प्रतापच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात दिमाखदार निवड; एकूण ११ विद्यार्थ्यांनी फडकवला यशाचा झेंडा!
अमळनेर | प्रतिनिधी
खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील करिअर काउन्सेलिंग सेंटरने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. केंद्राच्या आणखी चार विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, यापूर्वी निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांसह आता एकूण ११ विद्यार्थ्यांनी मुंबई पोलीस दलात स्थान मिळवत महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामुळे प्रताप महाविद्यालयासह संपूर्ण अमळनेर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, करिअर काउन्सेलिंग सेंटरच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला यामुळे मोठी दाद मिळाली आहे.
मुंबई पोलीस दलात निवड झालेले विद्यार्थी
मयुर भगवान पाटील
अविनाश विकास पाटील
मंगलेश सुनील पाटील
विकास इंदल बेहरे
या यशाबद्दल खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष सीए नीरज अग्रवाल, कार्योपाध्यक्ष जितेंद्र जैन, चिटणीस प्रा. पराग पाटील, सहचिटणीस डॉ. व्ही. बी. मांटे, प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, उपप्राचार्य डॉ. अशोक पाटील, करिअर काउन्सेलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे, कुलसचिव राकेश निळे, कार्यालयीन अधीक्षक देवेंद्र कांबळे, डॉ. धनंजय चौधरी, डॉ. निलेश पवार, डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. कैलास निळे, डॉ. माधव भुसनर, डॉ. प्रमोद चौधरी, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. विजय साळुंखे, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, डॉ. विवेक बडगुजर, तसेच करिअर काउन्सेलिंग सेंटरचे दिलीप शिरसाठ, पराग रविंद्र पाटील आणि अतुल धनगर यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवाभावी आणि उज्ज्वल कारकिर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
प्रताप महाविद्यालयाच्या करिअर काउन्सेलिंग सेंटरने अल्पावधीतच स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत विद्यार्थ्यांना सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून दिले असून, या यशामुळे भविष्यातही अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे.

