मयत सासऱ्यांच्या वाढदिवशी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ५० हजारांची मदत अर्चना सूर्यवंशी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी
अमळनेर : सामाजिक बांधिलकी जपत आपणही समाजाचे काही देणे लागतो, या भावनेतून पाळधी येथील सूर्या फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच पाळधी नोबल इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका डॉ. सौ. अर्चना प्रशांत सूर्यवंशी यांनी आपल्या दिवंगत सासऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजहिताचा आदर्श निर्माण केला आहे.
त्यांचे सासरे कै. भगवानराव सूर्यवंशी यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या दहाव्या व इतर कार्यक्रमांसाठी होणारा खर्च टाळून तोच निधी सामाजिक कार्यासाठी देण्याचा निर्णय डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी घेतला. कै. भगवानराव सूर्यवंशी यांच्या ८६व्या वाढदिवसानिमित्त आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक मदतीसाठी ५० हजार रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
यावेळी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांचे पती प्रशांत सूर्यवंशी, भरारी फाउंडेशनचे दीपकदादा परदेशी, रत्नाकर पाटील, पर्यावरणप्रेमी वसंत पाटील यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विशेष कौतुक केले. वाढदिवस अथवा कौटुंबिक कार्यक्रमांवरील खर्चाला सामाजिक कार्याची जोड देत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करणे ही निश्चितच प्रेरणादायी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी डॉ. अर्चना सूर्यवंशी यांनी “समाजहितासाठी आम्ही सदैव सोबत राहू”, असे आश्वासन दिले. त्यांच्या या उपक्रमातून दिवंगत व्यक्तीच्या स्मृती जपत समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या भवितव्याला हातभार लावण्याचा संवेदनशील संदेश देण्यात आला आहे.
