अस्थी विसर्जनाऐवजी शेतात वृक्षारोपण; प्रमिलाताईंच्या स्मृतींना पर्यावरण संवर्धनाची अनोखी आदरांजली
अमळनेर : श्री भद्रा प्रतीक उद्योग समूहाच्या प्रवर्तक संचालिका सौ. प्रमिलाताई सुरेश साळी यांचे ३ सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या स्मृतींना अनोखी आणि पर्यावरणपूरक आदरांजली वाहत पारंपरिक अस्थी विसर्जनाला फाटा देत त्यांच्या अस्थींचे विसर्जन न करता शेतजमिनीत वृक्षलागवड करून त्या मातीत पेरण्यात आल्या. या अनोख्या उपक्रमातून ‘मृत्यूनंतरही निसर्गाशी नाते कायम’ असा प्रेरणादायी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
प्रमिलाताईंच्या अस्थींचे नदी अथवा जलाशयात विसर्जन करण्याऐवजी शेतात वृक्षारोपण करून त्या वृक्षाच्या मातीत अस्थी पेरण्याचा संकल्प त्यांच्या परिवाराने केला. या माध्यमातून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जपण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा विधायक विचार समाजासमोर ठेवण्यात आला.
हा स्तुत्य उपक्रम त्यांचे बंधू नगरसेवक प्रताप साळी, अर्बन बँकेचे संचालक दीपक साळी, संदीप साळी तसेच साळी परिवाराच्या संकल्पनेतून साकारण्यात आला. कुटुंबीयांनी दुःखाच्या प्रसंगीही सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपत घेतलेला हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
एका व्यक्तीच्या स्मृती वृक्षाच्या रूपाने जिवंत ठेवण्याची ही संकल्पना भावनिकतेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा आदर्श संदेश देणारी आहे. भविष्यात हा वृक्ष वाढत असताना त्याच्या सावलीत, हिरवाईत आणि प्राणवायूत प्रमिलाताईंच्या स्मृती जिवंत राहतील, अशी भावना परिवाराकडून व्यक्त करण्यात आली.
अस्थी विसर्जनाच्या पारंपरिक प्रथेला पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक दिशा देणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत असून, ‘अंत्यसंस्कारानंतरही निसर्गासाठी काहीतरी देऊया’ हा विचार समाजात रुजविण्यास या उपक्रमाची प्रेरणा मिळणार आहे.


