ब्रेकिंग
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट

 

जळगाव : प्रतिनिधी

सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असून, डिजिटल युगात प्रत्येकाने सतर्क आणि सजग राहणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.

सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची माहिती देत अनोळखी व्यक्ती, लिंक, कॉल किंवा संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि OTP सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट करण्यात आले.

सायबर फसवणूक टाळण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून नागरिकांची जागरूकता आणि सतर्कता हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या उपक्रमासाठी कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.

यावेळी नागरिकांना क्विक हील फाउंडेशनच्या अँटी फ्रॉड ॲपविषयी माहिती देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेण्यात आले, तसेच त्याच्या उपयोगाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल व्यवहारांचा वाढता विस्तार लक्षात घेता सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची मालिका पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

जागरूक नागरिक — सुरक्षित समाज — सुरक्षित डिजिटल भारत! हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *