जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 22 minutes ago
सायबर सुरक्षेचा संकल्प; सारा मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये विशेष जनजागृती
Featured general Latest- Est 1 min
- 0 Views
- 27 minutes ago
महत्वाच्या
घडामोडी
सर्वाधिक वाचक
बातम्या
स्मिताताई वाघ यांना सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न’ पुरस्कार प्रभावी संसदीय कामगिरीची दखल; दिल्लीतील सोहळ्यात सन्मान
अमळनेर: जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना त्यांच्या प्रभावी संसदीय कामगिरीची दखल घेत सलग दुसऱ्यांदा ‘संसद रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
खासदार स्मिताताई वाघ यांनी लोकसभेत जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडत मतदारसंघाच्या विकासासाठी सक्रिय भूमिका बजावली आहे. संसदेत उपस्थित केलेले प्रश्न, विकासकामांसाठी केलेला पाठपुरावा तसेच जनहितासाठी घेतलेल्या विविध मुद्द्यांची दखल या पुरस्काराच्या माध्यमातून घेण्यात आली.
मार्गदर्शन, विश्वासाबद्दल कृतज्ञता
पुरस्कार स्वीकारल्यानंतर खासदार वाघ यांनी आपल्या यशामागे मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल आणि विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते, सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
सलग दुसऱ्यांदा मिळालेला हा पुरस्कार जनतेने दिलेल्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा असून, भविष्यातही मतदारसंघातील प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रेरणा मिळाल्याचे खासदार स्मिताताई वाघ यांनी सांगितले.
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे प्रथमच आयोजन : तीन दिवसीय सोहळ्याची ‘मंगलमय’ वातावरणाने सांगता आमदार अनिलदादा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांचीही लाभली उपस्थिती
अमळनेर : येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेल्या श्री मंगळग्रह देवांच्या परम पवित्र तीन दिवसीय भव्य महारुद्र पूजेची आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास भक्ती, चैतन्य आणि मंगलमय वातावरणात पूर्णाहुतीने सांगता झाली.
यावेळी आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम व सहाय्यक निरीक्षक शरद काकळीज यांच्यासह आणि समाजातील विविध पक्ष, संस्था, संघटना, समाजांचे अनेक पदाधिकारी, सदस्य, विविध महिला मंडळांच्या पदाधिकारी, सदस्या यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते. प्रधान आचार्य तथा वेदमूर्ती श्री. केशव पुराणिक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रकल्याण, संरक्षण, समृद्धी तसेच संस्थेच्या विविध संकल्पपूर्तीनिमित्त हा भव्य महारुद्र अभिषेक पूजा सोहळा आयोजित करण्यात आला.
मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सौ. आशाताई महाले या विशेष धार्मिक सोहळ्याचे यजमान होते. त्यांच्या शुभहस्ते या तीन दिवसीय परम पवित्र भव्य महारुद्र अभिषेक पूजेचे अनुष्ठान कार्य झाले. आज शुक्रवार, दि. ११ सप्टेंबर रोजी या भव्य महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी सकाळी साडेनऊच्या सुमारास सर्व स्थापित देवतांची पूजा झाली. ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडलावर’ भगवान महादेवांची व श्री मंगळग्रह देव, भूमिमाता, पंचमुखी हनुमानजी यांनाही आवाहन करत त्यांची स्थापना करण्यात आली. त्यानंतर अरणीमंथन करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला. नवग्रह रुद्र स्थापन करून त्यांचे हवन झाले. प्रधान देवता श्री मंगळग्रह देव व भगवान महादेव वांच्याप्रीत्यर्थ रुद्राच्या १२१ आवर्तनांनी हवन (अंदाजे २००० आहुत्या) यज्ञात टाकण्यात आल्या. भगवान शंकरांच्या जल्लोषपूर्ण तांडवस्तोत्राने पूर्णाहुतीसाठीची वातावरणनिर्मिती झाली. त्यानंतर विशेष हवन, बलिदान व पूर्णाहुती झाली. पूर्णाहुतीनंतर महाआरती, मंत्रपुष्पांजली झाली. त्यानंतर पुरोहितांनी फडकत्याचालीवर शिवशंकरांचे संगीताच्या साथीने भक्तीगित म्हटले. त्यावर डॉ. डिगंबर महाले व त्यांच्या धर्मपत्नी सी. आशाताई महाले, आमदार अनिलदादा पाटील व त्यांच्या धर्मपत्नी सौ. जयश्रीताई पाटील यांच्यासह उपस्थित भाविकांनी नृत्याचा आनंद घेतला. भक्तीमय, चैतन्यमय आणि मंगलमय वातावरणात अतिशय जल्लोषपूर्ण या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. रात्री उशिरापर्यंत भाविकांनी दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला. सदर तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेसाठी वेदमूर्ती व्यंकटेश कळवे गुरुजी, सारंग पाठक, शुभम वैष्णव, प्रसाद भंडारी, परशुराम शर्मा, पवन शर्मा, यश जोशी, चंद्रकांत जोशी, तुषार दीक्षित, जयंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी, वैभव लोकाक्षी, गणेश जोशी, विनोद पाठक, दिव्येश जोशी, शैलेश जोशी, उमेश पंचभाई, निलेश रोडे, हेमंत गोसावी यांच्यासह अयोध्या व प्रयागराज येथून खास निमंत्रित गौरव मिश्रा, सूरज मिश्रा, मनजीत मिश्रा व हरिओम शुक्ल यांनी पौरोहित्य केले. त्यांना उमेश पाठक, प्रवीण भंडारी व चेतन नाईक यांच्यासह मंदिरातील सेवेकऱ्यांनी सहकार्य केले. मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, डी. ए. सोनवणे यांच्यासह मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, व्ही. व्ही. कुलकर्णी, उमाकांत हिरे, बाळा पचार, पुषंद ढाके आदींनी परिश्रम घेतले
आमदार अनिलदादांकडून टाळ वादन सेवा
श्री मंगळग्रह मंदिरात आयोजित तीन दिवसीय परम पवित्र महारुद्र अभिषेक पूजेच्या पूर्णाहुतीपूर्वी दुपारी आमदार अनिलदादा पाटील ‘अष्टोत्तरशत लिंगतो भद्र मंडल स्थानी काही वेळ बसले. यावेळी वाद्यवृंदाच्या साथीत म्हटल्या गेलेल्या श्री मंगळग्रह देव आणि भगवान शंकर यांच्या स्तुतीपर भजनांवर टाळ वादन करीत मंत्रमुग्ध होऊन साथसंगत केली. याप्रसंगी उपस्थित असंख्य भाविकांनीही या स्तुतीपर भजनांचा आत्मानंद घेतला.
जागरूक नागरिक, सुरक्षित डिजिटल भारत! जळगावात सायबर अवेअरनेस इम्पॅक्ट
जळगाव : प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाईत जागरूक नागरिक हीच सर्वात मोठी ताकद असून, डिजिटल युगात प्रत्येकाने सतर्क आणि सजग राहणे गरजेचे आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश ब्राह्मण सभागृह येथे आयोजित सायबर सिक्युरिटी अवेअरनेस इम्पॅक्ट कार्यक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमात सायबर वॉरियर विद्या विशाल सोनवणे आणि साक्षी तानाजी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना सायबर सिक्युरिटी, ऑनलाइन फ्रॉड आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले. वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना फसविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध पद्धतींची माहिती देत अनोळखी व्यक्ती, लिंक, कॉल किंवा संदेशांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि OTP सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व उपस्थितांना स्पष्ट करण्यात आले.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी केवळ तंत्रज्ञानाचा वापर पुरेसा नसून नागरिकांची जागरूकता आणि सतर्कता हीच डिजिटल सुरक्षेची पहिली पायरी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या उपक्रमासाठी कार्यालय सचिव गणेश भगवान माळी यांनी मोलाचे सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रम डॉ. आर. बी. आमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडला.
यावेळी नागरिकांना क्विक हील फाउंडेशनच्या अँटी फ्रॉड ॲपविषयी माहिती देण्यात आली. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांच्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड करून घेण्यात आले, तसेच त्याच्या उपयोगाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
डिजिटल व्यवहारांचा वाढता विस्तार लक्षात घेता सायबर सुरक्षेचा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे. नागरिकांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करून सुरक्षित डिजिटल वातावरण निर्माण करण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची मालिका पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
जागरूक नागरिक — सुरक्षित समाज — सुरक्षित डिजिटल भारत! हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे देण्यात आला.

