ब्रेकिंग
‘मेघदूत’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या उत्कट प्रतिभेचा अद्वितीय आविष्कार : दिनेश नाईक साहित्य भारतीच्या पुढाकारातून सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ विषयावरील प्रेरणादायी व्याख्यान संपन्न

 

अमळनेर | प्रतिनिधी

संस्कृत साहित्याची समृद्ध परंपरा ही भारतीय संस्कृतीची अमूल्य ओळख असून, महाकवी कालिदास यांनी आपल्या विलक्षण प्रतिभेने या परंपरेला जागतिक स्तरावर मानाचे स्थान मिळवून दिले. ‘मेघदूत’ हे महाकाव्य म्हणजे त्यांच्या उत्कट प्रतिभेचा, कल्पनाशक्तीचा आणि निसर्गप्रेमाचा सर्वोच्च आविष्कार आहे, असे प्रतिपादन साहित्य भारतीचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश नाईक यांनी केले.

महाकवी कालिदास दिनानिमित्त सावित्रीबाई फुले महाविद्यालय, अमळनेर येथे ‘महाकवी कालिदास – जीवन व कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी. एम. कोळी होते. या कार्यक्रमाचे आयोजन साहित्य भारती, अमळनेर शाखेच्या वतीने करण्यात आले.

आपल्या व्याख्यानात दिनेश नाईक यांनी सांगितले की, महाकवी कालिदास यांनी कठोर साधना, अभ्यास आणि प्रतिभेच्या जोरावर संस्कृत साहित्यात अजरामर स्थान प्राप्त केले. त्यांच्या साहित्यामध्ये निसर्गाचे रमणीय सौंदर्य, पर्वत, नद्या, ऋतू, प्रेम, शृंगार, मानवी भावना आणि तत्कालीन समाजजीवनाचे अत्यंत जिवंत व प्रभावी चित्रण आढळते. त्यांच्या साहित्याची सोप्या पण प्रभावी शब्दरचनेमुळे आणि विलक्षण कल्पनाशक्तीमुळे आजही जगभरातील वाचकांना भुरळ पडते.

ते पुढे म्हणाले की, महाकवी कालिदास यांनी दोन महाकाव्ये, दोन खंडकाव्ये आणि तीन नाटके अशी सात अजरामर साहित्यकृती निर्माण केल्या. त्यापैकी ‘मेघदूत’ हे महाकाव्य त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. त्यांच्या साहित्याचे जगातील अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले असून भारतीय साहित्याचा गौरव जगभर पोहोचविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विविध विषयांवरील दर्जेदार साहित्याचे नियमित वाचन करून आपले ज्ञान, विचारक्षमता आणि व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक साहित्य भारती अमळनेर शाखेचे अध्यक्ष प्रा. नरेंद्र सोनवणे यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य पी. एम. कोळी यांनी अशा साहित्यिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगितले. वाचन, लेखन आणि प्रभावी संवाद कौशल्ये ही आधुनिक युगातील यशाची गुरुकिल्ली असून विद्यार्थ्यांनी ती आत्मसात करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले, तर सुनिल वाघ यांनी आभार मानले.

या प्रसंगी साहित्य भारतीचे विवेक जोशी, मंगेश काळकर, सारंग गर्गे, महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *