ब्रेकिंग
कर्तबगार महिलांचा सन्मान यावर्षी तरी होणार का? दोन वर्षांपासून रखडलेले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार तातडीने वितरित करण्याची मागणी

 

 

प्रतिनिधी | अमळनेर 

ग्रामीण भागातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानासाठी सुरू करण्यात आलेला *“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार”* गेल्या दोन वर्षांपासून रखडल्याने महिलांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यावर्षी तरी रखडलेले सर्व पुरस्कार थाटामाटात वितरित करून ग्रामीण महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी खानदेश साहित्य संघाचे जिल्हा उपाध्यक्ष डी. ए. धनगर यांनी केली आहे.

महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने 9 मे 2023 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत व गटपंचायत क्षेत्रातील दोन कर्तबगार महिलांचा *31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त* सन्मान करण्याचे निश्चित करण्यात आले होते.

या पुरस्कारांतर्गत महिलांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ आणि प्रति महिला 500 रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येत होते. 31 मे 2023 रोजी राज्यभरातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये महिलांचा गौरवही करण्यात आला होता. मात्र त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे पुढील दोन वर्षांचे पुरस्कार रखडले.

विशेष म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरही शासनाने या विषयाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. रखडलेल्या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने हजारो ग्रामीण महिलांवर अन्याय झाला असून शासन निर्णयाचाही अनादर झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डी. ए. धनगर यांनी म्हटले आहे की, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी आपण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजऱ्या करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान होणेही तितकेच आवश्यक आहे.

यावर्षी तरी 2024, 2025 आणि 2026 या तीन वर्षांचे मिळून प्रत्येकी दोन अशा एकूण सहा कर्तबगार महिलांना पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. राज्यातील हजारो ग्रामपंचायतींसाठी हा महत्त्वाचा प्रश्न बनला असून शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

आखाजीच्या पारंपरिक सणाला सामाजिक जाणीवेची जोड : अमळनेरमध्ये होतकरू विद्यार्थ्याचा घरगुती सत्कार

 

अमळनेर : “आज उना आखजिना सन… त्याले दीना आम्ही आहेरना मान!” या पारंपरिक ओळींना साजेसा सामाजिक उपक्रम अमळनेर शहरात पाहायला मिळाला. आखाजीच्या पावन निमित्ताने अमळनेर नगरीचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम यांच्या पुढाकारातून होतकरू विद्यार्थ्यांचा घरगुती सत्कार करून एक प्रेरणादायी संदेश देण्यात आला.

अमळनेर तालुक्यातील पैलाड येथील उदय अरुण सोनार या गुणवंत विद्यार्थ्याने एमपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत मंत्रालयात नियुक्ती मिळवली असून सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत आहेत. याचबरोबर ते यूपीएससी परीक्षेची तयारीही करत आहेत. त्यांच्या या यशाचा गौरव करत आखाजीच्या पारंपरिक ‘आहेर’ पद्धतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी श्री. प्रशांत निकम, नगरसेवक श्री. पंकज भोई तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते उदय सोनार यांचा सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, उदय यांच्या यशामागील प्रेरणास्थान असलेल्या त्यांच्या मातोश्रींचाही समाजसेवक श्री. मनोहर निकम यांच्या हस्ते सन्मान करून ‘मातेचा गौरव’ ही सुंदर परंपरा जपण्यात आली.

कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. मनोहर निकम यांनी केली. त्यानंतर श्री. प्रशांत निकम, श्री. कैलास भोई, वानखेडे सर आणि लांडगे मॅडम यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक केले व अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. सत्कारमूर्ती उदय सोनार यांनी आपल्या भावना व्यक्त करत सर्वांचे आभार मानले व आगामी यूपीएससी वाटचालीसाठी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

या उपक्रमाबाबत समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुक व्यक्त करण्यात आले. होतकरू आणि गुणी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जावेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यक्रमाला अमळनेर शहराचे उपनगराध्यक्ष श्री. प्रशांत निकम, श्री. पंकज भोई, समाजसेवक श्री. मनोहर निकम, श्री. हिरामण कणखरे, प्रा. श्री. गणेश पवार, भूषण भदाणे, महेश पाटील, चंदू वानखेडे, विजय वानखेडे, गौतम मोरे सर, जयवंतराव पाटील, नरसिंहराव वाघ, दशरथ लांडगे, कैलास भोई, बाळू बिराडे, विश्वासराव पाटील सर तसेच पतंजली महिला ग्रुपच्या सदस्यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच, पारंपरिक आखाजी सणाला सामाजिक भानाची जोड देत विद्यार्थ्यांच्या यशाचा सन्मान करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळाला हक्काचा मंच : पातोंडा येथे कला व कार्यानुभव प्रदर्शन उत्साहात संपन्न

 

पातोंडा : जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा, पातोंडा येथे आयोजित करण्यात आलेले विद्यार्थी निर्मित कला व कार्यानुभव प्रदर्शन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडले. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम आविष्कार घडवणाऱ्या या प्रदर्शनाने उपस्थितांची मनं जिंकली.

या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा, पातोंडा येथील मुख्याध्यापिका सौ. सुनीता प्रदीप लोहारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. यामध्ये सौ. प्रियंका शिंदे, सौ. वैशाली सोनवणे, श्रीमती सुषमा तायडे, सौ. छाया इसे तसेच श्री. स्वप्नील शिंदे व सागर भोई यांचा समावेश होता. शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक कलाकृती, हस्तकला साहित्य, तसेच कार्यानुभवावर आधारित प्रकल्प सादर केले. रंग, कल्पकता आणि कौशल्य यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला मिळालेल्या या व्यासपीठाचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले.

यावेळी मुख्याध्यापिका सौ. सुनीता लोहारे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची अत्यंत गरज आहे. यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि आत्मविश्वास वाढतो.”

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रीमती सुषमा तायडे व सौ. छाया इसे यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाली असून शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना नवे बळ मिळाले आहे.

एकूणच, या प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देत त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पदी श्रीकांत ढिवरे यांनी स्वीकारला पदभार

 

 जळगाव : मावळते मा. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना निरोप देण्यात आला असून, त्यांच्या कार्यकाळातील उल्लेखनीय व उत्कृष्ट कामगिरीबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. तसेच, नवनियुक्त मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांच्या नेतृत्वाखाली जळगाव पोलीस दल अधिक सक्षम व गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. दोन्ही अधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!

अमळनेरात सराफ बाजारातील घराला लागली आग 

 अमळनेर :- येथील सराफ बाजार येथे दिनांक 20 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास संजय मंगलचंद कोठारी यांच्या कापड दुकानावरील घराला अचानक आग लागली असता नागरिकांनी अग्निशमन दलास कळविले. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवून आग विझविली आणि पुढील अनर्थ टळला. ही आग तिसऱ्या मजल्या वरील घराला लागल्यामुळे तसेच खाली कापड दुकान असल्यामुळे मोठा अनर्थ झाला असता मात्र नगरसेवक गोपी कासार, सुरज परदेशी यांनी तात्काळ अग्निशमन दलास संपर्क केला.

                    आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन अधिकारी गणेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी दिनेश बिऱ्हाडे, फारुख शेख, जफर पठाण, मच्छिंद्र चौधरी, आकाश संधनशिव, लखन कंखरे, भिका संदनशिव, तसेच स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले.

                   आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटने आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.