अमळनेरच्या वाडी संस्थानचा तातडीने तीर्थक्षेत्र विकासच्या माध्यमातून प्रस्ताव शासनाकडे मागवा आमदार अनिल पाटील यांनी वाडी संस्थानच्या आगीबाबत वेधले शासनाचे लक्ष
अमळनेर येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थानला लागलेल्या आगीच्या दुर्दैवी घटनेबाबत माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आज विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत प्रश्न मांडून सभागृह तथा महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधले.
अमळनेर शहरात प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे व सुमारे 250 वर्षांची परंपरा असलेले श्री संत सखाराम महाराज वाडी संस्थान उत्तर महाराष्ट्रात प्रचलित असून संस्थानचे गादीपती संत सखाराम महाराज वर्षभर वारकरी संप्रदायाचा झेंडा महाराष्ट्रभर फिरवीत असतात.
याच पवित्र वाडी मंदिरात दिनांक 1जुलै च्या रात्री आगीची दुर्दैवी घटना घडली असून यात मंदिरातील सुमारे 250 वर्षाचे गाभाऱ्याचे वैभव जळून नष्ट झाले आहे.सुदैवाने मंदिर व देव सुरक्षित राहिले आहेत.तरी देखील सुमारे 15 कोटी पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.या घटनेमुळे मंदिर दर्शनासाठी काही दिवस बंद करण्यात आले आहे.
परंतु याच महिन्यात 25 जुलै रोजी पंढरपूर येथील आषाढी महोत्सव असून अमळनेरचे हे वाडी मंदिर प्रति पंढरपूर म्हणून प्रचलित असल्याने आषाढीला हजारो भाविक विठ्ठल रुखमाई च्या दर्शनासाठी येत असतात.त्यामुळे लवकरात लवकर या मंदिराचे पुनरूज्जीवन होणे आवश्यक आहे.
मंदिर संस्थानचे झालेले नुकसान,आणि भाविकांची असलेली अपार श्रद्धा लक्षात घेता.मंदिर संस्थानची तातडीने पुनर्बांधणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी याचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर पुर्ण करून पर्यटन विकास विभागाच्या माध्यमातून याचा तातडीने तीर्थक्षेत्र विकास मध्ये समावेश करावा आणि तसा प्रस्ताव शासनाकडे तातडीने मागवावा अशी विनंती आ.अनिल पाटील यांनी केली.


