सामाजिक समतेचे खरे पुरस्कर्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर – राकेश जगताप युवा कल्याण प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
अमळनेर : समाजातील अन्यायकारक रूढी-परंपरांविरुद्ध संघर्ष करणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सर्व भारतीयांना समान हक्क व न्याय मिळवून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक समतेचे खरे व कट्टर पुरस्कर्ते होते, असे प्रतिपादन पंजाब नॅशनल बँक, अमळनेरचे व्यवस्थापक राकेश जगताप यांनी केले.
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेर यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी प्रा. डॉ. राहुल निकम आणि प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी विद्यार्थी व शिक्षकांना “निबंध कसा लिहावा?” याविषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच अर्बन बँकेचे संचालक तथा माजी व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसाठी आर्थिक सहकार्य जाहीर केले. अशोक बिऱ्हाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिशा संदानशिव, भारती कोळी, माधुरी पाटील आणि डी. ए. पाटील यांनी महात्मा फुले यांच्यावरील गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी केले, तर सूत्रसंचालन डी. ए. पाटील यांनी केले.
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेच्या मोठ्या गटात पुणे, मुंबई, अमरावती, जळगाव, धुळे आदी जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणावर निबंध प्राप्त झाले होते. विशेष म्हणजे शिक्षकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर लहान गटात अमळनेर तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
मोठ्या गटातील विजेते
प्रथम क्रमांकाचे १,००० रुपयांचे बक्षीस (आबासाहेब व.ता. पाटील यांच्या स्मरणार्थ, प्रायोजक – नगरसेविका प्रा. योगिताताई कापडणेकर) शुद्धोधन मिलिंद बागुल (धुळे)यांना प्रदान करण्यात आले.
द्वितीय क्रमांकाचे ७५० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – योगराज (बाळासाहेब) संदानशिव) रुद्राणी विनोद राव राऊत (अमरावती) यांना मिळाले.
तृतीय क्रमांकाचे ५०० रुपयांचे बक्षीस (प्रायोजक – चिंधु वानखेडे) पल्लवी जगतराव शिंदे (हातेड) यांना प्रदान करण्यात आले.
उत्तेजनार्थ पुरस्कार संगीता विलास बाविस्कर (शिक्षिका, एन. टी. मुंदडा हायस्कूल, अमळनेर) व तरन्नुम मन्सूर शेख (शिक्षिका, जी. एस. हायस्कूल, अमळनेर) यांना देण्यात आले.
लहान गटातील विजेते
प्रथम क्रमांक – रोहिणी समाधान भोई (इयत्ता ११ वी विज्ञान, आश्रम शाळा, गडखांब)
द्वितीय क्रमांक – डिंपल कपिल पाटील (गडखांब)
तृतीय क्रमांक – आरोही राकेश गोसावी (इयत्ता ६ वी, भगिनी मंडळ आदर्श प्राथमिक शाळा, अमळनेर)
उत्तेजनार्थ पुरस्कार – पियुष राजेंद्र मोरे (गडखांब) व मिताली विवेक गोसावी (स्वामी विवेकानंद स्कूल, अमळनेर)
सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तके व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. ही सर्व बक्षिसे युवा कल्याण प्रतिष्ठान यांच्यातर्फे देण्यात आली.
या समारंभाला चेतन जाधव, बापूराव ठाकरे, अजय भामरे, प्रा. उषा देवरे, हृदयनाथ मोरे, पुरुषोत्तम माळी, हरिश्चंद्र कढरे, राकेश गोसावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रम विठ्ठल नगर येथील अभ्यासिकेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


