ सौ. हेमलताताई पाटील, पर्यवेक्षिका सौ. सुजाताताई चौधरी, सौ. भाग्यश्रीताई पाटील, श्रीमती प्रीतीताई देवरे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचा हेमंतकुमार भदाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी सौ. वर्षा भदाणे, पाचोऱ्याच्या सीडीपीओ संत मॅडम, जळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील सीडीपीओ, पर्यवेक्षिका व महिला व बालविकास विभागातील अधिकारी उपस्थित होते. तसेच मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, विश्वस्त डी. एस. सोनवणे, मंगल सेवेकरी आर. टी. पाटील, व्ही. व्ही. कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी यांनी केले, तर श्रीमती प्रीतीताई देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

लायन्स क्लब अमळनेरचा सामाजिक पुढाकार ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप; ग्रामीण भागातील मातांना बसभाड्याचीही मदत

 

अमळनेर | प्रतिनिधी

तालुक्यातील कुपोषणाच्या गंभीर समस्येची दखल घेत लायन्स क्लब, अमळनेर यांनी समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली. जून २०२६ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात अमळनेर तालुक्यात ३७ बालके तीव्र कुपोषित (SAM) आणि २१४ बालके मध्यम कुपोषित (MAM) असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ९ जुलै रोजी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल घेत लायन्स क्लबने पुढाकार घेत ३७ तीव्र कुपोषित बालकांना पोषण आहाराचे वाटप केले.

शुक्रवारी (दि. १७) सकाळी जी. एस. हायस्कूल येथील लायन्स हॉलमध्ये झालेल्या या उपक्रमात प्रत्येक बालकाला २०० ग्रॅम प्रोटीन पावडर आणि राजगिरा लाडू देण्यात आले. विशेष म्हणजे, दूरवरच्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्व मातांना लायन सुनील चौधरी यांच्या वतीने बसभाडे देऊन आर्थिक मदतीचाही हात पुढे करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद, जळगावचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंतराव भदाणे, पंचायत समिती, अमळनेरचे गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रेमलता पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष जितेंद्र पारख, ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संदीप जोशी, महेंद्र पाटील, तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि लायन्स क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेमंतराव भदाणे यांनी कुपोषण ही केवळ उपचारांची नव्हे, तर सामाजिक आणि आरोग्यविषयक जाणीवेची समस्या असल्याचे सांगितले. गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत माता व बालकाच्या पोषणाची विशेष काळजी घेणे, बालकांना पचनशक्ती वाढविणारा सकस आहार देणे आणि कुटुंब नियोजनाबाबत प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अशा सेवाभावी कार्यासाठी लायन्स क्लब, अमळनेरचे विशेष कौतुक करत समाजसेवेचा हा वसा अखंड सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ज्येष्ठ लायन डॉ. डिगंबर महाले यांनी, “समाजातील वंचित, गरजू आणि गरजवंत घटकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. समाजसेवा हीच आमची खरी ओळख आणि परंपरा आहे,” असे सांगितले.

अध्यक्ष जितेंद्र पारख यांनी भविष्यातही अशा सामाजिक आणि लोकहिताच्या उपक्रमांसाठी लायन्स क्लब सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही देत गरजूंसाठी मदतीचे दरवाजे कायम खुले असल्याचे नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मिलिंद नवसारीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रेमलता पाटील यांनी मानले.

यावेळी सुनील चौधरी, दिनेश मणियार, चंद्रकांत महाजन, विजय पारख, प्रितेश पारख, जितेंद्र जैन, महावीर पहाडे, प्रदीप जैन, प्रकाश जैन, राज जैन, रोनक दोधिवाला यांच्यासह लायन्स क्लबचे अनेक सदस्य उपस्थित होते.