ब्रेकिंग
रेल्वे स्थानकावर मानवतेचा महायज्ञ! ‘जैन सोशल ग्रुप’सह शहरातील सामाजिक संस्थांकडून अन्नछत्र; अडकलेल्या १२०० प्रवाशांना दिलासा

अमळनेर (प्रतिनिधी): महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने काही गाड्या रद्द करण्यात आल्या, काहींचे मार्ग बदलण्यात आले, तर अनेक गाड्या अमळनेर रेल्वे स्थानकावरच तासन्‌तास खोळंबून राहिल्या. त्यामुळे हजारो प्रवासी अमळनेरमध्ये अडकून पडले. लहान मुले, वृद्ध, महिला आणि आजारी प्रवाशांसमोर अन्न, पाणी आणि वैद्यकीय मदतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता.

अशा संकटाच्या वेळी ‘जैन सोशल ग्रुप’ (JSG) आणि अमळनेर शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी एकत्र येत मानवतेचा अनोखा आदर्श घालून दिला. रेल्वे स्थानकावरच भव्य अन्नछत्राचे आयोजन करून अडकलेल्या प्रवाशांसाठी गरमागरम भोजन, नाश्ता, चहा, पिण्याचे पाणी तसेच आवश्यक वैद्यकीय मदतीची व्यवस्था करण्यात आली.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपसोबत लायन्स क्लब, लायनेस क्लब, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, परिवर्तन ग्रुप आणि शहरातील इतर अनेक सामाजिक संस्थांनी खांद्याला खांदा लावून निस्वार्थ भावनेने काम केले. संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह स्वयंसेवकांनी दिवसभर रेल्वे स्थानकावर थांबून प्रवाशांची सेवा केली.

याशिवाय अमळनेरमधील अनेक नागरिकांनीही आपापल्या परीने मोठे योगदान दिले. कोणी अन्नधान्य उपलब्ध करून दिले, कोणी वाहनांची व्यवस्था केली, तर अनेकांनी श्रमदान करून सेवा कार्यात सहभाग नोंदवला. संकटाच्या क्षणी संपूर्ण शहरच मदतीसाठी एकवटल्याचे प्रेरणादायी चित्र रेल्वे स्थानकावर पाहायला मिळाले.

या अन्नछत्राचा लाभ सुमारे १,००० ते १,२०० प्रवाशांनी घेतला. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी प्रवाशांची काळजी घेत त्यांच्यासाठी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली. अचानक मिळालेल्या या मदतीमुळे अनेक प्रवासी भावूक झाले. “अमळनेरकरांनी आम्हाला परक्या शहरातही घरच्यांसारखी माया दिली,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी सर्व सामाजिक संस्था आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.

या सेवाकार्यात जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष सचिन पारख, सचिव महावीर सिंघवी तसेच जैन सोशल ग्रुपचे सर्व सभासद सक्रियपणे सहभागी झाले होते. या मानवतावादी उपक्रमाची माहिती जैन सोशल ग्रुपचे पीआरओ कीर्तीकुमार कोठारी यांनी दिली.

संकटाच्या काळात जात, धर्म, पंथ आणि संघटनांच्या सीमा बाजूला ठेवत अमळनेरकरांनी दाखवलेली एकजूट, सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरली असून, “माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म” हा संदेश या उपक्रमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाला.

द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८२ व्या वर्धापन दिनाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थिनींसह क्रीडा विजेत्यांचा गौरव

 

केक कापून, फुगे आकाशात झेपावत आणि ‘वर्धापन दिन चिरायू होवो’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला

अमळनेर (प्रतिनिधी) : खान्देश शिक्षण मंडळ संचलित द्रौपदीबाई रामचंद्र शेठ कन्या शाळेचा ८२ वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या आणि अभिनव पद्धतीने मोठ्या उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थीनी, शिक्षक, माजी विद्यार्थिनी, पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याने शाळेच्या समृद्ध परंपरेला उजाळा मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद जगदीश अग्रवाल होते. प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी सौ. रोहिणी सुनील देशपांडे तसेच सामाजिक कार्यकर्त्या सौ. शुभांगी निलेश राजपूत उपस्थित होत्या.

यावेळी ताईसाहेब माधुरी पाटील, कमलजी कोचर, ताईसाहेब वसुंधरा लाडगे, सी.ए. नीरजजी अग्रवाल, भाऊसाहेब जितेंद्र जैन, श्री. हरी आण्णा वाणी, श्री. प्रदीप अग्रवाल, श्री. विवेक भांडारकर, प्राचार्य प्रा. डॉ. एच. डी. जाधव, श्री. विनोद भांडारकर, प्रा. व्ही. बी. मांटे, श्री. निलेश भांडारकर, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, श्री. व्ही. एम. पाटील, श्रीमती एस. पी. बाविस्कर, श्री. दत्तात्रय पवार, श्री. एस. पी. वाघ, श्री. कैलास पाटील, श्री. आर. जे. पाटील, श्री. एस. एम. पवार तसेच सौ. पी. पी. जोशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते माँ सरस्वती, श्रीमंत प्रताप शेठजी, परमपूज्य सानेगुरुजी आणि श्रीमती द्रौपदीबाई भांडारकर यांच्या प्रतिमांचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून झाली. त्यानंतर वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.

यावेळी शाळेच्या नामफलकाची आकर्षक कलाकृती फुग्यांच्या माध्यमातून आकाशात झेपावण्यात आली. हा अनोखा क्षण पाहताच विद्यार्थीनींनी “वर्धापन दिन चिरायू होवो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला.

कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात शालेय प्रार्थनेने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी यांनी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. के. पी. सनेर आणि श्रीमती पी. डी. शेवाळे यांनी करून दिला.

प्रमुख अतिथींनी आपल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून विद्यार्थिनींना शिक्षण, संस्कार, कर्तृत्व आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व पटवून दिले. याच प्रसंगी शाळेच्या “फुलवात” या स्वलिखित वार्षिक अंकाच्या ८१ व्या अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

समारंभात एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थिनींसह आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविणाऱ्या क्रीडापटू विद्यार्थिनींचा स्मृतिचिन्ह, सुवर्णपदक, सन्मानपत्र आणि शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त सर्व विद्यार्थिनींना चिवडा व पेढ्यांचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन क्रीडा विभागप्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे यांनी केले, तर श्री. एस. पी. वाघ यांनी आभार मानले.

या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय समितीचे चेअरमन भाऊसाहेब जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, बक्षीस समिती प्रमुख श्रीमती पी. व्ही. साबे, सौ. व्ही. जे. पाटील, श्री. किरण पाठक तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

शाळेच्या ८२ वर्षांच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा हा वर्धापन दिन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरला.

सामाजिक वंचितांच्या प्रश्नांवर संशोधनाची मोहोर! प्रा. विजयकुमार वाघमारे यांना समाजकार्य विषयात पीएचडी पदवी

‘लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण’ या दुर्लक्षित पण अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील संशोधनाला यश

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी करत श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी संचलित पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, अमळनेर येथील सहायक प्राध्यापक प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत समाजकार्य विषयात यशस्वीरित्या पीएचडी पदवी संपादन केली आहे.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी डॉ. एस. जी. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन पूर्ण केले असून, त्यांच्या संशोधनाचा ऑनलाइन व्हायवा यशस्वीरीत्या पार पडला.

या परीक्षेसाठी प्रा. डॉ. रघुनाथ महाजन (बिलासपूर) यांनी चेअरमन म्हणून तर प्रा. डॉ. प्रतिभा मिश्रा (बिलासपूर) यांनी बाह्य मूल्यमापक म्हणून सहभाग नोंदविला. संशोधन मार्गदर्शक डॉ. सुदाम राठोड यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांनी “लैंगिक कामगार महिला : सामाजिक वंचितीकरण व सामिलीकरण” या समाजातील अत्यंत संवेदनशील, दुर्लक्षित आणि महत्त्वपूर्ण विषयावर सखोल संशोधन केले आहे. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या घटकांच्या सामाजिक वास्तवाचा अभ्यास करणारे हे संशोधन समाजकार्य क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटी, अमळनेरचे अध्यक्ष अभिजीत सुभाष भांडारकर, प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ, डॉ. पी. एस. पाटील यांच्यासह विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापक, राज्यभरातील सहकारी, विद्यार्थी, मित्रपरिवार आणि स्नेहींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रा. विजयकुमार वाघमारे यांच्या या उल्लेखनीय यशामुळे अमळनेरच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, समाजकार्य क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

पुराच्या संकटात मानवतेचा हात! रोटरी क्लब अमळनेरकडून हजारो प्रवाशांना अन्नसेवा वापी विभागातील पुरामुळे मार्ग बदललेल्या पटना–बांद्रा एक्स्प्रेसमधील १२०० प्रवाशांना रेल्वे स्थानकावर दिला दिलासा

 

अमळनेर (प्रतिनिधी) : वापी विभागात आलेल्या भीषण पुरामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, मार्ग बदलण्यात आल्याने ट्रेन क्र. २९७२ पटना–बांद्रा एक्स्प्रेस अमळनेर रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीत ट्रेनमधील सुमारे १००० ते १२०० प्रवाशांच्या जेवणाची तातडीने व्यवस्था करून रोटरी क्लब अमळनेरने आपल्या सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी परिचय दिला.

पुराच्या संकटामुळे अडकलेल्या प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अमळनेरमधील विविध सामाजिक संस्था मदतीसाठी धावून आल्या. त्यामध्ये रोटरी क्लब अमळनेरने अत्यंत तत्परतेने पुढाकार घेत प्रवाशांना अन्नसेवा उपलब्ध करून दिली.

क्लब अध्यक्ष रोटे. महेश पाटील तसेच सेक्रेटरी व उपनगराध्यक्ष रोटे. प्रशांत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने रेल्वे स्थानक अधीक्षक श्री. अनिल शिंदे व सी. एम. आय. श्री. पांडे यांच्या सहकार्याने, तसेच पश्चिम रेल्वेचे माजी ZRUCC सदस्य रोटे. प्रीतपालसिंग बग्गा यांच्या सूचनेने व विशेष प्रयत्नातून अन्नवाटपाची प्रभावी व्यवस्था उभी करण्यात आली.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत रोटरी क्लब अमळनेर आणि इतर सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे हा उपक्रम यशस्वी केला. संकटाच्या काळात सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत स्वयंसेवकांनी प्रवाशांची मनापासून सेवा केली.

या उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख रोटे. प्रीतपालसिंग बग्गा होते. त्यांच्यासह रोटे. अभिजीत भांडारकर, रोटे. कीर्ती कुमार कोठारी, रोटे. रोहित सिंघवी, रोटे. प्रतीक खंडेरिया, रोटे. धीरज अग्रवाल, रोटे. किशोर लुल्ला, रोटे. ईश्वर सेनानी, रोटे. राजेश बेदमुथा, रोटे. सनी कोठारी तसेच रोटरी क्लबच्या सर्व रोटेरियन सदस्यांनी अथक परिश्रम घेत उपक्रम यशस्वी केला.

या सेवाकार्यासाठी अमळनेरमधील नागरिक आणि विविध संस्थांचेही मोलाचे सहकार्य लाभले. संकटाच्या प्रसंगी समाजसेवेची परंपरा जपत रोटरी क्लब अमळनेरने पुन्हा एकदा मानवतेचा आदर्श घालून दिला.

चैतन्य संदानशिव हल्लाप्रकरण तापले; आरोपींच्या तात्काळ अटकेसाठी समाजबांधवांचा एल्गार! मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा; प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा, घोषणांनी अमळनेर दणाणले

 

अमळनेर | प्रतिनिधी

देवगाव-देवळी येथील स्टोन क्रशरवर काम करणारे चैतन्य राजेंद्र संदानशिव यांच्यावर झालेल्या कथित जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर शहर व तालुक्यातील समाजबांधवांनी गुरुवारी संताप व्यक्त करत प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाने महाराणा प्रताप चौक ते प्रांत कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

मोर्चादरम्यान आंदोलकांनी “पीडिताला न्याय मिळालाच पाहिजे”, “दोषींना तात्काळ अटक करा”, “मुख्य आरोपी अनंत निकमला त्वरित अटक करा” अशा जोरदार घोषणा देत प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी तसेच अमळनेर पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, कष्ट करून उदरनिर्वाह करणाऱ्या चैतन्य राजेंद्र संदानशिव यांना जातीवाचक शिवीगाळ करत तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना बेदम मारहाण करण्यात आली असून त्यांचा मित्र कल्पेश पाटील यालाही मारहाण करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रकरणाचा निष्पक्ष, जलद व सखोल तपास करण्याची मागणी केली. भारतीय न्याय संहितेतील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम अंतर्गत लागू असलेल्या सर्व कायदेशीर तरतुदींनुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यासोबतच पीडित आणि साक्षीदारांना आवश्यक सुरक्षा तसेच कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली.

मोर्चादरम्यान प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समाजबांधवांनी दिला.

यावेळी माजी नगरसेवक नरेंद्र रामभाऊ संदानशिव, नगरसेवक डॉ. डिंगबर महाले, नगरसेविका शोभाबाई गढरे, देवदत्त संदानशिव, अरुण घोलप, पंचशीला संदानशिव, कल्पना मोरे, दाजीबा गव्हाणे, सनी गायकवाड, तुषार संदानशिव, अरविंद संदानशिव, आकाश संदानशिव, योगेश बिऱ्हाडे, समाधान मैराळे, सुरेश कांबळे, अनिल ठाकूर, राहुल संदानशिव, संदीप गढरे, महेश संदानशिव, प्रमोद बिऱ्हाडे, जयेश पगारे, विवेक सांगोरे, संदीप वाघ, सचिन ढिवरे, शुभम घोलप, मनीष पाटील, करण साळुंखे, उमेश ढिवरे, संतोष साळवे, गोपीचंद चव्हाण, प्रल्हाद मोरे, सुनील संदानशिव, राजेंद्र संदानशिव, सुधाकर सोनवणे, संजय बिऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, आकाश गढरे, रमेश झाल्टे यांच्यासह असंख्य समाजबांधव व विविध समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘माझ्यावरील आरोप बिनबुडाचे’; माजी आमदार शिरीष चौधरींचे पत्रकार परिषदेत खंडन, आमदार अनिल पाटील यांच्यावर गंभीर आरोप

 

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेरचे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत स्वतःवरील विविध आरोपांचे ठामपणे खंडन करत, ते राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्यावरही गंभीर आरोप करत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

पत्रकार परिषदेत बोलताना शिरीष चौधरी यांनी, “माझ्याविरुद्ध करण्यात येणारे आरोप हे वस्तुस्थितीशी विसंगत असून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. राजकीय द्वेषातून माझी प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले जात आहे,” असा आरोप केला.

यावेळी त्यांनी आमदार अनिल पाटील यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत विकासकामे, प्रशासन आणि विविध स्थानिक मुद्द्यांवर गंभीर आरोप केले. तसेच जनतेसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठीच ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेनंतर अमळनेरच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, दोन्ही नेत्यांतील आरोप-प्रत्यारोपांमुळे स्थानिक राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

दरम्यान, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप हे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी मांडलेले दावे असून, संबंधित आरोपांवर आमदार अनिल पाटील यांची अधिकृत प्रतिक्रिया वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत उपलब्ध झाली नव्हती. त्यांची भूमिका प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल.

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याविरोधात अमळनेरमध्ये संताप; एन.मुक्टो.कडून काळ्या फिती लावून तीव्र निषेध

 

अमळनेर | प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदवित विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली.

महाविद्यालय परिसरात झालेल्या या आंदोलनात प्राध्यापकांनी सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत विद्यार्थ्यांवरील बलप्रयोगाचा निषेध केला. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी, “शांततापूर्ण आंदोलन करणे हा विद्यार्थ्यांचा घटनात्मक आणि लोकशाही अधिकार असून, त्यावर अशा प्रकारे निर्बंध आणणे किंवा दडपशाही करणे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारे आहे,” असे स्पष्ट मत व्यक्त केले.

तर एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील यांनी, “विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर हिंसात्मक कारवाई करणे ही अत्यंत निषेधार्ह बाब असून सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे सांगितले.

यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला.

या आंदोलनात एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डॉ. भगवान भालेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, प्रा. डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विद्यार्थ्यांवरील कारवाईविरोधात अमळनेरमध्ये झालेल्या या निषेध आंदोलनातून लोकशाही हक्कांचे संरक्षण आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याची मागणी जोरदारपणे करण्यात आली.

पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ‘विठू नामाचा गजर’; भक्तिरसात रंगली आषाढी एकादशीची दिंडी, रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष

 

अमळनेर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल येथे आषाढी एकादशीचा सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विठू नामाच्या अखंड गजराने संपूर्ण शाळा परिसर दुमदुमून गेला, तर दिंडी यात्रेने आणि रिंगण सोहळ्याने उपस्थितांना जणू पंढरपूरच्या वारीचाच आनंद अनुभवायला मिळाला.

सकाळच्या मंगलप्रहरी शाळेचा परिसर आकर्षक रांगोळ्या, पुष्पसजावट, कमानी आणि सुंदर मंचाने सजविण्यात आला होता. संपूर्ण परिसर भक्तिरसाने नटला होता. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत मुक्ताबाई तसेच विठू माऊली यांच्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडविले.

“ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” आणि “विठ्ठल… विठ्ठल…” या नामघोषांनी आसमंत दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शाळेत जणू चंद्रभागेच्या तीरावरील पंढरपूरची वारी अवतरल्याची अनुभूती सर्वांना आली.

कार्यक्रमातील सर्वाधिक आकर्षण ठरलेल्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले. दिंडी यात्रेतही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत विठ्ठलभक्तीचा संदेश दिला.

यावेळी पालखी पूजन मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी आणि पर्यवेक्षिका एम. एस. बारी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच दक्षा शर्मा हिने प्रतीकात्मक विठुरायाची भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारून उपस्थितांची वाहवा मिळविली.

या भक्तिमय उपक्रमासाठी मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षक महेश माळी, पर्यवेक्षिका मीनाक्षी बारी, प्रशांत वंजारी, व्ही. जी. बोरोले, अशोक महाजन, व्ही. एस. अमृतकर, एस. पी. पाटील, सविता पारधी, योगिशा महाजन, अनंत बागल तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित या भक्तिमय दिंडी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांचे विचार आणि भारतीय संस्कृतीचे संस्कार रुजविण्याचा सुंदर प्रयत्न यशस्वी ठरला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, भक्ती आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.

अमळनेर एसटी आगारात अत्याधुनिक ५ नव्या बसेस दाखल; आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण, प्रवाशांना मिळणार आधुनिक सुविधांचा प्रवास!

अमळनेर : अमळनेर एसटी आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशा ५ नव्या बसेसची भर पडली असून, माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजन करून या बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नव्या बसेसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक होणार असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

अशोक लेलंड कंपनीच्या या नवीन बसेस ३ बाय २ आसनरचनेच्या असून प्रत्येक बसमध्ये ५२ आसने उपलब्ध आहेत. प्रवाशांच्या सुविधांचा विचार करून बसमध्ये मोबाईल चार्जिंग पॉइंट, बसच्या आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे, माईक प्रणाली, बॅक कॅमेरा, एअर सस्पेन्शन तसेच बीएस-६ मॉडेलचे अत्याधुनिक इंजिन देण्यात आले आहे. त्यामुळे सुरक्षिततेसोबतच अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

अमळनेर आगाराने आणखी ५ नवीन बसेसची मागणी केली असून, त्या मंजूर व्हाव्यात यासाठी आमदार अनिल भाईदास पाटील प्रयत्नशील असल्याची माहिती देण्यात आली. यापूर्वीही त्यांच्या प्रयत्नांतून अमळनेर आगाराला ५ नवीन बसेस मिळाल्या होत्या. या नव्या बसेसच्या समावेशामुळे अमळनेर आगारातील एकूण बसेसची संख्या आता ७५ वर पोहोचली आहे.

लोकार्पणानंतर आमदारांनी केली बस सवारी

लोकार्पणानंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्त्यांसह नव्या बसमध्ये प्रवास करून बसेसची पाहणी केली. यावेळी उपस्थितांनी नव्या बसेसचे स्वागत करत आनंद व्यक्त केला.

पंढरपूर यात्रेसाठी एसटीला मोठी पसंती

सध्या पंढरपूर येथील विठ्ठल-रुख्मिणी आषाढी महोत्सवानिमित्त एसटी सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. दररोज ३ ते ४ बसेस पंढरपूरकडे रवाना होत असून, ग्रामीण भागातून ४० ते ४२ प्रवासी उपलब्ध झाल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र बसची व्यवस्था करण्यात येत आहे. या प्रवाशांना शासनाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी सवलतींचाही लाभ दिला जात आहे.

याशिवाय पंढरपूर यात्रेसाठी अमळनेर आगारातून १२ बसेस इतर आगारांकडे उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती आगार व्यवस्थापक राकेश शिवदे यांनी दिली.

लोकार्पण सोहळ्यास कामगार नेते एल. टी. पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, शहराध्यक्ष चेतन राजपूत, शेतकी संघ संचालक विक्रांत पाटील, पत्रकार किरण पाटील, एस. टी. मोरे, गौरव पाटील, आगार व्यवस्थापक राकेश शिवदे, कार्यशाळा अधीक्षक प्रमोद बाविस्कर, वाहतूक निरीक्षक मुकेश सैदाने, वरिष्ठ लिपिक तुषार पाटील, अकाऊंटंट अमोल पाटील तसेच एसटी अधिकारी, कर्मचारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”

 

अमळनेर : अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या स्व. अजितदादा पवार यांच्या शेतकरी रूपातील बैलगाडी हाकतानाच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रेरणा स्मारकाचे जयंतीनिमित्त लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले. या स्मारकाचे पूजन माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील म्हणाले की, “अजितदादांचे हे प्रेरणा स्मारक केवळ पुतळा नसून शेतकऱ्यांसाठी कष्ट, धैर्य, वक्तशीरपणा आणि विकासाची प्रेरणा देणारे केंद्र ठरेल. येणाऱ्या पिढ्यांनाही त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे हे स्मारक कायम प्रेरणादायी राहील.”

आमदार अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचे सभापती अशोक पाटील व संचालक मंडळाच्या पुढाकारातून हे स्मारक साकारण्यात आले आहे. शेतकरी रूपातील बैलगाडीवर स्वार असलेल्या अजितदादा पवार यांच्या प्रतिमेमुळे ग्रामीण जीवनाशी असलेली त्यांची नाळ अधोरेखित करण्यात आली आहे.

याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी बाजार समितीच्या वतीने ‘बळीराजा शेतकरी सेतू सुविधा केंद्र’ सुरू करण्यात आले. या केंद्रातून केवळ शासकीय शुल्कात विविध ऑनलाइन योजनांसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याचे उद्घाटनही आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमात सभापती अशोक पाटील म्हणाले की, “अजित पवार हे महाराष्ट्राच्या विकासाला दिशा देणारे नेतृत्व होते. त्यांच्या विचारातून आणि आमदार अनिल पाटील यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्याच्या विकासाला नवी गती मिळत आहे. त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे प्रेरणा स्मारक उभारण्यात आले आहे. तसेच बाजार समितीच्या बांधकामाधीन व्यापारी संकुलाला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याचाही मानस आहे.”

या सोहळ्यास सौ. जयश्री पाटील, अशोक पाटील, सुरेश पिरन पाटील, संभाजी पाटील, गणेश भामरे, सचिन पाटील, सुषमा देसले, भोजमल पाटील, समाधान धनगर, भाईदास भिल, डॉ. अनिल शिंदे, हिरालाल पाटील, शरद पाटील, प्रकाश अमृतकार, रणजित शिंदे, भागवत पाटील, चेतन राजपूत, प्रा. मंदाकिनी भामरे, रिता बाविस्कर, आशा चावरीया, अलका पवार, कविता पवार, शोभाताई गढरे, सुरेश विक्रम पाटील, एल. टी. पाटील, राजू फापोरेकर, जितू ठाकूर, विजय पाटील, मुख्तार खाटिक, हेमंत पवार, जितेंद्र झाबक, निलेश भांडारकर, अनिल अहिरराव, दिनेश शेलकर, अलीम मुजावर, गौरव पाटील तसेच सचिव डॉ. उन्मेष राठोड यांच्यासह अनेक पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रणजित शिंदे यांनी मानले. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच उभारण्यात आलेल्या या शेतकरी प्रेरणा स्मारकामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गातून या उपक्रमाचे स्वागत होत आहे.

Read More “अजितदादांचे शेतकरी प्रेरणा स्मारक’ अमळनेर कृउबात लोकार्पित; शेतकऱ्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे स्मारक ठरेल – आमदार अनिल पाटील”